LATEST ARTICLES
म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती; ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा
Newsworldmarathi Pune: म्हाळुंगे गावातील नागरिकांच्या रस्ते, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या लाईनसंदर्भातील समस्यांची तातडीने दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
म्हाळुंगे गावातील ऑर्चिड हॉटेल ते व्ही.टी.पी. बांधकाम प्रकल्पापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, तसेच ड्रेनेज लाईन आणि पावसाळी पाण्याच्या लाईन टाकण्याची मागणी घेऊन शिष्टमंडळाने ना. चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. तसेच, ग्रामस्थांच्या विविध अडचणींबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.
ग्रामस्थांच्या मागणीची तातडीने दखल घेत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे महापालिकेच्या महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथजी भिमाले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सदर रस्ता, ड्रेनेज तसेच पावसाळी पाण्याच्या लाईनची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश दिले.
म्हाळुंगे गावातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत असून, या कामांना आता गती मिळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी भाजप नेते गणेश कळमकर, माजी सरपंच सौ. रेखाताई पाडळे, माजी सरपंच नामदेवराव गोलांडे, उद्योजक सोपानराव पाडळे, सुरेश पाडळे, सचिन पाडळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
वाहतूक समस्या सोडवायला सर्वोच्च प्राधान्य : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
Newsworldmarathi Pune: विस्तारत जाणारे पुणे, झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढते आयटी आणि औद्योगिक क्षेत्र, नव्याने विकसित होणाऱ्या निवासी व व्यावसायिक वसाहती आणि त्यासोबत वाढणारी वाहनांची संख्या यामुळे शहरासमोरील वाहतुकीचे आव्हान दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. पुण्याच्या विकासाचा वेग कायम ठेवायचा असेल, तर पायाभूत सुविधांचा विस्तार आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. हीच गरज लक्षात घेऊन पुण्यात विविध रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो, विमानतळ आणि सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांना गती दिली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही पुण्याच्या विकासाकडे विशेष लक्ष असून, भविष्यातील पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी मांडलेली ‘पाताळ लोक’ अर्थात भुयारी मार्ग आणि रस्त्यांच्या संकल्पनेतून शहराच्या वाहतुकीला नवे पर्याय उपलब्ध करून देण्याचा व्यापक विचार पुढे येत आहे.
याच विकासदृष्टीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पुण्याच्या पूर्व भागातील केशवनगर–खराडी उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. “पुण्याची वाढती गरज लक्षात घेता वाहतूक समस्या सोडवणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. केशवनगर–खराडी उड्डाणपूल हा केवळ वाहतूक कोंडी कमी करणारा प्रकल्प नसून पुण्याच्या पूर्व भागाच्या भविष्यातील विकासाला गती देणारी महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केले.
खराडी हे पुण्याचे महत्त्वाचे आयटी हब म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. त्याचबरोबर केशवनगर, मुंढवा, वडगाव शेरी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी व व्यावसायिक विकास झाला आहे. परिणामी या भागातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. दररोज हजारो नागरिक कामानिमित्त या मार्गावरून प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर केशवनगर–खराडी उड्डाणपूल नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
या उड्डाणपुलामुळे केशवनगरकडून खराडीकडे जाणाऱ्या वाहनांचा सुमारे ६ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास टाळता येणार असून, बायपास रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा दररोजचा सुमारे अर्धा तास प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होईल. वाहतुकीचा वेग वाढण्यासोबतच इंधनाची बचत होईल आणि वाहनांमुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासही या प्रकल्पाचा हातभार लागणार आहे.
खराडीतील आयटी पार्क, व्यावसायिक केंद्रे आणि वाढत्या निवासी भागांमुळे भविष्यात या परिसरातील वाहतूक आणखी वाढणार आहे. त्यामुळे उभारण्यात आलेला हा उड्डाणपूल केवळ वर्तमानातील वाहतूक समस्या सोडवणारा प्रकल्प नसून भविष्यातील पुण्याची गरज लक्षात घेऊन उभारलेली महत्त्वाची सुविधा आहे. पुण्याच्या पूर्व भागातील केशवनगर, खराडी, मुंढवा, वडगाव शेरी तसेच लगतच्या परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला यामुळे मोठी गती मिळणार आहे.
