LATEST ARTICLES
५० लाख रिक्त सरकारी पदे वर्षभरात भरा : युवक काँग्रेस
Newsworldmarayhi Pune: देशभरातील विविध सरकारी विभागांमध्ये ५० लाख ५ हजार ८५० मंजूर पदे रिक्त असल्याचा दावा करीत ही सर्व पदे एका वर्षाच्या आत भरण्यासाठी केंद्र सरकारने कालबद्ध भरती कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. यासाठी ‘मेरी डिग्री का क्या?’ हे देशव्यापी अभियान राबविण्यात येणार असून, महाराष्ट्रातील अभियानाची भूमिका पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.
इंडियन यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी इंदूर येथे या अभियानाची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. अभियानाची वेबसाइट आणि पुढील वर्षभराचा कृती आराखडाही तेथे जाहीर करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील अभियान आणि पुढील कार्यक्रमांची माहिती पुण्यात देण्यात आली.
‘युवकांच्या मेहनतीला न्याय हवा’ — उदय भानू चिब
देशातील लाखो युवक पदवी आणि आवश्यक पात्रता मिळवूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत असल्याचे चिब यांनी सांगितले. सामान्य कुटुंबे मुलांच्या शिक्षणासाठी मोठा आर्थिक भार उचलतात. अशा परिस्थितीत सरकारी विभागांमध्ये लाखो मंजूर पदे रिक्त का ठेवली जात आहेत, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
“युवक केवळ नोकरी मागत नाही; तो आपल्या आई-वडिलांना आधार देण्याची आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलण्याची संधी मागत आहे. युवकांची मेहनत, त्यांचा वेळ आणि त्यांच्या भविष्याला किंमत आहे,” असे चिब म्हणाले.
एका वर्षात रिक्त पदे भरण्यासाठी ठोस कार्यवाही न झाल्यास देशभर ‘जॉब मार्च’ आणि ‘डिग्री मार्च’ आयोजित करून आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
‘महाराष्ट्रातील युवकांचा आवाज बुलंद करणार’ — शिवराज मोरे
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, “राज्यातील लाखो युवक स्पर्धा परीक्षांची वर्षानुवर्षे तयारी करीत आहेत. केंद्रासह राज्यातील विविध विभागांमध्ये किती मंजूर पदे रिक्त आहेत, किती भरती प्रक्रिया प्रलंबित आहेत आणि त्या कधी पूर्ण होणार, याची माहिती सरकारने सार्वजनिक करावी.”
‘मेरी डिग्री का क्या?’ अभियान महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत नेण्यात येणार आहे. महाविद्यालये, विद्यापीठे आणि स्पर्धा परीक्षार्थींशी संवाद साधून बेरोजगारी आणि प्रलंबित भरतीचे प्रश्न सरकारसमोर मांडण्यात येतील, असे मोरे यांनी सांगितले.
‘परीक्षेपासून नियुक्तीपर्यंत निश्चित मुदत हवी’ — प्रथमेश आबनावे
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे म्हणाले, “सरकारी भरतीची केवळ जाहिरात काढून चालणार नाही. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी आणि अंतिम नियुक्तीपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित कालमर्यादा असली पाहिजे.”
स्पर्धा परीक्षांसाठी युवक आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे खर्च करतात. परीक्षा पुढे ढकलणे, निकाल रखडणे आणि नियुक्त्यांना होणारा विलंब यामुळे उमेदवारांचे नुकसान होते. त्यामुळे प्रत्येक विभागाने वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करावी, असे आबनावे यांनी सांगितले.
प्रमुख मागण्या
• देशभरातील ५०,०५,८५० रिक्त मंजूर पदे एका वर्षात भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा.
• केंद्र आणि राज्यातील विभागनिहाय रिक्त पदांची अद्ययावत माहिती सार्वजनिक करावी.
• प्रत्येक सरकारी विभागाने वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करावे.
• जाहिरात, परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी ते अंतिम नियुक्तीपर्यंत स्पष्ट कालमर्यादा निश्चित करावी.
• प्रलंबित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात.
• परीक्षा आणि निवड प्रक्रियेत पारदर्शकता व उत्तरदायित्व निश्चित करावे.
• रिक्त पदे, सुरू असलेल्या भरती आणि झालेल्या नियुक्त्यांचा नियमित सार्वजनिक अहवाल प्रसिद्ध करावा.
