LATEST ARTICLES

भाऊसाहेब रंगारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १,५०० विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप

0
Newaworldmarathi Pune: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने क्रांतीसूर्य भाऊसाहेब रंगारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ दापोली, भीमाशंकर, सातारा, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील सुमारे १,५०० विद्यार्थ्यांना होणार आहे. या कार्यक्रमात जागतिक विक्रमवीर आहान मोदी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व सायली नंदकिशोर अगावणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. अवघ्या ५ वर्षे ८ महिन्यांच्या वयात आहान मोदी याने २ मिनिटे ४९ सेकंदांत १९७ राष्ट्रध्वजांची नावे अचूक ओळखून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच तो जगातील सर्व देश, त्यांच्या राजधान्या आणि नकाशावरील त्यांचे स्थान अचूक सांगू शकतो. सायली अगावणे या कथक आणि वेस्टर्न नृत्यांगना असून डाऊन सिंड्रोम तसेच शारीरिक व मानसिक अडचणींवर मात करत त्यांनी स्वतःच्या जिद्दीने विशेष मुलांसाठी प्रेरणादायी कार्य उभे केले आहे. त्या स्वतःसारख्या विशेष मुलांना नृत्य आणि योगाचे प्रशिक्षण देतात. ट्रस्टच्या वतीने आहान मोदी आणि सायली अगावणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संजय घनाटे (उपाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा, तेलंगणा), विजयकुमार सिंग (निवृत्त निबंधक, एनआयटी, कोलकाता), श्रीमती शिखा दरबारी (निवृत्त आयकर आयुक्त, नवी दिल्ली) आणि राम सरोदे (अध्यक्ष, युवा मोर्चा, भावसार समाज) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, सचिव दिलीप आडकर, विश्वस्त मिलिंद डफळ तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कात्रज पंपिंग स्टेशन टँकर भरणा केंद्रावरून वाहतूक कोंडीचा मुद्दा ऐरणीवर; नगरसेवक व्यंकोजी खोपडेंचा महापालिकेला जाब

0
Newsworldmarathi Pune कात्रज पंपिंग स्टेशन चौकात प्रस्तावित नवीन टँकर भरणा केंद्रामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य वाहतूक कोंडीचा मुद्दा पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत चांगलाच गाजला. या संदर्भात नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करत महापालिका प्रशासनाला थेट जाब विचारला. व्यंकोजी खोपडे यांनी सांगितले की, संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसमवेत टँकर भरणा केंद्राच्या प्रस्तावित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिक आणि परिसरातील रहिवाशांकडून या केंद्राला तीव्र विरोध असल्याचे निदर्शनास आले. टँकरच्या सततच्या ये-जा, वाढणारी वाहतूक आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कोंडीचा नागरिकांना मोठा त्रास होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने यावर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला. यावर उत्तर देताना महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, टँकर भरणा केंद्र उभारण्यापूर्वी वाहतूक पोलिस आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी केली जाणार आहे. तसेच वाहतुकीवर कोणताही अतिरिक्त ताण येणार नाही, याची काळजी घेत कमी वर्दळीच्या रस्त्यालगतच हे टँकर भरणा केंद्र उभारले जाईल. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि वाहतूक सुरळीत राहील, यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही प्रशासनाकडून सभागृहात स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, नागरिकांच्या भावना आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, अशी भूमिका नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी सभागृहात मांडली. या विषयावर महापालिकेने योग्य नियोजन करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

काळेपडळमधील दूषित पाणीप्रश्नी नगरसेवक निवृत्ती (आण्णा) बांदल आक्रमक; महापालिका सभागृहात तातडीच्या कारवाईची मागणी

