LATEST ARTICLES
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पुनर्वसनाला ग्रामस्थांची संमती; वर्षभरात नवीन घरांचे आश्वासन
Newsworldmarathi pune: श्री क्षेत्र भीमाशंकर येथील भीमाशंकरवाडी गावाच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी अखेर संमती दर्शवली असून, लगतच्या जागेमध्येच गावाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ग्रामस्थांना एका वर्षाच्या आत नवीन घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले.
याबाबतचे निवेदन आज भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवादे आणि ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनात पुनर्वसन प्रक्रियेसाठी काही महत्त्वाच्या अटी व नियम नमूद करण्यात आले आहेत.
त्यामध्ये भीमाशंकरवाडीतील सर्व घरांचे स्थलांतर लगतच्या जागेतच व्हावे, जुना गट क्रमांक १२९ (नवीन गट क्रमांक १) येथे गावाचे काम पूर्ण झाल्यानंतरच स्थलांतर करावे, तसेच बाधित प्रत्येक कुटुंबाला दुकानासाठी गाळा देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय गावठाणाबाहेरील सुमारे ३० ते ४० घरांना, ज्यांची ग्रामपंचायत नोंद आहे, त्यांनाही नवीन गावात घरे मिळावीत, अशी अट घालण्यात आली आहे.
तसेच स्थलांतरापूर्वी नवीन जागेचा सिटी सर्व्हे करून उतारा देण्यात यावा आणि ग्रामपंचायत उतारा मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. भीमाशंकरवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर करून नव्या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचाही प्रस्ताव निवेदनात समाविष्ट आहे.
या सर्व अटींचा विचार करून ग्रामस्थांनी पुनर्वसनास संमती दर्शवली असून, सर्वांच्या स्वाक्षऱ्यांसह हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे.
दहशत माजविणाऱ्या गुंडांचा माज उतरवला! कोंढवा येवलेवाडी पोलिसांच्या कडक कारवाईने नागरिकांना दिलासा
Newaworldmarathi Pune: कोंढवा बुद्रुक परिसरात मंगळवारी रात्री दुचाकींवरून आलेल्या सुमारे १२ तरुणांच्या टोळक्याने मोठा राडा घालत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. या टोळक्याने भरधाव वेगात रॅश ड्रायव्हिंग करत नागरिकांना त्रास दिला, तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या दोन निष्पाप व्यक्तींना कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली.
या घटनेत बँक कर्मचारी मयूर गायकवाड यांच्यावर टोळक्याने अचानक हल्ला केला. त्यांच्या मानेवर पट्ट्याने प्रहार करण्यात आला. त्यानंतर समोरून येणाऱ्या सायपन शेख (वय १८), जो ‘मिशो’ कुरिअर सेवेत काम करतो, यालाही लक्ष्य करण्यात आले. आरोपींपैकी एकाने त्याच्या छातीवर जोरदार वार केला. गायकवाड यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र टोळके दुचाकींवरून वेगाने पसार झाले.
मारहाणीनंतरही टोळक्याचा उच्छाद सुरूच राहिला. गल्ली क्रमांक ११ मधील पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. स्थानिक रहिवासी महामुनी यांच्या दुचाकीचे नुकसान करण्यात आले. नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करून धमकावले.
घटनेनंतर तक्रारदार आणि स्थानिकांच्या मदतीने काही आरोपींची ओळख पटली असून, ओंकार पांचाळ, सोन्या जाधव, हर्षल, अभि दीक्षित, प्रसाद शिंदे यांच्यासह इतरांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व आरोपी कोंढवा बुद्रुक परिसरातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा येवलेवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधितांवर वचक बसवला. ज्या ठिकाणी गुंडांनी दहशत माजवली, त्याच ठिकाणी त्यांची धिंड काढण्यात आली.
पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला असून, अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांना अजिबात सूट दिली जाणार नाही. परिसरात शांतता राखण्यासाठी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ही राबवण्यात आले असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
लग्न समारंभात पुस्तके आणि रोपटे देऊन मान्यवरांचा सत्कार; एक अनोखा सामजिक उपक्रम
Newaworldmarathi Pune : सध्याच्या युगात लग्न समारंभात बेफाम खर्च करीत मान्यवरांना हार- फुले देऊन सत्काराचा खर्च केला जातो. मात्र या परंपरेला फाटा देत अकोले येथील सुबनावळ आणि सुर्यवंशी कुटुंबाने लग्न समारंभात पुस्तक आणि रोपटे देऊन आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
अकोले (इंदापूर)येथील प्रतिष्ठित नागरिक गणेश सुबनावळ (सरचिटणीस पुणे जिल्हा युवक काँग्रेस) यांच्या विवाह समारंभात आलेल्या मान्यवरांना यावेळी देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, शहीद भगतसिंगांचे तरुणांना आव्हान ,मी नास्तिक का आहे,देशावर फॅसिझम चे संकट,भेदाभेद भ्रम अमंगळ ,विवेकवादी विज्ञानवादी, समाजवादी विवेकानंद, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज , आपले संविधान या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या लोकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.या उपक्रमामुळे तरुण मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल तसेच भरमसाठ खर्चाला आळा घालून असे उपक्रम केल्यास एक चांगली सवयी लागेल असे. आण्णासो सुबनावळ यांनी शुभ विवाह प्रसंगी सांगितले. यावेळी २०० पुस्तके आणि २०० रोपटी देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
स्टार्टअप्सना बळकटी देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवा; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांची मागणी
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र शासनाने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात स्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘नवीन स्टार्टअप व नाविन्यता धोरण २०२६’ जाहीर केले असून पुढील पाच वर्षांत ५० हजार स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या धोरणाची माहिती नवउद्योजकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी जनजागृती व मार्गदर्शन मोहीम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात, पुणे शहर व जिल्ह्यातील नवउद्योजकांना शासनाच्या विविध उद्योग योजनांची माहिती व्यापक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे आश्वासन उद्योग राज्यमंत्री नाईक यांनी दिले आहे.
पुणे जिल्हा हा औद्योगिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने विकसित होत असून मोठ्या प्रमाणावर युवक-युवती, महिला तसेच ग्रामीण भागातील नागरिक उद्योग व स्वयंरोजगाराकडे वळत आहेत. मात्र, शासनाच्या विविध योजनांची पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक इच्छुक उद्योजक या संधींपासून वंचित राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा उद्योग केंद्राच्या (DIC) माध्यमातून पीएमईजीपी (PMEGP), मुद्रा योजना, महिला उद्योजकता योजना आणि स्टार्टअप इंडिया यांसारख्या योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले अनुदान, बँक कर्ज, तांत्रिक सहाय्य आणि परवानगी प्रक्रियेबाबत एकाच ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे.
महिला बचत गट आणि महिला उद्योजकांसाठी विशेष प्रशिक्षण व अनुदान कार्यक्रम राबविणे, तसेच ग्रामीण व शहरी भागात मार्गदर्शन शिबिरे आणि कार्यशाळा आयोजित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय सोशल मीडिया, स्थानिक वृत्तपत्रे आणि एफएम रेडिओच्या माध्यमातून योजनांची माहिती व्यापक प्रमाणात प्रसारित करण्याचे सुचविण्यात आले आहे.
शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी एकात्मिक हेल्पडेस्क उभारणे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन मार्गदर्शन व अर्ज प्रक्रियेस सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे पुणे जिल्ह्यातील युवक-युवती, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
साने गुरुजी प्राथमिक शाळेत ‘सन्मान मातृत्वाचा’ सन्मान सोहळा संपन्न
Newsworldmarathi Pune: महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाच्या साने गुरुजी प्राथमिक शाळेत सन्मान मातृत्वाचा, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार व गुणवंत पालक पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यशाच्या शिखरावर असणारे माजी विद्यार्थी शोधून त्यांच्या यशात आईचे योगदान अनन्यसाधारण असते हा गाभा पकडून यशस्वी विद्यार्थ्यांच्या मातांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वर्षभर सातत्यपूर्ण निरीक्षणातून प्रत्येक वर्गातून एक गुणवंत विद्यार्थी निवडला गेला.त्यात त्या विद्यार्थ्याची वाचन क्षमता, नियमितता, टापटिपता, शिक्षकांशी संवाद, हस्ताक्षर,नम्रता इत्यादी निकषांच्या आधारे निवड करण्यात आली.तसेच गुणवंत पालक पुरस्कारासाठी पालकांचा शाळेसोबतचा संवाद व सहभाग, विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती या निकषांवर आधारित वर्षभरातील निरिक्षण व नोंदीअधारे निवड करण्यात आली. यात प्रत्येक निकषासाठी स्टार देण्यात आले होते.