वर्षभर देशव्यापी अभियान
येत्या वर्षभरात देशभर जॉब मार्च, डिग्री मार्च, महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील संवाद आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. एका वर्षात रिक्त पदे भरण्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसने दिला.
“पदवी आहे, पात्रता आहे आणि मेहनतीची तयारीही आहे; मग रोजगाराची संधी कुठे आहे? ‘मेरी डिग्री का क्या?’ या युवकांच्या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावे,” अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस महेश म्हेत्रे तसेच प्रदेश सचिव विश्वजीत जाधव, प्रियांका चौधरी आणि अभिषेक अवचार उपस्थित होते.
पुण्यात बारा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गणेशस्तोत्र गायनातून रचला जागतिक रेकॉर्ड
Newsworldmarayhi Pune : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष उपक्रमात तब्बल १२ हजार ३६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने गणेशस्तोत्राचे पठण केले. पुण्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून उपक्रमाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये करण्यात आली आहे.
गणेशोत्सवातील धार्मिक परंपरा आणि विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ठरवून दिलेल्या वेळेनुसार सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमातून एकाच वेळी गणेशस्तोत्राचे सामूहिक पठण केले. या विक्रमाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये करण्यात आली असून यावेळी एशिया बुकच्या न्याय निर्णायक चित्रा जैन यांनी या रेकॉर्डसचे प्रमाणपत्र ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्याकडे सुपूर्द केले.
पुणे शहरासह परिसरातील विविध भागांतील शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यामध्ये महेश विद्यालय इंग्लिश स्कूल (कोथरूड), महेश विद्यालय सेमी इंग्लिश स्कूल (कोथरूड), धनिराज स्कूल (वाकड), पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड (कोरेगाव पार्क), जागृती ब्लाइंड स्कूल फॉर गर्ल्स, सिंहगड इन्स्टिट्यूट (एरंडवणे), अहिल्यादेवी शाळा, पुणे, रमणबाग स्कूल, केएचएस स्कूल कन्नड, न्यू मा. वि. शाळा, हुजूरपागा (कात्रज), हुजूरपागा (नारायण पेठ), हुजूरपागा इंग्लिश मीडियम (नारायण पेठ), क्लारा स्कूल (बी. टी. कवडे रोड), क्लारा स्कूल (सिंहगड रोड), कटारिया स्कूल, भाऊ रंगारी मंडप किड्स, प्राध्यापक नाथ हरी पुरंदरे प्राथमिक विद्यालय, विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रोड) या शाळांचा समावेश होता.
“गणेशोत्सव हा केवळ एक उत्सव न राहता तो संस्कार आणि सामाजिक एकोप्याचं माध्यम ठरावा, हा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीशी आणि गणेशभक्तीशी जोडण्याच्या उद्देशाने सामूहिक गणेशस्तोत्र पठणाचा उपक्रम आयोजित केला होता, त्यात तब्बल १२ हजार ३६० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला, ही निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उपक्रम संस्मरणीय ठरला असून या विक्रमी उपक्रमाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली. त्यामुळं गणेशभक्ती आणि संस्कृतीचा हा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचण्यास निशिचतच मदत होईल.”
– पुनीत बालन
उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे मोफत आरोग्य शिबिर
Newsworldmarathi Pune: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या वतीने गणेशोत्सवानिमित्त नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांत नेत्र तपासणी, फिजिओथेरपी तसेच दंत उपचारांशी संबंधित तपासण्या करण्यात येणार असून गरजू नागरिकांना ११ हजार चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमात विविध नामांकित रुग्णालये आणि संस्थांचा सहभाग आहे. अपोलो हॉस्पिटलच्या वतीने १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अग्रवाल आय हॉस्पिटलतर्फे १७ ते २० सप्टेंबरदरम्यान नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. संचेती हॉस्पिटलच्या वतीने २१ सप्टेंबरला फिजिओथेरपी तपासणी करण्यात येणार आहे. त्याच दिवशी तसेच २२ सप्टेंबरला इंडियन प्रोस्थोडॉन्टिक सोसायटी आणि डॉ. विजय माब्रुकर यांच्या सहकार्याने दंत तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. मॉडर्न कॉलेजच्यावतीने २२ सप्टेंबरला तर ढोले पाटील यांच्या सहकार्याने २३ सप्टेंबरला फिजिओथेरपी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या मंडपात होणार असून अधिकाधिक गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध तपासण्यांमुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेता येणार असून, आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही मिळणार आहे.
“गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमांचा उत्सव व्हावा, हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. याच उद्देशाने यंदा विविध नामांकित रुग्णालये व संस्थांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवश्यक उपचाराबाबत सल्ला मिळणार आहे. विशेषतः गरजू नागरिकांना ११ हजार चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने हा आरोग्योत्सव होत असून ट्रस्टचे हे सेवाकार्य यापुढेही असेच सुरू राहील.”
,
– पुनीत बालन
(उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
महेश नागरीची दमदार वाटचाल; ठेवी २५० कोटींवर, सभासदांना ९ टक्के लाभांश
Newsworldmarayhi Pune : महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीने २५० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मगराज राठी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.
संस्थेचे संस्थापक स्व. धनराजजी राठी यांच्या प्रयत्नांतून १९९८ मध्ये महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीची सुरुवात झाली. दोन दशकांहून अधिक काळ सभासदांनी संस्थेवर दाखविलेला विश्वास ही संस्थेच्या प्रगतीची प्रमुख ताकद असल्याचे मगराज राठी यांनी सांगितले. आर्थिक शिस्त, कर्जवाटप आणि कर्जवसुलीचे नियम काटेकोरपणे पाळत संस्थेने आर्थिक क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही काम केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सहकार क्षेत्रात संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
३१ मार्च २०२६ अखेर संस्थेच्या ठेवी २३२ कोटी ६९ लाख रुपये, कर्जवाटप १४७ कोटी रुपये आणि एकूण व्यवसाय ३७९ कोटी ६९ लाख रुपये झाला आहे. संस्थेचे भागभांडवल ३ कोटी ५८ लाख रुपये असून निव्वळ नफा २ कोटी १० लाख रुपये झाला आहे. त्यानंतर संस्थेने २५० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला.
सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे संस्थापकांचे उद्दिष्ट होते. त्यानुसार घरबांधणी, वाहन खरेदी, देश-विदेशातील शिक्षण तसेच छोट्या व्यावसायिकांना व्यवसायवाढीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा भर राहणार असल्याचे मगराज राठी यांनी सांगितले. सक्षम कर्जवसुली, आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभार यांचा समतोल राखण्यावरही संस्थेचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभेला माजी सहकार आयुक्त अनिल कवडे, माजी सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे, माजी अपर निबंधक कृष्णाजी वाडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, बँकांचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
२०२६-३१ या कालावधीसाठी निवडून आलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सेवकवर्ग आणि दैनिक ठेव प्रतिनिधींचाही गौरव करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी यांनी अध्यक्षीय भाषणात सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर केला. सुमारे ५०० सभासद, खातेदार, ठेवीदार आणि हितचिंतकांच्या उपस्थिती सभा पार पडली. उपाध्यक्षा हेमा अनिल बांगड यांनी आभार मानल्यानंतर सभेची सांगता झाली.
सिंहगडरोड पोलिसांची मोठी कारवाई; रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त
Newsworldmarayhi Pune : सिंहगडरोड पोलिसांनी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान एका रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई ११ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सिंहगडरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण आणि युवराज कांबळे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली. एक व्यक्ती अंगात काळ्या रंगाची टी-शर्ट व पांढऱ्या रंगाची पँट परिधान करून विश्व्रांतीनगरकडून जनता वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शंकर मंदिराजवळ, हिंगणे खुर्द, सिंहगडरोड परिसरात संशयास्पदरीत्या थांबलेली असून त्याच्याकडे अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाली.
ही माहिती तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भूपेश साळुंके यांना देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांना पाहून संशयित व्यक्ती तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव सिद्धेश सुरेश पवार (वय ३१), रा. बिल्डिंग नं. ८ बी, पहिला मजला, विश्व्रांतीनगर, हिंगणे खुर्द, पुणे, असे सांगितले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तुल आणि १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सिंहगडरोड पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूपेश साळुंके करीत आहेत.
सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे,अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३ डॉ. सागर कवडे सहा पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, भुपेश साळुंके, पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, प्रफुल्ल चव्हाण, सतिश मोरे, विकास बांदल, राहुल ओलेकर, युवराज कांबळे सागर शेडगे, विनायक मोहिते, तानाजी सागर, शिरीष गावडे यांचे पथकाने केली आहे.
