LATEST ARTICLES
जयराज अँड कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र
Newaworldmarathi Pune : उत्पादन क्षेत्रातील आघाडीची जयराज अँड कंपनीला Great Place to Work India कडून प्रतिष्ठित ‘ग्रेट प्लेस टू वर्क®️ सर्टिफाइड™️’ मानांकन प्राप्त झाले आहे. कर्मचारी अनुभव, विश्वास आणि सकारात्मक कार्यसंस्कृती जपण्यातील कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.
या मानांकनासाठी संस्थेकडून कर्मचारी विश्वास, कामाचे वातावरण, नेतृत्व आणि व्यवस्थापनाच्या धोरणांचे सखोल मूल्यमापन करण्यात आले. जयराज अँड कंपनीने विश्वासार्हता, आदर, निष्पक्षता आणि टीमवर्क या प्रमुख निकषांवर उल्लेखनीय कामगिरी नोंदवत हे प्रमाणपत्र मिळवले आहे.
या यशाबद्दल कंपनीचे संचालक धवल शाह म्हणाले, “हे प्रमाणपत्र आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या समर्पणाचा सन्मान आहे. सुरक्षित, प्रेरणादायी आणि प्रगतीस पोषक कार्यसंस्कृती निर्माण करण्यावर आम्ही सातत्याने भर दिला आहे. हे यश पुढील काळात कार्यपरिसर अधिक सक्षम आणि सकारात्मक करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.”
दरम्यान, ‘ग्रेट प्लेस टू वर्क®️ इंडिया’ ही कार्यस्थळ संस्कृतीवरील देशातील आघाडीची संस्था असून ती संशोधनाधारित ‘ट्रस्ट इंडेक्स™️ सर्व्हे’च्या माध्यमातून कंपन्यांना कर्मचारी अनुभव मोजणे, सुधारणा करणे आणि मानांकन मिळवण्यासाठी मार्गदर्शन करते. सर्टिफिकेशन, कर्मचारी सर्व्हे, सांस्कृतिक सल्लागार सेवा तसेच विविधता, समावेशकता आणि समान संधी (DEIB) यांसारख्या उपाययोजना विविध क्षेत्रातील कंपन्यांना उपलब्ध करून दिल्या जातात.
३० वर्षांहून अधिक जागतिक संशोधन आणि १५० हून अधिक देशांमधील उपस्थितीच्या बळावर ही संस्था भारतातील सर्वोत्तम कार्यस्थळे, महिलांसाठी सर्वोत्तम कार्यस्थळे यांसारख्या प्रतिष्ठित यादी प्रकाशित करते. Accenture, HDFC Bank, Bajaj Group आणि Cisco यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांचा विश्वास संपादन करत या संस्थेने भारतात उच्च-विश्वास आणि उच्च-कार्यक्षमता असलेल्या कार्यसंस्कृतीचे मानदंड निर्माण केले आहेत.
जयराज अँड कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत विविधता व समावेशकतेसाठी सातत्याने उपक्रम राबवले जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
एचडीएफसी बँकेचे पुण्यातील 200 व्या ब्रँचे उदघाटन.
Newaworldmarathi Pune : बिबवेवाडी २ येथे एचडीएफसी बँकेचे नवीन शाखेचे उदघाटन डॉ.राजेश शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक राजेंद्र शिलीमकर व मानसीताई देशपांडे उपस्थित होत्या. सदर ब्रांच पुणे शहरातील २०० वी शाखा आहे असे माहिती, प्राची अग्रवाल क्लस्टर हेड एचडीएफसी बँक यांनी सांगितले. यावेळी एचडीएफसी बँकेचे झोनल हेड विक्रांत नागरे व रिजनल हेड गायत्री राव उपस्थित होत्या.
