LATEST ARTICLES
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप
Newaworldmarathi Pune : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत समोरासमोर दिसणारी दोन प्रमुख पॅनल प्रत्यक्षात एकाच विचारधारेची असून त्यांच्यातील संघर्ष हा केवळ दिखावा असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांत महामंडळाच्या कारभारात असलेल्या संचालकांनी चित्रपटसृष्टीच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याऐवजी अंतर्गत वाद आणि राजकारणातच वेळ घालवल्याचा आरोप त्यांनी केला. प्रस्थापितांची मुजोरी मोडीत काढून महामंडळ आणि सदस्यांच्या हितासाठी आठ अपक्ष उमेदवारांनी एकत्र येऊन संघ उभा केल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक अमोल भावे, निर्माता महादेव शिरोळकर, मानसिंग कदम, कला दिग्दर्शक उल्हास लांडगे या उमेदवारांसह अपक्ष संघाला पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्री, निर्मात्या भाग्यश्री देसाई या उपस्थित होत्या. अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि शाहीर संभाजी भगत यांच्यासह अनेकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा अपक्ष संघाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना लोणकर म्हणाले की, दोन्ही पॅनलमधील अनेक माजी संचालक वेगवेगळ्या गटांतून निवडणूक लढवत असले तरी त्यांच्यातील परस्पर समन्वय स्पष्ट दिसून येतो. काही उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी दोन्ही गटांनी एकमेकांना मदत केल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला “मिलीभगत” असे संबोधले.
महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नसल्याचा दावा देखील त्यांनी फेटाळून लावला. काही उमेदवार आणि राजकीय नेत्यांमधील संबंध सर्वश्रुत असल्याचे सांगत, निवडणूक प्रक्रियेवर राजकीय प्रभाव अद्याप कायम असल्याचे त्यांनी म्हटले. वितरण आणि प्रसिद्धी विभागातून निवडणूक लढवत असलेल्या लोणकर यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवरही टीका केली. चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धी आणि वितरण व्यवसायाच्या नावाखाली आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करत, आपण गेली चार दशके विनामूल्य प्रसिद्धीचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
महामंडळात नव्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज व्यक्त करताना लोणकर म्हणाले की, विद्यमान गटांच्या राजकारणाला कंटाळलेल्या सभासदांनी यावेळी बदलाचा निर्णय घ्यावा. पुणे, मुंबई आणि राज्यातील सर्व सुज्ञ मतदारांनी मतदानासाठी पुढे आल्यास चांगल्या आणि प्रामाणिक व्यक्तींना संधी मिळू शकेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.गेल्या दशकातील कारभारावर टीका करताना दिग्दर्शक भावे यांनी सभासद, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गरीब कलाकारांच्या निवासासाठी आणि वृद्धाश्रमासाठी दिलेल्या जागेवर अद्याप कोणतेही ठोस काम झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महामंडळाच्या निधीचा वापर कार्यालयांसाठी करण्यात आला, मात्र कलाकारांच्या कल्याणासाठी अपेक्षित उपक्रम राबवले गेले नाहीत,असा दावा त्यांनी केला.
महामंडळाच्या घटनेतील बदल, मालमत्ता निर्मिती आणि आर्थिक निर्णयांविषयी सभासदांना पुरेशी माहिती देण्यात आली नसल्याचाही आरोप महादेव शिरोळकर यांनी केला. पुणे महापालिकेकडून अत्यल्प भाडेतत्त्वावर उपलब्ध होऊ शकणारी कार्यालयाची जागा नाकारून नंतर स्वतंत्र कार्यालयांवर खर्च करण्यात आल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
महामंडळात गुंडा-कुंडांचा मुजोर कारभार :अभिनेत्री भाग्यश्री देसाई -मतदार यादीच्या मुद्द्यावर बोलताना भाग्यश्री देसाई मतदार यादी करताना जाणूनबुजून आपल्याला मते मिळणार नाहीत असा संशय असलेल्यांची नावे वगळून मतदार यादी करण्यात आली,मी स्वतः कित्येक वर्षे मतदार होते आणि आता माझे मत मिळणार नाही हे लक्षात आल्यावर माझे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले.मृत व्यक्तींची माहिती असून त्यांची नावे मतदार यादीत ठेवण्यात आली त्यामुळे त्यांच्या नावावर बोगस मतदान होण्याची दाट शक्यता आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.चांगली लोकं महामंडळावर यावीत म्हणून मी या अपक्ष उमेदवारांना पाठींबा देत आहे.भाग्यश्री देसाई यांनी सुमारे ४० हजार संभाव्य मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप केला. चित्रपटसृष्टीशी काडीचा संबंध नसलेल्या लोकांची नावे मतदार यादीत घुसवली आहेत. हा सर्व गुंडा-कुंडांचा मुजोर कारभार असल्याची टीका अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांनी केली.
