LATEST ARTICLES

बजेट सादर होताच सोनं चांदी स्वस्त; आजचा भाव ऐकून थेट दुकानच गाठाल

0
Newsworldmarathi Team: अर्थसंकल्पाच्या दिवशी कमोडिटी मार्केटमध्ये गोंधळाचे वातावरण होते. गेल्या दोन दिवसांतच चांदी १.३६ लाख रुपयांनी आणि सोन्याचे ३०,००० रुपयांनी घसरण झाली आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये चांदी २.६६ लाख रुपयांनी आणि सोन्याचे १.४६ लाख रुपयांनी घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, या तीव्र घसरणीचे मुख्य कारण मार्जिन मनी आणि नफा-पुस्तकात वाढ आहे. बजेटच्या दिवशी एकीकडे देशाचे लक्ष संसदेकडे होते, तर दुसरीकडे कमोडिटी बाजारात वेगळाच भूकंप आला होता. सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत इतकी मोठी घसरण दिसली आहे की, गुंतवणूकदार आणि सामान्य खरेदीदार दोघांनाही धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी आकाशाला भिडणारे सोने आणि चांदी आज, म्हणजे १ फेब्रुवारीला बजेट सादर झाल्यानंतर जोरदार खाली आले आहेत. फ्युचर्स मार्केटमध्ये झालेल्या या भूकंपामुळे किंमती रेकॉर्ड स्तरापासून खूप खाली आणल्या आहेत, ज्यामुळे बाजाराचे संपूर्ण समीकरणच बदलले आहे. सोनेही असेच आहे. २९ जानेवारीला १.६९ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलेले सोने आज वायदा बाजारात १.३८ लाख रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. आज सराफा बाजार बंद असला तरी, ३० जानेवारीला सराफा बाजारात चांदी ४० हजार रुपये आणि सोना सुमारे ९,५०० रुपये स्वस्त झाले होते. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव १.६५ लाख रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ३.३९ लाख रुपये प्रति किलोवर आली होती.

मी सुनेत्रा अजित पवार…, सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

Newaworldmarathi Pune: मोठी बातमी समोर येत आहे, अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत, राज्यपालांनी त्यांंना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली, आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा नवा गटनेता कोण होणार? नवे उपमुख्यमंत्री कोण असणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज राजभवानामध्ये राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी देखील त्यांची निवड करण्यात आली आहे. आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीला पक्षाच्या सर्व आमदारांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये दोन प्रस्ताव मांडण्यात आले, पहिला प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवडी संदर्भात होता, तर दुसरा प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांना पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचा संविधानिक अधिकार मिळण्यासंदर्भात होता. या दोन्ही प्रस्तावाला या बैठीकेमध्ये मंजुरी मिळाली, सुनेत्रा पवार यांची या बैठकीमध्ये गटनेता म्हणून निवड करण्यात आली, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्रिपदापूर्वी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या.

महाराष्ट्राचा दादा अनंतात विलीन! महाराष्ट्र हळहळला; बारामतीचा झंझावात आज तिथल्याच मातीत शांत झाला…

0
Newaworldmarathi Pune: राज्याच्या राजकारणातील एक धगधगते आणि कृतिशील नेतृत्व, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखों चाहत्यांच्या उपस्थितीत, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले होते. आपल्या लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप देण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र बारामतीत जणू एकवटला होता आणि “अजितदादा परत या…”, “अजित दादा अमर रहे..” अशा काळीज चिरणाऱ्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. बुधवारी, २८ जानेवारी रोजी सकाळी अजित पवार आपल्या नियोजित प्रचारसभांसाठी मुंबईहून बारामतीकडे ‘बंबार्डिअर लिअरजेट ४५ एक्सआर’ या ८ सीटर विमानाने रवाना झाले होते. सकाळी ८:१० मिनिटांनी विमानाने उड्डाण केले, मात्र ८:४५ च्या सुमारास बारामती धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच विमानाला भीषण अपघात झाला. दाट धुक्यामुळे दोन वेळा लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात विमान कोसळले आणि त्याला आग लागली. या दुर्घटनेत अजित पवारांसह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षारक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. अजित पवार यांचे पार्थिव आज सकाळी प्रथम त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले, जिथे पवार कुटुंबाने त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी सुनेत्रा पवार यांना शोक अनावर झाला होता, तेव्हा त्यांच्या नणंद सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांना सावरले. त्यानंतर सकाळी ९ वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली आणि सकाळी ११ वाजता पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि बिगुल वाजवून त्यांना शासकीय सलामी दिली. त्यानंतर त्यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार आणि धाकटे चिरंजीव जय पवार यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी “अजितदादा अमर रहे” आणि “परत या दादा” अशा घोषणांनी बारामतीचा परिसर दणाणून सोडला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांनी जड अंतःकरणाने अजित पवारांना अखेरचा मुजरा केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटला होता. प्रत्येकाच्या मनात ‘एक पर्व संपले’ हीच भावना दाटून आली होती.

