LATEST ARTICLES

कै. हिराभाई शहा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिर; ३०० हमाल बांधवांची डोळे तपासणी

0
Newsworldmarathi Pune: सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे, वेळेवर आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन डॉ. राजेश शहा यांनी केले. जयराज ग्रुपचे संस्थापक कै. हिराभाई शहा यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित डोळे तपासणी शिबिर, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, बीएमडी (बोन मिनरल डेन्सिटी) तपासणी तसेच रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला हमाल पंचायतचे अध्यक्ष गोरख मेंगडे, पुना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष दीपक बोरा, अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ, पुणे हॉस्पिटलचे ट्रस्टी अशोक ओसवाल, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे अध्यक्ष मिलिंद पाटील, जयराज ग्रुपचे संचालक धवल शहा, श्री पूना गुजराती बंधू समाजाचे खजिनदार हरीश शहा तसेच अमनोरा एस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात मोठ्या प्रमाणावर हमाल बांधव आणि व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ३०० हमाल बांधवांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच २०० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर २५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी नोंदणी करण्यात आली. याशिवाय ३० महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली आणि १८ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. कै. हिराभाई शहा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या आरोग्य उपक्रमाला व्यापारी, हमाल बांधव आणि विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महाज्योती व वनार्टीतील कोट्यवधींच्या निविदांची चौकशीची मागणी; प्रशांत वावगे व चंदनसिंग यांना पदावरून हटविण्याची मागणी

0
Newsworldmarathi Pune: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) तसेच वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) येथील कथित आर्थिक गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेते रोहन सुरवसे पाटील यांनी महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात महाज्योतीचे वित्त व लेखा अधिकारी तथा वनार्टीचे प्रभारी संचालक प्रशांत वावगे आणि महाज्योतीचे टेंडर सल्लागार चंदनसिंग यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या निविदांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची स्वतंत्र उच्चस्तरीय समिती किंवा सक्षम तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, प्रशांत वावगे हे महाज्योतीमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांच्या बदलीनंतर प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या निविदा मंजूर झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व निविदांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. वनार्टीच्या प्रभारी संचालकपदाची जबाबदारी सांभाळत असतानाही त्यांच्या कार्यकाळात काही निविदा विशिष्ट संस्थांना देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून या व्यवहारांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. टेंडर सल्लागार चंदनसिंग यांच्याविरोधातही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अनेक वर्षे टेंडर सल्लागार म्हणून कार्यरत राहून त्यांनी स्वतःच्या किंवा संबंधित संस्थांना तसेच परिचित संस्थांना कोट्यवधी रुपयांच्या निविदा मिळवून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विविध व्यक्तींच्या नावाने संस्था किंवा कंपन्या स्थापन करून निविदा वळविण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच प्रशांत वावगे आणि चंदनसिंग यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त करून त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. रोहन सुरवसे पाटील यांनी प्रशांत वावगे यांना महाज्योती व वनार्टीतील सर्व पदांवरून तात्काळ दूर करणे, चंदनसिंग यांची टेंडर सल्लागार म्हणून नियुक्ती रद्द करणे, त्यांच्या कार्यकाळातील सर्व निविदांची चौकशी करणे, दोषी आढळल्यास फौजदारी व विभागीय कारवाई करणे, शासनाच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे तसेच चंदनसिंग यांच्याशी संबंधित संस्थांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकून सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेतून वगळण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार रोहन सुरवसे पाटील यांनी इशारा दिला की, महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली नाही, तर या संपूर्ण प्रकरणाची तक्रार थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात येईल. तसेच या कथित आर्थिक गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री स्तरावर लावून धरली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या ही हातातून साकारतोय बाप्पा….