पुण्यातील जलसंपदा विभागाची कार्यालये परत आणा : रोहन सुरवसे पाटील
Newaworldmarathi Pune: जलसंपदा विभागाची पुण्यातील दोन महत्त्वाची मुख्य अभियंता कार्यालये कोल्हापूर आणि सोलापूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द करून ही कार्यालये पुन्हा पुण्यातच कायम ठेवावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विविध बैठकींमध्ये बांधकाम आणि सिंचन व्यवस्थापनाच्या कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले होते. ज्या प्रकल्पांचे बांधकाम ज्या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली आहे, त्याच मंडळाकडे संबंधित प्रकल्पांचे अन्वेषण, संकल्पन, भूसंपादन, पुनर्वसन, बांधकाम, सिंचन व्यवस्थापन तसेच देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी देण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्या अनुषंगाने संबंधित महामंडळाने १५ मे २०२६ रोजी विभागाचे कार्यक्षेत्र निश्चित करणारे आदेश जारी केले. त्यानुसार मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे हे कार्यालय कोल्हापूर येथे, तर मुख्य अभियंता (विप्न), जलसंपदा विभाग, पुणे हे कार्यालय सोलापूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे पाटील म्हणाले की, पुणे हे राज्यातील महत्त्वाचे प्रशासकीय, शैक्षणिक आणि विकासात्मक केंद्र असून जलसंपदा विभागाची प्रमुख कार्यालये येथे कार्यरत होती. अशा परिस्थितीत ही दोन्ही महत्त्वाची कार्यालये पुण्याबाहेर हलविणे म्हणजे पुणे शहर आणि जिल्ह्याच्या प्रशासकीय महत्त्वाला कमी लेखण्यासारखे आहे.
या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील समन्वय, प्रशासकीय कार्यक्षमता तसेच नागरिकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे स्थलांतरित करण्यात आलेली दोन्ही कार्यालये पुन्हा पुण्यातच कार्यरत ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी ही दोन्ही कार्यालये पुन्हा पुण्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याचे सुरवसे-पाटील यांनी सांगितले.
जनसेवा फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा गौरव
Newaworldmarathi Pune: डॉ.बाबा आढाव यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त हमाल पंचायत,पुणे यांच्यातर्फे पहिला पुरस्कार जनसेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेला देण्यात आला. सदर पुरस्कार मा. उल्हास दादा पवार, मा.शीलाताई आढाव व दि पुना मर्चंट चेंबर्सचे अध्यक्ष राजेंद्रजी बाठिया यांच्या हस्ते देण्यात आला.
पुण्यातील प्रतिष्ठित सामाजिक संस्था जनसेवा फाउंडेशनला, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानचिन्ह,शाल आणि माळ देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ.विनोद शहा,खजिनदार डॉ.राजेश शहा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
तसेच पुण्यातील उद्योग, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात ठसा उमटवणारे जयराज ग्रुपचे संचालक डॉ. राजेश शहा यांना थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित ‘इंडो-थाई अचिव्हर्स समिट–२०२६’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रतिष्ठित ‘भारत उद्योग पुरस्कार २०२६’ सन्मानित केल्याबद्दल हमाल पंचायत,पुणे तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
जनसेवा फाउंडेशन ही संस्था गेल्या कित्येक वर्षांपासून निराधार मुलांचे शिक्षण, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करत आहे.गरीब/विभक्त कुटुंबांतील सुमारे २०० मुले येथे सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा स्वतंत्र सुविधांमध्ये राहत आहेत. त्यांना पूर्णपणे मोफत
साहाय्य दिले जाते आणि विविध शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. येथे लहान वयात दाखल झालेल्या अनेक मुलांनी इथेच राहून त्यांचे शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले आहे आणि आता ते चांगल्या पगारावर नोकरी करत आहेत.