अकोले प्रीमियर लिगवर सदाहरीचे वर्चस्व; सामन्यात दमदार कामगिरी करत विजेतेपदावर मोहोर
Newsworldmarayhi Baramati: अकोले प्रीमियर लिगच्या मैदानावर सदाहरि क्रिकेट टीमने दमदार खेळाचे प्रदर्शन करत सामन्यात बाजी मारली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर प्रभावी कामगिरी करत सदाहरि संघाने प्रतिस्पर्ध्याला चांगलेच झुंजवले. सामन्यातील प्रत्येक क्षणी खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, आत्मविश्वास आणि सांघिक भावना यामुळे विजयावर शिक्कामोर्तब झाले.
सदाहरि संघाकडून सुदाम खाडे, आकाश खाडे (कर्णधार), नामदेव आव्हाड, निलेश सोन्ने
दीपक दराडे, दत्तू दराडे, हर्षद खाडे, तेजस खाडे, अविनाश पवार, तानाजी खामकर आणि आर्यन कांबळे यांनी मैदानावर दमदार योगदान दिले. निर्णायक क्षणी खेळाडूंनी दाखविलेली चिकाटी आणि संघासाठी केलेला संघर्ष विजयासाठी महत्त्वाचा ठरला.
संघाच्या या यशामागे संघमालक सागर मोरे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले. तसेच विजय खाडे, संजय खाडे, दत्तू मोरे, समीर सोन्ने आणि प्रथमेश आव्हाड यांनी संघाला दिलेले पाठबळ आणि प्रोत्साहन उल्लेखनीय ठरले.
सामन्यातील प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धावेबरोबर वाढत गेलेली उत्सुकता अखेर सदाहरि संघाच्या विजयाने संपली. विजय मिळताच खेळाडूंनी मैदानावर जल्लोष केला. समर्थकांनीही आनंदोत्सव साजरा करत आपल्या संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.
सदाहरी संघाच्या या विजयामुळे अकोले प्रीमियर लिगमध्ये त्यांचे वर्चस्व अधिक ठळक झाले असून, आगामी सामन्यांसाठी संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
महाखनिज पोर्टलचा ‘श्रीगणेशा’ अन् डोंगर फोडणारयांना डिजिटल ‘प्रसाद’ही !
Newsworldmarayhi Mumbai :डोंगर पोखरून, माती-मुरूम-खडीचा बेकायदा उपसा करून राज्य सरकारचा महसूल बुडविणाऱ्या खाणमाफियांवर डिजिटल नजर ठेवण्यासाठीच्या ‘महाखनिज २.०’ या पोर्टलचा ‘श्रीगणेशा’ मंगळवारी झाला. राज्यात पहिल्यांदाच आणलेल्या या योजनेमुळे बेकायदा उत्खनन रोखले जाणार आहे. तसेच सरकारची फसवणूक करणाऱ्यांना जबर दंडाचा डिजिटल ‘प्रसाद’ मिळणार आहे. या प्रणालीचे राज्यपातळीरील कामकाज कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल पाहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन मंगळवारी झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री योगेश कदम, महसूल विभागाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल तसेच रेलटेलचे प्रधान कार्यकारी संचालक विनोद कुमार अग्रवाल उपस्थित होते.
राज्यात गौण खनिजाच्या बेकायदा उत्खननामुळे राज्य सरकारचा महसूल बुडत असल्याच्या तक्रारी सातत्याने येतात. परवानगीपेक्षा अधिक उत्खनन, वाहतुकीतील अनियमितता आणि नियमबाह्य वाहतूक परवान्यांमुळे महसूल विभागासमोर मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या ‘महाखनिज’ प्रणालीचे अद्ययावतीकरण करून अधिक व्यापक स्वरूपात ‘महाखनिज २.०’ विकसित करण्यात आले आहे.
नव्या प्रणालीमध्ये गौण खनिजाच्या उत्खननापासून वाहतुकीपर्यंतची डिजिटल नोंद उपलब्ध होणार आहे. खाणक्षेत्र, साठवणूक क्षेत्र आणि वाहतुकीची माहिती एकत्रित करण्यात आली असून ई-टीपी, डिजिटल वाहतूक परवाना, वाहनांचे जीपीएस ट्रॅकिंग, ड्रोन सर्व्हे, ऑनलाइन शुल्कभरणा, अहवाल-विश्लेषण आणि तक्रार निवारण अशा सुविधा उपलब्ध आहेत.
