LATEST ARTICLES
दुभाजक दुरुस्ती करा; बेकायदेशीर तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : रोहन सुरवसे-पाटील
Newsworldmarathi Pune: पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज ते खंबाटकी घाट पायथा दरम्यान अनेक ठिकाणी महामार्गावरील दुभाजक बेकायदेशीररित्या तोडून अनधिकृत जोडरस्ते तयार करण्यात आल्याने अपघातांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित दुभाजकांची तातडीने दुरुस्ती करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम तसेच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कात्रज ते खंबाटकी घाट पायथा या दरम्यान काही हॉटेल तसेच व्यावसायिक आस्थापनांकडून महामार्गाच्या दुभाजकांना तोडून थेट प्रवेशमार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे सेवा रस्त्यावरून येणारी वाहने अचानक महामार्गावर प्रवेश करत असून, महामार्गावरील वेगवान वाहतुकीमुळे अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
त्यामुळे या मार्गावरील ज्या ठिकाणी दुभाजक तोडण्यात आले आहेत, त्या सर्व ठिकाणांची तातडीने पाहणी करून दुभाजकांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.
तसेच महामार्गावरील दुभाजक बेकायदेशीररित्या तोडून अनधिकृत जोडरस्ते तयार करणाऱ्या संबंधित व्यक्ती, हॉटेल चालक किंवा आस्थापनांविरुद्ध चौकशी करून संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
भविष्यात अशा प्रकारचे बेकायदेशीर प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठीही कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुरवसे-पाटील यांनी निवेदनातून केली आहे.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदिपसिह गिल्ल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता अंकित यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
काशेवाडीतील ड्रग्ज प्रकरणावरून अर्चना पाटील संतप्त; पोलीस आयुक्तांना दिली थेट माहिती
Newsworldmarathi Pune: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ च्या वार्षिक तपासणी बैठकीत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी काशेवाडी (प्रभाग क्र. २२) परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा आणि अवैध धंद्यांचा पाढा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांच्यासमोर वाचला.
काशेवाडीत राजरोसपणे सुरू असलेला ड्रग्जचा व्यापार आणि वेश्याव्यवसाय यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. (Pune News)
या बैठकीत बोलताना अर्चना पाटील यांनी निदर्शनास आणून दिले की, काशेवाडी परिसरात पानपट्टी आणि टपऱ्यांवरून अगदी उघडपणे ‘एमडी’ (MD) सारख्या अमली पदार्थांची विक्री होत आहे. यामुळे अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी गेली असून, ड्रग्ज खरेदी करण्यासाठी ती चोऱ्या करत आहेत. यासोबतच वस्तीमध्ये रात्रीच्या वेळी जुन्या आणि बेवारस गाड्यांच्या आडोशाने तसेच परिसरातील लाईट्स फोडून वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट राजरोसपणे चालवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव त्यांनी समोर आणले.
स्थानिक काशेवाडी पोलीस चौकीत नागरिकांच्या, विशेषतः महिलांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही आणि त्यांना हाकलून थेट खडक पोलीस ठाण्यात पाठवले जाते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. अवैध धंद्यांच्या ठिकाणांची यादी वारंवार देऊनही कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करत, त्यांनी पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना यादी सुपूर्द करून तातडीने कारवाईची मागणी केली. अर्चना पाटील यांच्या या रोखठोक खुलाशानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत, “जर असे प्रकार चालत असतील, तर आपण पुढे काय तोंड दाखवणार?” अशा शब्दांत उपस्थित अधिकाऱ्यांना खडसावले.
इंडो-जपान ‘शिवस्वराज्य वन इंडिया फेस्टिव्हल’ टोकियोत उत्साहात
टोकियो : इंडो-जपान ‘शिवस्वराज्य वन इंडिया फेस्टिव्हल’ (अखंड भारत महोत्सव) २०२६ रविवारी टोकियो येथील इंडिया इंटरनॅशनल स्कूल इन जपान येथे उत्साहात पार पडला. भारत आणि जपानमधील सांस्कृतिक नातेसंबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात भारतीय वंशाचे जपानमधील नागरिक, जपानी मान्यवर, कलाकार आणि विविध समुदायांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुमारे ५०० प्रेक्षक, १४० कलाकार आणि ५० पेक्षा अधिक स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.