सदर शाखेचे उदघाटन करताना डॉ.राजेश शहा म्हणाले बँकेचा व्यवसाय हा आता खूप स्पर्धात्मक झाला आहे. सर्विस रिलेटेडच्या या युगात आपल्या ब्रांच मध्ये येणारा ग्राहक यांच्यासाठी सर्व सुविधा आपल्याकडून उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.पुण्यामध्ये एचडीएफसी बँकेच्या जवळपास 200 शाखा आहेत त्यामुळे आपापल्या शाखेमध्ये स्पर्धा होऊ नये.एचडीएफसी बँकेचा पुणे शहरामध्ये सर्वात जास्त , व्यवसायामध्ये 24% हिस्सा आहे.यावेळी एचडीएफसी बँकेचे वतीने डॉ. राजेश शहा यांचा सत्कार करण्यात आला.
नांदेडसिटी पोलिसांची मोठी कारवाई; तीन महिन्यांपासून फरार सराईत गुन्हेगार अटकेत
Newaworldmarathi Pune: नांदेडसिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील तीन महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अखेर अटक करत मोठे यश मिळवले आहे. संबंधित आरोपीवर एमपीडीए (Maharashtra Prevention of Dangerous Activities Act) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज महेंद्र नांगरे (वय २९, रा. किरकटवाडी, हवेली) हा आरोपी गेल्या काही वर्षांपासून खूनाचा प्रयत्न, दुखापत करणे, शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. त्याच्यावर सुमारे ०४ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असून परिसरात त्याची मोठी दहशत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि अनेकजण तक्रार देण्यासही घाबरत होते.
या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार,सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग अजय परमार यांच्या सुचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस व प्रसाद राऊत यांचे मार्गदर्शनाखाली सर्व्हेलन्स पथकाचे पोलीस उप निरीक्षक राजेश गायकवाड, पो. अंमलदार प्रथमेश गुरव, कैलास केंद्रे, अनिल बारड यांनी एम.पी.डी.ए.प्रस्ताव तयार करून मा. पोलीस आयुक्त, सो. पुणे शहर यांचेकडे पाठवीला होता.
प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. पो. हवा. संग्राम शिनगारे पो. अंमलदार स्वप्निल मगर, निलेश खांबे, प्रतिक मोरे यांनी भोर, पुणे ग्रामीण हद्दीतुन सदर आरोपीस ताब्यात घेतला.
आरोपी तीन महिन्यांपासून फरार होता. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास, सोशल मीडिया तसेच विविध ठिकाणी सापळे रचून अखेर त्याला ताब्यात घेतले. आरोपीला पुढील कारवाईसाठी ताब्यात घेऊन त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पुनर्वसनाला ग्रामस्थांची संमती; वर्षभरात नवीन घरांचे आश्वासन
Newsworldmarathi pune: श्री क्षेत्र भीमाशंकर येथील भीमाशंकरवाडी गावाच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी अखेर संमती दर्शवली असून, लगतच्या जागेमध्येच गावाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ग्रामस्थांना एका वर्षाच्या आत नवीन घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले.
याबाबतचे निवेदन आज भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवादे आणि ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनात पुनर्वसन प्रक्रियेसाठी काही महत्त्वाच्या अटी व नियम नमूद करण्यात आले आहेत.
त्यामध्ये भीमाशंकरवाडीतील सर्व घरांचे स्थलांतर लगतच्या जागेतच व्हावे, जुना गट क्रमांक १२९ (नवीन गट क्रमांक १) येथे गावाचे काम पूर्ण झाल्यानंतरच स्थलांतर करावे, तसेच बाधित प्रत्येक कुटुंबाला दुकानासाठी गाळा देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय गावठाणाबाहेरील सुमारे ३० ते ४० घरांना, ज्यांची ग्रामपंचायत नोंद आहे, त्यांनाही नवीन गावात घरे मिळावीत, अशी अट घालण्यात आली आहे.
तसेच स्थलांतरापूर्वी नवीन जागेचा सिटी सर्व्हे करून उतारा देण्यात यावा आणि ग्रामपंचायत उतारा मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. भीमाशंकरवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर करून नव्या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचाही प्रस्ताव निवेदनात समाविष्ट आहे.