“पुण्याचा विकास हा केवळ शहराच्या मध्यवर्ती भागापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महानगर क्षेत्राचा संतुलित विकास झाला पाहिजे, ही भूमिका आहे. त्यासाठी रस्ते आणि उड्डाणपुलांसोबतच मेट्रो, विमानतळ, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. भविष्यातील वाहतुकीचा विचार करून आजच आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे,” असेही मोहोळ यांनी सांगितले.
या उड्डाणपुलाच्या कामाशी आपला पूर्वीपासून असलेला संबंध अधोरेखित करताना मोहोळ म्हणाले, “महापालिकेच्या स्थायी समितीची धुरा माझ्याकडे असताना या उड्डाणपुलाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महापौर म्हणून काम करत असताना त्याच्या प्रक्रियेला पुढे नेण्याची संधी मिळाली आणि आज केंद्रीय मंत्री म्हणून त्याचे लोकार्पण करण्याचा योग आला, ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. एका प्रकल्पाची संकल्पना प्रत्यक्षात येऊन तो नागरिकांच्या सेवेत दाखल होताना पाहणे हा निश्चितच आनंदाचा क्षण आहे.”
पुण्याच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्याची गरज आहे. पुणे शहराचा विस्तार वेगाने होत असताना केवळ पारंपरिक रस्ते रुंदीकरणावर अवलंबून न राहता उड्डाणपूल, भुयारी मार्ग, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक पर्यायांचा एकत्रित विचार करावा लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारकडून पुण्याच्या पायाभूत विकासाला विशेष चालना मिळत असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून पुण्याला भविष्यातील गरजांसाठी सक्षम करण्याचे काम सुरू आहे.
“पुणे हे देशातील महत्त्वाचे शिक्षण, आयटी, उद्योग आणि सेवा क्षेत्राचे केंद्र आहे. त्यामुळे पुण्याचा विकास आणि वाहतूक व्यवस्था यांचा मेळ साधणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचवणारी, तसेच शहराच्या विकासाला गती देणारी पायाभूत सुविधा उभारणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
या लोकार्पण सोहळ्यास आमदार चेतन तुपे, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, शिवसेनेचे पक्ष नेते नितीन गावडे यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.
केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव द्या; रोहन सुरवसे पाटील यांची मागणी
Newsworldmaratgi Pune : केशवनगर-खराडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उड्डाणपुलाचे रविवारी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला.
दरम्यान, या उड्डाणपुलाला दिवंगत अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना निवेदन दिले आहे.
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजितदादा पवार यांनी पायाभूत सुविधा आणि वाहतूक प्रकल्पांना प्राधान्य दिले. त्यांच्या विकासाभिमुख कार्याची आठवण कायम राहावी, या उद्देशाने उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या उड्डाणपुलाची लांबी सुमारे ४११ मीटर असून रुंदी २४ मीटर आहे. पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू राहणार आहे.
अजितदादांच्या पुणे शहराच्या विकासातील योगदानाचा सन्मान म्हणून उड्डाणपुलाचे ‘दिवंगत अजितदादा पवार उड्डाणपूल’असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.
सायकलींनी दिली विद्यार्थिनीच्या स्वप्नांना नवी दिशा
Newsworldmarathi Pune : खाचखळगे, चिखल आणि मातीच्या रस्त्यांवरून काही मैलांचा खडतर प्रवास करत शाळा गाठणाऱ्या नांदगाव फाटा-वऱ्हाणे परिसरातील विद्यार्थिनींच्या वाट्याला आता सायकलचे स्वातंत्र्य आले आहे. स्वातंत्र्यदिनी नव्या सायकलींवरून शाळेत पोहोचलेल्या या सव्वाशे विद्यार्थिनींनी ध्वजारोहण सोहळ्यात सहभाग घेतला. तिरंग्याला सलाम करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता; मात्र त्याहून मोठा आनंद होता – आता रोजचा शाळेचा प्रवास काहीसा सोपा होणार याचा.