खाणक्षेत्रासाठी किती उत्खननाची परवानगी देण्यात आली, प्रत्यक्षात किती उत्खनन झाले आणि किती खनिजाची वाहतूक झाली, याची पडताळणी करता येणार आहे. वाहतूक परवान्याशी संबंधित वाहनांची माहिती आणि त्यांच्या हालचालींचाही मागोवा घेता येणार असल्याने नियमबाह्य उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. नवी मुंबईतील कोकण भवन येथे ‘महाखनिज २.०’चा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. गौण खनिजाच्या उत्खननातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे ‘महाखनिज’च्या माध्यमातून महसूल गळती रोखण्याबरोबरच बेकायदा उत्खनन आणि वाहतूक रोखण्याचा प्रयत्न आहे.
गौण खनिजाच्या बेकायदा उत्खननामुळे राज्य सरकारचा महसूल बुडण्याबरोबरच नैसर्गिक साधनसंपत्तीचेही नुकसान होते. ‘महाखनिज २.०’च्या माध्यमातून उत्खननापासून वाहतुकीपर्यंतची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचा प्रयत्न आहे. बेकायदा उत्खनन आणि वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवून महसूल गळती रोखण्यास या प्रणालीची मदत होईल.-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
गौण खनिजाचे बेकायदा उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महाखनिज २.० ही यंत्रणा २४ तास काम करेल. दिवसागणिक राज्याचा एकत्रित आढावा घेऊन, याबाबतची कार्यवाही केली जाईल.-रूबल अग्रवाल, विभागीय आयुक्त, कोकण विभाग तथा नोडल अधिकारी, ‘महाखनिज २.०’ ‘महाखनिज २.०’ची प्रमुख वैशिष्ट्ये २४ तास डिजिटल देखरेख ई-टीपी व डिजिटल वाहतूक परवाना वाहनांचे जीपीएस ट्रॅकिंग ड्रोन सर्व्हे उत्खनन व वाहतुकीची डिजिटल नोंद ऑनलाइन शुल्कभरणा व महसूल पडताळणी तक्रार निवारण डिजिटल अहवाल व विश्लेषण वाहनांची हालचाल व वाहतूक परवान्यांची पडताळणी जीआयएस आधारित माहिती व्यवस्थापन
फिट इंडिया, प्रदूषणमुक्त पुण्यासाठी पाच हजार पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग
Newsworldmarayhi Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्राच्या वतीने ‘पुणे ऑन पेडल्स’ सायकल रॅली, तसेच ‘पुणे फॅमिली वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार व प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर येथून निघून कर्वे रोड मार्गे डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते पुन्हा बालशिक्षण मंदिर अशी समाप्त झाली.
या रॅलीच्या निमित्ताने १५० गरीब गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. रॅलीत सहभागी प्रत्येकाला पदक, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देऊन गौरविण्यात आले. सुमारे पाच हजार पुणेकर या सायकल रॅली व वॉकेथाॅनमध्ये सहभागी झाले होते. प्रसंगी माजी नगरसेवक जयंत भावे, विश्राम कुलकर्णी आदी उपस्थित होते.
गिर्यारोहक गणेश आगाशे, खोखो प्रशिक्षक पुष्कर बर्वे, खोखो पुरस्कार विजेती राखी बर्वे, आयर्नमन स्पर्धा विजेते कुणाल आणि मीनल काशीकर, निवृत्त पोलीस अधिकारी विष्णु ताम्हाणे, क्लायंबर रुद्र करंदीकर व किया रेवणकर, क्रीडा छायाचित्रकार नितीन खानोलकर, अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेतील विजेते प्रशांत व मेधा जोग यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
अमितेश कुमार म्हणाले, “विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने योगदान देणे आवश्यक आहे. ‘फिट इंडिया’च्या माध्यमातून नागरिकांनी आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्राधान्य द्यावे, तसेच पर्यावरण संवर्धनासाठीही सक्रिय सहभाग नोंदवावा. देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा उभारणीवर भर देतानाच, येत्या काळात सायकल प्लॅनच्या माध्यमातून सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सामान्य नागरिक, महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत.”
