LATEST ARTICLES
तांदूळ उत्पादनात ७० लाख टनांनी घट ? कमी पाऊस, लागवडीत घट झाल्याचा फटका.
Newsworldmarathi Pune: केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाचे खरीप हंगामातील तांदूळ लागवडी खालील क्षेत्र सरासरी ४१२ लाख हेक्टर आहे.
खरीप हंगामात देशाच्या तांदूळ उत्पादनात सुमारे १४ लाख हेक्टरने घट झाली आहे. त्यासह अपुऱ्या पावसामुळे तांदूळ पिकाला पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे एकूण तांदूळ उत्पादनात सुमारे ७० लाख टनांनी घट होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. उत्पादनात घट झाली तरीही जागतिक तांदूळ बाजारात भारताचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाचे खरीप हंगामातील तांदूळ लागवडी खालील क्षेत्र सरासरी ४१२ लाख हेक्टर आहे. गतवर्षी उच्चांकी ४२८.४६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा ४१४.१० लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत १४.३६ लाख हेक्टरने लागवड क्षेत्रात घट झाली आहे.
राज्यनिहाय कर्नाटकात ३.६१ लाख, तेलंगाणात ३.२९ लाख, झारखंडमध्ये १.८२ लाख, मध्य प्रदेशात १.७५ लाख, तमीळनाडूत १.२२ लाख, महाराष्ट्रात १.०२ लाख, आसाममध्ये १.२१ लाख, उत्तर प्रदेशात ७० हजार आणि हरियाणात १५ हजार, अशी लागवडीत घट झाली आहे. सर्वाधिक घट कर्नाटक, तेलंगाणा, झारखंड, मध्य प्रदेशात झाली आहे.
कृषी विभागाने तांदूळ उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गतवर्षी उच्चाकी लागवड आणि चांगल्या पावसामुळे चीनला मागे टाकून देशात १,५४० लाख टन तांदूळ उत्पादन झाले होते. यंदा एल – निनोमुळे देशभरात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे लागवड आणि उत्पादनावर परिणाम होणार आहे. उत्पादनात सुमारे ७० लाख टनांनी घट होऊन, देशाचे एकूण उत्पादन यंदा १,४७० लाख टन होण्याचा अंदाज आहे.
जागतिक बाजारात भारताचाच दबदबा
यंदाच्या खरीप हंगामात तांदूळ उत्पादनात घट होण्याचा अंदाज असला तरीही केंद्र सरकारकडे ऑगस्टअखेर ६३९ लाख टन तांदळाचा साठा आहे. संरक्षित साठ्याच्या तुलनेत पाच पटीने जास्त आहे. त्या शिवाय अन्न सुरक्षा आणि इथेनॉलसह अन्य उपयोगासाठी एका वर्षाला देशाला सुमारे ४५० लाख टन तांदळाची गरज असते. त्यामुळे देशाची गरज भागूनही निर्यातीसाठी तांदळाची उपलब्धता चांगली राहणार आहे. त्यामुळे लागवड, उत्पादनात घट होऊनही जागतिक तांदूळ बाजारात भारताचा दबदबा कायम राहण्याचा अंदाजही कृषी विभागाने व्यक्त केला आहे. अशी माहिती जयराज ग्रुपचे संचालक डॉ.राजेश शाह यांनी दिली.
अतिरेकी धमक्यांना न जुमानता काश्मीरमध्ये साजरा होणार गणेशोत्सव
Newsworldmarathi Pune : काश्मीर खोऱ्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना यंदा अतिरेकी संघटनांकडून उत्सव साजरा केल्यास जीवे मारण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. मात्र, या धमकीला न जुमानता काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदाही धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मूर्ती काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे विधिवत पूजा करून सुपूर्द करण्यात आल्या. पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळांनी सलग पाचव्या वर्षी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
तब्बल ३४ वर्षे बंद असलेल्या काश्मीरमधील लाल चौकात २०२२ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर गेली तीन वर्षे काश्मीर खोऱ्यातील विविध ठिकाणी उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यंदा या उत्सवाला आणखी व्यापक स्वरूप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम यांच्या मूर्ती विधिवत पूजा करून काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. या मूर्ती स्वीकारण्यासाठी काश्मीरमधील गणेश मंडळांचे मोहित भान, रिषभ चाकू, शिशंत चाकू, संदीप रैना, संजीव रैना, हितेश रैना आणि संदीप कौल हे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम, गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार आणि अखिल मंडई मंडळाचे सूरज थोरात आदी उपस्थित होते.