ऑल-जपान असोसिएशन ऑफ इंडियन्स (AJAI), एडोगावा इंडिया कल्चर सेंटर (EICC) आणि अमरावती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA), जपान सरकार तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचेही सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात AJAI चे अध्यक्ष योगेंद्र पुराणिक यांच्या प्रस्ताविक भाषणाने झाली. ‘वन इंडिया’ या संकल्पनेतून जपानमधील विविध भारतीय समुदायांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. भारताचे माजी CBI न्यायाधीश मिलिंद गोसावी यांनी मुख्य भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा आणि सामाजिक सलोख्याच्या मूल्यांचा उल्लेख केला.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राची पारंपरिक दिंडी, पालखी मिरवणूक, भगवद्गीतेचे पठण यांसह विविध भारतीय प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे नृत्य, संगीत आणि नाट्यप्रकार सादर करण्यात आले. जपानी कलाकारांच्या ‘तायको’ ढोलवादनानेही प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमात भारत-जपान सांस्कृतिक देवाणघेवाणीवर दोन चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. त्यात बौद्ध आणि शिंतो परंपरेतील तज्ज्ञांनी दोन्ही देशांतील आध्यात्मिक नात्यांवर प्रकाश टाकला. तसेच इंडो-जपान संबंध दृढ करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मराठा साम्राज्याशी संबंधित ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन आणि भारतीय खाद्यपदार्थांच्या आस्वादाने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली. भजन व संगीत मैफलीने महोत्सवाचा समारोप झाला. भारत आणि जपानमधील सांस्कृतिक मैत्री अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना सहभागींकडून व्यक्त करण्यात आली.
व्यापाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाचे अपहरण
पुणे : शहरातील नामांकित व्यापाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. ही घटना उघड होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. अपहरणकर्त्यांनी कुटुंबीयांकडून खंडणीची मागणी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास Jejuri Police Station यांच्या पथकाकडे देण्यात आला. पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयितांचा ठावठिकाणा शोधून काढत सासवड परिसरात सापळा रचला. सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपींना अटक करण्यात आली आणि युवकाची सुखरूप सुटका करण्यात यश आले. या कारवाईदरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपहरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. अटकेतील आरोपींची कसून चौकशी सुरू असून गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. या धाडसी कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर
पुणे : शहरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रशासकीय बैठकीत १६ विकासप्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये पीएमआरडीएमार्फत उभारण्यात येत असलेल्या Pune Metropolitan Region Development Authority च्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम ९४ टक्के पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. एप्रिलअखेर २३ पैकी १३ स्थानके पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यानंतर चाचण्या घेऊन लवकरच मार्ग सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रीय नदीसंवर्धन प्रकल्पांतर्गत नदीसुधार आणि पुनर्जीवन कामांना वेग देण्याच्या सूचना देण्यात आल्या. समान पाणीपुरवठा योजनेतील उर्वरित साठवणूक टाक्या, जलवाहिन्या व मीटर बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविणे आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यावरही भर देण्यात आला.
चांदणी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, गदिमा स्मारक व लहुजी वस्ताद स्मारक आदी कामांना गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. वनाज-चांदणी चौक व रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गांसह विमानतळ मेट्रो कनेक्टिव्हिटीसाठी सहा पर्यायांवर चर्चा होऊन व्यवहार्य मार्ग निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. खडकवासला-हिंजवडी मेट्रोसाठी डीपीआर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून विमानतळ परिसरातील रस्ते विस्तार आणि सौंदर्यीकरणालाही लवकरच सुरुवात होणार आहे.
मार्टिन समूहाकडून आयएससीई साठी ४ कोटी रुपयांची मदत
Newaworldmarathi Pune : मार्टिन समूह यांनी इंडो-स्विस उत्कृष्टता केंद्रासाठी(आयएससीई) साठी ४ कोटी रुपयांची मदत जाहीर करत त्यातील पहिला १ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. कोरेगाव भीमा (पुणे) येथील आयएससीईच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या ३०० आसनी बहुउद्देशीय सभागृहाच्या बांधकामासाठी ही रक्कम देण्यात आली आहे. २६ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात मार्टिन समूहाचे व्यवस्थापकीय संचालक जोसे चार्ल्स मार्टिन यांनी धनादेश प्रदान केला.