प्रास्ताविकात प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित ‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे यंदाचे सातवे वर्ष आहे. आरोग्यपूर्ण जीवनासाठी, प्रदूषणमुक्त पुण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन मोदीजी काम करीत आहेत. त्यांच्या या उदात्त कार्याला कृतज्ञता म्हणून हा उपक्रम राबविण्यात येतो आहे.”
जयंत भावे यांनी सूत्रसंचालन केले. निलेश मिसाळ, जान्हवी जोशी, यामिनी मठकरी, निनाद पटवर्धन, गिरीश डोंगरे, कल्याणी टोकेकर, अमित पागे, शैलेश संचेती, प्रकाश तापकीर, अमेय कोकाटे, लोकेश राणे, दिनेश मुंडे, दिपाली मोहिते, तेजस गुप्ता या सर्वांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.
व्हिएतनामच्या पंतप्रधानांचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भारत सरकारच्या वतीने केले स्वागत
Newsworldmarayhi New Delhi: १८व्या BRICS शिखर परिषदेच्या निमित्ताने व्हिएतनामचे पंतप्रधान श्री ले मिन्ह हंग यांचे आज नवी दिल्ली येथे आगमन झाले. त्यांच्या भारत आगमनावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भारत सरकारच्या वतीने त्यांचे स्वागत केले.
व्हिएतनामच्या पंतप्रधानांचे भारत सरकारच्या वतीने स्वागत करण्याची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पार पाडली. यावेळी त्यांनी श्री. ले मिन्ह हंग यांचे भारतात मनःपूर्वक स्वागत करत, भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील दृढ व दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंधांना अधोरेखित केले.
भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबंध असून, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, संस्कृती यांसह विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचे सहकार्य सातत्याने वृद्धिंगत होत आहे. व्हिएतनामच्या पंतप्रधानांचा हा भारत दौरा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना आणखी बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या १८व्या BRICS शिखर परिषदेच्या माध्यमातून सदस्य व सहभागी देशांमध्ये विविध जागतिक आणि प्रादेशिक विषयांवर विचारविनिमय तसेच सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. या व्यासपीठामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सहकार्य अधिक व्यापक आणि परिणामकारक करण्यासाठीही महत्त्वपूर्ण संवादाला चालना मिळणार आहे.
गणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरणपूरक मूर्ती
Newsworldmarathi pune: विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांना आपल्या उत्सवांची व संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांच्या माध्यमातून ‘गणेशमूर्ती कार्यशाळा व स्पर्धा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात परिसरातील तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वतःच्या हातांनी आकर्षक व देखण्या पर्यावरण मूर्ती बनवल्या.
या कार्यशाळेत पुण्यातील प्रसिद्ध मूर्तिकार विनोद येलारपुरकर यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणरायाची सुबक मूर्ती साकारण्याचे शास्त्रोक्त व कलात्मक प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी अत्यंत उत्साहाने विविध रूपांतील ३०० पर्यावरण मूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ५ ते ७ वर्षे, ८ ते १० वर्षे आणि ११ ते १५ वर्षे अशा तीन स्वतंत्र वयोगटांमध्ये स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. तिन्ही वयोगटांतील मुलांनी मोठ्या कल्पकतेने गणेशमूर्ती साकारल्या. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आगामी गणेशोत्सवादरम्यान विशेष समारंभात आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना कलाशिक्षक अमोल काळे, प्रसिद्ध कलाकार निलेश खराडे, मूर्तिकार कुणाल कर्नावत आणि मूर्तिकार माधवी येलारपुरकर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.
या उपक्रमास कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने, नगरसेविका स्वप्नाली पंडित, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष अमित कंक यांच्यासह अनेक मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पर्यावरण मूर्तींची पाहणी करून मुलांच्या कौशल्याचे मनापासून कौतुक केले. हा संपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ‘राघवेंद्र बाप्पू मानकर मित्र परिवारा’च्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
“विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच आपल्या संस्कृतीची ओळख आणि संस्कार बालवयातच व्हावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय वयातच विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांतून प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने आपली समृद्ध संस्कृती जोपासण्यासाठी भावी पिढी निश्चितच सक्षम होईल,” असा विश्वास यावेळी नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी व्यक्त केला.