0
Newsworldmarathi Pune: आयुष्यातील एका वळणावर , रागाच्या भरात नकळत त्यांच्या हातून गुन्हा घडला, त्याची शिक्षा ते प्रामाणिकपणे भोगत आहेत.त्यांना नकारात्मक वातावरणातून बाहेर काढून त्यांच्या मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून एका वेगळ्या आयुष्याचा शब्दश: श्री गणेशा येरवडा मध्यवर्ती कारागृहात संपन्न झाला.निमित्त होते कारागृहातील बंदी बांधवांना गणपती मूर्ती बनवण्याच्या प्रशिक्षणाचे. या सकारात्मक आणि विधायकते ची ही पालखी खांद्यावर पेलली होती जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर आणि त्यांचे चिरंजीव युवा शिल्पकार विराज खटावकर यांनी. महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान- पुणे आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यातील चांगला माणूस जागा करण्या साठी गेली बारा वर्षे प्रेरणापथ हा उपक्रम कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत या बांधवांना पर्यावरण पूरक बाप्पाची मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत या बांधवांनी माती मळण्यापासून ते प्रत्यक्ष गणपती मूर्ती बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे सहभाग घेतला. महाराष्ट्र कारागृह प्रशासनाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, कारागृह ,कागारगृह उपमहा निरीक्षक श्री योगेश देसाई, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक श्री सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक सौ पल्लवी कदम,सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, तुरुंग अधिकारी श्री शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा संपन्न झाली. या प्रकल्पाचे समन्वयक आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे आयोजनामाची भूमिका स्पष्ट करताना या बांधवांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांच्या हातून चांगले काम करून घेण्याच्या उद्दिष्टाने प्रेरणापथ प्रकल्प कार्यरत असून त्याला समाजाच्या विविध स्तरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे असे सांगितले. जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी याप्रसंगी बोलताना या बंदी बांधवांमध्ये असलेल्या ऊर्जेला आणि कलात्मकतेला जर योग्य मार्ग आणि वळण मिळाले तर त्यांच्या हातून अनेक चांगल्या कलाकृती घडू शकतील आणि त्याची सुरुवात या कार्यशाळेतून झाली आहे असे सांगून माझ्या कला जीवनातल्या प्रवासातला हा अविस्मरणीय दिवस आहे असे नमूद केले. या कार्यशाळेत शिल्पकार शशिकांत राहूकर, अमित कलाल, रोहित गोळे, कागद काम निर्देशक पुंडलिक खलोलकर, शुभम मेदनकर, प्रवीण सोनवणे, संजय मोरे यांनी मार्गदर्शन केले. *या बंदी बांधवांनी बनवलेल्या गणेश मूर्ती समाजातील विविध मान्यवरांनी खरेदी करून या मंडळींच्या वेगळ्या आयुष्याची सुरुवात करावी असे आवाहन महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या वतीने या निमित्ताने करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुरुंग अधिकारी श्री शिवाजी पाटील यांनी केले. शिक्षक श्री नामदेव शिंदे गुरुजी यांनी आभार प्रदर्शन केले.

पुनीत बालन स्टुडिओजच्या ‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार; मनवीर जसरोटिया यांना सर्वोत्कृष्ट संकलनाचा सन्मान

0
Newsworldmarathi Pune : पुनीत बालन स्टुडिओज निर्मित ‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ या माहितीपटासाठी मनवीर जसरोटिया यांना ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये गैर-फीचर चित्रपट (Non-Feature Film) विभागातील सर्वोत्कृष्ट संकलन (Best Editing) या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली. पुनीत बालन स्टुडिओज निर्मित हा माहितीपट खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (National Defence Academy – NDA) या देशातील तिन्ही सैन्यदलांसाठी अधिकारी घडविणाऱ्या अग्रगण्य प्रशिक्षण संस्थेच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला समर्पित आहे. एनडीएच्या स्थापनेपासून ते जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित लष्करी प्रशिक्षण संस्थांपैकी एक होईपर्यंतचा प्रवास, त्यातील महत्त्वाचे टप्पे, परंपरा आणि भारतीय सशस्त्र दलासाठी घडविलेल्या अनेक पिढ्यांतील अधिकाऱ्यांचे योगदान या माहितीपटातून प्रभावीपणे उलगडण्यात आले आहे. तनुज भाटिया आणि तनुका लाघाटे यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले असून मुग्धा कालरा यांनी लेखन केले आहे. दुर्मीळ संग्रहित दृश्ये आणि प्रभावी दृश्यात्मक कथनशैलीच्या माध्यमातून एनडीएचा नेतृत्व, शिस्त आणि उत्कृष्टतेचा वारसा प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. या माहितीपटातील मनवीर जसरोटिया यांच्या उत्कृष्ट संकलनाला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे. या राष्ट्रीय पुरस्कारामुळे पुनीत बालन स्टुडिओजच्या अर्थपूर्ण, प्रभावी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर दर्जेदार चित्रपट निर्मिती करण्याच्या वचनबद्धतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
“‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा आमच्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हा सन्मान राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या गौरवशाली परंपरेला आणि देशसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या शूर अधिकाऱ्यांना समर्पित आहे. या प्रेरणादायी प्रवासाचे दस्तऐवजीकरण करण्याच्या आमच्या प्रयत्नाची सर्वोच्च स्तरावर दखल घेण्यात आल्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संकलक मनवीर जसरोटिया आणि आमच्या संपूर्ण सर्जनशील टीमचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा सन्मान भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेला समर्पित आहे.”
– पुनीत बालन, निर्माते

गुरुपौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Newsworldmarathi Pune: गुरुपौर्णिमेनिमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ ते २९ जुलै या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक उपक्रम पार पडणार असून, भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळच्या सत्रात धार्मिक विधी व पूजा-अर्चा, दुपारच्या सत्रात भजनाचा कार्यक्रम तसेच सायंकाळी भक्तिगीते व भावगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच मंदिरात दिवसभर भाविकांसाठी प्रसाद वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. या उत्सवाच्या काळात विविध क्षेत्रांतील मान्यवर मंदिरास भेट देणार असून, भाविकांना आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे. याबाबत माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी सांगितले, “गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भाविकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेष आखणी करण्यात आली असून, सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.” यावेळी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, खजिनदार ॲड. सूरज थोरात, विश्वस्त वर्षा थोरवे, विश्वस्त डॉ. पराग काळकर, विश्वस्त महेंद्रशेठ गाडवे, उत्सव प्रमुख नितीन पंडित तसेच उप-उत्सव प्रमुख मनीषाताई खेडेकर उपस्थित होते.

कलम १५५ गैरवापरप्रकरणी निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; रोहन सुरवसे पाटील यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

0
Newsworldmarathi Pune: महसूल विभागातील कलम १५५ च्या कथित गैरवापरप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच संबंधित अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह इतर सक्षम यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. निवेदनात सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे की, पावसाळी अधिवेशनात महसूल मंत्री बावनकुळे यांनी कलम १५५ चा गैरवापर केल्याप्रकरणी पुण्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये न्याय मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. कलम १५५ चा वापर केवळ शुद्धलेखन किंवा लिपिकीय स्वरूपातील चुका दुरुस्त करण्यापुरता मर्यादित असताना त्याचा गैरवापर करून जमिनींच्या मालकी हक्कांमध्ये फेरफार करण्यात आल्याचे गंभीर आरोप आहेत. सातबारा उताऱ्यातील नावे कमी करणे, मालकी हक्कांमध्ये बदल करणे तसेच काही प्रकरणांत पुरावे नष्ट करण्यासाठी संचिका गायब करण्यात आल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. सुरवसे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी नसून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. अशा कठोर कारवाईमुळे भविष्यात कोणताही अधिकारी अधिकारांचा गैरवापर करण्याचे धाडस करणार नाही आणि महसूल विभागात पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. याशिवाय, संबंधित अधिकाऱ्यांनी कथितरित्या भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळविल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर सक्षम यंत्रणांकडून सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे.

वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची !

0
Newsworldmarathi Pune: आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘चरणसेवा’ उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे, अशी माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असून सेवा करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री पुणे शहरातील उपक्रमाला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचे सांगत अशा सेवाकार्यात सहभागी होणे हे मोठे भाग्य असल्याची भावना श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली. वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी सुमारे ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे. याशिवाय, पालखी मार्गावर ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती, स्वच्छतेचे महत्त्व, संसर्गजन्य व पावसाळ्यातील आजारांपासून बचाव, निरोगी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक मार्गदर्शन वारकरी व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. निवडक ठिकाणी योगसत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. श्री. रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित गतवर्षी ‘चरणसेवा’ उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वर्षीही ११ जिल्ह्यांतील सुमारे ४०० सेवा केंद्रांवर १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक कार्यरत असून, ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेल, रुग्णवाहिका सेवा आणि ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेवर आधारित ‘चरणसेवा’ उपक्रमातून वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय सेवेची जोड देण्यात आली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि पालखी मार्गावरील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 0000

कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘शॉप्शन’ला स्टार्टअप लीडरशिप पुरस्कार

0
Newsworldmarathi Navi Delhi: देशातील आघाडीची कृषितंत्रज्ञान कंपनी शॉप्शन प्रा. लि.ला अॅग्रिकल्चर टुडे कॉन्क्लेव्ह २०२६मध्ये प्रतिष्ठेचा ‘स्टार्टअप लीडरशिप अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शरद आर. काळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यास राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही, गुजरातचे कृषिमंत्री राघवजी पटेल तसेच कृषी क्षेत्रातील धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भारतीय शेतीमध्ये तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांद्वारे परिवर्तन घडवून आणण्यासाठी शॉप्शनने केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. कंपनीने शेतकरी, विक्रेते आणि कृषी उपकरण उत्पादक यांना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणत शेतीसाठी आवश्यक उत्पादने आणि सेवा अधिक सुलभ केल्या आहेत. तसेच सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, आयओटी आणि डिजिटल कृषी उपायांवर कंपनी विशेष भर देत आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शरद आर. काळे म्हणाले, “हा सन्मान आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा, विक्रेत्याचा आणि आमच्या संपूर्ण टीमचा आहे. ग्रामीण भारतातील शेती अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानस्नेही करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू.” शॉप्शन सध्या देशातील २५ राज्यांमध्ये कार्यरत असून ५५ हजारांहून अधिक विक्रेत्यांचे जाळे कंपनीशी जोडलेले आहे. कंपनीच्या ‘जीबीआरयू’ या ब्रँडअंतर्गत सिंचन, पंप, पाइप, हार्वेस्टर, स्प्रे पंप, रोटाव्हेटर, अर्थ ऑगर आदी ३५० हून अधिक कृषी उत्पादने उपलब्ध आहेत. डिजिटल व्यवहार आणि अल्पावधीत कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यामुळे कंपनीने कृषी व्यवसायात नवे मॉडेल उभे केले आहे.

नवीन फ्रँचायझी टीमसह पुनित बालन ग्रुपचा इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या तिसऱ्या हंगामात सहभाग