शाळा गाठण्यासाठी या विद्यार्थिनींना दररोज पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते. रस्त्यातील खड्डे, निसरडी माती, पावसाचे पाणी आणि वाहतुकीचा अभाव यामुळे त्यांचा प्रवास अनेकदा कष्टदायक ठरतो. उन्हाळ्यात धुळीचे लोट, तर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य – अशा परिस्थितीतही शिक्षणाची ओढ त्यांना रोज शाळेपर्यंत घेऊन येत होती. सायकल मिळाल्याने त्यांच्या वेळेची बचत होणार असून, शाळेत जाण्या-येण्याचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुसह्य होणार आहे.
आर. बी. जी. फाऊंडेशन, नवी मुंबई आणि मधुरा गेठे यांच्या वतीने विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या मुली सायकलींवरून शाळेत आल्या आणि स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्यामुळे सायकल वाटपाचा उपक्रम केवळ वस्तू देण्यापुरता मर्यादित न राहता त्याचा प्रत्यक्ष परिणामही दिसून आला.
या कार्यक्रमाला सुरेश जी शेलार, विकी खैरनार, रतन हलवर, प्रा. डॉ. डी. के. हलवर, सोमनाथ दुकळे,
साहेबराव बच्चाव, रामचंद्र दुकळे , विक्रम मार्कंड उपस्थित होते.
“ग्रामीण विद्यार्थिनींच्या शिक्षणाला पाठबळ देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. मुलींना साधने आणि संधी मिळाल्या, तर त्या आत्मविश्वासाने पुढे जातील,” असे मधुरा गेठे यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणातील अडथळे कमी होऊन त्यांच्या स्वप्नांना चाकांची नवी गती मिळाली आहे. पालक, नागरिक आणि विद्यार्थिनींनी आर. बी. जी. फाऊंडेशनच्या उपक्रमाचे स्वागत केले.
राष्ट्रहित जोपासणारे विदयार्थी घडवणे हिच काळाची गरज” : आयएएस अधिकारी डॉ.सागर डोईफोडे
Newsworldmarathi Pune: स्वातंत्र्य हि जबाबदारी आहे, ती प्रामाणिकपणे पेलणारे तसेच राष्ट्रहित जोपासणारे विद्यार्थी घडवणे हि काळाची गरज आहे असे प्रतिपादन श्रीनगरचे भारतीय प्रशासकिय सेवा अधिकारी सागर डोईफोडे
यांनी केले.
चाटे शिक्षिण समुहाच्याधनकवडी येथील चाटे पब्लिक स्कूल येथे आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळा चाटे स्कूल चे माजी विद्यार्थी, श्रीनगरचे भारतीय प्रशासकिय सेवा अधिकारी डॉ सागर डोईफोडे यांच्यासह आशिष साबळे, रत्नाकर सोनवणे, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त विजयसिंह गायकवाड शिव व्याख्याते राहूल नलावडे, संस्थापक प्रा. फुलचंद चाटे मुख्याध्यापक नवनीत राजपाल व रणजीत जगताप, जाधव सर यांच्या उपस्थितीत मोठ्या . उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ देण्यात आली. देशभक्तीपर मनोगतं, नृत्य व विविध कलागुणं सादर करुन विद्यार्थ्यानी उपस्थितांची मने जिंकली.
प्रा. फुलचंद चाटे सरांनी आपल्या प्रास्ताविकात चाटे शिक्षण समुहाच्या चौफेर प्रगतीचा आढावा मांडताना देशाचे सर्वोत्तम
नागरिक, देशाचे नेतृत्व, सर्व क्षेत्रात आपली क्षमता सिध्द करणारे विद्यार्थी घडवण्याचे प्रयत्न सदोदीत सुरू असल्याचे सांगीतले.
डॉ डोईफोडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना जीवनातील धेय प्राप्तीसाठी आवश्यक असलेला मूलमंत्र दिला. तत्पुर्वी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला. आभार प्राचार्य रणजीत जगताप यांनी मानले.
