LATEST ARTICLES
कलम १५५ गैरवापरप्रकरणी निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; रोहन सुरवसे पाटील यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी
Newsworldmarathi Pune: महसूल विभागातील कलम १५५ च्या कथित गैरवापरप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच संबंधित अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह इतर सक्षम यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
निवेदनात सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे की, पावसाळी अधिवेशनात महसूल मंत्री बावनकुळे यांनी कलम १५५ चा गैरवापर केल्याप्रकरणी पुण्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये न्याय मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
कलम १५५ चा वापर केवळ शुद्धलेखन किंवा लिपिकीय स्वरूपातील चुका दुरुस्त करण्यापुरता मर्यादित असताना त्याचा गैरवापर करून जमिनींच्या मालकी हक्कांमध्ये फेरफार करण्यात आल्याचे गंभीर आरोप आहेत. सातबारा उताऱ्यातील नावे कमी करणे, मालकी हक्कांमध्ये बदल करणे तसेच काही प्रकरणांत पुरावे नष्ट करण्यासाठी संचिका गायब करण्यात आल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
सुरवसे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी नसून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. अशा कठोर कारवाईमुळे भविष्यात कोणताही अधिकारी अधिकारांचा गैरवापर करण्याचे धाडस करणार नाही आणि महसूल विभागात पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.
याशिवाय, संबंधित अधिकाऱ्यांनी कथितरित्या भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळविल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर सक्षम यंत्रणांकडून सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे.
वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची !
Newsworldmarathi Pune: आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘चरणसेवा’ उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे, अशी माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असून सेवा करीत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री पुणे शहरातील उपक्रमाला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचे सांगत अशा सेवाकार्यात सहभागी होणे हे मोठे भाग्य असल्याची भावना श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.
वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी सुमारे ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
याशिवाय, पालखी मार्गावर ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती, स्वच्छतेचे महत्त्व, संसर्गजन्य व पावसाळ्यातील आजारांपासून बचाव, निरोगी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक मार्गदर्शन वारकरी व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. निवडक ठिकाणी योगसत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.
श्री. रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित गतवर्षी ‘चरणसेवा’ उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वर्षीही ११ जिल्ह्यांतील सुमारे ४०० सेवा केंद्रांवर १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक कार्यरत असून, ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेल, रुग्णवाहिका सेवा आणि ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेवर आधारित ‘चरणसेवा’ उपक्रमातून वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय सेवेची जोड देण्यात आली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि पालखी मार्गावरील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
0000
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘शॉप्शन’ला स्टार्टअप लीडरशिप पुरस्कार
Newsworldmarathi Navi Delhi: देशातील आघाडीची कृषितंत्रज्ञान कंपनी शॉप्शन प्रा. लि.ला अॅग्रिकल्चर टुडे कॉन्क्लेव्ह २०२६मध्ये प्रतिष्ठेचा ‘स्टार्टअप लीडरशिप अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शरद आर. काळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यास राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही, गुजरातचे कृषिमंत्री राघवजी पटेल तसेच कृषी क्षेत्रातील धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
भारतीय शेतीमध्ये तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांद्वारे परिवर्तन घडवून आणण्यासाठी शॉप्शनने केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. कंपनीने शेतकरी, विक्रेते आणि कृषी उपकरण उत्पादक यांना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणत शेतीसाठी आवश्यक उत्पादने आणि सेवा अधिक सुलभ केल्या आहेत. तसेच सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, आयओटी आणि डिजिटल कृषी उपायांवर कंपनी विशेष भर देत आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर शरद आर. काळे म्हणाले, “हा सन्मान आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा, विक्रेत्याचा आणि आमच्या संपूर्ण टीमचा आहे. ग्रामीण भारतातील शेती अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानस्नेही करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू.”
शॉप्शन सध्या देशातील २५ राज्यांमध्ये कार्यरत असून ५५ हजारांहून अधिक विक्रेत्यांचे जाळे कंपनीशी जोडलेले आहे. कंपनीच्या ‘जीबीआरयू’ या ब्रँडअंतर्गत सिंचन, पंप, पाइप, हार्वेस्टर, स्प्रे पंप, रोटाव्हेटर, अर्थ ऑगर आदी ३५० हून अधिक कृषी उत्पादने उपलब्ध आहेत. डिजिटल व्यवहार आणि अल्पावधीत कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यामुळे कंपनीने कृषी व्यवसायात नवे मॉडेल उभे केले आहे.