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहरातील काळेपडळ परिसरात ड्रेनेज लाईनमधील सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याच्या गंभीर समस्येचा मुद्दा नगरसेवक निवृत्ती आण्णा बांदल यांनी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. या समस्येमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे सभागृहात निदर्शनास आणून देण्यात आले. या संदर्भात नगरसेवक निवृत्ती (आण्णा) बांदल यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली. दूषित पाणीपुरवठ्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असून नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काळेपडळ परिसरातील नागरिकांकडून सातत्याने दूषित पाण्याबाबत तक्रारी येत असून, ड्रेनेज आणि जलवाहिन्यांमधील बिघाडामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून दोषी यंत्रणा दुरुस्त करावी तसेच नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. सभागृहात हा विषय मांडताना नगरसेवक निवृत्ती (आण्णा) बांदल यांनी नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे ठामपणे सांगितले. तसेच या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांच्या भावना तीव्र होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणाकडे आता महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि काळेपडळ परिसरातील दूषित पाण्याचा प्रश्न किती लवकर मार्गी लागतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पुणे विद्यापीठातील गैरकारभारावर वंदे मातरम् विद्यार्थी संघटनेचा हल्लाबोल; ७ दिवसांत उत्तर न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

0
Newsworldmarathi Pune सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध प्रशासकीय त्रुटी, पारदर्शकतेचा अभाव आणि विद्यार्थ्यांशी संबंधित गंभीर प्रश्नांवर वंदे मातरम् विद्यार्थी संघटनेने कुलगुरूंना निवेदन देत ७ दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. अन्यथा विद्यापीठ परिसरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. संघटनेने मेसमधील अन्नाची गुणवत्ता व स्वच्छता, बी.कॉम. अंतिम वर्षाच्या निकालातील कथित त्रुटी, लेखापरीक्षणात चर्चेत आलेल्या ₹३०० ते ₹३५० कोटींच्या व्यवहारांची माहिती, तसेच पावसामुळे उत्तरपत्रिका भिजल्याच्या घटनेबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित या सर्व प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक मुद्द्यावर तथ्याधारित लेखी उत्तर देणे, आवश्यक ठिकाणी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती नेमणे, चौकशी अहवाल सार्वजनिक करणे आणि मेसमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून प्रशासनातील विविध बाबींवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत असल्याने विद्यापीठाने पारदर्शक भूमिका घ्यावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. ७ दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर आणि आवश्यक कार्यवाही न झाल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्यास विद्यापीठ प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा वंदे मातरम् विद्यार्थी संघटनेने दिला आहे.

प्रभाग २५ मधील पावसाळी जलवाहिन्यांची अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करा; प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

0
Newsworldmarathi Pune: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २५ मधील विविध भागांत पावसाळी जलवाहिन्यांच्या स्वच्छतेचा प्रत्यक्ष आढावा दौरा आयोजित करण्यात आला होता. मुसळधार पावसात या प्रभागातील अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत असल्याने, तातडीने स्वच्छता व सफाईची कामे पूर्ण करण्याच्या सूचना विश्रामबाग वाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या प्रभागातील विविध समस्यांच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त मा. माधव जगताप यांच्यासह विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या पाहणी दौऱ्यादरम्यान कचऱ्याचे क्रोनिक स्पॉट पूर्णपणे बंद करणे, ड्रेनेज सुधारणा, अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणे, नदीपात्र सीमाभिंत बांधणे, रस्त्यांचे समपातळीकरण करणे, बंद पथदिवे दुरुस्त करणे आणि ठिकठिकाणी साचलेला राडारोडा तातडीने उचलणे, याबाबत प्रशासनाला सद्यस्थितीची माहिती प्रभागातील लोकप्रतिनिधींनी दिली. यावेळी नगरसेविका स्वरदा बापट, नगरसेवक कुणाल टिळक आणि नगरसेविका स्वप्नाली पंडित या देखील उपस्थित होत्या. ‘कसब्याचे आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या सूचनेनुसार सर्व नगरसेवकांनी नागरिकांच्या दारी जात समस्या जाणून घेतल्या. पावसाळा तोंडावर असल्याने या सर्व समस्यांवर ‘टीम वर्क’ म्हणून काम करून सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी ‘कालबद्ध’ पद्धतीने तातडीने कार्यवाही करावी’, अशा स्पष्ट सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्याचे राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसादरम्यान या भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नारायण पेठ आणि शुक्रवार पेठ येथील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला होता. तसेच दोन दिवस या भागातील विद्युत पुरवठा देखील खंडित राहिला होता. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने व्हाव्यात, या उद्देशाने या विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या महत्त्वाच्या सूचना आणि मागण्याही अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या.

महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या आदेश पूर्णतः रद्द करा : रोहन सुरवसे पाटील

0
Newsworldmarathi Pune :विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (एसएसआर) आणि आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले असतानाही पुणे जिल्ह्यात तलाठी, महसूल सहायक, अव्वल कारकून, सर्कल यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सदर बाबत जिल्हाधिकारी यांनी सदर बदली आदेश बाबत स्थगिती दिली असून त्या बदल्या आदेश तातडीने रद्द करून राज्य सरकारच्या धोरणानुसार पारदर्शक ऑनलाइन बदली प्रक्रिया पुढील काळात राबविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक आयोगाकडे सुद्धा केली आहे. निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण आणि जनगणना तयारीच्या काळात निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पुणे जिल्ह्यात झालेल्या तलाठी, मंडळ अधिकारी , महसूल सहायक, अव्वल कारकून,( वर्ग -३) यांच्या बदल्या निवडणूकविषयक कामकाज पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. मात्र ह्या बदल्या होताना पारदर्शक पद्धतीला हरताळ फासला गेल्याचे मत सुरवसे यांनी व्यक्त केले यातील अनेक बदल्या करताना नियमांना बगल देण्यात आलेली असून केवळ स्थगिती न देता संबंधित बदली आदेश पूर्णपणे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे. सुरवसे पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सध्या राज्यभर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसएसआर) मोहीम सुरू असून महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि इतर कर्मचारी या प्रक्रियेत कार्यरत आहेत. त्याचबरोबर जनगणनेची तयारीही सुरू असल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली असली तरी चुकीच्या पद्धतीने झालेल्या बदल्या पूर्णतः रद्द करण्याचे आदेश करावेत तसेच पुढील काळात ज्यावेळी बदल्या कराव्या लागतील त्या वेळी ऑनलाइन पद्धतीचे सर्व निकष व नियम पाळले जावेत याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेनेही तलाठी, महसूल सहाय्यक, मंडळ अधिकारी आणि सहाय्यक महसूल अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्या पुढील आदेश येईपर्यंत कोणालाही कार्यमुक्त करण्यात येऊ नये, असे परिपत्रक जारी केले होते. मात्र, त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बदल्यांचे आदेश काढल्याने प्रशासनाची भूमिका परस्परविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांमुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण आणि जनगणना प्रक्रियेवर परिणाम होण्याबरोबरच महसूल प्रशासनात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे. सदर बदली आदेशाला स्थगिती दिली आहे मात्र चुकीच्या पद्धतीने झालेल्या बदल्या आदेश रद्द करावेत आणि पुढील काळात राज्य शासनाच्या धोरणानुसार ऑनलाइन, पारदर्शक व गुणवत्ताधारित बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
>पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या नियम डाउनलुन बदल्या करण्यात आले आहेत त्या रद्द कराव्यात अशी आमची मागणी आहे. रद्द न झाल्यास येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– रोहन सुरवसे पाटील, नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

श्री पूना गुजराती बंधू समाजातर्फे दहावी-बारावी व उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन

0
Newaworldmarathi Pune: कोंढवा येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे , श्री.भरत अग्रवाल अध्यक्ष विश्वकर्मा ग्रुप व ट्रस्टी महालक्ष्मी मंदिर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री पूना गुजराती बंधू समाजाचे अध्यक्ष जयंत शहा,कार्यकारी संचालक डॉ.राजेश शहा, सहकार्यकारी संचालक नैनेश नंदू ,सचिव राजेंद्र शहा,खजिनदार हरेश शहा मान्यवर उपस्थित होते. यावेळी दहावी,बारावी व उच्चशिक्षित उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भरत अग्रवाल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी भरत अग्रवाल म्हणाले की समाज माध्यमे तुमची विचार प्रक्रिया कुंठीत करून टाकतात तुमच्या विचारांची दिशा भरकटवून तुमचे विचार विश्व प्रदूषित करीत असतात.आपण कसे जगायचे कोणत्या दिशेने विचार करायचा याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दिशा देण्याचे काम समाज माध्यमे करीत असतात. तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे आपण तंत्रज्ञानासाठी नाही याची जाणीव प्रत्येक तरुणाने ठेवली पाहिजे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत कधी नव्हे ती कमालीची लवचिकता आल्याने त्या लवचिकेचा फायदा घेत व्यवसाय आणि छंद याची सांगड घालता आली पाहिजे. ध्येय निश्चित करून केवळ आरंभशूरपणा न करता सातत्याने त्या दिशेने नागरिक मार्गक्रमण केल्यास संकल्पपूर्ती होते.भूतकाळात अपयश आले असल्यास ते विसरून यशावर लक्ष केंद्रित करा असे त्यांनी सांगितले. डॉ.राजेश शाह म्हणाले की,गुजरात समाज हा उद्योगाचा समाज म्हणून सुपरीचित आहे उद्योगजगतात सचोटीने काम करीत नाव कमावलेल्या अनेक जण आपल्या समाजात आहेत. भविष्यात उद्योगाला शिक्षणाची जोड देत बुद्धिजीवी क्षेत्रात देखील आपल्या समाजाचे उदाहरणे प्रस्थापित केली पाहिजेत. यशाला मर्यादा नसतात एका यशा प्राप्तीनंतर पुढचा ध्येय आपल्याला खुणावत असते आणि ही सातत्याने सुरू राहणारे प्रक्रिया आहे. या समारंभास ट्रस्टी हेमंत मेहता,जनक शाह,केतन कापडिया,विनोद देडिया,दिलीप मेहता व सौ.हंसा शाह आणि सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.या वर्षीपासून विशेष स्पोर्ट्स कॅटेगिरी मध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नैनेश नंदू यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय केला,राजेंद्र शहा यांनी आभार प्रदर्शन मांडले. अनुजा सेलोट यांनी सूत्रसंचालन केले.

नसरापूर अत्याचार प्रकरण; आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा

Newsworldmarathi Pune: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील अत्याचार प्रकरणाचा निकाल अखेर समोर आला आहे. अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात अखेर आज पुण्याच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने ६५ वर्षीय नराधम दोषी भीमराव प्रभाकर कांबळे याला मरेपर्यंत फाशीची ठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या आत सुनावणी पूर्ण करून निकाल देणारा हा राज्यातील आजवरचा सर्वात जलद गतीने निकाली लागलेला पहिलाच खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार प्रकरण कोर्टात काय घडलं? न्यायालयाने गुरुवारीच भीमराव कांबळे याला पोक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरवले होते. त्यानंतर आज शिक्षेच्या तीव्रतेवर अंतिम सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली होती. कोर्टाने मागील वेळच्या सुनावणीत आरोपीलाच विचारलं होतं, की तूच सांग तुला काय शिक्षा द्यायला हवी? यावेळी आरोपीने मौन बाळगले. यानंतर त्याने पुन्हा कोर्टात खोटी कहाणी सांगत बनाव रटला. मात्र, न्यायाधीशांनी त्याला फटकारत दोषी ठरवलं. आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी त्याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीसोबत केलेले कृत्य अतिशय क्रूर आहे आणि त्याच्यात सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही, हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आज त्याला ही शिक्षा सुनावली. महाराष्ट्र दिनी, म्हणजेच १ मे रोजी नसरापूर येथे ही काळीमा फासणारी घटना घडली होती. या घटनेनंतर अख्ख्या महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने विशेष तपास पथक स्थापन केले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांच्या आत १,२०० पानांचे भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. राज्यातील सर्वात वेगवान खटला विशेष न्यायालयाने २१ मे पासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू केली होती. सरकारी पक्षाने अत्यंत वेगाने पीडित मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, वैद्यकीय तज्ज्ञ आणि डीएनए विश्लेषकांसह ५० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली. २० जून रोजी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला होता. अखेर आज कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावताच पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश शेळके व सरचिटणीसपदी हिरा सरवदे

