LATEST ARTICLES
पुण्यभूषण नितीन रावजीभाई देसाई यांचे निधन
Newsworldmarathi Pune: अपार व्यावसायिक यश मिळवूनही समाजाशी नाळ घट्ट ठेवणारे पुण्यभूषण नितीन रावजी देसाई यांचे ८ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मीना, मुलगी शितल, निशा, रिमा, जावई राजन, जय, तसेच नातवंडे असा परिवार आहे.
उद्योगविश्वात यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण करतानाच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याने पुण्याच्या सामाजिक व औद्योगिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. व्यावसायिक यश ही अंतिम मंजिल नसून समाजाच्या उन्नतीसाठी ते साधन ठरले पाहिजे, हा विचार त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कृतीतून जपला.
१ नोव्हेंबर १९४३ रोजी पुण्यात जन्मलेल्या नितीन देसाई यांचे बालपण कसबा पेठेतील वाडा आणि चाळसंस्कृतीत गेले. आरसीएम गुजराती हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुढे गुजरातमधील करमसद येथील अभियांत्रिकी शिक्षणानंतर त्यांनी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून सिव्हिल आणि पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेत उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध असतानाही मातृभूमीच्या ओढीने त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
भारतात परतल्यानंतर वडिलोपार्जित देसाई बिडी उद्योगाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी ब्रँडिंग, मार्केटिंग आणि उत्पादन व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले. गुजरात, हरियाणा, पंजाब, राजस्थानसह देशभरात व्यवसाय विस्तारला. पुढे देसाई ब्रदर्स समूहाच्या माध्यमातून पारंपरिक लोणच्यांच्या उद्योगात गुणवत्ता, चव आणि विश्वासाचा ठसा उमटवला. तसेच अॅक्काफार्म केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून केमिकल उद्योगात भारतासह अमेरिकेतही व्यावसायिक भरारी घेतली.
उद्योगाबरोबरच सामाजिक बांधिलकी हा त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू राहिला. सह्याद्री हॉस्पिटलचे को-प्रमोटर म्हणून आरोग्य क्षेत्रात योगदान, सोसायटी फॉर फिजिकली हॅण्डीकॅपच्या माध्यमातून दिव्यांग व मुकबधिरांच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी कार्य, तसेच एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलद्वारे लाखो गरजू रुग्णांना विनामूल्य नेत्रशस्त्रक्रियांची सुविधा देऊन त्यांनी लाखो रुग्णांना मोफत दृष्टी देण्याचे त्यांचे कार्य व्यवस्थात्मक आणि दीर्घकालीन होते. यासोबतच वनराई, जनसेवा फाउंडेशन, दिशा संस्था, धायरी व पानशेत येथील वृद्धाश्रम, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले. ते पूना क्लब आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष होते.
श्री पूना गुजराती बंधू समाज व दि पूना गुजराती केळवणी मंडळ यांच्या अध्यक्षपदी राहून शिक्षण क्षेत्राच्या विस्तारासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच PGKM स्कूल आणि जयराज स्पोर्ट कॉन्व्हेंशन सेंटर हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधी देशातील मोठे प्रकल्प पूर्ण झाले. तसेच विविध राष्ट्रीय व सामाजिक पुरस्कारांनी सन्मानित झालेले नितीन देसाई उद्योगातून समाजनिर्मितीकडे जाणाऱ्या मूल्याधिष्ठित उद्योजकतेचे प्रेरणास्थान होते. त्यांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांना दिशा देत राहतील.
उद्योगातून समाजासाठी देणगी नव्हे, तर कर्तव्य म्हणून काम करणारे नितीन देसाई हे मूल्याधिष्ठित उद्योजकत्वाचे प्रेरणास्थान होते. त्यांचे विचार, कार्य आणि सामाजिक बांधिलकी पुढील पिढ्यांना निश्चितच दिशा देत राहतील.
बनावट बांधकाम परवानग्याद्वारे शासनाची फसवणूक; वारजे पोलीस सात गुन्हा दाखल
Newaworldmarathi Pune: बनावट कमेन्समेंट प्रमाणपत्र, कम्प्लिशन प्रमाणपत्र आणि मंजूर बांधकाम आराखड्यांच्या आधारे दस्त नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वामीराज डेव्हलपर्सचे भागीदार संदिप दामोदर कडू (वय ३८, रा. विठ्ठल नगर सोसायटी, आनंदनगर, वडगाव धायरी), साईनाथ वासुदेव सपकाळ (वय ३७, रा. तृप्ती गार्डन, आनंदनगर, सिंहगड रोड), महेश महाबळेश्वर नाईक (वय २५), रा. विठ्ठल नगर सोसायटी, आनंदनगर, वडगाव धायरी), आश्रफ खलील शेख (वय २५, रा. हर्ष पॅलेस, आनंदनगर, सिंहगड रोड), संदेश राजू आवळे (वय ३४), प्रियंका संदेश आवळे (वय २९, रा. स्वामीराज बी, वडगाव धायरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर भारतीय न्याय संहितेतील कलम ३३६(३), ३४०(२), ३१८ (४), ३ (५) तसेच नोंदणी अधिनियम कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सह दुय्यम निबंधक हवेली क्र. १३, पुणे शहर कार्यालयाचे अधिकारी व्ही. डी. कासेवाड (वय ५३) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० डिसेंबर २०२४ रोजी घडला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दस्त क्र. २३७८१/२०२४ नोंदणीसाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करताना फिर्यादी कासेवाड यांना जोडलेल्या पूरक कागदपत्रांबाबत संशय आला. संबंधित दस्तासोबत पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे कमेन्समेंट प्रमाणपत्र व मंजूर बांधकाम आराखडा जोडण्यात आला होता.
या कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी ती पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग (झोन क्र. २) यांच्याकडे पाठविण्यात आली. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी उपअभियंता कार्यालयाकडून त्यांना पत्र प्राप्त झाले.
या पत्रानुसार, धायरी येथील सर्व्हे नं. १०५, हिस्सा ५/१ या ठिकाणी नमूद बांधकामास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महाशिवरात्रीला भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनासाठी बंद राहणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची माहिती
Newsworldmarathi Pune:
सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, कुंभकाळात नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठ्या प्रमाणावर भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. साधारणपणे दररोज सुमारे एक लाख भाविक येथे येतील, असा अंदाज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे.
या आराखड्यानुसार कुंभमेळा २०२७ दरम्यान गर्दी व्यवस्थापन व भाविकांसाठी सुरक्षित, सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध पायाभूत विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश व निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग तसेच गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. कुंभमेळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
कुंभमेळ्याच्या काळात अपेक्षित प्रचंड गर्दी लक्षात घेता सध्याचा जुना सभामंडप अपुरा पडणार असल्याने नवीन भव्य सभामंडप उभारण्यात येत आहे. तसेच पायरी मार्गाचे कामही सुरू आहे. या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर दगड, बांधकाम साहित्य व अवजड यंत्रसामग्री मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे. कामांचे स्वरूप, भौगोलिक परिस्थिती आणि भाविकांची संख्या लक्षात घेता बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.
पूर्वी भाविकांच्या सोयीसाठी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सध्याच्या बांधकामाचा वेग, व्याप्ती आणि सुरक्षिततेचा सखोल आढावा घेतल्यानंतर महाशिवरात्री कालावधीतही मंदिर खुले ठेवणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भीमाशंकर हा अतिवृष्टीचा भाग असल्याने जून ते सप्टेंबरदरम्यान बांधकाम करणे कठीण होते, त्यामुळे उपलब्ध कालावधीतच कामे पूर्ण करणे आवश्यक आहे.
या सर्व बाबींचा विचार करून दि. १२ फेब्रुवारी २०२६ ते दि. १८ फेब्रुवारी २०२६ या महाशिवरात्री कालावधीतही श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महापौर निवडीनंतर भाजपचा साधेपणाचा निर्णय; केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव, पहिल्याच सभेत श्रद्धांजली ठराव
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदाची निवड येत्या ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महापालिकेच्या एकूण १६५ जागांपैकी भाजपचे तब्बल ११९ नगरसेवक निवडून आल्याने ही निवड प्रक्रिया औपचारिक ठरण्याची शक्यता आहे. मात्र, बहुमत असूनही भाजपने यावेळी जल्लोष टाळण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महापौर-उपमहापौर निवडीनंतर कोणताही उत्सव, गुलाल, फुले किंवा फटाके न फोडता केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानेच हा निर्णय घेतला असून तो पक्षाच्या सर्व नगरसेवकांना कळवण्यात आला आहे. याबाबतची माहिती भाजप गटनेते गणेश बिडकर यांनी दिली.
बिडकर यांनी सांगितले की, लोकभावना आणि सध्याच्या परिस्थितीचा विचार करून भाजपने संयमित भूमिका घेतली आहे. त्यामुळे विजयानंतरचा जल्लोष टाळून अत्यंत साधेपणाने प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याचबरोबर महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव मांडण्यात येणार आहे.
भाजपच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, बहुमत असूनही दाखवलेला हा संयम पक्षाच्या धोरणात्मक भूमिकेचे प्रतीक मानला जात आहे. आगामी काळात महापालिकेच्या कारभारातही अशीच जबाबदार आणि संवेदनशील भूमिका ठेवली जाईल, असा संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.
आधी डान्सबारमालकांना नाचविले; आता बेलापुरातील अनधिकृत धार्मिक स्थळ पाडले; अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे ‘अॅक्शन मोड’वर
Newaworldmarathi Mumbai : नवी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाच्या खुर्चीत बसतानाच, बेकायदेशीरपणे डान्सबार थाटणाऱ्या बारमालकांना अद्दल घडविल्यानंतर अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी पुन्हा एकदा अतिक्रमणांवर आपली नजर वळवली आहे. काही महिन्यांपूर्वी बेकायदा इमारतींवर बुलडोझर फिरवला आणि आता नियम तुडवून उभारलेल्या मदरशा आणि मशिदीवरही हातोडा उगारला आहे. महापालिका निवडणूक आटोपताच डॉ. गेठे आणि त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळीच कारवाईचा धडाका लावून बेलापूरमधील (सेक्टर १९) मधील मदरशा आणि मशिद पाडली.
विशेष म्हणजे, बेकायदा उभारलेल्या बांधकामाची एक वीटही ठेवायची नाही, अशी ताकीद देऊन डॉ. गेठे यांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना घेऊन डोळ्यादेखतच कारवाई पार पाडली. अशा प्रकारे कारवाई करीत अतिक्रमण करणाऱ्यांना थारा नसेन, हाच इशारा यानिमित्ताने महापालिका प्रशासनाने दिला.
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील काही ठिकाणी परवानगीपेक्षा अधिक कामे बांधकामे करण्यात आली आहेत. विशेषतः हॉटेल त्यातही डान्सबार हे बेकायदा असल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली होती. या व्यावसायिकांना नोटिसा देऊनही काणाडोळा केल्यानंतर मात्र, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी एका रात्री शे-सव्वाशे हॉटेल पाडून डान्सबार मालकांना जागेवर आणले होते.
थेट बुलडोझर उभारून बांधकामे जमीनदोस्त करणाऱ्या डॉ. गेठेंविरोधात डान्सबारमालकांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाठ घेऊन नाराजी मांडली होती. त्यानंतरही आपला पवित्रा कायम ठेवून महापालिकेने कारवाईची मोहीम सुरूच ठेवली होती. त्यानंतरही बेलापूर आणि परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना महापालिकेने कायम कारवाईचा धाक दाखवला. अशातच बलापूरमधील (सेक्टर १९) या भागातील मदरशा आणि मशिदवर कारवाई करीत, नियमबाह्य धार्मिक स्थळांवरही कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
“नवी महापालिकेच्या हद्दीतील बेकायदा निवासी आणि व्यावसायिक मिळकतींवर नियमित कारवाई केली जाते. शहरात अशा प्रकारची बांधकामे होऊ नयेत, यासाठी सर्व पातळ्यांवर कार्यवाही करीत आहोत. त्याचाच भाग म्हणून, मदरशा आणि मशिदीवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम कायमस्वरुपी राबविली जाते, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.
बजेट सादर होताच सोनं चांदी स्वस्त; आजचा भाव ऐकून थेट दुकानच गाठाल
Newsworldmarathi Team: अर्थसंकल्पाच्या दिवशी कमोडिटी मार्केटमध्ये गोंधळाचे वातावरण होते. गेल्या दोन दिवसांतच चांदी १.३६ लाख रुपयांनी आणि सोन्याचे ३०,००० रुपयांनी घसरण झाली आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये चांदी २.६६ लाख रुपयांनी आणि सोन्याचे १.४६ लाख रुपयांनी घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, या तीव्र घसरणीचे मुख्य कारण मार्जिन मनी आणि नफा-पुस्तकात वाढ आहे.
बजेटच्या दिवशी एकीकडे देशाचे लक्ष संसदेकडे होते, तर दुसरीकडे कमोडिटी बाजारात वेगळाच भूकंप आला होता. सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत इतकी मोठी घसरण दिसली आहे की, गुंतवणूकदार आणि सामान्य खरेदीदार दोघांनाही धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी आकाशाला भिडणारे सोने आणि चांदी आज, म्हणजे १ फेब्रुवारीला बजेट सादर झाल्यानंतर जोरदार खाली आले आहेत. फ्युचर्स मार्केटमध्ये झालेल्या या भूकंपामुळे किंमती रेकॉर्ड स्तरापासून खूप खाली आणल्या आहेत, ज्यामुळे बाजाराचे संपूर्ण समीकरणच बदलले आहे.
सोनेही असेच आहे. २९ जानेवारीला १.६९ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलेले सोने आज वायदा बाजारात १.३८ लाख रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. आज सराफा बाजार बंद असला तरी, ३० जानेवारीला सराफा बाजारात चांदी ४० हजार रुपये आणि सोना सुमारे ९,५०० रुपये स्वस्त झाले होते. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव १.६५ लाख रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ३.३९ लाख रुपये प्रति किलोवर आली होती.
मी सुनेत्रा अजित पवार…, सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
Newaworldmarathi Pune: मोठी बातमी समोर येत आहे, अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत, राज्यपालांनी त्यांंना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली, आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.
अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा नवा गटनेता कोण होणार? नवे उपमुख्यमंत्री कोण असणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज राजभवानामध्ये राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी देखील त्यांची निवड करण्यात आली आहे.
आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीला पक्षाच्या सर्व आमदारांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये दोन प्रस्ताव मांडण्यात आले, पहिला प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवडी संदर्भात होता, तर दुसरा प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांना पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचा संविधानिक अधिकार मिळण्यासंदर्भात होता. या दोन्ही प्रस्तावाला या बैठीकेमध्ये मंजुरी मिळाली, सुनेत्रा पवार यांची या बैठकीमध्ये गटनेता म्हणून निवड करण्यात आली, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्रिपदापूर्वी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या.
महाराष्ट्राचा दादा अनंतात विलीन! महाराष्ट्र हळहळला; बारामतीचा झंझावात आज तिथल्याच मातीत शांत झाला…
Newaworldmarathi Pune: राज्याच्या राजकारणातील एक धगधगते आणि कृतिशील नेतृत्व, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखों चाहत्यांच्या उपस्थितीत, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले होते. आपल्या लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप देण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र बारामतीत जणू एकवटला होता आणि “अजितदादा परत या…”, “अजित दादा अमर रहे..” अशा काळीज चिरणाऱ्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.
बुधवारी, २८ जानेवारी रोजी सकाळी अजित पवार आपल्या नियोजित प्रचारसभांसाठी मुंबईहून बारामतीकडे ‘बंबार्डिअर लिअरजेट ४५ एक्सआर’ या ८ सीटर विमानाने रवाना झाले होते. सकाळी ८:१० मिनिटांनी विमानाने उड्डाण केले, मात्र ८:४५ च्या सुमारास बारामती धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच विमानाला भीषण अपघात झाला. दाट धुक्यामुळे दोन वेळा लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात विमान कोसळले आणि त्याला आग लागली. या दुर्घटनेत अजित पवारांसह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षारक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.
अजित पवार यांचे पार्थिव आज सकाळी प्रथम त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले, जिथे पवार कुटुंबाने त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी सुनेत्रा पवार यांना शोक अनावर झाला होता, तेव्हा त्यांच्या नणंद सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांना सावरले. त्यानंतर सकाळी ९ वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली आणि सकाळी ११ वाजता पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि बिगुल वाजवून त्यांना शासकीय सलामी दिली. त्यानंतर त्यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार आणि धाकटे चिरंजीव जय पवार यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी “अजितदादा अमर रहे” आणि “परत या दादा” अशा घोषणांनी बारामतीचा परिसर दणाणून सोडला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांनी जड अंतःकरणाने अजित पवारांना अखेरचा मुजरा केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटला होता. प्रत्येकाच्या मनात ‘एक पर्व संपले’ हीच भावना दाटून आली होती.
काटेवाडी गावावर दुःखाचा डोंगर
Newsworldmarathi pune: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमानतळावर झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताबाबतचे वृत्त समोर येताच त्यांच्या जन्मगावी काटेवाडी (ता. बारामती) येथे दुःखाचा डोंगर कोसळल्याचे चित्र दिसून आले.
या अनपेक्षित वार्तेने गावात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वृत्त समजताच गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. अनेक वयोवृद्ध महिला धाय मोकळून रडताना दिसून आल्या. ‘आमचा दादा कुठे हाय… आम्हाला सोडून गेलास कसा’, अशा हृदयद्रावक शब्दांत गावातील माजी संरपच कल्पना कचरे, वयोवृद्ध महिला पद्मिनी लोंढे व मिराबाई रा. कपसरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या शब्दांनी उपस्थितांची मने हेलावून गेली.
गावात शोकमय वातावरण पसरल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. दुकाने तातडीने बंद ठेवण्यात आली असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रस्त्यांवर शांतता असून, प्रत्येक जण मोबाईल व टीव्हीवरील अपडेट्सकडे डोळे लावून बसलेला दिसतो आहे. ‘कुटुंबातील कर्ता माणूस गेल्यासारखं वाटतंय’, अशा शब्दांत अनेक ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला.
अजित पवार यांचे काटेवाडीशी असलेले घरातील जिव्हाळ्याचे नाते, त्यांच्या विकासकामांमुळे गावकऱ्यांच्या मनात असलेली आपुलकी यामुळे या घटनेचा धक्का अधिक तीव्रतेने बसल्याचे जाणवत आहे.
राज्याला मोठा धक्का! विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, विमान जळून खाक
Newaworldmarathi Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे. तर विमान जळून खाक झालं आहे.
आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार, या विमान अपघातापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दादांन घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते.
विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचं दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