या सर्व अटींचा विचार करून ग्रामस्थांनी पुनर्वसनास संमती दर्शवली असून, सर्वांच्या स्वाक्षऱ्यांसह हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे.
दहशत माजविणाऱ्या गुंडांचा माज उतरवला! कोंढवा येवलेवाडी पोलिसांच्या कडक कारवाईने नागरिकांना दिलासा
Newaworldmarathi Pune: कोंढवा बुद्रुक परिसरात मंगळवारी रात्री दुचाकींवरून आलेल्या सुमारे १२ तरुणांच्या टोळक्याने मोठा राडा घालत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. या टोळक्याने भरधाव वेगात रॅश ड्रायव्हिंग करत नागरिकांना त्रास दिला, तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या दोन निष्पाप व्यक्तींना कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली.
या घटनेत बँक कर्मचारी मयूर गायकवाड यांच्यावर टोळक्याने अचानक हल्ला केला. त्यांच्या मानेवर पट्ट्याने प्रहार करण्यात आला. त्यानंतर समोरून येणाऱ्या सायपन शेख (वय १८), जो ‘मिशो’ कुरिअर सेवेत काम करतो, यालाही लक्ष्य करण्यात आले. आरोपींपैकी एकाने त्याच्या छातीवर जोरदार वार केला. गायकवाड यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र टोळके दुचाकींवरून वेगाने पसार झाले.
मारहाणीनंतरही टोळक्याचा उच्छाद सुरूच राहिला. गल्ली क्रमांक ११ मधील पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. स्थानिक रहिवासी महामुनी यांच्या दुचाकीचे नुकसान करण्यात आले. नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करून धमकावले.
घटनेनंतर तक्रारदार आणि स्थानिकांच्या मदतीने काही आरोपींची ओळख पटली असून, ओंकार पांचाळ, सोन्या जाधव, हर्षल, अभि दीक्षित, प्रसाद शिंदे यांच्यासह इतरांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व आरोपी कोंढवा बुद्रुक परिसरातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा येवलेवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधितांवर वचक बसवला. ज्या ठिकाणी गुंडांनी दहशत माजवली, त्याच ठिकाणी त्यांची धिंड काढण्यात आली.
पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला असून, अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांना अजिबात सूट दिली जाणार नाही. परिसरात शांतता राखण्यासाठी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ही राबवण्यात आले असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
लग्न समारंभात पुस्तके आणि रोपटे देऊन मान्यवरांचा सत्कार; एक अनोखा सामजिक उपक्रम
Newaworldmarathi Pune : सध्याच्या युगात लग्न समारंभात बेफाम खर्च करीत मान्यवरांना हार- फुले देऊन सत्काराचा खर्च केला जातो. मात्र या परंपरेला फाटा देत अकोले येथील सुबनावळ आणि सुर्यवंशी कुटुंबाने लग्न समारंभात पुस्तक आणि रोपटे देऊन आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
अकोले (इंदापूर)येथील प्रतिष्ठित नागरिक गणेश सुबनावळ (सरचिटणीस पुणे जिल्हा युवक काँग्रेस) यांच्या विवाह समारंभात आलेल्या मान्यवरांना यावेळी देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, शहीद भगतसिंगांचे तरुणांना आव्हान ,मी नास्तिक का आहे,देशावर फॅसिझम चे संकट,भेदाभेद भ्रम अमंगळ ,विवेकवादी विज्ञानवादी, समाजवादी विवेकानंद, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज , आपले संविधान या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या लोकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.या उपक्रमामुळे तरुण मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल तसेच भरमसाठ खर्चाला आळा घालून असे उपक्रम केल्यास एक चांगली सवयी लागेल असे. आण्णासो सुबनावळ यांनी शुभ विवाह प्रसंगी सांगितले. यावेळी २०० पुस्तके आणि २०० रोपटी देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
स्टार्टअप्सना बळकटी देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवा; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांची मागणी
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र शासनाने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात स्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘नवीन स्टार्टअप व नाविन्यता धोरण २०२६’ जाहीर केले असून पुढील पाच वर्षांत ५० हजार स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या धोरणाची माहिती नवउद्योजकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी जनजागृती व मार्गदर्शन मोहीम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात, पुणे शहर व जिल्ह्यातील नवउद्योजकांना शासनाच्या विविध उद्योग योजनांची माहिती व्यापक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे आश्वासन उद्योग राज्यमंत्री नाईक यांनी दिले आहे.