धनकवडीतील जमीन व टीडीआर प्रकरणावरून कडू यांचा चव्हाणांना इशारा; आरोप सिद्ध करा, अन्यथा मागे घ्या
Newsworldmarathi Pune: धनकवडी येथील जमीन व टीडीआर प्रकरणावरून सुरेंद्र दत्तात्रय कडू यांनी उषा चव्हाण आणि हृदयनाथ कडू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिकेविरोधात खोटे व तथ्यहीन आरोप करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा दावा कडू यांनी पत्रकार परिषदेत केला. संबंधितांनी न्यायालयात सर्व कागदपत्रे व पुरावे सादर करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.
कडू यांच्या निवेदनानुसार, त्यांचे वडील दिवंगत दत्तात्रय मारुतीराव कडू यांच्याशी अभिनेते म्हणून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत काही रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कडू कुटुंबीयांच्या नावाचा गैरवापर करून मालमत्तेबाबत चुकीचे दावे केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उषा चव्हाण यांनी स्वतःचे नाव कडू असल्याचे सांगणेही चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला.
उषा चव्हाण यांनी त्यांची आई दिवंगत सुमन दत्तात्रय कडू यांचा संसार उद्ध्वस्त केला असून आता कडू कुटुंबीयांच्या मागे लागल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. या आरोपांसाठी त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांचा आधार घेतला आहे. संबंधितांनी आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ न्यायालयीन कागदपत्रे आणि टायटल सर्च रिपोर्ट जनतेसमोर सादर करावेत, असे आवाहन कडू यांनी केले.
दरम्यान, धनकवडीतील टीडीआर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही कडू यांनी उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, रिट पिटिशन क्रमांक ५६१८/२०२४ मध्ये न्यायालयाने संपूर्ण टीडीआर त्यांच्या नावावर देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ४ मार्च २०२६ रोजीच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने कार्यवाही सुरू केल्याचा दावाही त्यांनी केला.
उषा चव्हाण व हृदयनाथ कडू यांनी कायदेशीर कागदपत्रांसह आपले दावे सिद्ध करावेत, अन्यथा आरोप मागे घ्यावेत, असे आव्हान सुरेंद्र कडू यांनी दिले आहे. त्यामुळे धनकवडीतील जमीन आणि टीडीआरचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
भारताच्या तांदळाच्या निर्यातीमध्ये 5% टक्के वाढ
Newsworldmarathi Pune: बिगर बासमती तांदळाच्या मागणीमुळे जागतिक बाजारपेठेत भारताचे वर्चस्व कायम,यावर्षी म्हणजे जानेवारी 2026 ते जून 2026 या सहा महिन्यांमध्ये तांदळाच्या निर्यातीमध्ये भारतातून 5% ची वाढ झाली आहे.गेल्या वर्षी आपण भारतातून 11.68 दशलक्ष टन निर्यात झाली होती आणि यावर्षी तांदळाची निर्यात 12.27 दशलक्ष टन झाली आहे.भौगोलिक,राजकीय तणाव,अमेरिका इराण युद्ध असताना सुद्धा भारताने निर्यातीमध्ये आपली परंपरा कायम ठेवली आहे.5% टक्केची चांगली अशी वाढ दर्शवली आहे.
त्यामध्ये मूळ कारण अशी आहेत की आपल्याला तांदळामध्ये निर्यातीमध्ये स्पर्धेमध्ये आपल्याबरोबर जे कोणी देश आहेत त्यामध्ये मुख्यतः थायलंड,व्हिएतनाम आणि पाकिस्तान आहेत या तिन्ही देशांनी जेवढी निर्यात केली आहे तेवढी निर्यात भारताकडून झाली आहे.साधारणत जगातील जी निर्यात होते त्यातली 40% निर्यात हा फक्त भारत एकमेव देश करतो.ही नोंदणीय गोष्ट आहे याची दोन-तीन कारणे आहेत की गेल्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तांदळाचा चांगला उत्पादन आलं.देशातल्या मागणी पेक्षाही अधिक उत्पादन आल्यामुळे आपण निर्यात करू शकलो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थायलंड,व्हिएतनाम आणि पाकिस्तान पेक्षाही आपल्या तांदळाचे दर जागतिक स्तरावर कमी आहेत.