नवीन फ्रँचायझी टीमसह पुनित बालन ग्रुपचा इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या तिसऱ्या हंगामात सहभाग
Newsworldmarathi Pune: इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ही भारतातील प्रमुख सुपरक्रॉस रेसिंग लीग, आपल्या तिसऱ्या हंगामासाठी पुनित बालन ग्रुपचे (PBG) नवीन फ्रँचायझी म्हणून अभिमानाने स्वागत करत आहे. पीबीजी रेसिंग या नवीन फ्रँचायझीच्या माध्यमातून पुनित बालन ग्रुपने भारतीय मोटरस्पोर्ट्सच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. तसेच, देशातील उदयोन्मुख क्रीडा परिसंस्थांचे एक प्रमुख केंद्र म्हणून पुण्याचे वाढते महत्त्व यातून अधिक अधोरेखित होत आहे.
प्रसिद्ध उद्योजक, चित्रपट निर्माते आणि क्रीडा क्षेत्राचे पुरस्कर्ते पुनित बालन यांच्या नेतृत्वाखालील ही नवीन फ्रँचायझी, सुपरक्रॉस
रेसिंगमध्ये क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी, युवा विकास आणि मोठ्या प्रमाणावरील लीग सहभाग यांचा वारसा घेऊन येते. क्रिकेट, बुद्धिबळ, टेनिस, हँडबॉल, टेबल टेनिस, खो-खो, बॅडमिंटन आणि आर्म रेसलिंग यासारख्या खेळांमध्ये यशस्वी गुंतवणूक आणि मालकी हक्क असलेल्या पुनित बालन ग्रुपचे आयएसआरएल मधील हे आगमन, भारतातील क्रीडा क्षेत्रातील पुढील पिढीसाठी संधी निर्माण करण्याच्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या ध्येयातील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
आयएसआरएलमध्ये पीबीजी रेसिंगचा समावेश झाल्यामुळे महाराष्ट्रातील लीगचे स्थान अधिक भक्कम होईल आणि त्याचबरोबर भारतीय सुपरक्रॉसमध्ये क्रीडाप्रेर्मीचा एक नवीन वर्ग आणि चाहत्यांसाठी सहभागाच्या (फॅन एंगेजमेंट) नवनवीन संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.
‘तरुणांच्या प्रतिभेला प्रेरणा देण्यासाठी आणि मजबूत समुदाय उभारण्यासाठी खेळ हे नेहमीच एक प्रभावी माध्यम राहिले आहे; आणि याच विचारसरणीने गेल्या काही वर्षात आम्ही क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक गुंतवणुकीला दिशा दिली आहे. इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) हे भारतातील रेसिंग क्षेत्रातील एका रोमांचक नवीन पर्वाचे प्रतिनिधित्व करते. महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे शहर, येथील
उत्साही चाहते आणि रेसिंगभोवती विकसित होत असलेल्या संस्कृतीमुळे देशातील सक्रिय मोटरस्पोर्ट हबपैकी एक म्हणून वेगाने उदयास आले आहे. सीझन 3 साठी ISRL मध्ये सहभागी होताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आम्ही अशा एका फ्रँचायझीची उभारणी करण्यास उत्सुक आहोत जी भारतीय रेसिंगचा ध्यास, उत्कृष्ट कामगिरी आणि त्यातील उत्साह यांचे प्रतिबिंब असेल; तसेच, या माध्यमातून देशातील मोटरस्पोर्टच्या दीर्घकालीन विकासालाही आम्ही हातभार लावू, असे पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन यांनी म्हटले आहे.
आयएसआरएलचे सह-संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, “तिसऱ्या हंगामासाठी पुनित बालन ग्रुपचे ISRL परिवारात स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. भारतीय खेळ तसेच विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंच्या विकासासाठी पुनित बालन यांची असलेली वचनबद्धता, जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था उभारण्याबाबतच्या त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देते. सुपरक्रॉसला भारताच्या मुख्य प्रवाहातील क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्नांवरती, ISRL मध्ये त्यांचा झालेला प्रवेश ही या लीगची प्रगती आणि क्षमता यावरील आणखी एक महत्त्वपूर्ण मोहोर आहे. ही नवीन फ्रँचायझी चाहते तसेच रेसिंग क्षेत्रातील मंडळींमध्ये नवा उत्साह निर्माण करेल. या संयुक्त प्रवासासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
क्रीडा, मनोरंजन, युवा संस्कृती आणि व्यवसाय यांचा संगम साधत इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) सातत्याने वेगाने प्रगती करत आहे. ISRL मध्ये पुनित बालन ग्रुपचा प्रवेश हा भारतातील मोटरस्पोर्ट्स क्षेत्रातील वाढती व्यावसायिक गती आणि या लीगच्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर आघाडीचे गुंतवणूकदार तसेच क्रीडा क्षेत्रातील उद्योजकांचा वाढता विश्वास दर्शवतो.