‘‘काश्मीरमधील चार ते पाच जिल्ह्यांमध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन होते. मात्र, गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना अतिरेकी संघटनांनी जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु त्यांच्या या धमकीला न जुमानता आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गणेशोत्सव साजरा करण्याचा कार्यकर्त्यांचा उत्साह नक्कीच वाखाणण्यासारखं असून त्यांच्या या धाडसाचं कौतुकच करायला पाहिजे.’’पुनीत बालन विश्वस्त व उत्सवप्रमुख – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
श्री वर्धमान स्वामी भगवान प्रतिष्ठा महोत्सव उत्साहात संपन्न
Newsworldmarathi Pune: कोंढवा परिसरातील थ्री ज्युवेल्स सोसायटी येथे श्री वर्धमान स्वामी भगवान यांच्या प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाले. श्री वर्धमान स्वामी जैन संघ (श्री ज्युवेल्स), पुणे यांच्या वतीने या प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जयराज ग्रुपच्या मातोश्री कंचनबेन हिरालालजी शहा (चोखावाला) परिवारातील राजेश शाह व जयंत शाह यांचे महोत्सवासाठी बहुमूल्य योगदान लाभले.
भक्तियोगाचार्य प.पू.आ.भ. श्री यशोविजयसूरीश्वरजी महाराजा, शासनसरोज प.पू.आ.भ.श्री सुविजयसूरीश्वरजी महाराजा, तत्त्वकुशलाचार्य प.पू.आ.भ. श्री राजपुण्यसूरीश्वरजी महाराजा आणि वैभवसुधांशु प.पू.आ.भ. श्री कल्याणविजयसूरीश्वरजी महाराजा आदी संतांच्या मंगल सान्निध्यात प्रतिष्ठा महोत्सवातील धार्मिक विधी पार पडले.
महोत्सवातील मुख्य सोहळ्यात श्री वर्धमान स्वामी भगवान यांच्या मूर्तीची मुख्य गाभाऱ्यात विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच श्री पार्श्वनाथ प्रभू भगवान, श्री आदिनाथ भगवान, श्री गौतम स्वामी भगवान, श्री सुधर्मा स्वामी भगवान, श्री मणिभद्र वीर भगवान आणि श्री पद्मावती माता यांच्या मूर्तींचीही विधिवत प्रतिष्ठा करण्यात आली.
प्रतिष्ठा महोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांना २६ ऑगस्टपासून सुरुवात झाली. ३ सप्टेंबर रोजी प्रभुजी की मेहंदी एवं सांझी, तर ४ सप्टेंबर रोजी माणकस्तंभ, घंटाकर्ण महावीर स्थापना, वेदिका स्थापना, लघु नंदीवर्त पाटला पूजन, नवग्रह पाटला पूजन, दशदिक्पाल पाटला पूजन आणि अष्टमंगल पाटला पूजन आदी धार्मिक विधी संपन्न झाले.
५ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता प्रभूंचा मंगल प्रवेश झाला. त्यानंतर शुभमुहूर्तावर मंगल प्रतिष्ठेचा मुख्य सोहळा आणि फले चुंदडी (गौतम प्रसाद) यांचे आयोजन करण्यात आले. याच दिवशी दुपारी बृहत शांतिस्नात्र पूजनही भक्तिभावाने संपन्न झाले.
या प्रतिष्ठा महोत्सवाला पुणे तसेच परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. असंख्य भाविकांनी श्री वर्धमान स्वामी भगवान यांचे दर्शन घेऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला. संपूर्ण
महोत्सवात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश शाह, जयंत शाह, धवल शाह, मालव शाह, हंसा शाह, हिना शाह, सेजल शाह आणि प्राची शाह यांच्यासह शहा परिवारातील सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. महोत्सोवाच आयोजन जयराज ग्रुपच्या वतीने करण्यात आले.
जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटरचा वर्धापन दिन क्रीडा स्पर्धांनी उत्साहात
Newsworldmarathi Pune: बुद्धिबळातील डावपेच, कॅरममधील अचूक नेम, टेबल टेनिसमधील चुरशीच्या लढती आणि बॅडमिंटनमधील वेगवान खेळ अशा क्रीडामय वातावरणात कोंढवा येथीलना जयराज क्लबमध्ये जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटरचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध वयोगटांतील सभासद आणि क्रीडाप्रेमींनी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने दिवसभर क्लबमध्ये क्रीडा उत्साह पाहायला मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन करत ‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया’ या भावनेतून देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यावर सातत्याने भर दिला आहे. खेळातून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. हाच दृष्टिकोन पुढे नेत जयराज क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धिबळ स्पर्धेतील १८ वर्षांखालील गटात क्रिसिल शहा व क्रिशांग शहा, तर १८ वर्षांवरील गटात प्रकाश ओसवाल व रणजीत शहा यांनी बाजी मारली. कॅरममध्ये १८ वर्षांखालील गटात हृदान व विहान मेहेर, तर १८ वर्षांवरील गटात मयूर मेहेर व सौरभ शहा विजेते ठरले.
टेबल टेनिस स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात अर्थ रुणवाल व आदिव शाह, १८ वर्षांवरील गटात अनुप मेहेर व प्रितेश मेहता, तर ६० वर्षांवरील गटात विलास शहा व रणजीत शहा यांनी विजेतेपद पटकावले. बॅडमिंटनच्या पुरुष विभागातील विविध वयोगटांत अर्णव शहा, लॅव्हन पटेल, अर्थ रुणवाल, रिदान प्रथम पारेख, तुषार राठोड, व्रजेश शहा आणि राजेश पारेख यांनी विजेतेपद मिळविले. महिला विभागात प्रियाल शहा, पूजा गांधी आणि स्नेहल शहा यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील कामगिरीबरोबरच क्रीडा क्षेत्रातील उत्साह आणि सहभागाचाही विशेष गौरव करण्यात आला. स्मित संघवी यांना ‘बेस्ट स्पोर्टिंग अवॉर्ड’, हसमुख पटेल यांना ‘सीनियर स्टार अवॉर्ड’, तर माहित शहा यांना ‘यंगेस्ट पार्टिसिपेंट अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना श्री पूना गुजराती बंधू समाजाचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. राजेश शहा, जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी नैनेश नंदू, सेक्रेटरी राजेंद्र शहा तसेच ट्रस्टी दिलीप मेहता आणि पंकज डेडिया यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या स्पर्धांमुळे विविध वयोगटांतील खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर सभासदांमध्ये क्रीडाविषयक आवड वाढविणे, नियमित खेळासाठी प्रोत्साहन देणे आणि खिलाडूवृत्ती दृढ करण्याचा उद्देशही या उपक्रमातून साध्य झाला.राजेश शहा, मॅनेजिंग ट्रस्टी, श्री पूना गुजराती बंधू समाज
पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार
Newsworldmarathi Pune: ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, ढोल-ताशांचा मंगलमय गजर, हलगीच्या पारंपरिक वादनावर थिरकणारी तरुणाई, उसळलेला जनसागर आणि काळजाचा ठोका चुकविणारे मानवी मनोरे अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुनीत बालन ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डीजेमुक्त संयुक्त दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवला. ऐतिहासिक लाल महाल चौकात तुडुंब गर्दीसमोर शिवतेज दहीहंडी संघाने सात थर रचत संयुक्त दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. सलग दुसऱ्या वर्षी डीजेमुक्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून पुनीत बालन ग्रुपने यानिमित्ताने एक नवा आदर्श निर्माण केला.
पुण्यातील ३१ सार्वजनिक गणेश मंडळांनी या संयुक्त दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला. पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी गतवर्षी महाराष्ट्रातील पहिल्या डीजेमुक्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत झाले. यंदा पुण्यात डीजेच्या वापरावरून वातावरण तापले असतानाही पुनीत बालन यांनी डीजेमुक्त दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्याची ठाम भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेला ३१ गणेश मंडळांनी साथ देत संयुक्त दहीहंडीत सहभाग नोंदविला.
