LATEST ARTICLES

सिंहगडरोड पोलिसांची मोठी कारवाई; रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

0
Newsworldmarayhi Pune : सिंहगडरोड पोलिसांनी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान एका रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई ११ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सिंहगडरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण आणि युवराज कांबळे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली. एक व्यक्ती अंगात काळ्या रंगाची टी-शर्ट व पांढऱ्या रंगाची पँट परिधान करून विश्व्रांतीनगरकडून जनता वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शंकर मंदिराजवळ, हिंगणे खुर्द, सिंहगडरोड परिसरात संशयास्पदरीत्या थांबलेली असून त्याच्याकडे अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाली. ही माहिती तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भूपेश साळुंके यांना देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांना पाहून संशयित व्यक्ती तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव सिद्धेश सुरेश पवार (वय ३१), रा. बिल्डिंग नं. ८ बी, पहिला मजला, विश्व्रांतीनगर, हिंगणे खुर्द, पुणे, असे सांगितले. झडतीदरम्यान त्याच्याकडून अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तुल आणि १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सिंहगडरोड पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूपेश साळुंके करीत आहेत. सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे,अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३ डॉ. सागर कवडे सहा पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, भुपेश साळुंके, पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, प्रफुल्ल चव्हाण, सतिश मोरे, विकास बांदल, राहुल ओलेकर, युवराज कांबळे सागर शेडगे, विनायक मोहिते, तानाजी सागर, शिरीष गावडे यांचे पथकाने केली आहे.

अकोले प्रीमियर लिगवर सदाहरीचे वर्चस्व; सामन्यात दमदार कामगिरी करत विजेतेपदावर मोहोर

0
Newsworldmarayhi Baramati: अकोले प्रीमियर लिगच्या मैदानावर सदाहरि क्रिकेट टीमने दमदार खेळाचे प्रदर्शन करत सामन्यात बाजी मारली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर प्रभावी कामगिरी करत सदाहरि संघाने प्रतिस्पर्ध्याला चांगलेच झुंजवले. सामन्यातील प्रत्येक क्षणी खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, आत्मविश्वास आणि सांघिक भावना यामुळे विजयावर शिक्कामोर्तब झाले. सदाहरि संघाकडून सुदाम खाडे, आकाश खाडे (कर्णधार), नामदेव आव्हाड, निलेश सोन्ने दीपक दराडे, दत्तू दराडे, हर्षद खाडे, तेजस खाडे, अविनाश पवार, तानाजी खामकर आणि आर्यन कांबळे यांनी मैदानावर दमदार योगदान दिले. निर्णायक क्षणी खेळाडूंनी दाखविलेली चिकाटी आणि संघासाठी केलेला संघर्ष विजयासाठी महत्त्वाचा ठरला. संघाच्या या यशामागे संघमालक सागर मोरे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले. तसेच विजय खाडे, संजय खाडे, दत्तू मोरे, समीर सोन्ने आणि प्रथमेश आव्हाड यांनी संघाला दिलेले पाठबळ आणि प्रोत्साहन उल्लेखनीय ठरले. सामन्यातील प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धावेबरोबर वाढत गेलेली उत्सुकता अखेर सदाहरि संघाच्या विजयाने संपली. विजय मिळताच खेळाडूंनी मैदानावर जल्लोष केला. समर्थकांनीही आनंदोत्सव साजरा करत आपल्या संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. सदाहरी संघाच्या या विजयामुळे अकोले प्रीमियर लिगमध्ये त्यांचे वर्चस्व अधिक ठळक झाले असून, आगामी सामन्यांसाठी संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.

महाखनिज पोर्टलचा ‘श्रीगणेशा’ अन् डोंगर फोडणारयांना डिजिटल ‘प्रसाद’ही !