0
Newsworldmarathi Pune : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे विशेष प्रतिनिधी उमेश शेळके हे विजयी झाले, तर सरचिटणीसपदी ‘लोकमत’चे हिरा सरवदे यांची बिनविरोध निवड झाली, तसेच ‘सकाळ’चे सचिदानंद वाघमारे हे कार्यकारिणी सदस्यपदी विजयी झाले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या २०२६-२७ च्या वार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. २८) मतदान झाले. उपाध्यक्षपदी ‘टीव्ही ९’चे योगेश बोरसे आणि ‘पुढारी’चे किशोर बरकाले, खजिनदारपदी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे प्रसाद पानसे निवडून आले. चिटणीसपदी दैनिक भास्करचे राहुल देशमुख आणि ‘लोकसत्ता’चे संजय सपकाळे यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्यपदी सुशांत राऊत (टीव्ही ९), ज्ञानेश्वर फड (प्रभात), उद्धव धुमाळे (लोकमत), अक्षय फाटक (नवराष्ट्र), तुषार झरेकर (पुढारी न्यूज), गोपाळ गुरव (महाराष्ट्र टाईम्स), दीपक होमकर (तरुण भारत), मिलिंद शुक्ल (प्रभात), मनोज मोरे (लोकसत्ता), सचिदानंद वाघमारे (सकाळ) यांचा विजय झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. प्रताप परदेशी आणि अॅड. स्वप्नील जोशी यांनी कामकाज पाहिले.

शिक्षण व्यवस्था ICU मध्ये; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा : कन्हैया कुमार

0
Newsworldmarathi Pune : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे देशभर सुरू करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूंज’ या राष्ट्रव्यापी विद्यार्थी अभियानाचा महाराष्ट्रातील शुभारंभ आज पुण्यात काँग्रेस कार्यसमिती (CWC) सदस्य कन्हैया कुमार आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी, कॉंग्रेस गटनेते चंदूशेठ कदम यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय व्यासपीठ देत शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, पेपरफुटी, भरतीतील विलंब आणि एनटीएच्या अपयशाविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. *पत्रकार परिषदेत बोलताना कन्हैया कुमार* यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, देशातील लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत असताना पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे, निकालातील विलंब आणि भरती प्रक्रिया रखडल्यामुळे त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. विद्यार्थी कोणतीही विशेष सवलत मागत नाहीत; त्यांना केवळ निष्पक्ष परीक्षा आणि वेळेत नोकरी हवी आहे. ते पुढे म्हणाले की, NEET-UG 2026 पेपरफुटी हा एक अपवाद नसून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या अपयशाचे प्रतीक आहे. गेल्या काही वर्षांत देशभरात ८९ हून अधिक पेपरफुटी आणि परीक्षा घोटाळे उघडकीस आले असून कोट्यवधी विद्यार्थी त्याचा फटका बसले आहेत. तरीही मोठे सूत्रधार आणि त्यांना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. कन्हैया कुमार यांनी असा आरोप केला की, शिक्षण व्यवस्था आज विद्यार्थ्यांना संधी देणारी नसून “रिजेक्शन सिस्टीम” बनली आहे. महागडी कोचिंग व्यवस्था, रिक्त पदे, सतत पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षा आणि वाढती बेरोजगारी यामुळे तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास ढासळला आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, पेपरफुटी आणि भरतीतील अन्याय या विषयांवर केंद्र सरकार आणि पंतप्रधानांचे मौन अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी कोटा येथून सुरू केलेल्या ‘छात्रों की गूंज’ अभियानाचा उल्लेख करत, हे केवळ विद्यार्थ्यांचे आंदोलन नसून युवा भारताचे भविष्य वाचविण्याची लढाई असल्याचे सांगण्यात आले. *देशातील २८ प्रमुख शहरांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक, महाविद्यालये, वाचनालये आणि कोचिंग केंद्रांमध्ये व्यापक जनसंपर्क केला जाणार आहे.* काँग्रेसच्या प्रमुख मागण्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. पेपरफुटी माफिया, संबंधित एजन्सी, अधिकारी आणि राजकीय संरक्षण यांची निष्पक्ष चौकशी करावी. एनटीएसह(NTA) संपूर्ण परीक्षा व्यवस्थेचे पुनर्गठन करून पेपर सेटिंग, प्रिंटिंग, वाहतूक, परीक्षा केंद्रे आणि डिजिटल प्रणाली सुरक्षित करावी. सर्व स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेसाठी निश्चित वार्षिक कॅलेंडर जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. अभियानाचा पुढील आराखडा ३० जूनपासून देशातील २८ शहरांत पत्रक वाटप, विद्यार्थी संपर्क आणि नुक्कड सभा. जुलै महिन्यात कॅम्पस संपर्क आणि ‘आंबेडकर संवाद’ कार्यक्रम. १ ऑगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे. ९ ऑगस्ट रोजी ‘दिल्ली चलो’ आंदोलनाद्वारे पहिल्या टप्प्याचा समारोप.