त्यामुळे आपल्याकडून जानेवारी 2026 ते जून 2026 मध्ये खूप चांगली अशी निर्यात झाली आहे या निर्यातीमध्ये साधारणतः आपल्याकडून बासमती तांदळाची निर्यात यावेळी 5% टक्क्यांनी गेल्या वर्षी पेक्षा कमी झाली आहे.आपल्याकडे या सहा महिन्यांमध्ये बासमतीची निर्यात ही 3.7 दशलक्ष टन झाली आहे याचे एकच कारण आहे की युद्ध चालू होते आणि आपल्याकडे बासमती जो आहे हा सौदी अरब,इराण अशा बऱ्याच देशांमध्ये जातो तर त्या देशांमध्ये युद्ध असल्यामुळे बासमतीची मागणी कमी होती आणि त्यामुळे बासमतीची निर्यात कमी झाली.परंतु असा असतानाही सुद्धा नॉन बासमतीने निर्यातीमध्ये खूप मोठी वाढ केली आहे.नॉन बासमतीची निर्यात या वेळेला साधारण 9% टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ही जी वाढ झाली आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडून नॉन बासमती तांदूळ बांगलादेश, आफ्रिका,कॅमेरॉन,श्रीलंका अशा देशांमध्ये निर्यात झाला आहे.
एकंदरीत सहा महिन्याची जी निर्यात आहे जी 5% टक्क्यांनी वाढ झाली आहे ती खूप चांगली गोष्ट आहे.पुढील काळात ही निर्यात टिकून राहिला पाहिजे किंवा वाढायला पाहिजे,कारण की ही निर्यात झाली तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अब्जो रुपयात परकीय चलन मिळेल.
जुलै महिन्या पासून निर्यातीमध्ये बराच मोठ्या फरक पडला आहे.जुलै 2026 पासून काही निर्यातीमध्ये जे काही अडचणी आल्या आहेत त्यामध्ये मुख्यतःमालवाहतुकीचे दर खूप वाढलेले आहेत आणि जागतिक पातळीवर त्याची आपल्याशी खूप मोठी स्पर्धा होत आहे.आपल्या लॉजिस्टिक मध्ये ज्या अडचणी आहेत जे निर्यातदार आहेत त्यांना खूप मोठा दरवाढीचा सामना करावा लागत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्गो कंटेनर उपलब्ध होत नाहीयेत.या दोन गोष्टीची खूप मोठी अडचण आहे,त्यामुळे कार्गो नसल्यामुळे त्यांनी दर वाढवले आहेत.
तांदूळ वाहतुकीच्या दरामध्ये खूप वाढ झाली,साधारणता काही महिन्या पूर्वी एक शिपमेंट पाठवण्यासाठी 1500 ते 2000 डॉलर इतका खर्च येत होता.तो आता 7000 ते 7500 डॉलर इतका येत आहे आणि तो परदेशी व्यापाऱ्यांना परवडत नसल्यामुळे ते ऑर्डर देत नाहीत. तांदळाच्या निर्यातीचा जो खूप मोठा खर्च आहे,त्यामुळे निर्यातदर खूप मोठ्या संकटात सापडला आहे आणि पुढील काही महिने अशी परिस्थिती राहिली तर निर्यातीच लक्ष्य गाठणे खूप अवघड होईल.या परिस्थितीमध्ये सरकारला अशी विनंती आहे की, आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकायचा असेल तर निर्यात चालू ठेवायचे असेल आणि देशातील तांदळाचे जे अतिरिक्त उत्पादन आहे ते वाया न जाता ते परदेशात निर्यात व्हायला पाहिजे.त्यासाठी जे आता निर्यातीदाराला जे मुख्य अडचण आहेत की वाहतुकीसाठी कार्गो मिळत नाही किंवा उपलब्ध नाहीत, उपलब्ध आहेत तर त्याचे दर तिप्पट झालेले आहेत.त्याच्यावर सरकारने त्वरित निर्णय घ्यायला पाहिजे.निर्यातदाराला कार्गो उपलब्ध करून द्यायला पाहिजेत.