प्रभात बँडच्या सुमधुर वादनाने दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर श्रीमंत पेशवे गणेश मंदिर तसेच लाल महाल येथे माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. मानवंदना, रमणबाग, गजर प्रतिष्ठान, शिवाज्ञा ढोल, शिवयोद्धा मर्दानी आखाडा, आवर्तन, समर्थ आणि शिवमुद्रा पथकांच्या जोरदार वादनाने संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला. उपस्थित तरुणाईने ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला.
शिवाज्ञा पथकाने जत्रा यात्रेतील बगाड आणि श्रीनाथ बाबांची पालखी याचे सादरीकरण करत भंडाऱ्याची उधळण केली. वारकऱ्यांच्या पखवाज वादनाने वातावरण भक्तिमय झाले, तर हलगीच्या दमदार वादनाने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील ऐतिहासिक लाल महाल चौकात आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेली दहीहंडी, विद्युत रोषणाई आणि त्यावर करण्यात आलेली कोल्ड फायरची आतषबाजी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या दहीहंडीला २१ हून अधिक गोविंदा पथकांनी पाच ते सात थर रचत सलामी दिली.
दहीहंडीच्या सलामीसाठी सुरुवातीला महिलांच्या शिवकन्या गोविंदा पथकाने सहभाग घेतला. त्यानंतर कसबा पुणे, म्हसोबा दहीहंडी संघ, पंढरीनाथ सेवा मंडळ, पुणेश्वर कसबा पेठ, गणेश मित्र मंडळ कसबा पेठ, राष्ट्र प्रथम कसबा पेठ, भोईराज संघ, मुंबईचे आम्ही आमचे राजे आणि शिवतेज संघ यांसह अनेक गोविंदा पथकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
रात्री पावणेदहा वाजता शिवतेज दहीहंडी संघाने सात थर रचत ऐतिहासिक दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. या संघाने १ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस आणि मानाची ट्रॉफी पटकावली.
या दहीहंडी उत्सवाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. तसेच परदेशी पर्यटकांनीही उत्सवात सहभाग घेतला.
“पुणेकरांनी सलग दुसऱ्या वर्षी डीजेमुक्त दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा उत्सव यशस्वी केल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही तितक्याच उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करता येतो, हे पुणेकरांनी अनुभवले आणि पाहिले. यामुळे ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत झाली, तसेच पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्या कलाकारांनाही रोजगार मिळाला. आगामी गणेशोत्सवही अशाच पद्धतीने साजरा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप तथा विश्वस्त व उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
पुनीत बालन ग्रुपच्या डीजेमुक्त दहीहंडीचा यंदाही जल्लोष
Newsworldmarathi Pune:पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणत पुनीत बालन ग्रुपच्या वतीने यंदाही डीजेमुक्त दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी-मर्दानी खेळ आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यांवरील ऐतिहासिक लाल महाल चौकात संयुक्त दहीहंडी सोहळा रंगणार आहे. पुनीत बालन ग्रुपने दोन वर्षांपासून संयुक्त दहीहंडी उत्सव सुरु केला आहे. तर गतवर्षी डीजेमुक्त दहीहंडीचे आयोजन करून महाराष्ट्रातील पहिली सार्वजनिक डीजेमुक्त दहीहंडी साजरी केली होती. त्यानंतर डीजेमुक्त दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका ग्रुपने सातत्याने घेतली आहे. या उपक्रमाला यंदा व्यापक प्रतिसाद मिळत असून यावर्षी तब्बल 31 गणेश मंडळे या सयुंक्त दहीहंडीत सहभागी होणार आहेत.
या संयुक्त दहीहंडी कार्यक्रमाची सुरवात दुपारी तीन वाजता प्रभात बँडच्या वादनाने होणार आहे. त्यानंतर मानवंदना होणार असून या कार्यक्रमांनंतर रमणबाग तेजस्विनी , पकवाज टाळ, शिवाद्य, गजर, हलगी वादन, मर्दानी खेळ, आवर्तन , समर्थ, शिवमुद्रा आणि अष्टविनायक या पथकांचे सादरीकरण होणार आहे.
