LATEST ARTICLES
पुणे मनपा शाळांच्या खासगीकरणाला काँग्रेसचा तीव्र विरोध : प्रशांत जगताप
Newaworldmarathi Pune :पुणे महानगरपालिकेच्या शाळा खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याच्या प्रयत्नाला तसेच शिक्षणाच्या बाजारीकरणाला काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध दर्शविला आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे मनपाच्या काही शाळा आकांक्षा फाउंडेशनकडून मोफत चालवल्या जात आहेत. मात्र, यंदापासून या शाळांमधील त्यांची यंत्रणा कायम ठेवण्यासाठी आकांक्षा फाउंडेशनला दरवर्षी १२ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी मांडल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर काँग्रेसकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. स्थायी समितीचे पुनर्गठन झाल्यानंतर गेल्या पाच महिन्यांत प्रथमच एखाद्या प्रस्तावावर मतदान घेण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिकेच्या शाळांसाठी आकांक्षा फाउंडेशनला एकूण १०८ कोटी रुपये देण्याचा प्रशासनाचा डाव असून या उधळपट्टीला काँग्रेसचा विरोध असल्याचे काँग्रेसचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षांकडून आधीच नऊ शाळा खासगी संस्थांना देण्यास आक्षेप असताना, आणखी काही शाळा खासगी संस्थांकडे सोपविण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी मांडल्याचा आरोपही त्यांनी केला. एका शाळेसाठी सुमारे २२ कोटी रुपये खर्च होत असून भविष्यात या सर्व शाळांसाठी तब्बल ७७०० कोटी रुपयांची उधळपट्टी होऊ शकते, असा दावा जगताप यांनी केला.
या प्रस्तावाला काँग्रेसचे प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास टिंगरे, अमोल बालवडकर आणि वैशाली बनकर यांनीही विरोध दर्शविला. सर्वांना मोफत शिक्षणाचा हक्क मिळावा, मात्र त्यासाठी मनपाच्या शाळा खासगी संस्थांच्या घशात घालण्यास आमचा विरोध असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी राज्यव्यापी स्पर्धांचे आयोजन; विद्यार्थी व नागरिकांना सहभागाचे आवाहन
Newsworldmarathi Pune: देशातील युवकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी भारत सरकारच्या “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत विविध स्तरांवर व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF), महाराष्ट्र राज्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भोई प्रतिष्ठान पुणे आणि जाधवर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी राज्यव्यापी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या आकर्षणाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, पोलीस, प्रशासन, साहित्य, कला, संस्कृती, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर तसेच देशप्रेमी नागरिक या उपक्रमात सक्रिय सहभागी होणार आहेत.
ही केवळ अल्पकालीन मोहीम नसून समाजात दीर्घकालीन जनजागृती निर्माण करण्यासाठी पुढील अनेक वर्षे सातत्याने राबविण्यात येणारा उपक्रम असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या मोहिमेचा अधिकृत शुभारंभ राज्यव्यापी स्पर्धांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्याच्या विळख्यात अडकलेली तरुणाई या विषयावर घोषवाक्य (स्लोगन), निबंध, चित्रकला आणि रील (Reels) निर्मिती या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धा विनामूल्य असून सहभागी होण्याची अंतिम मुदत २१ जून २०२६ आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या प्रमुख श्रीमती ज्योतीप्रिया सिंग यांनी सर्व वयोगटातील विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांनी या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांचा भव्य बक्षीस वितरण समारंभ २६ जून २०२६ रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अटी, नियम व नोंदणीसाठी इच्छुकांनी आयोजकांनी दिलेल्या गुगल फॉर्म लिंकचा वापर करावा तसेच अधिक माहितीसाठी संबंधित समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आम्ही पण लष्करात जाऊन देशसेवा करणार”; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची एनडीए भेट ठरली भावनिक
Newaworldmarathi Pune: “आम्हाला वडील नाहीत, तरी आम्ही खूप अभ्यास करू आणि सैन्यात भरती होऊन तुमच्यासारखीच देशसेवा करू,” असे अभिवचन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथील अधिकाऱ्यांना दिले. या शब्दांनी उपस्थित अधिकारीही भावुक झाले. भोई प्रतिष्ठान आणि अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघ, नांदेड यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘पुण्यजागर’ प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांच्या एनडीए भेटीदरम्यान हा हृदयस्पर्शी प्रसंग घडला.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण भोई प्रतिष्ठान आणि अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघ गेली बारा वर्षे सांभाळत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी या विद्यार्थ्यांसाठी जगप्रसिद्ध लष्करी प्रशिक्षण संस्था एनडीए, पुणे येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती.
सुमारे सात हजार एकर परिसरात विस्तारलेल्या एनडीएमध्ये भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांचे प्रशिक्षण दिले जाते. येथे विद्यार्थ्यांनी विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन, जहाजे, अश्वदळ तसेच विविध लष्करी साधने प्रत्यक्ष पाहिली. देशसेवेसाठी सैनिकांना दिल्या जाणाऱ्या कठोर शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रशिक्षणाची माहिती देणारी चित्रफीतही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.
एनडीएच्या प्रशस्त आणि अत्याधुनिक मेसमध्ये एका टेबलावर ठेवलेले जेवणाचे ताट आणि समोरची रिकामी खुर्ची पाहून विद्यार्थ्यांनी चौकशी केली. त्यावेळी युद्धात बेपत्ता झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ रोज हे ताट ठेवले जाते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे ऐकून सर्वजण भावनाविवश झाले.
उपक्रमाचे संयोजक, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता देशप्रेम, देशसेवा आणि सैन्याविषयी आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले. “सेवा परमो धर्मः (Service Above Self)” हा सैन्याचा मंत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हाच या उपक्रमामागील हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले या विद्यार्थिनींनी एनडीए परिसरातील पवित्र माती सोबत घेत देशसेवेची शपथ घेतली. “एक दिवस आम्हीही एनडीएमध्ये प्रवेश मिळवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, एअर कमांडर आर. एम. श्रीधरन, ब्रिगेडियर विनोद कुमार, लेफ्टनंट कर्नल दलजीत सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले.
पीएमपीच्या सर्व बसमध्ये बसणार सीसीटीव्ही कॅमेरे विनयभंग, चोरी व अपघातांवर नियंत्रणासाठी निर्णय; रोहन सुरवसे-पाटील यांच्या मागणीला यश
Newsworldmarathi Pune :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधील विनयभंग, चोरी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पीएमपीएमएल प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
सुरवसे-पाटील यांनी एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांना लेखी निवेदन देऊन सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत उर्वरित बसमध्येही ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला.
सध्या पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ३० ते ३५ टक्के बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याचे सुरवसे-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे बसमधील गुन्हेगारी घटनांमध्ये आरोपींची ओळख पटविणे आणि पुरावे गोळा करणे कठीण जात होते. विशेषतः गर्दीच्या वेळेत महिलांशी गैरवर्तनाच्या घटना घडत असून, पुराव्याअभावी कारवाईत अडचणी येत होत्या.
सध्या वातानुकूलित तसेच नव्याने दाखल झालेल्या बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध आहे. आता उर्वरित जुन्या बसमध्येही टप्प्याटप्प्याने कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच बसमधील सीसीटीव्ही फुटेजचे प्रभावी निरीक्षण व देखरेख करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याबद्दल सुरवसे-पाटील यांनी त्यांचे आभार मानले. या निर्णयामुळे बसमधील विनयभंग, चोरी आणि इतर गैरप्रकारांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोकणच्या विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा पहिला ‘वार’ बेकायदा गौण खनिज उपसणारे होणार ‘गार’ !