सर्वात जास्त स्टार मिळवणारे पालक व विद्यार्थी निवडले गेले.
हे सर्व पुरस्कार मुख्याध्यापिका मीना काटे मॅडम यांनी त्यांच्या सासू स्व.कलावती बाळकृष्ण काटे यांच्या स्मरणार्थ दिले. आकर्षक स्मृतिचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून योगगुरू संगिता कळमकर उपस्थित होत्या.अध्यक्षस्थान संस्थेच्या संचालिका मा.अलकाताई काळे उपस्थित होत्या. व्यासपीठावर शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव मा .शिवाजी खांडेकर , मुख्याध्यापिका मीना काटे तसेच सेवाज्येष्ठ शिक्षक सोपान बंदावणे उपस्थित होते.
सन्मान मातृत्वाचा पुरस्कार स्वीकारताना माजी विद्यार्थी व त्यांच्या मातांचे मन हेलावून गेल्याचे दृष्य दिसून आले. खळखळत्या आनंद आश्रूंनी हा पुरस्कार सर्वांनी स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे संगिता कळमकर, निलेश पायगुडे, सुषमा घरबुडवे, व अध्यक्षा अलकाताई काळे यांनी आपले विचार मांडले.
स्वच्छतेची सवय लागावी या उद्देशाने जे विद्यार्थी वर्ग स्वच्छतेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात अशा ४५ विद्यार्थ्यांना ” स्वच्छतेचा राजा ” पारितोषिक मुख्याध्यापिका सौ मीना काटे यांच्या वतीने देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय ससे, विठ्ठल शेवते, तेजस्विनी फुलफगर, लक्ष्मी कांबळे, मोनिका पोटे, शितल रुपनूर यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन संगिता गोवळकर यांनी, प्रास्ताविक मीना काटे यांनी तर आभार शितल खेडकर यांनी मानले.
सन्मान मातृत्वाचा पुरस्कार प्राप्त माजी विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
१) अनुष्का लक्ष्मी बाळू कांबळे
२) अमित मंगल अरविंद जाधव
३) सोनाली मंगल बापू खुरंगळे
४) भाग्यश्री बेबी मल्हारी जाधव
५) आलम शकिला जमील शेख
६) निलेश शांताबाई ज्ञानदेव पायगुडे
गुणवंत पालक पुरस्कार प्राप्त नावे पुढीलप्रमाणे-
सौ. अनिता नरेंद्र हांजे
सौ. जान्हवी सूर्यकांत खुलम
सुषमा समीर घरबुडवे
सचिन बाळासो दारवटकर
मिनाक्षी महेश ननावरे
सौ जगदेवी दत्तात्रय लिंगशेटटी
गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
विहान धनराज कदम
कु. रिया सूर्यकांत खुलम
ईशा समीर घरबुडवे
अद्विका दिलीप पालके
सिद्धांत महेश ननावरे
मनस्वी अरविंद शेंडगे
चिन्मय विश्वविद्यापीठाकडून ‘स्कूल ऑफ कलायोगा’ची सुरुवात
पुणे
समृद्ध सांस्कृतिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात शुक्रवारी, ६ मार्च रोजी बाणेर येथे चिन्मय विश्वविद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ कलायोगा’ या नवीन संगीत शिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. चिन्मय मिशनचे प्रमुख आणि चिन्मय विश्वविद्यापीठाचे कुलगुरू पूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन झाले.
चिन्मय विश्वविद्यापीठ ही एक आगळीवेगळी संस्था आहे, जिथे प्राचीन गुरु–शिष्य परंपरेचा वारसा आधुनिक विद्यापीठीय व्यवस्थेसोबत जोपासला जातो. बाणेर येथे सुरू झालेल्या ‘स्कूल ऑफ कलायोगा’मुळे भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण गुरुकुल पद्धतीने घेण्याची आणि त्याचवेळी मान्यताप्राप्त विद्यापीठीय पदवी मिळवण्याची एक अनोखी आणि समृद्ध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
या प्रसंगी बोलताना पुण्यातील ‘चिन्मय नाद बिंदू’च्या संचालिका तसेच ‘स्कूल ऑफ कलायोगा’च्या प्रमुख प्रमोदिनी राव म्हणाल्या, “भारत हा प्राचीन ज्ञानपरंपरा आणि तत्त्वज्ञानासाठी जगभर प्रसिद्ध आहे. आपल्या मूळांशी नाळ जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण शोधण्याची तयारी असेल तर अनुभवाधारित शिक्षणाची मोठी संपदा आपल्याला येथे सापडते. स्वामी तेजोमयानंद यांच्या मते संगीताचा खरा उद्देश कला, कलाकार आणि रसिक यांना अधिक उंच आध्यात्मिक व सांस्कृतिक स्तरावर नेणे हा आहे. त्यामुळे संगीत शिक्षण केवळ कौशल्य विकसित करण्यापुरते मर्यादित न राहता या व्यापक उद्देशालाही समर्पित असले पाहिजे.”
‘स्कूल ऑफ कलायोगा’मध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम (बीए ऑनर्स इन म्युझिक), दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (एमए इन म्युझिक) तसेच संगीत विषयातील डॉक्टरेट (पीएचडी) अभ्यासक्रम उपलब्ध असतील. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांत हिंदुस्थानी गायन, बासरी आणि तबला या विषयांमध्ये विशेष अभ्यासाची संधी मिळेल. तर पीएचडी कार्यक्रमांत सादरीकरण, अध्यापन पद्धती, संगीतशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरा यांवरील सखोल संशोधनाला प्राधान्य दिले जाईल.
या संस्थेत चालणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सखोल, अनुभवाधारित आणि वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन मिळेल. यासोबतच शास्त्रशुद्ध शैक्षणिक रचना आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोन हे या शिक्षणपद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरेल.
‘स्कूल ऑफ कलायोगा’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे राबवण्यात येणारी दोन स्तरांवरील अध्यापन पद्धती. यात एकीकडे गुरु विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने अनुभवाधारित मार्गदर्शन करतात, तर सहाय्यक प्राध्यापक शैक्षणिक, सैद्धांतिक आणि संशोधनाधारित अध्ययनाला पाठबळ देतात. या दुहेरी पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो—ज्यामध्ये सखोल संगीतज्ञान, नियमित रियाज, सैद्धांतिक समज आणि संशोधन क्षमता यांचा समतोल साधला जातो.
‘स्कूल ऑफ कलायोगा’मध्ये संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नसून ती एक साधना आणि जीवनपद्धती मानली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मैफिली, बैठका, संगीत महोत्सव आणि विद्वानांशी संवाद अशा विविध सांस्कृतिक उपक्रमांनी समृद्ध अशा वातावरणात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे
दुभाजक दुरुस्ती करा; बेकायदेशीर तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : रोहन सुरवसे-पाटील
Newsworldmarathi Pune: पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज ते खंबाटकी घाट पायथा दरम्यान अनेक ठिकाणी महामार्गावरील दुभाजक बेकायदेशीररित्या तोडून अनधिकृत जोडरस्ते तयार करण्यात आल्याने अपघातांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित दुभाजकांची तातडीने दुरुस्ती करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम तसेच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कात्रज ते खंबाटकी घाट पायथा या दरम्यान काही हॉटेल तसेच व्यावसायिक आस्थापनांकडून महामार्गाच्या दुभाजकांना तोडून थेट प्रवेशमार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे सेवा रस्त्यावरून येणारी वाहने अचानक महामार्गावर प्रवेश करत असून, महामार्गावरील वेगवान वाहतुकीमुळे अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
त्यामुळे या मार्गावरील ज्या ठिकाणी दुभाजक तोडण्यात आले आहेत, त्या सर्व ठिकाणांची तातडीने पाहणी करून दुभाजकांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.
तसेच महामार्गावरील दुभाजक बेकायदेशीररित्या तोडून अनधिकृत जोडरस्ते तयार करणाऱ्या संबंधित व्यक्ती, हॉटेल चालक किंवा आस्थापनांविरुद्ध चौकशी करून संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
भविष्यात अशा प्रकारचे बेकायदेशीर प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठीही कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुरवसे-पाटील यांनी निवेदनातून केली आहे.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदिपसिह गिल्ल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता अंकित यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
काशेवाडीतील ड्रग्ज प्रकरणावरून अर्चना पाटील संतप्त; पोलीस आयुक्तांना दिली थेट माहिती
Newsworldmarathi Pune: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ च्या वार्षिक तपासणी बैठकीत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी काशेवाडी (प्रभाग क्र. २२) परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा आणि अवैध धंद्यांचा पाढा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांच्यासमोर वाचला.