पुणे जिल्हा हा औद्योगिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने विकसित होत असून मोठ्या प्रमाणावर युवक-युवती, महिला तसेच ग्रामीण भागातील नागरिक उद्योग व स्वयंरोजगाराकडे वळत आहेत. मात्र, शासनाच्या विविध योजनांची पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक इच्छुक उद्योजक या संधींपासून वंचित राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा उद्योग केंद्राच्या (DIC) माध्यमातून पीएमईजीपी (PMEGP), मुद्रा योजना, महिला उद्योजकता योजना आणि स्टार्टअप इंडिया यांसारख्या योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले अनुदान, बँक कर्ज, तांत्रिक सहाय्य आणि परवानगी प्रक्रियेबाबत एकाच ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे.
महिला बचत गट आणि महिला उद्योजकांसाठी विशेष प्रशिक्षण व अनुदान कार्यक्रम राबविणे, तसेच ग्रामीण व शहरी भागात मार्गदर्शन शिबिरे आणि कार्यशाळा आयोजित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय सोशल मीडिया, स्थानिक वृत्तपत्रे आणि एफएम रेडिओच्या माध्यमातून योजनांची माहिती व्यापक प्रमाणात प्रसारित करण्याचे सुचविण्यात आले आहे.
शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी एकात्मिक हेल्पडेस्क उभारणे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन मार्गदर्शन व अर्ज प्रक्रियेस सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे पुणे जिल्ह्यातील युवक-युवती, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
साने गुरुजी प्राथमिक शाळेत ‘सन्मान मातृत्वाचा’ सन्मान सोहळा संपन्न
Newsworldmarathi Pune: महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाच्या साने गुरुजी प्राथमिक शाळेत सन्मान मातृत्वाचा, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार व गुणवंत पालक पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यशाच्या शिखरावर असणारे माजी विद्यार्थी शोधून त्यांच्या यशात आईचे योगदान अनन्यसाधारण असते हा गाभा पकडून यशस्वी विद्यार्थ्यांच्या मातांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वर्षभर सातत्यपूर्ण निरीक्षणातून प्रत्येक वर्गातून एक गुणवंत विद्यार्थी निवडला गेला.त्यात त्या विद्यार्थ्याची वाचन क्षमता, नियमितता, टापटिपता, शिक्षकांशी संवाद, हस्ताक्षर,नम्रता इत्यादी निकषांच्या आधारे निवड करण्यात आली.तसेच गुणवंत पालक पुरस्कारासाठी पालकांचा शाळेसोबतचा संवाद व सहभाग, विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती या निकषांवर आधारित वर्षभरातील निरिक्षण व नोंदीअधारे निवड करण्यात आली. यात प्रत्येक निकषासाठी स्टार देण्यात आले होते.
सर्वात जास्त स्टार मिळवणारे पालक व विद्यार्थी निवडले गेले.
हे सर्व पुरस्कार मुख्याध्यापिका मीना काटे मॅडम यांनी त्यांच्या सासू स्व.कलावती बाळकृष्ण काटे यांच्या स्मरणार्थ दिले. आकर्षक स्मृतिचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून योगगुरू संगिता कळमकर उपस्थित होत्या.अध्यक्षस्थान संस्थेच्या संचालिका मा.अलकाताई काळे उपस्थित होत्या. व्यासपीठावर शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव मा .शिवाजी खांडेकर , मुख्याध्यापिका मीना काटे तसेच सेवाज्येष्ठ शिक्षक सोपान बंदावणे उपस्थित होते.
सन्मान मातृत्वाचा पुरस्कार स्वीकारताना माजी विद्यार्थी व त्यांच्या मातांचे मन हेलावून गेल्याचे दृष्य दिसून आले. खळखळत्या आनंद आश्रूंनी हा पुरस्कार सर्वांनी स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे संगिता कळमकर, निलेश पायगुडे, सुषमा घरबुडवे, व अध्यक्षा अलकाताई काळे यांनी आपले विचार मांडले.
स्वच्छतेची सवय लागावी या उद्देशाने जे विद्यार्थी वर्ग स्वच्छतेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात अशा ४५ विद्यार्थ्यांना ” स्वच्छतेचा राजा ” पारितोषिक मुख्याध्यापिका सौ मीना काटे यांच्या वतीने देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय ससे, विठ्ठल शेवते, तेजस्विनी फुलफगर, लक्ष्मी कांबळे, मोनिका पोटे, शितल रुपनूर यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन संगिता गोवळकर यांनी, प्रास्ताविक मीना काटे यांनी तर आभार शितल खेडकर यांनी मानले.
सन्मान मातृत्वाचा पुरस्कार प्राप्त माजी विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
१) अनुष्का लक्ष्मी बाळू कांबळे
२) अमित मंगल अरविंद जाधव
३) सोनाली मंगल बापू खुरंगळे
४) भाग्यश्री बेबी मल्हारी जाधव
५) आलम शकिला जमील शेख
६) निलेश शांताबाई ज्ञानदेव पायगुडे
गुणवंत पालक पुरस्कार प्राप्त नावे पुढीलप्रमाणे-
सौ. अनिता नरेंद्र हांजे
सौ. जान्हवी सूर्यकांत खुलम
सुषमा समीर घरबुडवे
सचिन बाळासो दारवटकर
मिनाक्षी महेश ननावरे
सौ जगदेवी दत्तात्रय लिंगशेटटी
गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
विहान धनराज कदम
कु. रिया सूर्यकांत खुलम
ईशा समीर घरबुडवे
अद्विका दिलीप पालके
सिद्धांत महेश ननावरे
मनस्वी अरविंद शेंडगे
चिन्मय विश्वविद्यापीठाकडून ‘स्कूल ऑफ कलायोगा’ची सुरुवात
पुणे
समृद्ध सांस्कृतिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात शुक्रवारी, ६ मार्च रोजी बाणेर येथे चिन्मय विश्वविद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ कलायोगा’ या नवीन संगीत शिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. चिन्मय मिशनचे प्रमुख आणि चिन्मय विश्वविद्यापीठाचे कुलगुरू पूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन झाले.
चिन्मय विश्वविद्यापीठ ही एक आगळीवेगळी संस्था आहे, जिथे प्राचीन गुरु–शिष्य परंपरेचा वारसा आधुनिक विद्यापीठीय व्यवस्थेसोबत जोपासला जातो. बाणेर येथे सुरू झालेल्या ‘स्कूल ऑफ कलायोगा’मुळे भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण गुरुकुल पद्धतीने घेण्याची आणि त्याचवेळी मान्यताप्राप्त विद्यापीठीय पदवी मिळवण्याची एक अनोखी आणि समृद्ध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
या प्रसंगी बोलताना पुण्यातील ‘चिन्मय नाद बिंदू’च्या संचालिका तसेच ‘स्कूल ऑफ कलायोगा’च्या प्रमुख प्रमोदिनी राव म्हणाल्या, “भारत हा प्राचीन ज्ञानपरंपरा आणि तत्त्वज्ञानासाठी जगभर प्रसिद्ध आहे. आपल्या मूळांशी नाळ जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण शोधण्याची तयारी असेल तर अनुभवाधारित शिक्षणाची मोठी संपदा आपल्याला येथे सापडते. स्वामी तेजोमयानंद यांच्या मते संगीताचा खरा उद्देश कला, कलाकार आणि रसिक यांना अधिक उंच आध्यात्मिक व सांस्कृतिक स्तरावर नेणे हा आहे. त्यामुळे संगीत शिक्षण केवळ कौशल्य विकसित करण्यापुरते मर्यादित न राहता या व्यापक उद्देशालाही समर्पित असले पाहिजे.”