रस्ते, बस आणि रेल्वे स्थानकांवरून प्रौढ निराधारांना येथे आणले जाते आणि त्यांना निवास, भोजन व वैद्यकीय सेवा पुरवली जातात. नंतर त्यांचे शिक्षण, कौशल्ये आणि कल यांवर आधारित, त्यांना समाजात पुन्हा सामावून घेण्याच्या
उद्देशाने भरतकाम, शिलाई, कृत्रिम दागिने बनवणे, प्लंबिंगचे प्रशिक्षण इत्यादी योग्य व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. संस्थेच्या या नि:स्वार्थ सेवेची दखल घेऊन, या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली आहे.
पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना संस्थेचे डॉ.राजेश शहा म्हणाले, “हा पुरस्कार म्हणजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आहे. समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे. हा सन्मान आमच्या संस्थेच्या प्रत्येक दात्याला आणि स्वयंसेवकाला समर्पित आहे.”
हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १ जून २०२६ रोजी हमाल भवन मार्केट यार्ड येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. उल्हास दादा पवार व मा.शीलाताई आढाव, डॉ.विनोद शहा, डॉ.राजेश शहा, राजेंद्रजी बाठिया, हमाल पंचायतचे अध्यक्ष गोरखभाऊ मेंगडे, सेक्रेटरी अंकुश अवताडे व हमाल पंचायतचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पवार यांनी केले.
युजर चार्जेसविरोधात राज्यातील व्यापाऱ्यांचा एल्गार
Newaworldmarathi Pune :कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या युजर चार्जेसच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील व्यापारी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास १३ जूननंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला.
दि पूना मर्चंट्स चेंबर येथे रविवारी आयोजित राज्यव्यापी परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड, दि ग्रेन राईस अँड ऑईल सीड्स मर्चंट्स असोसिएशन आणि दि पूना मर्चंट्स चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने या परिषदेचे आयोजन केले होते.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये २८ फेब्रुवारी २०२२ पासून येणाऱ्या अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल व अनुषंगिक मालाच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर प्रति १०० रुपये व्यवहारामागे एक रुपया युजर चार्जेस आकारण्याच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला. या शुल्काचा भार अखेरीस सर्वसामान्य ग्राहकांवर पडून वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याची भीती परिषदेत व्यक्त करण्यात आली.
परिषदेत राज्यातील कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, जयसिंगपूर, नाशिक, बारामती, अहिल्यानगर, सोलापूर, मुंबई, वाशी, नागपूर, मोर्शी, धुळे आदी भागांतील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रत्यक्ष सुमारे १०० प्रतिनिधी उपस्थित होते, तर ऑनलाइन माध्यमातून राज्यभरातील विविध संघटनांच्या सुमारे २५० पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
या वेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे, ‘फाम’चे अध्यक्ष जितेंद्र शाह, ‘कॅमेट’चे दीपेनजी अग्रवाल, ‘ग्रोमा’चे अध्यक्ष भीमजीभाई भानुशाली यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, प्रवीण चोरबेले, पोपटलाल ओस्तवाल, राजेश शाह, सुरेश चिक्कली, प्रफुल्ल संचेती, सचिन निवुंगणे, संभाजी किरटे, अमोल शाह, शब्बीर शाह, राजेंद्र बोथरा आदींनी आपली मते मांडली.
परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांमध्ये युजर चार्जेस कायदा तातडीने रद्द करणे, जुन्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याऐवजी नव्या परिस्थितीनुरूप कायदा तयार करणे, २०२४ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करणे, तसेच पारंपरिक व्यापार टिकवून ठेवण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणे या मागण्यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र बाठिया यांनी केले. स्वागत इंद्रेश नहार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार आशीष दुगड यांनी मानले.
“भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आश्रयाशिवाय अवैध दारू व्यवसाय शक्य नाही”; रोहन सुरवसे-पाटील यांचा आरोप
Newaworldmarathi Pune : पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असून, या संपूर्ण रॅकेटला राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षण असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हडपसर तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत विषारी हातभट्टी दारू सेवन केल्याने सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट निर्माण झाली असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली, तरी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
अशा सराईत आरोपींकडून शहरातील विविध भागांत खुलेआम अवैध दारूची निर्मिती आणि विक्री सुरू होती. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग नेमका काय करत होता, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध दारू व्यवसाय सुरू राहू शकत नाही, असा आरोप सुरवसे-पाटील यांनी निवेदनात केला आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजित पवार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
आवाज महाराष्ट्राचा – पुण्याच्या परिवर्तनाचा” अंतर्गत “५ न्याय अभियान” राज्यभर युवक काँग्रेस राबविणार
Newaworldmarathi Pune : भारतीय युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर जिल्हा युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने “आवाज महाराष्ट्राचा – पुण्याच्या परिवर्तनाचा” तसेच “५ न्याय अभियान” राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आली.
देशभरातील विविध शहरांमध्ये वाढत्या नागरी समस्या, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी जनआंदोलन उभे करण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. पुणे शहरातील पाणी, वीज, रस्ते, वाहतूक कोंडी, महिला सुरक्षा, बेरोजगारी, आरोग्य व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण या प्रश्नांवर युवक काँग्रेसच्या माध्यमातून विविध स्तरांवर आंदोलन आणि जनजागृती करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर असंघटित क्षेत्रातील विविध कामगार घटकांच्या प्रश्नांवर “५ न्याय अभियान” अंतर्गत स्ट्रीट व्हेंडर्स, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, घरगुती कामगार आणि ऑटो-रिक्षा चालक यांच्या न्याय हक्कांसाठी स्वतंत्र मोहिमा राबविण्यात येणार आहेत. रेहडी-पटरी विक्रेत्यांवरील कारवाई, कथित वसुली, PF-ESI अंमलबजावणी, किमान वेतन, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग बंदी, सुरक्षा साधने, घरगुती कामगारांना कायदेशीर दर्जा, ई-चलान, अॅप कंपन्यांची मनमानी, वाढते इंधन दर, पार्किंग आणि सामाजिक सुरक्षेच्या प्रश्नांवर युवक काँग्रेस राज्यभर आवाज उठविणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने या अभियानांतर्गत नागरिक संवाद यात्रा, विभागनिहाय बैठक, निवेदन मोहीम, सोशल मीडिया जनजागृती आणि विविध जनआंदोलने राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, “शहर चालवणाऱ्या असंघटित कामगारांना आजही मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळत नाही. ‘५ न्याय अभियान’ हे केवळ आंदोलन नसून शहरातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी युवक काँग्रेसचा व्यापक संघर्ष आहे.”
ज्येष्ठ नेते मोहन जोशी म्हणाले, “पुण्यासारख्या वाढत्या शहरांमध्ये नागरी प्रश्न गंभीर बनले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर सरकार आणि प्रशासनाला उत्तरदायी धरण्यासाठी युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभे करणे ही काळाची गरज आहे.”
यावेळी प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सचिव शांभवी शुक्ला, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, इंटक अध्यक्ष चेतन अग्रवाल, बाळासाहेब आमराळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, प्रदेश सरचिटणीस व संघटन सचिव प्रवीण कुमार बिराजदार, माध्यम प्रमुख अक्षय जैन, पुणे शहराध्यक्ष सौरभ आमराळे, अभिषेक अवचार, स्नेहल देशमुख, विश्वजीत जाधव आदी उपस्थित होते.
व्यवसायवाढीसाठी मित्राला केलेली मदत आली अंगाशी; 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन सुगनलाल सेठीयावर गुन्हा दाखल
Newaworldmarathi Pune : एकाच सोसायटीत रहात असल्याने ते चांगले मित्र झाले. व्यवसाय वाढीसाठी त्यांनी तीन महिन्यांच्या मुदतीने ३५ लाख रुपये मित्राला दिले. मात्र, मित्राला मदत करणे त्यांच्या अंगाशी आले. तीन महिन्यानंतर मित्र उलटून पडला. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी एका व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संजय धनराज कटारिया (वय ६४, रा. कुमार सिद्धाचल, बिबवेवाडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नितीन सुगनलाल सेठीया Nitin Suganlal Sethia (वय ६१, रा. ऋतुराज सोसायटी, प्रेमनगर, बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२५ पासून आतापर्यंत घडला आहे. (Cheating Fraud Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय कटारिया याची स्वतःची निरगुडसर येथे ८ एकर बागायती शेती आहे. शेती व्यतिरिक्त त्यांचा रिअल इस्टेट व्यवसाय आहे. नितीन सुगनलाल सेठीया यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. दोघे एकाच कॉलनीत रहात असल्याने ते मित्र झाले. दोघांची चांगली ओळख असल्यामुळे सेठीया यांना बांधकामासाठी पैशांची गरज असल्याने तसेच बांधकामाचा धंदा वाढविण्यासाठी त्यांनी कटारिया यांच्याकडे पैशांची मागणी केली. २०२५ मध्ये त्यांनी तीन चेकद्वारे सेठीया यांना ३५ लाख रुपये दिले. बांधकामासाठी तीन महिन्यानंतर परत देण्याचे आश्वासन सेठीया यांनी दिले होते.