यासाठी शासनाने खूप गांभीर्याने त्याच्यावर काम करायला पाहिजे नाहीतर निर्यातीचा खूप मोठा विपरीत परिणाम होईल आणि देशाला जे परकीय चलन मिळते त्याच्यावर खूप मोठा फरक पडेल आणि आणि बराच रोजगार याच्यावर टिकून आहे.हा रोजगार पण कमी होऊ शकतो.अशा परिस्थितीमध्ये पुढील काळात निर्यात वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी,थायलंड पाकिस्तान आणि व्हिएतनाम सोबत स्पर्धा करायचे असेल तर नॉन बासमती आणि बासमती कार्गोचे दर त्वरित कमी करायला पाहिजे आणि कार्गो उपलब्ध करून द्यायला पाहिजेत,अशी माहिती जयराज ग्रुपचे (निर्यातदार) धवल शाह यांनी दिली.
श्रीलंकेतील ‘जेपीएल’साठी ‘पुणे पेशवाज’ संघाची घोषणा; जीतो अपेक्सतर्फे २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान ‘जेपीएल’चा पहिला हंगाम
Newsworldmarathi Pune : श्रीलंकेत होणाऱ्या ‘जीतो प्रीमियर लीग’ (JPL) क्रिकेट स्पर्धेसाठी पुण्याचा अधिकृत संघ असलेल्या पुणे पेशवाज संघाचे अनावरण द कोरिंथियन्स रिसोर्ट क्लब येथे भव्य सोहळ्यात आणि मोठ्या उत्साहात झाले. जीतो अपेक्सच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून जेपीएल स्पर्धेचा पहिला हंगाम २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित केला आहे. या स्पर्धेत पुणे पेशवाज संघ पुण्याचे प्रतिनिधीत्व करेल आणि क्रिकेटच्या या महत्त्वपूर्ण स्पर्धेत आपली दमदार छाप पाडण्याचा प्रयत्न करेल.
पुणे पेशवाई संघाच्या अनावरण सोहळ्यास जीतो अपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी आणि ‘जीतो स्पोर्ट्स’चे अध्यक्ष विकी ओसवाल यांच्यासह जीतो एपेक्स आरओएम आणि जीतो पुणे चॅप्टर’मधील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने आणि प्रोत्साहनपर शब्दांनी संघाचे मनोबल उंचावले तसेच या कार्यक्रमाची शोभा वाढवली. ‘पुणे पेशवाज’ संघाची मालकी विजय भंडारी, राजेशकुमार सांखला, विशाल चोरडिया, राजेंद्र जैन, डॉ. रमेश तेजावत, सुजित भटेवरा, दीपक जैन, अमोल कुचेरिया आणि निकुंज ओसवाल यांच्याकडे आहे. या सर्वांची या सोहळ्यास विशेष उपस्थिती होती.
जीतो अपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांनी ‘जेपीएल’च्या व्यापक उद्दिष्टांवर प्रकाश टाकला; तसेच, या लीगला अभूतपूर्व उंचीवर नेऊन समाजातील क्रिकेटसाठी एक खऱ्या अर्थाने जागतिक व्यासपीठ निर्माण करण्याच्या ‘जीतो’च्या नियोजनाबद्दल त्यांनी माहिती दिली.