हा तिसरा सीझन पूर्वीपेक्षा अधिक भव्य, वेगवान आणि प्रेक्षकांसाठी अधिक रोमांचक तसेच अविस्मरणीय अनुभव देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे; त्यादृष्टीने आयएसआरएल अशी एक फ्रँचायझी यंत्रणा विकसित करत आहे, जिथे उच्च-स्तरीय रेसिंगचा थरार, मनोरंजन आणि चाहत्यांचा अनुभव यांचा सुरेख मेळ घातला जातो.
या उत्साहात सहभागी व्हा आणि सोशल मीडियावर #Flirt With Dirt याच्यासह ISRL ला फॉलो करा
क्रीडा, मनोरंजन, युवा संस्कृती आणि व्यवसाय यांचा संगम साधत इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) सातत्याने वेगाने प्रगती करत आहे. ISRL मध्ये पुनित बालन ग्रुपचा प्रवेश हा भारतातील मोटरस्पोर्ट्स क्षेत्रातील वाढती व्यावसायिक गती आणि या लीगच्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर आघाडीचे गुंतवणूकदार तसेच क्रीडा क्षेत्रातील उद्योजकांचा वाढता विश्वास दर्शवतो.
हा तिसरा सीझन पूर्वीपेक्षा अधिक भव्य, वेगवान आणि प्रेक्षकांसाठी अधिक रोमांचक तसेच अविस्मरणीय अनुभव देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे; त्यादृष्टीने आयएसआरएल अशी एक फ्रँचायझी यंत्रणा विकसित करत आहे, जिथे उच्च-स्तरीय रेसिंगचा थरार, मनोरंजन आणि चाहत्यांचा अनुभव यांचा सुरेख मेळ घातला जातो.
या उत्साहात सहभागी व्हा आणि सोशल मीडियावर #Flirt With Dirt याच्यासह ISRL ला फॉलो करा भक्तीच्या वाटेवर काळाचा घाला! जेजुरीत ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Newsworldmarathi Pune : पंढरपूर वारीदरम्यान जेजुरी पालखी मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून, ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जेजुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या महिला वारकरी मार्गक्रमण करत असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या भीषण धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला जखमी झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेनंतर पालखी मार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, प्रशासनाकडून पुढील तपासानंतर अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे.
दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टतर्फे वारकऱ्यांची आरोग्यसेवा
Newsworldmarathi pune: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसमवेत आलेल्या वारकरी भाविकांच्या सेवेसाठी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्यावतीने विशेष वैद्यकीय सेवा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी सेवा आणि औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. याशिवाय ट्रस्टच्यावतीने वारकरी भाविकांसाठी प्रसाद म्हणून १५ हजार गुडदाणीच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकरी भाविकांना पायी वारी करताना होणारा शारीरिक त्रास लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सांधेदुखी, स्नायूंचा त्रास आणि थकवा यासाठी फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. गरजू वारकऱ्यांना आवश्यक औषधांचेही मोफत वाटप करण्यात आले. या वैद्यकीय सेवा उपक्रमासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित होते. वारकऱ्यांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ट्रस्टतर्फे विशेष नियोजन करण्यात आले होते. या सेवाभावी उपक्रमाला वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टकडून दरवर्षी सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून भाविकांची सेवा केली जाते. यावर्षी ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष पुनीत बालन यांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्य सेवा उपक्रम “सेवा हीच भक्ती” या भावनेतून राबविण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे व वर्षा थोरवे, खजिनदार सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषाताई खेडेकर, तसेच विश्वस्त पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाडवे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी डॉ. प्रमोद ठोंबरे, डॉ. अपूर्वा क्षीरसागर, डॉ. श्रेयस बाफना व डॉ. दिग्विजय शितोळे या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाचे मोलाचे सहकार्य लाभले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आणि महाप्रसाद
Newsworldmarathi Pune : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करून पुण्यनगरीत विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांसाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वारकऱ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था, आरोग्य शिबिर, औषध वाटप तसेच चरण मसाज सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या सेवा उपक्रमाला वारकरी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून. महाप्रसाद सेवेचा तर जवळपास 8 ते 10 हजार वारकऱ्यांनी लाभ घेतला.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसमवेत लाखो भाविक पुणे शहरात मुक्कामी आहेत. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले जातात. यंदाच्या आषाढी वारीतही “सेवा हीच साधना” या भावनेतून वारकरी भाविकांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली. वारकऱ्यांचा लांब पल्ल्याचा प्रवास, पायी वारी आणि शारीरिक थकवा लक्षात घेऊन आरोग्य तपासणी व औषध वाटपाची सुविधा करण्यात आली होती.
या आरोग्य शिबिरामध्ये वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी चरण मसाज सेवाही आयोजित करण्यात आली होती.