Newsworldmarathi Mumbai: राज्य सरकारच्या महसूल खात्याची फसवणूक करून बेकायदा गौण खनिज उपसणाऱ्यांना आता वठणीवर आणून, चांगलीच अद्दल घडविणयाचा पवित्रा कोकणच्या विभागीयआयुक्त रूबल अग्रवाल यांनी शुक्रवारी घेतला. बेकायदा, परवानगीपेक्षा अधिक आणि दंड चुकवण्यासाठी बेसुमार खोदाई करणाऱ्यांवर नजर ठेवून, त्यांच्याकडून जागेवरच दंड वसूल करून अशा लोकांचा बंदोबस्त करा, अशा शब्दांत बेकायदा गौण खनिज खोदणारयांना धडा शिकवण्याची सूचनावजा आदेशच अग्रवाल यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाला दिला. अशा प्रकारे बेकायदा उत्खनन करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
परिणामी, सरकारला चुना लावणारयांसाठी कारवाईचा मोठा खड्डा खोदला जाणार आहे, हे निश्चित आहे. “अशा प्रकरणांमधील दोषींना कोणीही पाठीशी घालणार नाही आणि दंड आकारताना कोणतीही हायगय केली जाणार नाही, हेही अग्रवाल यांनी स्पष्ट केला. केंद्र आणि राज्यसरकारच्या विविध योजना, त्यांची अंमलबजावणी आणि परिणामकारकता याचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त अग्रवाल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली.
या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णकांत पांचाळ यांच्यासह, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच ठाणे दौऱ्यावर आलेल्या रुबल अग्रवाल यांनी या बैठकीत संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या उत्खननासाठी जिल्हा प्रशासनाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र, गेल्या काही काळात कोणतीही परवानगी न घेता थेट उत्खनन केले जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्याशिवाय, परवान्यापेक्षा अधिक उत्खनन करून सरकारचा महसूल बुडवण्याचा आणि स्वतःचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला जातो.
यामुळे बेकायदा गौण खनिजाचा मुद्दा अत्यंत गंभीर बनला होता. यापूर्वी प्रत्यक्ष पाहणी करण्याची मोहीम राबवूनही बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर नियंत्रण राहत नव्हते. या पार्श्वभूमीवर,अग्रवाल यांनी आता विशेष मोहीम राबवून सरकारची फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारचा महसूल चुकवून सर्रास बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर नियंत्रण येण्याची आशा आहे.
विद्यार्थी-पालकांची अडवणूक खपवून घेणार नाही!
नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांसाठी सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ केंद्रांना विभागीय आयुक्त रुबलअग्रवाल यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी दाखले घेण्यासाठी केंद्रावर आलेल्या नागरिकांशी त्यांनी थेट संवाद साधला. “दाखले वेळेत मिळतात का?”, “जास्तीचे पैसे मागितले जातात का?” किंवा “कामासाठी अडवणूक केली जाते का?” असे थेट प्रश्न विचारून अग्रवाल यांनी या केंद्रांमधील कामकाजाची पारदर्शकता स्वतः तपासून पाहिली.
लोकांना सर्व दाखले वेळेत देऊन ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरळीत आणि पारदर्शक ठेवावी, अशा सक्त सूचना त्यांनी केंद्रचालकांना व अधिकाऱ्यांना दिल्या. सध्या शाळा आणि महाविद्यालये सुरू होत असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची दाखल्यांअभावी धावपळ होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आणि ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचा आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
असा बुडतो सरकारचा कोट्यवधींचा महसूल!
बेकायदा गौणखनिज उत्खनन आणि उपशामुळे सरकारी तिजोरीला कसा चुना लावला जातो, त्याचे धक्कादायक गणित खालीलप्रमाणे आहे:
१. विनापरवाना थेट चोरी सरकारी परवानगी न घेता उत्खनन केले जाते, ज्यामुळे सरकारला मिळणारी कोट्यवधी रुपयांची ‘रॉयल्टी’ (स्वामित्वधन) थेट बुडते.
२-परवानगीपेक्षा अधिक उपसा प्रशासनाकडून केवळ १०० ब्रासची परवानगी घ्यायची आणि प्रत्यक्षात पडद्यामागे ५०० ते १००० ब्रास उपसा करायचा. यामुळे केवळ कागदावर कर भरला जातो आणि उर्वरित खनिज बेकायदेशीरपणे विकून काळा पैसा कमावला जातो.
३-अवैध उत्खनन पकडले गेल्यास महसूल कायद्यानुसार मोठ्या दंडाची तरतूद आहे. मात्र, महसूल खात्याच्या सुस्त कारभारामुळे आणि प्रलंबित अपीलांचा गैरफायदा घेऊन दंडाची वसुली वर्षांनुवर्षे रखडवली जाते.