0
Newsworldmarathi Pune: इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ही भारतातील प्रमुख सुपरक्रॉस रेसिंग लीग, आपल्या तिसऱ्या हंगामासाठी पुनित बालन ग्रुपचे (PBG) नवीन फ्रँचायझी म्हणून अभिमानाने स्वागत करत आहे. पीबीजी रेसिंग या नवीन फ्रँचायझीच्या माध्यमातून पुनित बालन ग्रुपने भारतीय मोटरस्पोर्ट्सच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. तसेच, देशातील उदयोन्मुख क्रीडा परिसंस्थांचे एक प्रमुख केंद्र म्हणून पुण्याचे वाढते महत्त्व यातून अधिक अधोरेखित होत आहे. प्रसिद्ध उद्योजक, चित्रपट निर्माते आणि क्रीडा क्षेत्राचे पुरस्कर्ते पुनित बालन यांच्या नेतृत्वाखालील ही नवीन फ्रँचायझी, सुपरक्रॉस रेसिंगमध्ये क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी, युवा विकास आणि मोठ्या प्रमाणावरील लीग सहभाग यांचा वारसा घेऊन येते. क्रिकेट, बुद्धिबळ, टेनिस, हँडबॉल, टेबल टेनिस, खो-खो, बॅडमिंटन आणि आर्म रेसलिंग यासारख्या खेळांमध्ये यशस्वी गुंतवणूक आणि मालकी हक्क असलेल्या पुनित बालन ग्रुपचे आयएसआरएल मधील हे आगमन, भारतातील क्रीडा क्षेत्रातील पुढील पिढीसाठी संधी निर्माण करण्याच्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या ध्येयातील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आयएसआरएलमध्ये पीबीजी रेसिंगचा समावेश झाल्यामुळे महाराष्ट्रातील लीगचे स्थान अधिक भक्कम होईल आणि त्याचबरोबर भारतीय सुपरक्रॉसमध्ये क्रीडाप्रेर्मीचा एक नवीन वर्ग आणि चाहत्यांसाठी सहभागाच्या (फॅन एंगेजमेंट) नवनवीन संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. ‘तरुणांच्या प्रतिभेला प्रेरणा देण्यासाठी आणि मजबूत समुदाय उभारण्यासाठी खेळ हे नेहमीच एक प्रभावी माध्यम राहिले आहे; आणि याच विचारसरणीने गेल्या काही वर्षात आम्ही क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक गुंतवणुकीला दिशा दिली आहे. इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) हे भारतातील रेसिंग क्षेत्रातील एका रोमांचक नवीन पर्वाचे प्रतिनिधित्व करते. महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे शहर, येथील उत्साही चाहते आणि रेसिंगभोवती विकसित होत असलेल्या संस्कृतीमुळे देशातील सक्रिय मोटरस्पोर्ट हबपैकी एक म्हणून वेगाने उदयास आले आहे. सीझन 3 साठी ISRL मध्ये सहभागी होताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आम्ही अशा एका फ्रँचायझीची उभारणी करण्यास उत्सुक आहोत जी भारतीय रेसिंगचा ध्यास, उत्कृष्ट कामगिरी आणि त्यातील उत्साह यांचे प्रतिबिंब असेल; तसेच, या माध्यमातून देशातील मोटरस्पोर्टच्या दीर्घकालीन विकासालाही आम्ही हातभार लावू, असे पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन यांनी म्हटले आहे. आयएसआरएलचे सह-संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, “तिसऱ्या हंगामासाठी पुनित बालन ग्रुपचे ISRL परिवारात स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. भारतीय खेळ तसेच विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंच्या विकासासाठी पुनित बालन यांची असलेली वचनबद्धता, जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था उभारण्याबाबतच्या त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देते. सुपरक्रॉसला भारताच्या मुख्य प्रवाहातील क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्नांवरती, ISRL मध्ये त्यांचा झालेला प्रवेश ही या लीगची प्रगती आणि क्षमता यावरील आणखी एक महत्त्वपूर्ण मोहोर आहे. ही नवीन फ्रँचायझी चाहते तसेच रेसिंग क्षेत्रातील मंडळींमध्ये नवा उत्साह निर्माण करेल. या संयुक्त प्रवासासाठी आम्ही उत्सुक आहोत.” क्रीडा, मनोरंजन, युवा संस्कृती आणि व्यवसाय यांचा संगम साधत इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) सातत्याने वेगाने प्रगती करत आहे. ISRL मध्ये पुनित बालन ग्रुपचा प्रवेश हा भारतातील मोटरस्पोर्ट्स क्षेत्रातील वाढती व्यावसायिक गती आणि या लीगच्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर आघाडीचे गुंतवणूकदार तसेच क्रीडा क्षेत्रातील उद्योजकांचा वाढता विश्वास दर्शवतो. हा तिसरा सीझन पूर्वीपेक्षा अधिक भव्य, वेगवान आणि प्रेक्षकांसाठी अधिक रोमांचक तसेच अविस्मरणीय अनुभव देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे; त्यादृष्टीने आयएसआरएल अशी एक फ्रँचायझी यंत्रणा विकसित करत आहे, जिथे उच्च-स्तरीय रेसिंगचा थरार, मनोरंजन आणि चाहत्यांचा अनुभव यांचा सुरेख मेळ घातला जातो. या उत्साहात सहभागी व्हा आणि सोशल मीडियावर #Flirt With Dirt याच्यासह ISRL ला फॉलो करा

भक्तीच्या वाटेवर काळाचा घाला! जेजुरीत ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

Newsworldmarathi Pune : पंढरपूर वारीदरम्यान जेजुरी पालखी मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून, ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जेजुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या महिला वारकरी मार्गक्रमण करत असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या भीषण धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेनंतर पालखी मार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, प्रशासनाकडून पुढील तपासानंतर अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे.