Newsworldmarathi Pune : पंढरपूर वारीदरम्यान जेजुरी पालखी मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून, ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जेजुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या महिला वारकरी मार्गक्रमण करत असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या भीषण धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला जखमी झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेनंतर पालखी मार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, प्रशासनाकडून पुढील तपासानंतर अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे.


Recent Comments