विकी ओसवाल यांनी ‘जेपीएल’च्या कोलंबो येथे होणाऱ्या पहिल्या हंगामाबद्दल आणि लीगच्या पुढील वाटचालीच्या आराखड्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
एका विशेष परिसंवादा दरम्यान, मालकांनी ‘पुणे पेशवाज’बाबतची आपली दूरदृष्टी आणि जेपीएल विषयीच्या आपल्या आकांक्षा मांडल्या; तसेच केवळ एक यशस्वी क्रिकेट फ्रँचायझीच नव्हे, तर पुण्याचा अभिमान, जोश आणि उत्साह यांचे प्रतिनिधित्व करणारा संघ उभारण्याबाबतची आपली कटिबद्धताही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पुणे पेशवाज संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफचे प्रेक्षकांच्या प्रचंड उत्साहात आणि टाळ्यांच्या गजरात आगमन झाले. त्यांचा सत्कार करून ओळख करून देण्यात आली. संघाचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत मुंढे असून कर्णधार रुषभ राठोड आणि उपकर्णधार यश नहार आहेत. या पथकात अनुपम संकलेचा, स्वप्नील गुगळे, निलय शिंगवी, नील गांधी, निखिल लुणावत, अनिकेत पोरवाल, दीपक डांगी, हर्ष संघवी, हर्ष ओसवाल, अमन दोशी, अनुज छाजेड, यश बांबोळी, सौरभ शिंगवी, यश दागा, ईशान ओसवाल , निखिल जैन, चिराग गदिया , श्रेयांक जैन, रौनक खंडेलवाल , रौनक पारेख, प्रचित भलगट , क्षितिज जैन , शुभम चव्हाण स्पोर्ट्स मॅन्युअल थेरपिस्ट आणि डॉ. श्रेयश बाफना फिजिओथेरपिस्ट म्हणून आहेत.
‘पुणे पेशवाज’च्या अधिकृत गीताचे यावेळी भव्य अनावरण करण्यात आले. या गीतामुळे संघाला स्वतःची एक विशिष्ट ओळख आणि प्रेरणादायी घोषणा मिळाली असून, आगामी प्रवासासाठी एक उत्तम सुरुवात झाली आहे.
हा कार्यक्रम केवळ एका क्रिकेट संघाच्या अनावरणापुरता मर्यादित नव्हता, तर तो पुण्याच्या क्रीडा क्षेत्रातील एका नवीन प्रवासाची सुरुवात होती. संघाच्या मालकांचा उत्साह आणि प्रतिभावान खेळाडूंचा संघ, सक्षम नेतृत्व आणि पुणेकरांचा पाठिंबा यांच्या जोरावर ‘पेशवाज’ आता कोलंबोला जाऊन ‘जेपीएल’ च्या पहिल्या हंगामात सहभागी होण्यासाठी सज्ज आहे.
हा सोहळा अविस्मरणीय आणि यशस्वी करण्यासाठी प्रियंका परमार, जिनेंद्र लोढा, आर्या चोरडिया, शुभम भंडारी, शुभम राठोड आणि आयुष पालेशा यांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या १३५ व्या उत्सवाची सुरुवात; श्री गणेश सुवर्णधाम’ देखाव्याचे अनावरण अन् वासा पूजन
Newsworldmarathi Pune : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या यंदाच्या १३५ व्या गणेशोत्सवाची दिमाखदार सुरुवात ऑगस्ट क्रांती दिनाच्या मुहूर्तावर झाली. गणेशोत्सव मंडपाच्या वासा पूजनासह यंदाच्या देखाव्याचे अनावरणही यावेळी करण्यात आले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिर येथे रविवारी दुपारी झालेल्या कार्यक्रमात पोलिस उपायुक्त झोन-१ क्रुषिकेश रावले आणि अशोक इलेक्ट्रिकलचे अशोकभाई शहा व उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्या हस्ते उत्सव मंडपाचे विधीवत व पारंपारिक पद्धतीने वासा पूजन करण्यात आले. त्यानंतर यंदाच्या गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या देखाव्याचे अनावरण करण्यात आले.
यंदा ट्रस्टकडून ‘श्री गणेश सुवर्णधाम’ हा आकर्षक देखावा उभारण्यात येणार आहे. पार्वतीनंदन शिवपुत्र श्री गणेशाची वास्तू जिथे ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ या भारतीय संस्कृतीतील विचारांचा आचार-विचार केला जातो, या संकल्पनेवर आधारित हा देखावा असणार आहे. आई-वडिलांप्रती कृतज्ञता, त्यांचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील मातृ-पितृ पूजनाची परंपरा या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात येणार आहे.