काटेवाडी गावावर दुःखाचा डोंगर

0
Newsworldmarathi pune: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमानतळावर झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताबाबतचे वृत्त समोर येताच त्यांच्या जन्मगावी काटेवाडी (ता. बारामती) येथे दुःखाचा डोंगर कोसळल्याचे चित्र दिसून आले. या अनपेक्षित वार्तेने गावात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वृत्त समजताच गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. अनेक वयोवृद्ध महिला धाय मोकळून रडताना दिसून आल्या. ‘आमचा दादा कुठे हाय… आम्हाला सोडून गेलास कसा’, अशा हृदयद्रावक शब्दांत गावातील माजी संरपच कल्पना कचरे, वयोवृद्ध महिला पद्मिनी लोंढे व मिराबाई रा. कपसरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या शब्दांनी उपस्थितांची मने हेलावून गेली. गावात शोकमय वातावरण पसरल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. दुकाने तातडीने बंद ठेवण्यात आली असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रस्त्यांवर शांतता असून, प्रत्येक जण मोबाईल व टीव्हीवरील अपडेट्सकडे डोळे लावून बसलेला दिसतो आहे. ‘कुटुंबातील कर्ता माणूस गेल्यासारखं वाटतंय’, अशा शब्दांत अनेक ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला. अजित पवार यांचे काटेवाडीशी असलेले घरातील जिव्हाळ्याचे नाते, त्यांच्या विकासकामांमुळे गावकऱ्यांच्या मनात असलेली आपुलकी यामुळे या घटनेचा धक्का अधिक तीव्रतेने बसल्याचे जाणवत आहे.

राज्याला मोठा धक्का! विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, विमान जळून खाक

0
Newaworldmarathi Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे. तर विमान जळून खाक झालं आहे. आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार, या विमान अपघातापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दादांन घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचं दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून तीव्र निषेध

0
Newaworldmarathi Pune :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने आज संभाजी भिडे यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी केलेल्या आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि अवमानकारक विधानांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून कार्यकर्त्यांनी भिडेंच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. देशाचे कृषीमंत्री व संरक्षण मंत्री अशी अत्यंत महत्त्वाची पदे भूषवलेले, देशसेवेसाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आलेल्या मा. शरदचंद्रजी पवार साहेबांवर “देशद्रोही” असा आरोप करणे हे अत्यंत दुर्दैवी, बेजबाबदार व निषेधार्ह असल्याचे यावेळी सांगण्यात आले. देशासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या थोर राष्ट्रनेत्यावर आरोप करणाऱ्या संभाजी भिडे यांनी देशासाठी नेमके कोणते उल्लेखनीय कार्य केले आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. संभाजी भिडे हे सातत्याने वादग्रस्त विधाने करून समाजात द्वेष पसरवण्याचे काम करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. महिलांच्या आई-बहिणींच्या पेहरावावर अशोभनीय वक्तव्ये करणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीने पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्याबाबत बोलणे ही त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचेच द्योतक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विशेष म्हणजे अशा व्यक्तीस मोदी सरकारकडून “सो.” किताब बहाल करण्यात येणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. संभाजी भिडे यांनी त्यांच्या विधानांबद्दल महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात अध्यक्ष श्रीकांत पाटील, विशाल ताबे, मा. उदय महाले, स्वाती पोकळे, भगवान साळुंके, डॉ. सुनील जगताप, किशोर काबळे, औदुंबर खुने, श्रद्धा कुदळे, हेमंत येवलेकर, रोहन पायगुडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाटे पब्लिक स्कूल येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

