LATEST ARTICLES
“Shining Star” फॅशन शो पुण्यात रंगणार
Newaworldmarathi Pune : शहरात फॅशन आणि ग्लॅमरचा जल्लोष अनुभवण्यासाठी “Shining Star” हा भव्य फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे. मिस, मिसेस, मिस्टर आणि किड्स अशा विविध गटांसाठी हा स्पर्धात्मक कार्यक्रम खुला असून सहभागींसाठी मोठ्या संधींचे दार उघडणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना सोन्याची नथ, रोख बक्षिसे, क्राउन तसेच टॉप १० विजेत्यांना सिल्व्हर कॉइन देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागींसाठी सेलिब्रिटी, रील स्टार्स, व्यावसायिक व्यक्तिमत्त्वे आणि दिग्दर्शकांशी भेटण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच जाहिराती, चित्रपट, फोटोशूट, गाणी आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची संधीही मिळू शकते.
हा भव्य कार्यक्रम अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम येथे २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार आहे. अधिक माहितीसाठी आयोजकांकडून संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.
“Shining Star” फॅशन शोचे आयोजन नेक्स्टस प्रॉडक्शन आणि चंदुकाका सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर “Newsworld मराठी” असून, फॅशन आणि ग्लॅमर क्षेत्रात संधी शोधणाऱ्यांसाठी हा एक मोठा मंच ठरणार आहे.
सिध्दनाथाच्या नावानं चांगभलं… खरसुंडीत चैत्री यात्रा उत्साहात
Newsworldmarathi Pune: खरसुंडी (ता. आटपाडी) येथे सिद्धनाथ देवाच्या चैत्री यात्रेला यंदा प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. तब्बल ४० अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानातही भाविकांनी कडाक्याच्या उन्हाची तमा न बाळगता “सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं”चा जयघोष करत सासनकाठी व पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
चैत्र शुद्ध अष्टमीपासून यात्रेची सुरुवात झाली. अष्टमीच्या सायंकाळी श्री जोगेश्वरी मंदिर परिसरात सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त पारंपरिक मंगलकार्य व धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावात पार पडले. महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतून आलेल्या भाविकांनी यात्रेत हजेरी लावली.
सोमवारपासूनच भाविकांचे आगमन सुरू झाले होते. मंगळवारी पहाटेपासून मंदिर परिसरात मोठी गर्दी उसळली. विविध गावांतील मानाच्या सासनकाठ्या मध्यरात्रीपासूनच मंदिरात दाखल झाल्या. २५ ते १०० फूट उंच सासनकाठ्या रंगीबेरंगी पताकांनी सजवून वाजत-गाजत आणण्यात आल्या. गुलाल व खोबऱ्यांची उधळण करत भाविकांनी भक्तीचा जल्लोष केला.
दुपारी सिद्धनाथाची पालखी जोगेश्वरी देवीच्या भेटीसाठी निघाली. पालखी मार्गावर सासनकाठ्यांची मोठी झुंबड उडाली. लाखो भाविकांनी पालखी दर्शनासाठी गर्दी केली. पालखी मंदिरातून बाहेर पडताच जयघोष व गुलाल उधळणीने परिसर दुमदुमला.
जोगेश्वरी मंदिरात पालखी पोहोचताच सासनकाठ्यांनी पालखीस टेकून मानवंदना दिली. तीव्र उष्णतेमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागला, मात्र भक्तीरसात तल्लीन झालेल्या भाविकांनी सर्व कष्ट विसरून यात्रेचा आनंद लुटला.
बुधवार पेठेतील लॉज प्रकरणात एकटाच आरोपी; सीसीटीव्हीत अन्य कोणीही दिसले नाही : पोलीस आयुक्त अमितेश कुमार
Newaworldmarathi Pune: शहरातील चर्चेत असलेल्या बुधवार पेठेतील लॉज प्रकरणात आतापर्यंतच्या तपासात एकच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले असून इतर कोणाचाही सहभाग आढळलेला नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. संबंधित आरोपीने लॉजमध्ये जाऊन आपत्तीजनक कृत्य केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर आरोपीला लॉजमधील कर्मचाऱ्यांनी पकडले असता त्याने “स्टिंग ऑपरेशनसाठी आलो होतो आणि सोबत इतर पत्रकार होते” असा दावा केला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या सीसीटीव्ही तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणात तो व्यक्ती एकटाच असल्याचे स्पष्ट झाले. घटनेपूर्वी दोन तासांचा परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आला असून त्यात अन्य कोणीही सहभागी असल्याचे आढळले नाही.
दरम्यान, या प्रकरणात कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी फोन आले नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या “अनेक लोक उपस्थित होते, काहींना मारहाण झाली, काही जण पळून गेले” अशा चर्चांनाही त्यांनी फेटाळले. आरोपीला पकडताना काहींनी त्याला मारहाण केल्याचे मात्र त्यांनी मान्य केले.
रूपाली पाटील यांनी दिलेल्या अर्जात काही पत्रकारांवर सहभाग असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र त्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तरीही या सर्व मुद्द्यांची चौकशी सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
सदर लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालतो का, याबाबतही पोलीस पडताळणी करत असून आतापर्यंत असे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. आरोपी सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तपास पुढे सुरू असून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांची मागणी
Newsworldmarathi pune: मार्च अखेर आणि एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांना बसला असून सुमारे २ लाख ४ हजार ८३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अंदाजे ५ लाख १२ हजार एकर शेतीवर परिणाम झाला असून जवळपास ४ लाख शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन सादर करून पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि मदत वितरणाची प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आणि त्वरीत मदत जमा करण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली. बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या गहू, मका, हरभरा आणि ज्वारी यांसारख्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय आंबा, द्राक्षे, केळी, संत्रा, डाळिंब, टरबूज आणि उन्हाळी कांदा या बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. विशेषतः नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक असल्याचे समोर आले आहे.
“या आपत्तीत काढणीस आलेल्या गहू, मका, हरभरा आणि ज्वारी या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासोबतच आंबा, द्राक्षे, केळी, संत्रा, डाळिंब, टरबूज आणि उन्हाळी कांदा या बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. विशेषतः नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.”— रोहन सुरवसे पाटील, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे.
‘दृष्टी’ एकांकिका ब्रेल लिपीमध्ये प्रसिद्ध व्हावी : योगेश सोमण
Newaworldmarathi Pune: पुणे अंधजन मंडळातर्फे आयोजित “आंतरज्योती” ब्रेल साहित्य संमेलनात योगेश सोमण यांनी ही इच्छा व्यक्त केली. “आंतरज्योती” ब्रेल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिने-अभिनेते,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री योगेश सोमण तसेच ख्यातनाम साहित्यिक, गझलकार, समाजसेविका श्रीमती ममता सपकाळ उपस्थित होते.
रामटेकडी,हडपसर येथील संस्थेच्या टेक्नीकल ट्रेनिंग सेंटर मध्ये संपन्न झालेल्या मेळाव्यामध्ये दृष्टिबाधितांच्या कल्याणासाठी प्रेरणादायक कार्य करणाऱ्या श्री दत्तात्रय जाधव यांना आंतरज्योती गौरव पुरस्कार देण्यात आला तसेच श्री प्रकाश थोरात,श्री अनिल दिवटे,श्री सतीश निकम यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
एक दिवसीय संमेलनात दृष्टीबाधित रसिकांनी कविता,गाणी सादर केली तसेच स्वरगंधा सांस्कृतिक मंच,पुणे या दृष्टीबाधित कलाकारांचा मराठी-हिन्दी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.
दृष्टिबाधित व्यक्तींच्या वाचनाची आवड लक्षात घेऊन गेल्या ६५ वर्षापासून पुणे अंधजन मंडळ या सामाजिक संस्थेतर्फे “आंतरज्योती” नावाचे ब्रेल मधील मराठी मासिक प्रसिद्ध केले जाते.दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणाऱ्या या मासिकामध्ये कथा,कविता,माहितीपर लेख यांचा समावेश असतो.महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राहणारे दृष्टिबाधित व्यक्ती मासिकाच्या सभासद आहेत.
पुणे अंधजन मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजेश शहा,विश्वस्त श्री धनराज पाटील,कार्यकारी संचालक श्री परवेझ बिलीमोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती काश्मिरा ठाकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
पुणे अंधजन मंडळ ही सामाजिक संस्था गेली ७० वर्षापेक्षा अधिक काळापासून दृष्टिबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करीत आहे.दृष्टिबाधित व्यक्तीं,विद्यार्थी यांच्या सर्वागीण विकासासाठी संस्थेमार्फत विविध प्रकल्प राबविले जात आहे उदा.दृष्टिहीन निराधार महिलांसाठी मोफत वृद्धाश्रम,१८ ते ३५ वयोगटातील दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी मोफत टेक्नीकल ट्रेनिंग सेंटर डोळ्यांच्या विविध आजारांवरील उपचारासाठी अद्यावत हॉस्पिटल.आतापर्यंत महाराष्ट्र तसेच भारतामधील अनेक दृष्टिबाधित व्यक्ती संस्थेच्या प्रकल्पाच्या लाभार्थी आहेत.
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन
Newaworldmarathi Pune : पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे (वय 62 रा. कोथळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) यांचे प्रदीर्घ आजाराने आज पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कोथळे गावी कऱ्हा नदीकाठी आज रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
प्रकाश भोईटे यांनी पुढारी, देशदूत, ऐक्य, पुण्यनगरी, देशोन्नती या वृत्तपत्रांमध्ये प्रदीर्घकाळ वार्तांकन केले. सध्या ते दैनिक केसरीमध्ये कार्यरत होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याबरोबर त्यांनी काम केले आणि संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याबरोबर देखील त्यांनी काम केले. शेतकरी आणि पत्रकारांच्या प्रश्नावरील आंदोलनातही त्यांनी वेळोवेळी सहभाग घेतला होता.
दि पूना मर्चन्टस चेबरतर्फे दिला जाणारा कै. वी. ल. गवाडिया आदर्श पत्रकार पुरस्कार, पुणे जिल्हा परिषदेचे ग्रामस्वच्छता अभियान पारितोषिक त्यांना मिळाले होते. महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे महासचिव, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.
पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासाठी देखील त्यांनी लढा दिला होता. राजकीय विषयावरील बातम्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या अनेक बातम्या राज्यभर गाजल्या. कृषि, सहकार, साखर विषयावरही त्यांनी निर्भीड पत्रकारिता केली.
पुरंदर तालुक्यातील कोथळे गावच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. अनेक लोकाभिमुख कामे त्यांनी गावांमध्ये उभी केली. कोथळे गावातील वाचनालयाचेदेखील अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी जयश्री भोईटे या कोथळे गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष अँड धनंजय भोईटे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय भोईटे, पत्रकार प्रताप भोईटे हे त्यांचे बंधू होत.
स्वरस्वामिनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Asha Bhosle : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन झाले आहे. शनिवारी त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्यानंतर ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे दुर्दैवी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रमाणेच आशा भोसले यांनीही आपल्या सुरांनी संगीत क्षेत्राला सजवलं. त्यांनी कित्येक आयकॉनिक गाण्यांना आवाज दिला.
आशा भोसले यांनी संगीत क्षेत्रातून जितकं प्रेम मिळालं, तितकच त्यांचं वैयक्तिक आयुष्य दु:खात गेलं. वैविध्यपूर्ण गायनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आशा ताईंना वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आशा भोसले यांनी आपली बायोग्राफी ‘‘Asha Bhosle: A Life In Music’ मध्ये आपल्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले. राम्या शर्मा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.
मेहतर वाल्मिकी समाज मंदिर निशुल्क करण्याचा प्रस्ताव; नगरसेविका अर्चना पाटील यांचा पुढाकार
Newaworldmarathi Pune : मेहतर वाल्मिकी समाजाच्या हितासाठी हरका नगर येथील समाज मंदिर पूर्णतः निशुल्क करण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी पुणे महानगरपालिकेकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर तसेच शहर सुधारणा समितीकडे विचारार्थ पाठविण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक २२ (क) मधील हरका नगर परिसरात असलेले मेहतर वाल्मिकी समाजाचे समाज मंदिर हे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच समाजातील बांधवांना एकत्र येण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि एकजूट वाढवण्यासाठी हे ठिकाण उपयुक्त ठरत आहे. समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक उपक्रमांसाठी या समाज मंदिराची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
समाजाच्या वतीने हे समाज मंदिर निशुल्क उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही बाब अत्यावश्यक असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने यावर सकारात्मक निर्णय घेऊन समाजाच्या हिताचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी मेहतर वाल्मिकी समाज पंचायतीचे सर्व सभासद उपस्थित होते. प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर व्हावा आणि समाज मंदिर पूर्णतः निशुल्क उपलब्ध व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून त्याला यश मिळत असल्याचे नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी सांगितले.
कर्करोग उपचार क्षेत्रात बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे आशादायी संशोधन : ‘संयुग ७’ची प्रभावी कामगिरी : डॉ. श्रीकांत माने
Newsworldmarathi Pune: कर्करोगावर अधिक परिणामकारक आणि कमी दुष्परिणाम असलेले उपचार विकसित करण्याच्या दिशेने बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेडने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून ‘संयुग ७’ या नव्या फायटो-औषध आधारित संयुगाने कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात आशादायी परिणाम दर्शवले आहेत.
जनुकशास्त्र आणि अचूक उपचारपद्धती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ज्ञ, येल विद्यापीठ (अमेरिका) येथील प्राध्यापक डॉ. श्रीकांत माने यांनी या संयुगाच्या कार्यक्षमतेबाबत माहिती दिली. ते यशदा, पुणे येथे आयोजित कर्करोग विषयक विशेष शास्त्रीय कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेड आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास बीव्हीजी समूहाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, बीव्हीजी लाइफ सायन्सेसच्या संचालिका डॉ. जयश्री द्रविड यांच्यासह प्रख्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. विनय थोरात, युरोलॉजिस्ट डॉ. सुरेश पाटणकर आणि विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे विभागप्रमुख उपस्थित होते. डॉ. प्रतापराव गोळे हे खास साताऱ्यावरून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. एकूण २५० डॉक्टरांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
डॉ. माने यांनी सांगितले की, ‘संयुग ७’ कर्करोग पेशींची वाढ रोखते, त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते आणि त्यांचा शरीरातील इतर भागांमध्ये प्रसार (मेटास्टेसिस) होण्यास प्रतिबंध करते. तसेच, हे संयुग शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकटी देत कर्करोगविरोधी लढा अधिक प्रभावी बनवते. प्राथमिक निष्कर्षांनुसार, हे संयुग कर्करोग पेशींवर प्रभावीपणे परिणाम करते, तर सामान्य पेशींवर त्याचा अत्यल्प किंवा नगण्य परिणाम आढळतो.
या संशोधनातून ‘संयुग ७’ कर्करोगाच्या वाढीशी संबंधित विविध जैविक प्रक्रियांवर प्रभाव टाकत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरक्षित, लक्ष्यित आणि अधिक प्रभावी उपचार विकसित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
यावेळी हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले की, बीव्हीजी लाइफ सायन्सेस गेल्या दशकभरापासून फायटो-औषध संशोधन क्षेत्रात कार्यरत असून सातत्यपूर्ण प्रयत्नांतून कर्करोगासह इतर अनेक आजारांवर प्रभावी औषधे विकसित करण्यात यश मिळाले आहे. या संशोधनामुळे देशातील कर्करोग रुग्णांना नवी आशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीव्हीजी वेलनेस ओपीडीच्या सल्लागार डॉ. अर्चना शिंदे यांनी केले. संशोधन व विकास उपक्रमांची माहिती विल्यम रणनवरे यांनी दिली, तर डॉ. जयश्री द्रविड यांनी काही महत्त्वपूर्ण केस स्टडीज सादर केल्या.
उपस्थित सर्व डॉक्टरांनी यकृत, हृदय, मधुमेह आणि पार्किन्सन यांसारख्या विविध आजारांवरील बीव्हीजीच्या संशोधनाधारित औषधांचे कौतुक केले. तथापि, कार्यक्रमाचा मुख्य भर कर्करोग उपचारावर होता.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणीत प्रथमेश आबनावे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
Newaworldmarathi Pune: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, युवकांमध्ये आक्रमक आणि अभ्यासपूर्ण नेतृत्व म्हणून ओळख असलेले प्रथमेश विकास आबनावे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रभारी मनीष शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब, महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी शांभवी शुक्ला व नवज्योत संधू यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वात ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
प्रथमेश आबनावे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर विविध प्रश्नांवर आक्रमक आणि संघटित आंदोलन उभारली आहेत. भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रेत त्यांनी नियोजन व सक्रिय सहभाग घेतला. MPSC Pattern Change 2025 विरोधातील उपोषण, अग्निवीर योजनेविरोधातील दिल्ली व पुण्यातील रेल रोको आंदोलन, खडकी (पुणे) येथील रेल रोको, प्रवाशांवरील अन्यायकारक भाडेवाढीविरोधातील लढा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केलेला संघर्ष, तसेच ट्रेड डीलविरोधातील पीएम कॉम्प्रमाईज आंदोलन—या सर्व आंदोलनांत त्यांनी अग्रभागी भूमिका निभावली आहे. दिल्ली, पुणे, नागपूर आणि मुंबई येथे झालेल्या असंख्य आंदोलनांतून त्यांनी युवकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवली आहे. विविध निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसच्या डोअर-टू-डोअर मोहिमेद्वारे विक्रमी जनसंपर्क साधत संघटना मजबूत करण्याचे कामही त्यांनी सातत्याने केले आहे.
याशिवाय, यंग इन्स्पिरेटर नेटवर्क (YIN) या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत युवकांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन सत्रे, संवाद उपक्रम आणि प्रेरणादायी कार्यक्रम राबवले आहेत. नव्या पिढीला सामाजिक व राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने त्यांचे हे कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते.
राजकीय कार्यासोबतच ते सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय आहेत.
ते महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ या ९९ वर्षांच्या ऐतिहासिक संस्थेत संचालक व खजिनदार म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षण, निवास व सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. Urban Development आणि Sustainable City Development या विषयांवरील त्यांचा अभ्यासही लक्षवेधी आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना प्रथमेश आबनावे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय इन्चार्ज मनीष शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब, महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी शांभवी शुक्ला व नवज्योत संधू तसेच प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
ते पुढे म्हणाले की, “धर्मनिरपेक्षतेचा विचार, महात्मा गांधींची शिकवण, सातत्य, संघर्ष आणि निष्ठा या मूल्यांवर उभं राहून काम करण्याचा माझा निर्धार आहे.
देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मांडलेले तरुणांचे प्रश्न आणि त्यासाठीची लढाई अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मा. शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना मिळालेली संधी हीच माझी प्रेरणा आहे.”
आबनावे यांनी आपल्या यशामागे ज्येष्ठ नेते मा. मोहन जोशी (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांचे मार्गदर्शन तसेच कुटुंबियांची साथ अधोरेखित केली. विशेष म्हणजे, त्यांच्या वडिलांच्या ६८ व्या जयंतीच्या दिवशीच ही निवड झाल्याने हा क्षण अधिक भावनिक ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
“आजची जबाबदारी ही केवळ पद नसून युवकांच्या विश्वासाची आहे. त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी आणि काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मी अखंड प्रयत्न करेन,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