Newsworldmarayhi Mumbai :डोंगर पोखरून, माती-मुरूम-खडीचा बेकायदा उपसा करून राज्य सरकारचा महसूल बुडविणाऱ्या खाणमाफियांवर डिजिटल नजर ठेवण्यासाठीच्या ‘महाखनिज २.०’ या पोर्टलचा ‘श्रीगणेशा’ मंगळवारी झाला. राज्यात पहिल्यांदाच आणलेल्या या योजनेमुळे बेकायदा उत्खनन रोखले जाणार आहे. तसेच सरकारची फसवणूक करणाऱ्यांना जबर दंडाचा डिजिटल ‘प्रसाद’ मिळणार आहे. या प्रणालीचे राज्यपातळीरील कामकाज कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल पाहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन मंगळवारी झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री योगेश कदम, महसूल विभागाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल तसेच रेलटेलचे प्रधान कार्यकारी संचालक विनोद कुमार अग्रवाल उपस्थित होते. राज्यात गौण खनिजाच्या बेकायदा उत्खननामुळे राज्य सरकारचा महसूल बुडत असल्याच्या तक्रारी सातत्याने येतात. परवानगीपेक्षा अधिक उत्खनन, वाहतुकीतील अनियमितता आणि नियमबाह्य वाहतूक परवान्यांमुळे महसूल विभागासमोर मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या ‘महाखनिज’ प्रणालीचे अद्ययावतीकरण करून अधिक व्यापक स्वरूपात ‘महाखनिज २.०’ विकसित करण्यात आले आहे. नव्या प्रणालीमध्ये गौण खनिजाच्या उत्खननापासून वाहतुकीपर्यंतची डिजिटल नोंद उपलब्ध होणार आहे. खाणक्षेत्र, साठवणूक क्षेत्र आणि वाहतुकीची माहिती एकत्रित करण्यात आली असून ई-टीपी, डिजिटल वाहतूक परवाना, वाहनांचे जीपीएस ट्रॅकिंग, ड्रोन सर्व्हे, ऑनलाइन शुल्कभरणा, अहवाल-विश्लेषण आणि तक्रार निवारण अशा सुविधा उपलब्ध आहेत. खाणक्षेत्रासाठी किती उत्खननाची परवानगी देण्यात आली, प्रत्यक्षात किती उत्खनन झाले आणि किती खनिजाची वाहतूक झाली, याची पडताळणी करता येणार आहे. वाहतूक परवान्याशी संबंधित वाहनांची माहिती आणि त्यांच्या हालचालींचाही मागोवा घेता येणार असल्याने नियमबाह्य उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. नवी मुंबईतील कोकण भवन येथे ‘महाखनिज २.०’चा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. गौण खनिजाच्या उत्खननातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे ‘महाखनिज’च्या माध्यमातून महसूल गळती रोखण्याबरोबरच बेकायदा उत्खनन आणि वाहतूक रोखण्याचा प्रयत्न आहे.
गौण खनिजाच्या बेकायदा उत्खननामुळे राज्य सरकारचा महसूल बुडण्याबरोबरच नैसर्गिक साधनसंपत्तीचेही नुकसान होते. ‘महाखनिज २.०’च्या माध्यमातून उत्खननापासून वाहतुकीपर्यंतची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचा प्रयत्न आहे. बेकायदा उत्खनन आणि वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवून महसूल गळती रोखण्यास या प्रणालीची मदत होईल.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
गौण खनिजाचे बेकायदा उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महाखनिज २.० ही यंत्रणा २४ तास काम करेल. दिवसागणिक राज्याचा एकत्रित आढावा घेऊन, याबाबतची कार्यवाही केली जाईल.
-रूबल अग्रवाल, विभागीय आयुक्त, कोकण विभाग तथा नोडल अधिकारी, ‘महाखनिज २.०’ ‘महाखनिज २.०’ची प्रमुख वैशिष्ट्ये २४ तास डिजिटल देखरेख ई-टीपी व डिजिटल वाहतूक परवाना वाहनांचे जीपीएस ट्रॅकिंग ड्रोन सर्व्हे उत्खनन व वाहतुकीची डिजिटल नोंद ऑनलाइन शुल्कभरणा व महसूल पडताळणी तक्रार निवारण डिजिटल अहवाल व विश्लेषण वाहनांची हालचाल व वाहतूक परवान्यांची पडताळणी जीआयएस आधारित माहिती व्यवस्थापन

फिट इंडिया, प्रदूषणमुक्त पुण्यासाठी पाच हजार पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग

0
Newsworldmarayhi Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्राच्या वतीने ‘पुणे ऑन पेडल्स’ सायकल रॅली, तसेच ‘पुणे फॅमिली वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार व प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर येथून निघून कर्वे रोड मार्गे डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते पुन्हा बालशिक्षण मंदिर अशी समाप्त झाली. या रॅलीच्या निमित्ताने १५० गरीब गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. रॅलीत सहभागी प्रत्येकाला पदक, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देऊन गौरविण्यात आले. सुमारे पाच हजार पुणेकर या सायकल रॅली व वॉकेथाॅनमध्ये सहभागी झाले होते. प्रसंगी माजी नगरसेवक जयंत भावे, विश्राम कुलकर्णी आदी उपस्थित होते. गिर्यारोहक गणेश आगाशे, खोखो प्रशिक्षक पुष्कर बर्वे, खोखो पुरस्कार विजेती राखी बर्वे, आयर्नमन स्पर्धा विजेते कुणाल आणि मीनल काशीकर, निवृत्त पोलीस अधिकारी विष्णु ताम्हाणे, क्लायंबर रुद्र करंदीकर व किया रेवणकर, क्रीडा छायाचित्रकार नितीन खानोलकर, अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेतील विजेते प्रशांत व मेधा जोग यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. अमितेश कुमार म्हणाले, “विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने योगदान देणे आवश्यक आहे. ‘फिट इंडिया’च्या माध्यमातून नागरिकांनी आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्राधान्य द्यावे, तसेच पर्यावरण संवर्धनासाठीही सक्रिय सहभाग नोंदवावा. देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा उभारणीवर भर देतानाच, येत्या काळात सायकल प्लॅनच्या माध्यमातून सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सामान्य नागरिक, महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत.” प्रास्ताविकात प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित ‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे यंदाचे सातवे वर्ष आहे. आरोग्यपूर्ण जीवनासाठी, प्रदूषणमुक्त पुण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन मोदीजी काम करीत आहेत. त्यांच्या या उदात्त कार्याला कृतज्ञता म्हणून हा उपक्रम राबविण्यात येतो आहे.” जयंत भावे यांनी सूत्रसंचालन केले. निलेश मिसाळ, जान्हवी जोशी, यामिनी मठकरी, निनाद पटवर्धन, गिरीश डोंगरे, कल्याणी टोकेकर, अमित पागे, शैलेश संचेती, प्रकाश तापकीर, अमेय कोकाटे, लोकेश राणे, दिनेश मुंडे, दिपाली मोहिते, तेजस गुप्ता या सर्वांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

व्हिएतनामच्या पंतप्रधानांचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भारत सरकारच्या वतीने केले स्वागत

Newsworldmarayhi New Delhi: १८व्या BRICS शिखर परिषदेच्या निमित्ताने व्हिएतनामचे पंतप्रधान श्री ले मिन्ह हंग यांचे आज नवी दिल्ली येथे आगमन झाले. त्यांच्या भारत आगमनावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भारत सरकारच्या वतीने त्यांचे स्वागत केले. व्हिएतनामच्या पंतप्रधानांचे भारत सरकारच्या वतीने स्वागत करण्याची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पार पाडली. यावेळी त्यांनी श्री. ले मिन्ह हंग यांचे भारतात मनःपूर्वक स्वागत करत, भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील दृढ व दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंधांना अधोरेखित केले. भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबंध असून, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, संस्कृती यांसह विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचे सहकार्य सातत्याने वृद्धिंगत होत आहे. व्हिएतनामच्या पंतप्रधानांचा हा भारत दौरा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना आणखी बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या १८व्या BRICS शिखर परिषदेच्या माध्यमातून सदस्य व सहभागी देशांमध्ये विविध जागतिक आणि प्रादेशिक विषयांवर विचारविनिमय तसेच सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. या व्यासपीठामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सहकार्य अधिक व्यापक आणि परिणामकारक करण्यासाठीही महत्त्वपूर्ण संवादाला चालना मिळणार आहे.

गणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरणपूरक मूर्ती

0
Newsworldmarathi pune: विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांना आपल्या उत्सवांची व संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांच्या माध्यमातून ‘गणेशमूर्ती कार्यशाळा व स्पर्धा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात परिसरातील तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वतःच्या हातांनी आकर्षक व देखण्या पर्यावरण मूर्ती बनवल्या. या कार्यशाळेत पुण्यातील प्रसिद्ध मूर्तिकार विनोद येलारपुरकर यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणरायाची सुबक मूर्ती साकारण्याचे शास्त्रोक्त व कलात्मक प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी अत्यंत उत्साहाने विविध रूपांतील ३०० पर्यावरण मूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ५ ते ७ वर्षे, ८ ते १० वर्षे आणि ११ ते १५ वर्षे अशा तीन स्वतंत्र वयोगटांमध्ये स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. तिन्ही वयोगटांतील मुलांनी मोठ्या कल्पकतेने गणेशमूर्ती साकारल्या. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आगामी गणेशोत्सवादरम्यान विशेष समारंभात आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना कलाशिक्षक अमोल काळे, प्रसिद्ध कलाकार निलेश खराडे, मूर्तिकार कुणाल कर्नावत आणि मूर्तिकार माधवी येलारपुरकर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमास कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने, नगरसेविका स्वप्नाली पंडित, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष अमित कंक यांच्यासह अनेक मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पर्यावरण मूर्तींची पाहणी करून मुलांच्या कौशल्याचे मनापासून कौतुक केले. हा संपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ‘राघवेंद्र बाप्पू मानकर मित्र परिवारा’च्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. “विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच आपल्या संस्कृतीची ओळख आणि संस्कार बालवयातच व्हावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय वयातच विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांतून प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने आपली समृद्ध संस्कृती जोपासण्यासाठी भावी पिढी निश्चितच सक्षम होईल,” असा विश्वास यावेळी नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी व्यक्त केला.

तांदूळ उत्पादनात ७० लाख टनांनी घट ? कमी पाऊस, लागवडीत घट झाल्याचा फटका.

0
Newsworldmarathi Pune: केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाचे खरीप हंगामातील तांदूळ लागवडी खालील क्षेत्र सरासरी ४१२ लाख हेक्टर आहे. खरीप हंगामात देशाच्या तांदूळ उत्पादनात सुमारे १४ लाख हेक्टरने घट झाली आहे. त्यासह अपुऱ्या पावसामुळे तांदूळ पिकाला पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे एकूण तांदूळ उत्पादनात सुमारे ७० लाख टनांनी घट होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. उत्पादनात घट झाली तरीही जागतिक तांदूळ बाजारात भारताचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाचे खरीप हंगामातील तांदूळ लागवडी खालील क्षेत्र सरासरी ४१२ लाख हेक्टर आहे. गतवर्षी उच्चांकी ४२८.४६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा ४१४.१० लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत १४.३६ लाख हेक्टरने लागवड क्षेत्रात घट झाली आहे. राज्यनिहाय कर्नाटकात ३.६१ लाख, तेलंगाणात ३.२९ लाख, झारखंडमध्ये १.८२ लाख, मध्य प्रदेशात १.७५ लाख, तमीळनाडूत १.२२ लाख, महाराष्ट्रात १.०२ लाख, आसाममध्ये १.२१ लाख, उत्तर प्रदेशात ७० हजार आणि हरियाणात १५ हजार, अशी लागवडीत घट झाली आहे. सर्वाधिक घट कर्नाटक, तेलंगाणा, झारखंड, मध्य प्रदेशात झाली आहे. कृषी विभागाने तांदूळ उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गतवर्षी उच्चाकी लागवड आणि चांगल्या पावसामुळे चीनला मागे टाकून देशात १,५४० लाख टन तांदूळ उत्पादन झाले होते. यंदा एल – निनोमुळे देशभरात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे लागवड आणि उत्पादनावर परिणाम होणार आहे. उत्पादनात सुमारे ७० लाख टनांनी घट होऊन, देशाचे एकूण उत्पादन यंदा १,४७० लाख टन होण्याचा अंदाज आहे. जागतिक बाजारात भारताचाच दबदबा यंदाच्या खरीप हंगामात तांदूळ उत्पादनात घट होण्याचा अंदाज असला तरीही केंद्र सरकारकडे ऑगस्टअखेर ६३९ लाख टन तांदळाचा साठा आहे. संरक्षित साठ्याच्या तुलनेत पाच पटीने जास्त आहे. त्या शिवाय अन्न सुरक्षा आणि इथेनॉलसह अन्य उपयोगासाठी एका वर्षाला देशाला सुमारे ४५० लाख टन तांदळाची गरज असते. त्यामुळे देशाची गरज भागूनही निर्यातीसाठी तांदळाची उपलब्धता चांगली राहणार आहे. त्यामुळे लागवड, उत्पादनात घट होऊनही जागतिक तांदूळ बाजारात भारताचा दबदबा कायम राहण्याचा अंदाजही कृषी विभागाने व्यक्त केला आहे. अशी माहिती जयराज ग्रुपचे संचालक डॉ.राजेश शाह यांनी दिली.