0
Newsworldmarathi Pune: संविधान हि निती आणि धर्म हा जीवन जगण्याची आदर्श पध्दती व संस्कार आहे. लोकशाहीच्या रथाची ही दोन्ही चाकं योग्य पध्दतीने पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे, असे प्रतिपादन आयएएस अधिकारी डॉ सागर डोईफोडे यांनी केले. धनकवडी येथील चाटे पब्लिक स्कूल येथे आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळा प्रसंगी चाटे स्कूल चे माजी विद्यार्थी जे सध्या दिव दमण व दादरा नगर हवेली चे प्रशासकिय सचिव म्हणून कार्यरत असलेले आयएएस अधिकारी डॉ सागर डोईफोडे, भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, शिवव्याख्याते राहूल नलावडे, चाटे शिक्षण समुहाचे संस्थापक फुलचंद चाटे आणि मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगतं, योगासने व कलागुणं सादर केली. यानिमित्ताने डॉ डोईफोडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना जीवनातील धेय प्राप्तीसाठी आवश्यक असलेला मूलमंत्र दिला. तत्पुर्वी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सन्मान संस्थेतर्फे करण्यात आले. फुलचंद चाटे सरांनी आपल्या प्रास्ताविकात चाटे शिक्षण समुहाच्या चौफेर प्रगतीचा आढावा मांडला. तृप्ती देसाई यांनी चाटे शिक्षण समुह हा देशाचे जबाबदार नागरिक घडवणारी एक नामांकित शिक्षण संस्था आहे असे गौरवोद्गार काढले. आभार संस्थेच्या प्राचार्यांनी मानले.

जोधपूर–पुणे रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्याची समस्त राजस्थानी समाज संघाची मागणी

0
Newaworldmarathi Pune : जोधपूर–पुणे–जोधपूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी समस्त राजस्थानी समाज संघ, पुणे (महाराष्ट्र) यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संघाचे संस्थापक अध्यक्ष मगराज एम. राठी यांनी मध्य रेल्वे, पुणे विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांना निवेदन दिले. सध्या जोधपूर–पुणे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे क्रमांक 11089/11090 तसेच 20475/20476 या गाड्या केवळ साप्ताहिक स्वरूपात चालवल्या जात आहेत. मात्र या मार्गावर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असून, सध्याच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी प्रवाशांना महिन्याभर आधी तिकीट बुक करावे लागते, तरीही प्रतीक्षा यादी लांबच राहत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना तसेच रुग्णांना विशेष त्रास सहन करावा लागत असून, पर्यायी वाहतूक साधनांचा अभाव ही मोठी समस्या ठरत आहे. त्यामुळे जोधपूर–पुणे–जोधपूर या मार्गावरील रेल्वे फेऱ्या वाढवून किमान आठवड्यातून पाच दिवस किंवा रोज धावतील, अशी व्यवस्था करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. रेल्वेच्या फेऱ्या वाढल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेलच, शिवाय रेल्वेच्या महसुलातही वाढ होईल, असा विश्वास संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. या मागणीवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा समस्त राजस्थानी समाज संघाने व्यक्त केली आहे.

डॉ. राजेश शहा यांची गुजरात सरकारच्या विशेष समितीवर निवड

0
Newaworldmarathi Pune : देशभर तसेच गुजरात राज्याबाहेर वास्तव्यास असलेल्या गुजराती समाजाला एकत्र आणण्यासाठी गुजरात सरकारने विशेष समितीची स्थापना केली असून, या समितीवर सामाजिक कार्यात सक्रिय असलेले डॉ. राजेश शहा यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. राजेश शहा यांच्या निवडीचे अधिकृत आदेश गुजरात सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी विनेश सिंह यांनी पाठवले आहेत. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी असून, या कालावधीत देशभरातील गुजराती समाजाचे संघटन, विविध संस्थांशी समन्वय आणि समाजहिताचे उपक्रम राबविण्याची जबाबदारी समितीवर राहणार आहे. गुजराती समाजाच्या संघटनासाठी आणि त्यांच्या क्षमतेचा देशाच्या विकासासाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या समितीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी समितीच्या माध्यमातून गुजरातबाहेरील गुजराती समाजाशी थेट संपर्क साधून त्यांना सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक कार्यासाठी एकत्र आणण्यावर भर दिला जाणार आहे. गुजराती समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षमतेचा उपयोग राष्ट्रीय प्रगतीसाठी व्हावा, या उद्देशाने ही समिती कार्य करणार आहे. विविध राज्यांत कार्यरत असलेल्या गुजराती संस्था, उद्योजक, युवक आणि व्यावसायिक यांना एकत्र आणून देशाच्या उत्कर्षात योगदान देणे, हे या समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. डॉ. शहा यांच्या अनुभवामुळे समितीच्या कामकाजाला अधिक प्रभावी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत डॉ.राजेश शहा यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे , त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन नुकतेच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी (पी.एचडी) देऊन सन्मानित केले आहे तसेच प्रतिष्ठित अशा फेअर बिझनेस प्रॅक्टीसेस करीता देण्यात येणाऱ्या जमनालाल बजाज पुरस्काराने तीन वेळा सम्मानित करण्यात आले आहे. याशिवाय समाजरत्न, आदर्श व्यापारी त्याचबरोबर जीवनगौरव पुरस्कार, व्यापार भूषण, राष्ट्रिय ऐकता पुरस्कार, कर्मवीर पुरस्कार, बेस्ट बिसनेसमॅन पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील सुप्रसिध्द उपक्रम लाडू-चिवडा चे ते जनक असून या उपक्रमासह डॉ.राजेश शहा यांचे गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदले आहे.डॉ.राजेश शहा हे दि पूना गुजराती केळवणी मंडळ व या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे चेअरमेन आहेत. तसेच ते एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल चे अध्यक्ष असून श्री पूना गुजराती बंधु समाज या ११० वर्षे पासून कार्यरत संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. पुना मर्चंट चेंबरचे सुवर्ण महोत्सवी वर्षाततील अध्यक्ष, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे महासचिव या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिशयन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे गेल्या २५ वर्षांपासून वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत. त्याचबरोबर जनसेवा फाऊंडेशन चे खजिनदार म्हणून ही ते कार्यरत आहेत. याशिवाय अनेक संस्थांच्या विविध पदांवर डॉ.राजेश शहा कार्यरत आहेत.