४-. बनावट वाहतूक परवाने एकाच रॉयल्टी पावतीवर (
खनिजाची अनेक वेळा वाहतूक केली जाते, ज्यामुळे वाहतूक कराची उघड चोरी होते.
धक्कादायक! पुण्यात आयटी अभियंत्याचा मृत्यू; चिठ्ठीत दोन महिला सहकाऱ्यांची नावे असल्याचा उल्लेख, हिंजवडी हादरली
Newsworldmarathi Pune: गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमधील (Nashik) आयटी कंपनीतील धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर, आता पुण्याच्या आयटी हब हिंजवडीमधून (Pune) एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक छळ आणि मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका 48 वर्षीय आयटी (IT) अभियंत्याने आत्महत्या केली आहे. अमित ब्राम्हे असं या अभियंत्याचं नाव आहे. या धक्कादायक प्रकरणी नामांकित आयटी कंपनीतील दोन वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका मित्राविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील आयटी क्षेत्रात खळबळ उडवून देणारी ही घटना 2 जून रोजी घडली असून 48 वर्षीय आयटी अभियंता अमित ब्राम्हे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अमित यांच्या या टोकाच्या पावलामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, आत्महत्येपूर्वी अमित यांनी लिहिलेल्या दोन पानांच्या सुसाईड नोटने कंपनीतील अंतर्गत छळाची भीषणता समोर आणली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांची नावे स्पष्टपणे लिहिली आहेत.
अमित ब्राम्हे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कंपनीतील वरिष्ठ सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक छळाचा पाढाच त्यांनी या नोटमध्ये वाचला आहे. चांगले प्रोजेक्ट्स काढून घेणे, जाणूनबुजून अत्यंत कठीण कामे देणे, इतर स्टाफसमोर वारंवार अपमान करणे आणि नोकरी सोडण्यासाठी सातत्याने दबाव टाकणे, असा छळ या दोन्ही महिला सहकाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप अमित यांनी केला आहे.
अन्न अधिकाऱ्यांवरील जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर निदर्शने
Newsworldmarathi Pune: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी कल्याण संघटनेच्या वतीने राज्यभर निदर्शने करण्यात आली. काळ्या फिती बांधून नियमित कामकाज करत अधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला असून, प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या विरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
दिनांक ९ जून २०२६ रोजी मध्यरात्री रहिमतपूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, मो. फरीद सिद्दीकी व नमुना सहायक अमोल कांबळे हे प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीविरुद्ध कारवाई करत असताना काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. संबंधितांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अश्लील शिवीगाळ करत धमक्या दिल्या तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून अधिकाऱ्यांना भयभीत करण्याचा प्रयत्न केला.
संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध करत सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. गुन्ह्यात वापरलेली वाहने, पिस्तुल व इतर साहित्य जप्त करून भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम तसेच इतर लागू कायद्यांतील कठोर कलमांनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील अन्न सुरक्षा अधिकारी अत्यल्प सुविधा व मनुष्यबळात जीवाची पर्वा न करता प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधात कारवाया करीत आहेत. अशा परिस्थितीत शासकीय अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले अत्यंत गंभीर असून त्यांच्याविरुद्ध उदाहरणात्मक कारवाई होणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
दरम्यान, विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ आणि आयुक्त तुकाराम मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विचारपूस करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल संघटनेने त्यांचे आभार मानले आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचा पुनरुच्चार संघटनेने केला आहे.
संरक्षण खात्याशी पुण्यातील प्रलंबित विषयांना मिळणार गती; केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली भेट
Newsworldmarathi pune: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेत पुण्याच्या संरक्षण खात्याशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार, पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांचे पुणे महानगरपालिकेत विलीनीकरण आणि इंदिरानगर-बर्मा शेल वसाहतीतील नागरिकांना हवाई दलाने बजावलेल्या नोटीसा या प्रमुख मुद्द्यांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून विषय मार्गी लावण्यासंदर्भात पुढील कार्यवाहीचे निर्देश संरक्षण मंत्र्यांनी दिले आहे. यामुळे गेली काही महिने प्रलंबित असणाऱ्या या विषयांना गती मिळणार आहे.