उत्सवाचा आनंद डीजेशिवायही घेता येतो’ “दहीहंडी आणि गणेशोत्सव हे आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहेत. या उत्सवांचा आनंद मोठ्या आवाजाच्या डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी, मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही तितक्याच उत्साहाने घेता येतो. गतवर्षी सुरू केलेल्या डीजेमुक्त दहीहंडीच्या उपक्रमाला यंदा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोनशेहून अधिक गणेश मंडळांनी डीजे न लावण्याचा घेतलेला निर्णय ही सकारात्मक आणि स्वागतार्ह बाब आहे. पुढील काळात पुण्यातील उत्सव अधिक पारंपरिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत, हा आमचा प्रयत्न आहे.’– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप सयुंक्त दहीहंडी उत्सवात सहभागी होणारी गणेश मंडळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट श्रीमंत पेशवे गणेश मंदिर श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट पुण्येश्वर महादेव मंदिर उत्सव समिती श्री गरुड गणपती (लक्ष्मी रोड) उदय तरुण मंडळ ट्रस्ट (एफ.सी. रोड) नागनाथपार सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट मुंजोबा तरुण मंडळ (पी.एम.सी.) फणी आळी तालीम ट्रस्ट प्रकाश मित्र मंडळ भरत मित्र मंडळ आझाद हिंद मंडळ (जे.एम. रोड) व्यवहार आळी चौक मित्र मंडळ ट्रस्ट त्वष्टा कासार समाज संस्था श्रीराम अभिमन्यू मंडळ पुणे श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान जनता जनार्दन मंडळ क्रांतिवीर राजगुरु मित्र मंडळ गणेश मित्र मंडळ (अलका चौक) भोईराज मित्र मंडळ शिवतेज ग्रुप नटराज ग्रुप श्रीकृष्ण मंडळ (ट्रस्ट) विश्वज्योत मित्र मंडळ (ट्रस्ट) कुंजीर तालीम उंबऱ्या गणपती मित्र मंडळ शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (झाशीचीराणी चौक) जनार्दन पवळे संघ शिवशक्ती मंडळ तुळशीबाग नेहरु तरुण मंडळ, कसबा पेठ त्रिमूर्ती मित्र मंडळ, माणिक चौक, कसबा
३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर अनिल कांबळे सेवानिवृत्त
Newsworldmarathi Pune: रावसाहेब पटवर्धन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि सेवाभावी शैक्षणिक सेवेनंतर अनिल लक्ष्मीबाई तात्याबा कांबळे हे नियत वयोमानानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त साने गुरुजी स्मारक येथील बॅ. नाथ पै सभागृहात सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद गोरे, मंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर, पर्यवेक्षक जीवन इंगळे, प्राथमिक मुख्याध्यापिका मीना काटे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व हितचिंतक उपस्थित होते. कांबळे यांच्या पत्नी अनुजा कांबळे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.
कांबळे यांनी आपल्या ३५ वर्षांच्या सेवाकाळात अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच संस्कार, शिस्त आणि जीवनमूल्यांची शिकवण देत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कांबळे यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीतील योगदानाचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दीर्घकाळ सहवास लाभलेल्या सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाझेदा मुलाणी यांनी केले. समारंभानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कांबळे यांच्या सेवापूर्तीचा हा सोहळा भावनिक वातावरणात पार पडला.
दातांमधील कीड दाखवणाऱ्या श्री-डी मॉडेलला पेटंट; पुण्याच्या श्रेया हंचाटे यांची उल्लेखनीय कामगिरी
Newsworldmarathi Pune: पुण्याच्या भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील २० वर्षीय श्रेया चंद्रकांत हंचाटे या दंतवैद्यकीय विद्यार्थिनीने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दातांमधील कीड दाखवण्यासाठी विकसित केलेल्या ‘श्री-डी कॅरिअस टूथ मॉडेल’ या नाविन्यपूर्ण संशोधनाला भारत सरकारच्या बौद्धिक संपदा कार्यालयाकडून डिझाइन पेटंट प्राप्त झाले आहे.
प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांसोबत काम करताना दातांमधील किडीची वाढ टप्प्याटप्प्याने स्पष्ट करण्याची गरज श्रेया यांच्या लक्षात आली. त्यातून त्यांनी हे मॉडेल विकसित केले. या मॉडेलमध्ये दातांच्या किडीचे विविध टप्पे सहज समजावून सांगता येतात. तसेच विद्यार्थ्यांना प्री-क्लिनिकल सराव आणि रुग्णांच्या काऊन्सिलिंगसाठीही हे मॉडेल उपयुक्त ठरणार आहे.