आयएससीई संस्थेचा उद्देश वंचित घटकांतील युवकांना उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविणे हा आहे. येथे राष्ट्रीय कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण परिषदेच्या मान्यतेचे अभियांत्रिकी पदविका नेट्टूर तांत्रिक प्रशिक्षण प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने राबविले जातात. तसेच कृषी उद्योजकता विकास उपक्रम सिंजेंटा फाउंडेशन इंडिया (सिंजेंटा प्रतिष्ठान, भारत यांच्या भागीदारीत चालविले जातात. याशिवाय नागरी विमानन महासंचालनालय मान्यताप्राप्त मानवरहित विमान चालक प्रशिक्षण तसेच सागरी क्षेत्राशी संबंधित विशेष प्रशिक्षण कार्यक्रमही राबविले जातात.
यावेळी मुकेश मल्होत्रा, अध्यक्ष, वीकफिल्ड समूह व आयएससीईचे प्रमुख कार्यकारी, यांनी उद्योग क्षेत्रातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. “आजच्या तरुणांना उद्याच्या कौशल्यांनी सक्षम करण्यासाठी उद्योग-शिक्षण भागीदारी अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले.
या उपक्रमामुळे पुणे जिल्ह्यातील कौशल्यविकासाला मोठी चालना मिळणार असून, इतर उद्योगसमूहांनीही या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयएससीईतर्फे करण्यात आले.
संस्कृत एकांकिका स्पर्धेत रमणबाग प्रशाला प्रथम
Newaworldmarathi Pune: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेज आयोजित डॉ.रा.ना.दांडेकर चषक संस्कृत एकांकिका स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेला सांघिक प्रथम क्रमांक प्राप्त झाला. संस्कृत एकांकिकेचे नाव धैर्यं हि महतां धनम् असे होते.
यामध्ये प्रशालेतील एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या संस्कृत एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन संस्कृत विभाग प्रमुख वर्षा गानू यांनी केले होते.अमोघ कुलकर्णी या सहावीतील विद्यार्थ्याला अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळाले. यामध्ये रुद्र बाभुळगांवकर ,अरुष बुद्धिहाळ अवनीश जवळेकर, रुद्र लंबाडे सोहम बागवे, अर्णव देशपांडे, हेरंब कुंभार या विद्यार्थ्यांनी तसेच सहावीतील दहा विद्यार्थ्यांनी उत्तम अभिनय केला.
प्रशालेतील नाट्य छंद विभागाचे प्रमुख रवींद्र सातपुते यांनी प्रकाशयोजना व नाटकातील सर्व विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. चित्रकला शिक्षिका अंजली मालुसरे यांनी नैपथ्य व रंगभूषेसाठी सहकार्य केले. संस्कृत शिक्षिका प्रज्ञा करडखेडकर, शितल चौधरी यांचे देखील सहकार्य लाभले.माजी विद्यार्थी ईशान जबडे, आयुष दुसाने, रितेश भरडे या विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. नववीतील विद्यार्थी वरद धारणे, कृष्णा कुलकर्णी यांनी नाटकाचे संगीत संयोजन केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा माने, उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर यांनी या नाट्यसंघाला विशेष प्रोत्साहन दिले.
अग्निशमन जवानांचे रखडलेले प्रशिक्षण २०२७ आधी पूर्ण व्हावे: नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांची मागणी
Newaworldmarathi Pune : शहराच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असलेल्या अग्निशमन दलातील सुमारे ९० कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण रखडले असल्याची बाब समोर आली आहे. वेळेत प्रशिक्षण पूर्ण न झाल्यास निश्चित वयोमर्यादा उलटून अनेक जवान भविष्यातील पदोन्नतीपासून कायमचे वंचित राहण्याची चिंता संबंधित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेऊन प्रशिक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली.
अग्निशमन विभागातील अनेक कर्मचारी हे ४३ ते ५३ वयोगटातील आहेत. भविष्यातील पदोन्नतीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयामार्फत विविध प्रशिक्षण कोर्सेस पूर्ण करणे बंधनकारक आहे. संबंधित प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली असून, २०२७ पर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वयाची अट ५४ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत पुरेशा संख्येने कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले नसल्याने सुमारे ९० हून अधिक जवानांचे प्रशिक्षण अद्याप प्रलंबित आहे. यापैकी अनेक कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा संपत आलेली असून ते प्रशिक्षण व पदोन्नतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यास प्रशिक्षित मनुष्यबळही अग्निशमन दलास उपलब्ध होऊ शकणार आहे.
‘अग्निशमन दलाचे जवान आग, पूरस्थिती तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण व मालमत्ता वाचविण्याचे काम करतात. केवळ तांत्रिक कारणांमुळे भविष्यात त्यांच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होणे अन्यायकारक असल्याचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नमूद केले. तसेच, महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये भविष्यात नवीन अग्निशमन केंद्रे उभारली जाणार असून, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. उपलब्ध अनुभवी मनुष्यबळाला भविष्यात पदोन्नतीच्या संधींत सामावून घेता यावे, यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करून, वयोमर्यादा संपत आलेल्या जवानांसाठी नागपूर येथील महाविद्यालयाची आवश्यक मान्यता घेऊन संबंधित प्रशिक्षण पुण्यातच आयोजित करण्यात यावे, तसेच २०२७ पूर्वी सर्व प्रलंबित प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्याकडे केली.
यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले असल्याचे राघवेंद्र बाप्पु मानकर
यांनी सांगितले. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे व अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेत भाजपचा बिनविरोध पॅटर्न, महापौर, स्थायीसह सर्व समित्यांचे अध्यक्ष बिनविरोध, बिडकरांची रणनीती कामी
Newsworldmarathi Pune : पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुणेकरांनी स्पष्ट बहुमत देत भारतीय जनता पार्टीला एकहाती सत्ता दिली. यानंतर झालेली महापालिकेतील सत्तास्थापनेची प्रक्रिया यंदा वेगळ्याच पद्धतीने पार पडली. तब्बल ११९ नगरसेवक निवडून आल्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समितीसह सर्व विषय समित्यांचे अध्यक्ष बिनविरोध निवडले जाणे, हा यंदाच्या कार्यकाळातील विशेष पैलू ठरला आहे.
महापौरपदी मंजुषा नागपुरे व उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पूर्वीच्या कार्यकाळात या पदांसाठी विरोधकांकडून उमेदवार उभे राहत असत; मात्र यंदा भाजपकडून सभागृह नेते गणेश बिडकर यांनी समन्वयाची रणनीती अवलंबत विरोधकांशी संवाद साधला. राष्ट्रवादीसह काँग्रेसनेही महापौर व उपमहापौर पदासाठी दिलेल्या उमेदवारांची माघार घेतली.
भाजपकडून सभागृह नेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक गणेश बिडकर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांतील नेत्यांशी सातत्याने संपर्क ठेवत निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडली. महानगरपालिकेमध्ये यंदा सर्व महत्त्वाच्या पदांची बिनविरोध निवड घडवून आणण्यात बिडकर यांच्या राजकीय रणनीतीची निर्णायक भूमिका राहिल्याचे स्पष्ट दिसून आले.
भाजपकडे मोठे बहुमत असतानाही विरोधकांकडून आपले उमेदवार देत प्रत्यक्ष निवडणूक घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र बिडकर यांनी केवळ संख्याबळावर विसंबून न राहता संवादाचा मार्ग स्वीकारला. विविध पक्षांतील वरिष्ठ नेत्यांशी वैयक्तिक संपर्क, गटनेत्यांसोबत संवाद आणि समित्यांवरील प्रतिनिधित्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून त्यांनी वातावरण प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत जाण्यापासून रोखले.
आज स्थायी समिती अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांचीही बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास टिंगरे यांचा अर्ज वेळेत न भरल्याने अवैध ठरला आणि निवडणूक एकतर्फी झाली. याशिवाय विधी समिती अध्यक्षपदी स्वरदा गौरव बापट, शहर सुधारणा समिती अध्यक्षपदी स्मिता वस्ते, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी अल्पना गणेश वरपे, शिक्षण समिती अध्यक्षपदी अरुण राजवाडे, नाव समिती अध्यक्षपदी पल्लवी जावळे आणि क्रीडा समिती अध्यक्षपदी नारायण गलांडे यांची नियुक्ती करण्यात आली.
भाजपाच्या स्पष्ट बहुमतासोबतच संवाद आणि समन्वयावर आधारित व्यूहरचनेमुळे सर्व महत्त्वाच्या पदांची बिनविरोध निवड शक्य झाली. या प्रक्रियेत सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या राजकीय कौशल्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
द बेसिल किड्स अकॅडेमीचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात
पुणे : द बेसिल किड्स अकॅडेमीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला. विद्यार्थ्यांसह पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार दिगंबर दराडे आणि सी.ए. श्रीपाद वाईकर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना लहानपणापासून आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून देत बचत, नियोजन आणि जबाबदार सवयींचे धडे दिले. आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि कठीण प्रसंगी खंबीर राहण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. संचालिका प्रीती साळुंके आणि अस्मिता पवार यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.