नवी दिल्लीतील संरक्षण खात्याच्या कार्यालयात झालेल्या या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी प्रामुख्याने पुणे विमानतळाच्या विस्ताराचा मुद्दा मांडला. विमानतळाच्या पुढील विस्तारासाठी एकूण ३०० एकर जागा संपादित केली जाणार असून, ही सर्व जागा राज्य सरकार स्वतः संपादित करणार आहे. सद्यस्थितीत, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या टर्मिनलला लागूनच हवाई दलाची ३५ एकर जागा आहे. राज्य सरकारने या ३५ एकर जागेच्या बदल्यात हवाई दलाला त्याच परिसराला लागून ६५ एकर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. संरक्षण मंत्रालयाने आपल्या स्तरावरून हवाई दलाला याबाबत आवश्यक निर्देश दिल्यास या विस्तारीकरणाचे काम अत्यंत वेगाने सुरू होऊ शकेल, अशी विनंती मोहोळ यांनी संरक्षण मंत्र्यांकडे केली.
पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महानगरपालिकेत विलीनीकरण करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या जमिनी महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने एप्रिल २०२६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला आहे. या प्रस्तावावर केंद्र सरकारकडून लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही व्हावी, अशी मागणी मोहोळ यांनी या वेळी केली.
लोहगाव येथील इंदिरानगर-बर्मा शेल वसाहतीतील नागरिकांना हवाई दलाने जागा रिकामी करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. सुमारे पाच एकरच्या या परिसरात ११०० ते ११५० घरे असून, जवळपास ५५०० ते ६००० नागरिक १९८० पासून येथे वास्तव्यास आहेत. या भागात महानगरपालिकेच्या शाळा, रुग्णालय आणि इतर अनेक नागरी सुविधा देखील उपलब्ध आहेत. या पूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्येही मंत्री मोहोळ यांनी या समस्येबाबत संरक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले होते. या प्रकरणात संरक्षण खाते आणि महापालिकेने समन्वयातून मार्ग काढण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी यांनी या सर्व विषयासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.
“पुण्याच्या विकासाशी आणि नागरिकांच्या हिताशी संबंधित संरक्षण खात्याचे अनेक महत्त्वाचे विषय गेल्या काही काळापासून प्रलंबित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. पुणे विमानतळ विस्तार, कॅन्टोन्मेंट विलीनीकरण आणि इंदिरानगरमधील नागरिकांच्या प्रश्नांबाबत लवकरच ठोस निर्णय होऊन प्रश्न मार्गा लागतील, असा विश्वास आहे.’’
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री
केडगाव प्रकरणानंतर शहरातील आयव्हीएफ केंद्रांचीही चौकशी करा : रोहन सुरवसे पाटील
Newsworldmarathi Pune: केडगाव येथील गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील रुग्णालयांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणात दोन डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील आयव्हीएफ (वंध्यत्व उपचार) केंद्रे, सोनोग्राफी केंद्रे आणि रुग्णालयांची ही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.
सुरवसे यांनी यापूर्वी मार्च महिन्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यामध्ये आयव्हीएफ केंद्रांमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, औषध विक्रीतील अनियमितता तसेच बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या संशयित प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर आयव्हीएफ केंद्रे सुरू झाली असून, वंध्यत्व उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अनेक ठिकाणी आवश्यक औषधे संबंधित केंद्रांकडूनच खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप सुरवसे यांनी केला आहे. ही औषधे बाहेरील मेडिकल दुकानांमध्ये उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याने उपचारासाठी येणाऱ्या दांपत्यांचे आर्थिक शोषण होत आहे. ते थांबल पाहिजे.
याशिवाय काही आयव्हीएफ केंद्रांशी संबंधित काही सोनोग्राफी केंद्रांमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी होते. उरळी कांचन येथील दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणानंतर वडगाव शेरीतील एका नामांकित रुग्णालयात कथित गर्भलिंग तपासणी झाल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सोनोग्राफी केंद्रांची वर्षातून दोन वेळा तपासणी केली जाते. मात्र ही तपासणी केवळ औपचारिकता ठरत असल्याचा आरोप करत सुरवसे यांनी तपासणी प्रक्रियेत अधिक काटेकोरपणा आणण्याची मागणी केली आहे.