या उपक्रमासाठी ट्रस्टचे विश्वस्त, उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. वारकरी भाविकांनी या सेवांचे कौतुक करत ट्रस्टच्या उपक्रमाचे स्वागत केले.
‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट
Newsworldmarathi Pune : पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पुनीत बालन ग्रुप’कडून जीवनावश्यक वस्तूंचे ९ हजार कीट देण्यात आले आहेत. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने वारीच्या बंदोबस्ताच्या कालावधीतील पोलीस बांधवाची गैरसोय टळणार आहे आणि परिणामी त्यांना दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना अधिक चांगली सेवा देता येणार आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संताच्या पालखी समवेत लाखो वारकरी पंढरपुरमध्ये दर्शनासाठी येत असतात. १५ ते १९ जुलै या कालावधीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही सातारा जिल्ह्यातून मार्गक्रम करत असते. लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या भागातून पालखीचे मार्गक्रमण होत असताना २७०० पुरुष पोलिस आणि ३०० महिला पोलिस बंदोबस्तासाठी असतात. त्यांच्यासाठी ३ हजार कीट उपलब्ध करुन देण्याची विनंती सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आली होती.
तसेच २५ जुलै रोजी पंढरपुरात भरणाऱ्या आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज या प्रमुख पालख्यांसह राज्यभरातील शेकडो पालख्या आणि दिंड्या पंढरपुरात दाखल होत असतात. या सोहळ्यात सहभागी होऊन विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वैयक्तिक पातळीवर येणाऱ्या भक्तांचीही मोठी संख्या असते. या सर्वांच्या बंदोबस्तासाठी पंढरपुरात ६ हजार ५०० पुरुष पोलिस तर २००० महिला पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
त्यांनाही अशाच प्रकारच्या साहित्याचे किट उपलब्ध करुन देण्याची विनंती पंढरपूर उपविभागीय कार्यालयाकडून युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार बालन यांनी तत्काळ हे कीट उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलिस दलासाठी ७ हजार तर सातारा ग्रामीण पोलिस दलासाठी २ हजार असे एकूण ९ हजार कीट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
किटमधील वस्तू
कोलगेट पाऊच, टुथब्रश, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज, डेटॉल साबण, शेंगदाणा चिक्की, कापडी मास्क, पाणी बॉटल आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड.
“यंदा पालखीच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने हजेरी लावली आहे. पण अशाही परिस्थिती पोलिस बांधव हे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची अत्यंत काटेकोरपणे सुरक्षा व्यवस्था बघण्याचं महत्त्वाचं कार्य करत असतात. ही एकप्रकारे सेवाच असून ही सेवा करत असताना त्यांचीही कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार दैनंदिन वस्तूंचे कीट देण्यात आले आहे. मागील वर्षीही पोलिस बांधवांची या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली होती. मागील वर्षीप्रमाणे यंदाही ही संधी मिळाली, याचं मनापासून समाधान आहे.”– पुनीत बालन, युवा उद्योजक
मोठी बातमी! पुण्यात इमारत कोसळली, 14 लोक अडकल्याची भीती; मोशी परिसरात खळबळ
Newsworldmarathi Pune: मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 14 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. पुण्याच्या वेगवेगळ्या भागातही पावसाने कहर केला आहे. अशातच आता पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 14 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
खडकवासला धरण शंभर टक्के भरले; पुणे महापालिकेकडून जलपूजन
Newsworldmarathi Pune: पुणे शहरासाठी दिलासादायक ठरलेली आनंदाची बातमी म्हणजे खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून, यानिमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पारंपरिक जलपूजन करून जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या जलपूजन सोहळ्यात पुणेकरांना वर्षभर मुबलक व नियमित पाणीपुरवठा व्हावा आणि शहरावर पाणीटंचाईचे संकट येऊ नये, अशी प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमाला पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार भीमराव तापकीर, स्थानिक नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटनेते सोपान उर्फ काका चव्हाण, श्री. सुभाष नाणेकर, नगरसेविका अनिता इंगळे, धनश्री कोल्हे, पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाणी ही निसर्गाची अमूल्य देणगी असल्याचे सांगण्यात आले. धरणे भरली असली तरी पाण्याचा वापर जपून आणि जबाबदारीने करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक नागरिकाने पाणी बचत आणि जलसंधारणाला प्राधान्य देत पाण्याचा अपव्यय टाळावा, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
पुणे शहर भविष्यातही जलसमृद्ध राहावे आणि नागरिकांना वर्षभर कोणत्याही अडचणीशिवाय पाणीपुरवठा व्हावा, हीच अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पुणेकरांमध्ये समाधानाचे वातावरण असून, जलपूजनाच्या माध्यमातून जलस्रोतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा यंदाही उत्साहात पार पडली.