कटारिया हे सेठीया यांना चांगले ओळखत असल्याने त्यांनी विश्वासाने पैसे दिले होते. तीन महिन्यांची मुदत निघून गेल्यानंतर त्यांनी सेठीया यांच्याकडे वारंवार फोनद्वारे संपर्क करुन पैशांची मागणी केली. तेव्हा प्रत्येक वेळी सेठीया यांनी उडवा उडवीची उत्तरे देत असत. तीन महिन्यांच्या बोलीवर पैसे दिले असताना त्यानंतर अनेक महिने झाल्यानंतरही सेठीया यांनी अद्याप काहीही पैसे परत केले नाही. शेवटी कटारिया यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
रवींद्र धंगेकरांचा तलाठी भाचा लाच घेताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात..!
Newaworldmarathi Pune: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महसूल विभागातील भ्रष्टाचारावर कारवाई केली आहे. मुळशी तालुक्यातील माण गावचा तलाठी संतोष प्रल्हाद राणे याला २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला तलाठी हा पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा भाचा असल्याचे समोर आले आहे.
वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार उताऱ्यावर तक्रारदार आणि त्यांच्या भावाचे नाव लावण्यासाठी ही लाच मागण्यात आली. बहीण आणि भावामध्ये हक्कसोड पत्र झाल्यानंतर त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी राणे याने एकूण १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली होती.
राणे याने यापूर्वीच १ लाख रुपये स्वीकारले होते आणि उर्वरित २५ हजार रुपयांसाठी तक्रारदाराकडे तगादा लावला होता. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, राणे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
मंगळवारी माण येथील तलाठी कार्यालयात एसीबीने सापळा रचला. यावेळी २५ हजार रुपये स्वीकारताना संतोष राणे याला रंगेहाथ अटक करण्यात आली. हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संजय मयेकर यांना पीएच. डी. जाहीर
Newaworldmarathi Pune : संजय रविकांत मयेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मयेकर यांनी पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातून ‘पुणे महानगरपालिका शिक्षण विभागातील योजनांचा अभ्यास’ या विषयावर संशोधन करत आपला शोधप्रबंध सादर केला होता. शिक्षण क्षेत्रातील विविध योजना, त्यांची अंमलबजावणी तसेच विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम यांचा त्यांनी आपल्या संशोधनामध्ये सखोल अभ्यास केला आहे.
त्यांच्या संशोधन कार्यासाठी विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. गायत्री चौकडे यांनी मार्गदर्शक म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मयेकर यांनी हे संशोधन पूर्ण केले.
शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या संजय मयेकर यांच्या या यशामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मित्रपरिवार, सहकारी तसेच विविध संस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
वंजारी समाजाचा भव्य वधू-वर सूचक स्नेह मेळावा रविवारी
Newsworldmarathi Pune: विठ्ठल रुक्मिणी सेवा प्रतिष्ठान व मा. पै. श्री. मोहन (आप्पा) वणवे युवा मंच यांच्या वतीने वंजारी समाजाचा भव्य वधू-वर सूचक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवारी, दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत तीर्थक्षेत्र भक्तिधाम, टॉम्स कंपनी शेजारी, मुंढवाडी, मुंढी (जि. पुणे) येथे होणार आहे.
समाजातील युवक-युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा तसेच समाजामध्ये एकोपा आणि संवाद वाढावा, या उद्देशाने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि पोलीस प्रशासनातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.
मेळाव्याचे मुख्य आयोजक मा. पै. श्री. मोहन (आप्पा) वणवे असून त्यांनी समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विविध कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
या मेळाव्यात वधू-वर परिचय, संवाद तसेच समाजातील विविध विषयांवर चर्चा होणार असून युवक-युवती आणि पालकांसाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरणार आहे. समाजातील ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे आयोजकांनी सांगितले.