ठराविक नमुन्यात माहिती भरणे, नोंदींची वरवरची तपासणी करणे आणि किरकोळ नोटिसा बजावून कारवाई पूर्ण झाल्याचे दाखविले जाते, असेही त्यांनी म्हटले आहे. गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपातासारखे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी संबंधित केंद्रांची कसून चौकशी करावी. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयव्हीएफ आणि सोनोग्राफी केंद्रांची मान्यता तात्काळ निलंबित अथवा रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मार्चमध्येच केली होती चौकशीची मागणी
आयव्हीएफ केंद्रांमधील आर्थिक गैरव्यवहार, औषध विक्रीतील अनियमितता आणि गर्भलिंग निदानाच्या संशयित प्रकरणांबाबत मार्च महिन्यातच राज्य सरकारकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. केडगाव प्रकरणानंतर प्रशासनाने ग्रामीण भागात कारवाई सुरू केली असली, तरी शहरातील केंद्रांचीही तातडीने तपासणी करण्यात यावी, अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी पुन्हा एकदा केली आहे.
कारागृहाचे रूपांतर सुधारगृहात होण्याचा प्रयत्न कौतुकास्पद : खा.डॉ. मेधा कुलकर्णी
Newsworldmarathi Pune: आपल्याकडे कारागृह ही स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी स्वातंत्र्य सैनिकांना डांबून ठेवून मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून बनवली होती. त्याकाळी नियम पण तसेच होते. गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये अमुलाग्र बदल होत असून कारागृह ही फक्त कारागृह न राहता ती सुधारगृह होत आहेत आणि या दृष्टीने महाराष्ट्र कारागृह प्रशासन ,भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांनी समाजासमोर स्तुत्य आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमांची व्यापकता वाढवून राज्यभर त्याचा प्रसार होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.
महाराष्ट्र कारागृह प्रशासन , भोई प्रतिष्ठान- पुणे आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा महिला कारागृहातील बंदी-भगिनींसाठी पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड्स बँक या अभिनव प्रकल्पाचा शुभारंभ खा.डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
या निमित्ताने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी अपर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक डॉ. सुहास वारके ,विशेष कारागृह महानिरीक्षक श्री योगेश देसाई, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ. मिलिंद भोई , येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक सौ.पल्लवी कदम, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सौ माया धतुरे, येरवडा खुले कारागृह अधीक्षक श्री श्याम शेडगे, बीड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.जनक चौरे, सौ प्राजक्ता चौरे, पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य सौ.बागेश्री मंठाळकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ अमृता चांदोरकर, प्रमिला देवकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अपर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी बोलताना कारागृहातील बंदी बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बंदी बांधवांमध्ये शिक्षा भोगत असताना सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून त्यांच्यातील चांगला माणूस समाजासमोर आणण्यासाठी भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांनी केलेल्या प्रकल्पांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामाची भूमिका स्पष्ट करताना बंदी बांधवांच्या मानसिकतेत बदल केले तर त्यांच्यातील चांगला माणूस जागा होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेश होण्याची सुरुवात होईल. असे सांगितले. आज तुम्ही सर्वजण येथे आहात पण घरी तुमची आई वाट पाहत आहे. तुम्ही तुमची शिक्षा संपवून लवकरात लवकर घरी जाऊन आईच्या कुशीत डोके ठेवून बसा असे डॉ. भोई यांनी म्हणताच बहुसंख्य बंदी भगिनींच्या डोळ्यात आईच्या आठवणीने अश्रू
तरळले.
याप्रसंगी बंदी भगिनींना विशेष पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड्स चा वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिक डॉ. सौ. प्राजक्ता चौरे यांनी दिले. राज्यातील इतर कारागृहात सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक येरवडा मध्यवर्ती कारागृह अतिरिक्त अधीक्षक सौ पल्लवी कदम यांनी केले. आभार प्रदर्शन येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक श्री सुनील ढमाळ यांनी केले.