काशेवाडीत राजरोसपणे सुरू असलेला ड्रग्जचा व्यापार आणि वेश्याव्यवसाय यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. (Pune News)
या बैठकीत बोलताना अर्चना पाटील यांनी निदर्शनास आणून दिले की, काशेवाडी परिसरात पानपट्टी आणि टपऱ्यांवरून अगदी उघडपणे ‘एमडी’ (MD) सारख्या अमली पदार्थांची विक्री होत आहे. यामुळे अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी गेली असून, ड्रग्ज खरेदी करण्यासाठी ती चोऱ्या करत आहेत. यासोबतच वस्तीमध्ये रात्रीच्या वेळी जुन्या आणि बेवारस गाड्यांच्या आडोशाने तसेच परिसरातील लाईट्स फोडून वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट राजरोसपणे चालवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव त्यांनी समोर आणले.
स्थानिक काशेवाडी पोलीस चौकीत नागरिकांच्या, विशेषतः महिलांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही आणि त्यांना हाकलून थेट खडक पोलीस ठाण्यात पाठवले जाते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. अवैध धंद्यांच्या ठिकाणांची यादी वारंवार देऊनही कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करत, त्यांनी पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना यादी सुपूर्द करून तातडीने कारवाईची मागणी केली. अर्चना पाटील यांच्या या रोखठोक खुलाशानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत, “जर असे प्रकार चालत असतील, तर आपण पुढे काय तोंड दाखवणार?” अशा शब्दांत उपस्थित अधिकाऱ्यांना खडसावले.
इंडो-जपान ‘शिवस्वराज्य वन इंडिया फेस्टिव्हल’ टोकियोत उत्साहात
टोकियो : इंडो-जपान ‘शिवस्वराज्य वन इंडिया फेस्टिव्हल’ (अखंड भारत महोत्सव) २०२६ रविवारी टोकियो येथील इंडिया इंटरनॅशनल स्कूल इन जपान येथे उत्साहात पार पडला. भारत आणि जपानमधील सांस्कृतिक नातेसंबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात भारतीय वंशाचे जपानमधील नागरिक, जपानी मान्यवर, कलाकार आणि विविध समुदायांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुमारे ५०० प्रेक्षक, १४० कलाकार आणि ५० पेक्षा अधिक स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.
ऑल-जपान असोसिएशन ऑफ इंडियन्स (AJAI), एडोगावा इंडिया कल्चर सेंटर (EICC) आणि अमरावती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA), जपान सरकार तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचेही सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात AJAI चे अध्यक्ष योगेंद्र पुराणिक यांच्या प्रस्ताविक भाषणाने झाली. ‘वन इंडिया’ या संकल्पनेतून जपानमधील विविध भारतीय समुदायांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. भारताचे माजी CBI न्यायाधीश मिलिंद गोसावी यांनी मुख्य भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा आणि सामाजिक सलोख्याच्या मूल्यांचा उल्लेख केला.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राची पारंपरिक दिंडी, पालखी मिरवणूक, भगवद्गीतेचे पठण यांसह विविध भारतीय प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे नृत्य, संगीत आणि नाट्यप्रकार सादर करण्यात आले. जपानी कलाकारांच्या ‘तायको’ ढोलवादनानेही प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमात भारत-जपान सांस्कृतिक देवाणघेवाणीवर दोन चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. त्यात बौद्ध आणि शिंतो परंपरेतील तज्ज्ञांनी दोन्ही देशांतील आध्यात्मिक नात्यांवर प्रकाश टाकला. तसेच इंडो-जपान संबंध दृढ करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मराठा साम्राज्याशी संबंधित ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन आणि भारतीय खाद्यपदार्थांच्या आस्वादाने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली. भजन व संगीत मैफलीने महोत्सवाचा समारोप झाला. भारत आणि जपानमधील सांस्कृतिक मैत्री अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना सहभागींकडून व्यक्त करण्यात आली.
व्यापाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाचे अपहरण
पुणे : शहरातील नामांकित व्यापाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. ही घटना उघड होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. अपहरणकर्त्यांनी कुटुंबीयांकडून खंडणीची मागणी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास Jejuri Police Station यांच्या पथकाकडे देण्यात आला. पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयितांचा ठावठिकाणा शोधून काढत सासवड परिसरात सापळा रचला. सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपींना अटक करण्यात आली आणि युवकाची सुखरूप सुटका करण्यात यश आले. या कारवाईदरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपहरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. अटकेतील आरोपींची कसून चौकशी सुरू असून गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. या धाडसी कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