दरवर्षी काल्पनिक विषयांवर आधारित देखावे सादर करणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून यंदाही गणेशभक्तांना वेगळा आणि संदेश देणारा देखावा पाहायला मिळणार आहे. १३५व्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
वासा पुजन सोहळ्यासाठी व देखावा अनावर प्रसंगी अनेक मान्यवर व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ढोल- ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाने वातावरण उत्सवमय झाले होते.
“क्रांतिकारकांचा गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या सजावटीचे वासापूजन आणि देखावा अनावरण क्रांतीदिनी झाले. यावर्षी श्री गणेश सुवर्णधाम हा काल्पनिक देखावा उभारला जाणार आहे. यावर्षीचा उत्सव हा धार्मिक, पावित्र्य आणि परंपरा जोपासून साजरा केला जाणार आहे. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही डिजेमुक्त गणेशोत्सव आणि दहीहंडी आम्ही साजरी करणार आहोत.”– पुनीत बालन, उत्सवप्रमुख व विश्वस्त
“श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या १३५ व्या गणेशोत्सव मंडपाच्या वासा पूजनाचा मान मला मिळाला याचा अत्यंत आनंद आहे. गतवर्षीही या मंडळाचा उत्सव मी पाहिला होता, कार्यकर्त्याचा उत्साह आणि विसर्जन मिरवणुकीतील शिस्त पाहिल्यानंतर पुण्याचा गणेशोत्सव आगळा वेगळा का आहे हे कळले. वासा पूजनाचा बहुमान दिल्याबद्दल ट्रस्टचा मनापासून आभारी आहे.”– क्रुषिकेश रावले, पोलिस उपायुक्त झोन-१.
प्रलंबित फौजदारी प्रकरण; विशाल चुघेरा यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
Newsworldmarathi Pune : निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फौजदारी प्रकरणाबाबत दिशाभूल करणाऱ्या आणि एकतर्फी बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप करत विशाल चुघेरा यांचे वकील अॅड. अभय देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट (सब ज्युडिस) असून न्यायालयाचा अंतिम निर्णय येणे बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रसिद्धीपत्रकानुसार, तक्रारदाराने भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० सह अन्य आरोपांखाली गुन्हा दाखल केला असला, तरी विशाल चुघेरा यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून ते न्यायालयात कायदेशीररित्या त्यांचा बचाव करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी विशाल चुघेरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने एबीए क्रमांक ३६९/२०२४ मध्ये १२ मार्च २०२४ रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान ट्रायल कोर्टात मोठी रक्कम जमा करण्यात आली असली, तरी त्याचा अर्थ गुन्ह्याची कबुली किंवा दोष स्वीकारल्याचे होत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
पुढे, न्यायालयात हजर राहण्याच्या तारखेची माहिती नसल्याने ट्रायल कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले होते. मात्र, संबंधित न्यायालयासमोर हजर राहून वस्तुस्थिती मांडल्यानंतर १ ऑगस्ट २०२६ रोजी हे वॉरंट रद्द करण्यात आले, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
केवळ एनबीडब्ल्यू जारी झाल्याचा उल्लेख करून अटकपूर्व जामीन, न्यायालयात रक्कम जमा करणे आणि नंतर वॉरंट रद्द झाल्याची बाब लपवून वृत्तांकन केल्यास ते दिशाभूल करणारे ठरेल, असा दावा करण्यात आला आहे. तसेच प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नसल्याने आरोपांना दोषसिद्धी म्हणून सादर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अॅड. अभय देशमुख यांनी सांगितले की, विशाल चुघेरा यांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून ते न्यायालयातच आपली बाजू मांडतील. खोटी, बदनामीकारक किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच वृत्त प्रकाशित करण्यापूर्वी न्यायालयीन नोंदी व आदेशांची पडताळणी करण्याचे आवाहन सर्व माध्यमांना करण्यात आले आहे.