मॉडेलमध्ये दातांवरील किडीपासून होणारे नुकसान स्पष्टपणे दाखवण्यात आले असून, किडीची सुरुवात, तिची वाढ आणि दातांवर होणारा परिणाम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजण्यास मदत होते. विशेषतः दंतवैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी हे मॉडेल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या संशोधनासाठी सहकारी प्राध्यापकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनानंतर श्रेया यांनी डिझाइनसाठी अर्ज केला होता. पेटंट मिळाल्याने त्यांच्या संशोधनाला मोठी चालना मिळाली असून, दंतवैद्यकीय शिक्षण अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
सामाजिक कार्याची दखल; सभागृह नेत गणेश बिडकर ‘ग्रीन क्रुसेडर’ पुरस्काराने सन्मानित
Newsworldmarathi Pune: पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांना प्रतिष्ठेच्या ‘ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भामला फाउंडेशन आणि पंचशील फाउंडेशन वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुणे चॅप्टर अंतर्गत हा सन्मान सोहळा पार पडला.
गेली अनेक वर्षे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष, स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच सभागृह नेते अशा विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या गणेश बिडकर यांनी सक्षमपणे सांभाळल्या आहेत. या जबाबदाऱ्या पार पाडताना केवळ प्रशासकीय कामकाजापुरते मर्यादित न राहता समाजाशी असलेली बांधिलकी जपत प्रत्यक्ष कृती, लोकसहभाग आणि दीर्घकालीन सकारात्मक बदल घडविण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे.
शहराच्या दूरगामी आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे विविध विकास प्रकल्प मार्गी लागावेत, तसेच पुणे शहराच्या जीवनवाहिन्या असलेल्या नद्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी त्यांनी आपल्या कार्यकाळात सातत्याने प्रयत्न केले आहेत. नागरी सुविधा, पायाभूत विकास आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर काम करताना विकास प्रक्रियेत लोकसहभागाला महत्त्व देण्याची भूमिका त्यांनी कायम जपली आहे.
भामला फाउंडेशन आणि पंचशील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे चॅप्टरचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यातून सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याची दखल घेण्यासाठी ‘ग्रीन क्रुसेडर अवॉर्ड’ प्रदान करण्यात येतो.
सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टकडून ५ हजार राख्या
Newsworldmaratgi Pune: सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुण्यातील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने जवानांसाठी ५ हजार राख्या पाठविण्यात येणार आहेत. याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील १९ इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल मनोज जोशी यांना पत्र पाठविले असून त्यात या राख्या विनंती केली आहे.
बालन यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, शहरातील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर हे पुणे शहरासाठी आध्यात्मिक अभिमानाचे प्रतीक ठरलेले आहे. मंदिराच्या ट्रस्टच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माध्यमातून धार्मिक, अध्यात्मिक आणि सामाजिक असे अनेक उपक्रम राबविले जातात.
या उपक्रमांतर्गत रक्षाबंधनानिमित्त सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत जवानांना ट्रस्टच्या माध्यमातून ५ हजार राख्या पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या राख्या ‘सेवा सदन दिलासा कार्यशाळा’ या संस्थेत तयार करण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. जवानांच्या मनगटावर पुण्यातून पाठविलेली राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना या उपक्रमामागे आहे. तरी जवानांना या राख्या स्वीकारून रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुणेकरांच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंतीही बालन यांनी केली आहे.
या उपक्रमासाठी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, वर्षा थोरवे, खजिनदार – ॲड.सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख – मनीषा खेडेकर, विश्वस्त – डॉ. पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाडवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे. हे मी माझे भाग्य समजतो. या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांपासून हजारो मैल दूर आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या जवान बांधवांसाठी पाच हजार राख्या प्पाठविण्यात येणार आहेत. या राख्या बौद्धिक अपंगांसाठी कार्यरत असणाऱ्या “सेवा सदन दिलासा कार्यशाळा” या संस्थेतून तयार झालेल्या आहेत.– पुनीत बालन, अध्यक्ष