‘स्कूल ऑफ कलायोगा’मध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम (बीए ऑनर्स इन म्युझिक), दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (एमए इन म्युझिक) तसेच संगीत विषयातील डॉक्टरेट (पीएचडी) अभ्यासक्रम उपलब्ध असतील. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांत हिंदुस्थानी गायन, बासरी आणि तबला या विषयांमध्ये विशेष अभ्यासाची संधी मिळेल. तर पीएचडी कार्यक्रमांत सादरीकरण, अध्यापन पद्धती, संगीतशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरा यांवरील सखोल संशोधनाला प्राधान्य दिले जाईल.
या संस्थेत चालणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सखोल, अनुभवाधारित आणि वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन मिळेल. यासोबतच शास्त्रशुद्ध शैक्षणिक रचना आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोन हे या शिक्षणपद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरेल.
‘स्कूल ऑफ कलायोगा’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे राबवण्यात येणारी दोन स्तरांवरील अध्यापन पद्धती. यात एकीकडे गुरु विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने अनुभवाधारित मार्गदर्शन करतात, तर सहाय्यक प्राध्यापक शैक्षणिक, सैद्धांतिक आणि संशोधनाधारित अध्ययनाला पाठबळ देतात. या दुहेरी पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो—ज्यामध्ये सखोल संगीतज्ञान, नियमित रियाज, सैद्धांतिक समज आणि संशोधन क्षमता यांचा समतोल साधला जातो.
‘स्कूल ऑफ कलायोगा’मध्ये संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नसून ती एक साधना आणि जीवनपद्धती मानली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मैफिली, बैठका, संगीत महोत्सव आणि विद्वानांशी संवाद अशा विविध सांस्कृतिक उपक्रमांनी समृद्ध अशा वातावरणात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे
दुभाजक दुरुस्ती करा; बेकायदेशीर तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : रोहन सुरवसे-पाटील
Newsworldmarathi Pune: पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज ते खंबाटकी घाट पायथा दरम्यान अनेक ठिकाणी महामार्गावरील दुभाजक बेकायदेशीररित्या तोडून अनधिकृत जोडरस्ते तयार करण्यात आल्याने अपघातांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित दुभाजकांची तातडीने दुरुस्ती करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम तसेच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कात्रज ते खंबाटकी घाट पायथा या दरम्यान काही हॉटेल तसेच व्यावसायिक आस्थापनांकडून महामार्गाच्या दुभाजकांना तोडून थेट प्रवेशमार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे सेवा रस्त्यावरून येणारी वाहने अचानक महामार्गावर प्रवेश करत असून, महामार्गावरील वेगवान वाहतुकीमुळे अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
त्यामुळे या मार्गावरील ज्या ठिकाणी दुभाजक तोडण्यात आले आहेत, त्या सर्व ठिकाणांची तातडीने पाहणी करून दुभाजकांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.
तसेच महामार्गावरील दुभाजक बेकायदेशीररित्या तोडून अनधिकृत जोडरस्ते तयार करणाऱ्या संबंधित व्यक्ती, हॉटेल चालक किंवा आस्थापनांविरुद्ध चौकशी करून संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
भविष्यात अशा प्रकारचे बेकायदेशीर प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठीही कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुरवसे-पाटील यांनी निवेदनातून केली आहे.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदिपसिह गिल्ल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता अंकित यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