अतिरेकी धमक्यांना न जुमानता काश्मीरमध्ये साजरा होणार गणेशोत्सव

Newsworldmarathi Pune : काश्मीर खोऱ्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना यंदा अतिरेकी संघटनांकडून उत्सव साजरा केल्यास जीवे मारण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. मात्र, या धमकीला न जुमानता काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदाही धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मूर्ती काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे विधिवत पूजा करून सुपूर्द करण्यात आल्या. पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळांनी सलग पाचव्या वर्षी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. तब्बल ३४ वर्षे बंद असलेल्या काश्मीरमधील लाल चौकात २०२२ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर गेली तीन वर्षे काश्मीर खोऱ्यातील विविध ठिकाणी उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यंदा या उत्सवाला आणखी व्यापक स्वरूप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम यांच्या मूर्ती विधिवत पूजा करून काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. या मूर्ती स्वीकारण्यासाठी काश्मीरमधील गणेश मंडळांचे मोहित भान, रिषभ चाकू, शिशंत चाकू, संदीप रैना, संजीव रैना, हितेश रैना आणि संदीप कौल हे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम, गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार आणि अखिल मंडई मंडळाचे सूरज थोरात आदी उपस्थित होते.
‘‘काश्मीरमधील चार ते पाच जिल्ह्यांमध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन होते. मात्र, गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना अतिरेकी संघटनांनी जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु त्यांच्या या धमकीला न जुमानता आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गणेशोत्सव साजरा करण्याचा कार्यकर्त्यांचा उत्साह नक्कीच वाखाणण्यासारखं असून त्यांच्या या धाडसाचं कौतुकच करायला पाहिजे.’’
पुनीत बालन विश्वस्त व उत्सवप्रमुख – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

श्री वर्धमान स्वामी भगवान प्रतिष्ठा महोत्सव उत्साहात संपन्न

0
Newsworldmarathi Pune: कोंढवा परिसरातील थ्री ज्युवेल्स सोसायटी येथे श्री वर्धमान स्वामी भगवान यांच्या प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाले. श्री वर्धमान स्वामी जैन संघ (श्री ज्युवेल्स), पुणे यांच्या वतीने या प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जयराज ग्रुपच्या मातोश्री कंचनबेन हिरालालजी शहा (चोखावाला) परिवारातील राजेश शाह व जयंत शाह यांचे महोत्सवासाठी बहुमूल्य योगदान लाभले. भक्तियोगाचार्य प.पू.आ.भ. श्री यशोविजयसूरीश्वरजी महाराजा, शासनसरोज प.पू.आ.भ.श्री सुविजयसूरीश्वरजी महाराजा, तत्त्वकुशलाचार्य प.पू.आ.भ. श्री राजपुण्यसूरीश्वरजी महाराजा आणि वैभवसुधांशु प.पू.आ.भ. श्री कल्याणविजयसूरीश्वरजी महाराजा आदी संतांच्या मंगल सान्निध्यात प्रतिष्ठा महोत्सवातील धार्मिक विधी पार पडले. महोत्सवातील मुख्य सोहळ्यात श्री वर्धमान स्वामी भगवान यांच्या मूर्तीची मुख्य गाभाऱ्यात विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच श्री पार्श्वनाथ प्रभू भगवान, श्री आदिनाथ भगवान, श्री गौतम स्वामी भगवान, श्री सुधर्मा स्वामी भगवान, श्री मणिभद्र वीर भगवान आणि श्री पद्मावती माता यांच्या मूर्तींचीही विधिवत प्रतिष्ठा करण्यात आली. प्रतिष्ठा महोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांना २६ ऑगस्टपासून सुरुवात झाली. ३ सप्टेंबर रोजी प्रभुजी की मेहंदी एवं सांझी, तर ४ सप्टेंबर रोजी माणकस्तंभ, घंटाकर्ण महावीर स्थापना, वेदिका स्थापना, लघु नंदीवर्त पाटला पूजन, नवग्रह पाटला पूजन, दशदिक्पाल पाटला पूजन आणि अष्टमंगल पाटला पूजन आदी धार्मिक विधी संपन्न झाले. ५ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता प्रभूंचा मंगल प्रवेश झाला. त्यानंतर शुभमुहूर्तावर मंगल प्रतिष्ठेचा मुख्य सोहळा आणि फले चुंदडी (गौतम प्रसाद) यांचे आयोजन करण्यात आले. याच दिवशी दुपारी बृहत शांतिस्नात्र पूजनही भक्तिभावाने संपन्न झाले. या प्रतिष्ठा महोत्सवाला पुणे तसेच परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. असंख्य भाविकांनी श्री वर्धमान स्वामी भगवान यांचे दर्शन घेऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला. संपूर्ण महोत्सवात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश शाह, जयंत शाह, धवल शाह, मालव शाह, हंसा शाह, हिना शाह, सेजल शाह आणि प्राची शाह यांच्यासह शहा परिवारातील सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. महोत्सोवाच आयोजन जयराज ग्रुपच्या वतीने करण्यात आले.

जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटरचा वर्धापन दिन क्रीडा स्पर्धांनी उत्साहात

0
Newsworldmarathi Pune: बुद्धिबळातील डावपेच, कॅरममधील अचूक नेम, टेबल टेनिसमधील चुरशीच्या लढती आणि बॅडमिंटनमधील वेगवान खेळ अशा क्रीडामय वातावरणात कोंढवा येथीलना जयराज क्लबमध्ये जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटरचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध वयोगटांतील सभासद आणि क्रीडाप्रेमींनी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने दिवसभर क्लबमध्ये क्रीडा उत्साह पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन करत ‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया’ या भावनेतून देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यावर सातत्याने भर दिला आहे. खेळातून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. हाच दृष्टिकोन पुढे नेत जयराज क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धिबळ स्पर्धेतील १८ वर्षांखालील गटात क्रिसिल शहा व क्रिशांग शहा, तर १८ वर्षांवरील गटात प्रकाश ओसवाल व रणजीत शहा यांनी बाजी मारली. कॅरममध्ये १८ वर्षांखालील गटात हृदान व विहान मेहेर, तर १८ वर्षांवरील गटात मयूर मेहेर व सौरभ शहा विजेते ठरले. टेबल टेनिस स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात अर्थ रुणवाल व आदिव शाह, १८ वर्षांवरील गटात अनुप मेहेर व प्रितेश मेहता, तर ६० वर्षांवरील गटात विलास शहा व रणजीत शहा यांनी विजेतेपद पटकावले. बॅडमिंटनच्या पुरुष विभागातील विविध वयोगटांत अर्णव शहा, लॅव्हन पटेल, अर्थ रुणवाल, रिदान प्रथम पारेख, तुषार राठोड, व्रजेश शहा आणि राजेश पारेख यांनी विजेतेपद मिळविले. महिला विभागात प्रियाल शहा, पूजा गांधी आणि स्नेहल शहा यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपापल्या गटात विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील कामगिरीबरोबरच क्रीडा क्षेत्रातील उत्साह आणि सहभागाचाही विशेष गौरव करण्यात आला. स्मित संघवी यांना ‘बेस्ट स्पोर्टिंग अवॉर्ड’, हसमुख पटेल यांना ‘सीनियर स्टार अवॉर्ड’, तर माहित शहा यांना ‘यंगेस्ट पार्टिसिपेंट अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना श्री पूना गुजराती बंधू समाजाचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. राजेश शहा, जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी नैनेश नंदू, सेक्रेटरी राजेंद्र शहा तसेच ट्रस्टी दिलीप मेहता आणि पंकज डेडिया यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या स्पर्धांमुळे विविध वयोगटांतील खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर सभासदांमध्ये क्रीडाविषयक आवड वाढविणे, नियमित खेळासाठी प्रोत्साहन देणे आणि खिलाडूवृत्ती दृढ करण्याचा उद्देशही या उपक्रमातून साध्य झाला.
राजेश शहा, मॅनेजिंग ट्रस्टी, श्री पूना गुजराती बंधू समाज