ज्ञानमंदिर कळंबोली शाळेने पटकवले ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’चे विजेतेपद

0
नवामहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) क्रीडावर्धिनी आणि कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’ या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मएसो ज्ञानमंदिर कळंबोली या शाळेने पटकवले. यासह ही फिरता करंडकाचीही मानकरी ठरली. या स्पर्धेचे हे १४ वे वर्ष होते. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही तीन दिवसीय निवासी क्रीडा स्पर्धा बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, मयूर कॉलनी कोथरूड येथे पार पडली. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी झाले. प्रसंगी ‘मएसो’चे उपाध्यक्ष प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, क्रीडावर्धिनी व शाला समितीचे अध्यक्ष विजय भालेराव, ‘मएसो’चे सचिव अतुल कुलकर्णी, सहसचिव सुधीर भोसले, शाला समिती महामात्र डाॅ. नेहा देशपांडे, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी, मंजुषा दुर्वे, सायली देशमुख यांच्यासह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते. तेजल हसबनीस म्हणाल्या, “विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या असतात. त्यांच्यात संघभावना, शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती विकसित होते. चांगला माणूस होण्यासाठी खेळांतून प्रोत्साहन मिळते.” प्रदीप नाईक यांनी अध्यक्षीय मनोगतात सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भविष्यात तुमच्यातील काही विद्यार्थी ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षीचा ‘मएसो क्रीडा करंडक’ पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके महाविद्यालय येथे आयोजिला जाणार असल्याचे विजय भालेराव यांनी घोषित केले. बाबासाहेब शिंदे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डाॅ. वैशाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मंजुषा दुर्वे यांनी आभार मानले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या सर्व शिक्षिका, क्रीडाशिक्षक यांनी क्रीडास्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. ——————————– या शाळा ठरल्या विजेत्या यामध्ये मुले व मुली या गटांत सूर्यनमस्कार, लंगडी, डॉजबॉल आणि गोल खो-खो या सांघिक मैदानी स्पर्धा झाल्या. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सांघिक व वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. सूर्यनमस्कार स्पर्धेत मुलांमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली, पब्लिक स्कुल कळंबोली, दामोदर शंकर रेणावीकर विद्यामंदिर अहिल्यानगर, तर मुलींमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली, पब्लिक स्कुल कळंबोली, बालविकास मंदिर सासवड, लंगडी स्पर्धेत मुलांमध्ये निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, ह. ग. देशपांडे बारामती, तर मुलींमध्ये इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, विद्यामंदिर बेलापूर, डॉजबॉल स्पर्धेत मुलांमध्ये विद्यामंदिर बेलापूर, ज्ञानमंदिर कळंबोली, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, तर मुलींमध्ये बालविकास मंदिर सासवड, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, गोल खोखो स्पर्धेत मुलांमध्ये निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, ज्ञानमंदिर कळंबोली, इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, तर मुलींमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, बालविकास मंदिर सासवड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला.