LATEST ARTICLES

भारताच्या तांदळाच्या निर्यातीमध्ये 5% टक्के वाढ

Newsworldmarathi Pune: बिगर बासमती तांदळाच्या मागणीमुळे जागतिक बाजारपेठेत भारताचे वर्चस्व कायम,यावर्षी म्हणजे जानेवारी 2026 ते जून 2026 या सहा महिन्यांमध्ये तांदळाच्या निर्यातीमध्ये भारतातून 5% ची वाढ झाली आहे.गेल्या वर्षी आपण भारतातून 11.68 दशलक्ष टन निर्यात झाली होती आणि यावर्षी तांदळाची निर्यात 12.27 दशलक्ष टन झाली आहे.भौगोलिक,राजकीय तणाव,अमेरिका इराण युद्ध असताना सुद्धा भारताने निर्यातीमध्ये आपली परंपरा कायम ठेवली आहे.5% टक्केची चांगली अशी वाढ दर्शवली आहे. त्यामध्ये मूळ कारण अशी आहेत की आपल्याला तांदळामध्ये निर्यातीमध्ये स्पर्धेमध्ये आपल्याबरोबर जे कोणी देश आहेत त्यामध्ये मुख्यतः थायलंड,व्हिएतनाम आणि पाकिस्तान आहेत या तिन्ही देशांनी जेवढी निर्यात केली आहे तेवढी निर्यात भारताकडून झाली आहे.साधारणत जगातील जी निर्यात होते त्यातली 40% निर्यात हा फक्त भारत एकमेव देश करतो.ही नोंदणीय गोष्ट आहे याची दोन-तीन कारणे आहेत की गेल्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तांदळाचा चांगला उत्पादन आलं.देशातल्या मागणी पेक्षाही अधिक उत्पादन आल्यामुळे आपण निर्यात करू शकलो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थायलंड,व्हिएतनाम आणि पाकिस्तान पेक्षाही आपल्या तांदळाचे दर जागतिक स्तरावर कमी आहेत. त्यामुळे आपल्याकडून जानेवारी 2026 ते जून 2026 मध्ये खूप चांगली अशी निर्यात झाली आहे या निर्यातीमध्ये साधारणतः आपल्याकडून बासमती तांदळाची निर्यात यावेळी 5% टक्क्यांनी गेल्या वर्षी पेक्षा कमी झाली आहे.आपल्याकडे या सहा महिन्यांमध्ये बासमतीची निर्यात ही 3.7 दशलक्ष टन झाली आहे याचे एकच कारण आहे की युद्ध चालू होते आणि आपल्याकडे बासमती जो आहे हा सौदी अरब,इराण अशा बऱ्याच देशांमध्ये जातो तर त्या देशांमध्ये युद्ध असल्यामुळे बासमतीची मागणी कमी होती आणि त्यामुळे बासमतीची निर्यात कमी झाली.परंतु असा असतानाही सुद्धा नॉन बासमतीने निर्यातीमध्ये खूप मोठी वाढ केली आहे.नॉन बासमतीची निर्यात या वेळेला साधारण 9% टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ही जी वाढ झाली आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडून नॉन बासमती तांदूळ बांगलादेश, आफ्रिका,कॅमेरॉन,श्रीलंका अशा देशांमध्ये निर्यात झाला आहे. एकंदरीत सहा महिन्याची जी निर्यात आहे जी 5% टक्क्यांनी वाढ झाली आहे ती खूप चांगली गोष्ट आहे.पुढील काळात ही निर्यात टिकून राहिला पाहिजे किंवा वाढायला पाहिजे,कारण की ही निर्यात झाली तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अब्जो रुपयात परकीय चलन मिळेल. जुलै महिन्या पासून निर्यातीमध्ये बराच मोठ्या फरक पडला आहे.जुलै 2026 पासून काही निर्यातीमध्ये जे काही अडचणी आल्या आहेत त्यामध्ये मुख्यतःमालवाहतुकीचे दर खूप वाढलेले आहेत आणि जागतिक पातळीवर त्याची आपल्याशी खूप मोठी स्पर्धा होत आहे.आपल्या लॉजिस्टिक मध्ये ज्या अडचणी आहेत जे निर्यातदार आहेत त्यांना खूप मोठा दरवाढीचा सामना करावा लागत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्गो कंटेनर उपलब्ध होत नाहीयेत.या दोन गोष्टीची खूप मोठी अडचण आहे,त्यामुळे कार्गो नसल्यामुळे त्यांनी दर वाढवले आहेत. तांदूळ वाहतुकीच्या दरामध्ये खूप वाढ झाली,साधारणता काही महिन्या पूर्वी एक शिपमेंट पाठवण्यासाठी 1500 ते 2000 डॉलर इतका खर्च येत होता.तो आता 7000 ते 7500 डॉलर इतका येत आहे आणि तो परदेशी व्यापाऱ्यांना परवडत नसल्यामुळे ते ऑर्डर देत नाहीत. तांदळाच्या निर्यातीचा जो खूप मोठा खर्च आहे,त्यामुळे निर्यातदर खूप मोठ्या संकटात सापडला आहे आणि पुढील काही महिने अशी परिस्थिती राहिली तर निर्यातीच लक्ष्य गाठणे खूप अवघड होईल.या परिस्थितीमध्ये सरकारला अशी विनंती आहे की, आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकायचा असेल तर निर्यात चालू ठेवायचे असेल आणि देशातील तांदळाचे जे अतिरिक्त उत्पादन आहे ते वाया न जाता ते परदेशात निर्यात व्हायला पाहिजे.त्यासाठी जे आता निर्यातीदाराला जे मुख्य अडचण आहेत की वाहतुकीसाठी कार्गो मिळत नाही किंवा उपलब्ध नाहीत, उपलब्ध आहेत तर त्याचे दर तिप्पट झालेले आहेत.त्याच्यावर सरकारने त्वरित निर्णय घ्यायला पाहिजे.निर्यातदाराला कार्गो उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. यासाठी शासनाने खूप गांभीर्याने त्याच्यावर काम करायला पाहिजे नाहीतर निर्यातीचा खूप मोठा विपरीत परिणाम होईल आणि देशाला जे परकीय चलन मिळते त्याच्यावर खूप मोठा फरक पडेल आणि आणि बराच रोजगार याच्यावर टिकून आहे.हा रोजगार पण कमी होऊ शकतो.अशा परिस्थितीमध्ये पुढील काळात निर्यात वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी,थायलंड पाकिस्तान आणि व्हिएतनाम सोबत स्पर्धा करायचे असेल तर नॉन बासमती आणि बासमती कार्गोचे दर त्वरित कमी करायला पाहिजे आणि कार्गो उपलब्ध करून द्यायला पाहिजेत,अशी माहिती जयराज ग्रुपचे (निर्यातदार) धवल शाह यांनी दिली.

श्रीलंकेतील ‘जेपीएल’साठी ‘पुणे पेशवाज’ संघाची घोषणा; जीतो अपेक्सतर्फे २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान ‘जेपीएल’चा पहिला हंगाम

0
Newsworldmarathi Pune : श्रीलंकेत होणाऱ्या ‘जीतो प्रीमियर लीग’ (JPL) क्रिकेट स्पर्धेसाठी पुण्याचा अधिकृत संघ असलेल्या पुणे पेशवाज संघाचे अनावरण द कोरिंथियन्स रिसोर्ट क्लब येथे भव्य सोहळ्यात आणि मोठ्या उत्साहात झाले. जीतो अपेक्सच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून जेपीएल स्पर्धेचा पहिला हंगाम २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित केला आहे. या स्पर्धेत पुणे पेशवाज संघ पुण्याचे प्रतिनिधीत्व करेल आणि क्रिकेटच्या या महत्त्वपूर्ण स्पर्धेत आपली दमदार छाप पाडण्याचा प्रयत्न करेल. पुणे पेशवाई संघाच्या अनावरण सोहळ्यास जीतो अपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी आणि ‘जीतो स्पोर्ट्स’चे अध्यक्ष विकी ओसवाल यांच्यासह जीतो एपेक्स आरओएम आणि जीतो पुणे चॅप्टर’मधील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने आणि प्रोत्साहनपर शब्दांनी संघाचे मनोबल उंचावले तसेच या कार्यक्रमाची शोभा वाढवली. ‘पुणे पेशवाज’ संघाची मालकी विजय भंडारी, राजेशकुमार सांखला, विशाल चोरडिया, राजेंद्र जैन, डॉ. रमेश तेजावत, सुजित भटेवरा, दीपक जैन, अमोल कुचेरिया आणि निकुंज ओसवाल यांच्याकडे आहे. या सर्वांची या सोहळ्यास विशेष उपस्थिती होती. जीतो अपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांनी ‘जेपीएल’च्या व्यापक उद्दिष्टांवर प्रकाश टाकला; तसेच, या लीगला अभूतपूर्व उंचीवर नेऊन समाजातील क्रिकेटसाठी एक खऱ्या अर्थाने जागतिक व्यासपीठ निर्माण करण्याच्या ‘जीतो’च्या नियोजनाबद्दल त्यांनी माहिती दिली. विकी ओसवाल यांनी ‘जेपीएल’च्या कोलंबो येथे होणाऱ्या पहिल्या हंगामाबद्दल आणि लीगच्या पुढील वाटचालीच्या आराखड्याबद्दल सविस्तर माहिती दिली. एका विशेष परिसंवादा दरम्यान, मालकांनी ‘पुणे पेशवाज’बाबतची आपली दूरदृष्टी आणि जेपीएल विषयीच्या आपल्या आकांक्षा मांडल्या; तसेच केवळ एक यशस्वी क्रिकेट फ्रँचायझीच नव्हे, तर पुण्याचा अभिमान, जोश आणि उत्साह यांचे प्रतिनिधित्व करणारा संघ उभारण्याबाबतची आपली कटिबद्धताही त्यांनी व्यक्त केली. यावेळी पुणे पेशवाज संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफचे प्रेक्षकांच्या प्रचंड उत्साहात आणि टाळ्यांच्या गजरात आगमन झाले. त्यांचा सत्कार करून ओळख करून देण्यात आली. संघाचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत मुंढे असून कर्णधार रुषभ राठोड आणि उपकर्णधार यश नहार आहेत. या पथकात अनुपम संकलेचा, स्वप्नील गुगळे, निलय शिंगवी, नील गांधी, निखिल लुणावत, अनिकेत पोरवाल, दीपक डांगी, हर्ष संघवी, हर्ष ओसवाल, अमन दोशी, अनुज छाजेड, यश बांबोळी, सौरभ शिंगवी, यश दागा, ईशान ओसवाल , निखिल जैन, चिराग गदिया , श्रेयांक जैन, रौनक खंडेलवाल , रौनक पारेख, प्रचित भलगट , क्षितिज जैन , शुभम चव्हाण स्पोर्ट्स मॅन्युअल थेरपिस्ट आणि डॉ. श्रेयश बाफना फिजिओथेरपिस्ट म्हणून आहेत. ‘पुणे पेशवाज’च्या अधिकृत गीताचे यावेळी भव्य अनावरण करण्यात आले. या गीतामुळे संघाला स्वतःची एक विशिष्ट ओळख आणि प्रेरणादायी घोषणा मिळाली असून, आगामी प्रवासासाठी एक उत्तम सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम केवळ एका क्रिकेट संघाच्या अनावरणापुरता मर्यादित नव्हता, तर तो पुण्याच्या क्रीडा क्षेत्रातील एका नवीन प्रवासाची सुरुवात होती. संघाच्या मालकांचा उत्साह आणि प्रतिभावान खेळाडूंचा संघ, सक्षम नेतृत्व आणि पुणेकरांचा पाठिंबा यांच्या जोरावर ‘पेशवाज’ आता कोलंबोला जाऊन ‘जेपीएल’ च्या पहिल्या हंगामात सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. हा सोहळा अविस्मरणीय आणि यशस्वी करण्यासाठी प्रियंका परमार, जिनेंद्र लोढा, आर्या चोरडिया, शुभम भंडारी, शुभम राठोड आणि आयुष पालेशा यांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या १३५ व्या उत्सवाची सुरुवात; श्री गणेश सुवर्णधाम’ देखाव्याचे अनावरण अन् वासा पूजन

Newsworldmarathi Pune : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या यंदाच्या १३५ व्या गणेशोत्सवाची दिमाखदार सुरुवात ऑगस्ट क्रांती दिनाच्या मुहूर्तावर झाली. गणेशोत्सव मंडपाच्या वासा पूजनासह यंदाच्या देखाव्याचे अनावरणही यावेळी करण्यात आले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिर येथे रविवारी दुपारी झालेल्या कार्यक्रमात पोलिस उपायुक्त झोन-१ क्रुषिकेश रावले आणि अशोक इलेक्ट्रिकलचे अशोकभाई शहा व उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्या हस्ते उत्सव मंडपाचे विधीवत व पारंपारिक पद्धतीने वासा पूजन करण्यात आले. त्यानंतर यंदाच्या गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या देखाव्याचे अनावरण करण्यात आले. यंदा ट्रस्टकडून ‘श्री गणेश सुवर्णधाम’ हा आकर्षक देखावा उभारण्यात येणार आहे. पार्वतीनंदन शिवपुत्र श्री गणेशाची वास्तू जिथे ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ या भारतीय संस्कृतीतील विचारांचा आचार-विचार केला जातो, या संकल्पनेवर आधारित हा देखावा असणार आहे. आई-वडिलांप्रती कृतज्ञता, त्यांचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील मातृ-पितृ पूजनाची परंपरा या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात येणार आहे. दरवर्षी काल्पनिक विषयांवर आधारित देखावे सादर करणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून यंदाही गणेशभक्तांना वेगळा आणि संदेश देणारा देखावा पाहायला मिळणार आहे. १३५व्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वासा पुजन सोहळ्यासाठी व देखावा अनावर प्रसंगी अनेक मान्यवर व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ढोल- ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाने वातावरण उत्सवमय झाले होते.
“क्रांतिकारकांचा गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या सजावटीचे वासापूजन आणि देखावा अनावरण क्रांतीदिनी झाले. यावर्षी श्री गणेश सुवर्णधाम हा काल्पनिक देखावा उभारला जाणार आहे. यावर्षीचा उत्सव हा धार्मिक, पावित्र्य आणि परंपरा जोपासून साजरा केला जाणार आहे. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही डिजेमुक्त गणेशोत्सव आणि दहीहंडी आम्ही साजरी करणार आहोत.”
– पुनीत बालन, उत्सवप्रमुख व विश्वस्त
“श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या १३५ व्या गणेशोत्सव मंडपाच्या वासा पूजनाचा मान मला मिळाला याचा अत्यंत आनंद आहे. गतवर्षीही या मंडळाचा उत्सव मी पाहिला होता, कार्यकर्त्याचा उत्साह आणि विसर्जन मिरवणुकीतील शिस्त पाहिल्यानंतर पुण्याचा गणेशोत्सव आगळा वेगळा का आहे हे कळले. वासा पूजनाचा बहुमान दिल्याबद्दल ट्रस्टचा मनापासून आभारी आहे.”
– क्रुषिकेश रावले, पोलिस उपायुक्त झोन-१.

प्रलंबित फौजदारी प्रकरण; विशाल चुघेरा यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

0
Newsworldmarathi Pune : निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फौजदारी प्रकरणाबाबत दिशाभूल करणाऱ्या आणि एकतर्फी बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप करत विशाल चुघेरा यांचे वकील अॅड. अभय देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट (सब ज्युडिस) असून न्यायालयाचा अंतिम निर्णय येणे बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रसिद्धीपत्रकानुसार, तक्रारदाराने भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० सह अन्य आरोपांखाली गुन्हा दाखल केला असला, तरी विशाल चुघेरा यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून ते न्यायालयात कायदेशीररित्या त्यांचा बचाव करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी विशाल चुघेरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने एबीए क्रमांक ३६९/२०२४ मध्ये १२ मार्च २०२४ रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान ट्रायल कोर्टात मोठी रक्कम जमा करण्यात आली असली, तरी त्याचा अर्थ गुन्ह्याची कबुली किंवा दोष स्वीकारल्याचे होत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पुढे, न्यायालयात हजर राहण्याच्या तारखेची माहिती नसल्याने ट्रायल कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले होते. मात्र, संबंधित न्यायालयासमोर हजर राहून वस्तुस्थिती मांडल्यानंतर १ ऑगस्ट २०२६ रोजी हे वॉरंट रद्द करण्यात आले, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. केवळ एनबीडब्ल्यू जारी झाल्याचा उल्लेख करून अटकपूर्व जामीन, न्यायालयात रक्कम जमा करणे आणि नंतर वॉरंट रद्द झाल्याची बाब लपवून वृत्तांकन केल्यास ते दिशाभूल करणारे ठरेल, असा दावा करण्यात आला आहे. तसेच प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नसल्याने आरोपांना दोषसिद्धी म्हणून सादर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अॅड. अभय देशमुख यांनी सांगितले की, विशाल चुघेरा यांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून ते न्यायालयातच आपली बाजू मांडतील. खोटी, बदनामीकारक किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच वृत्त प्रकाशित करण्यापूर्वी न्यायालयीन नोंदी व आदेशांची पडताळणी करण्याचे आवाहन सर्व माध्यमांना करण्यात आले आहे.

महात्मा फुले मंडईतील गाळ्यांच्या भाडेवाढीचा पुनर्विचार करा: नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांची मागणी

Newsworldmarathi Pune: पुणे शहरातील ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील २२०० गाळेधारकांवर करण्यात आलेल्या भाडेवाढीचा पुनर्विचार करून, गाळेधारकांची आर्थिक परिस्थिती, व्यवसायाचे स्वरूप आणि मागील काही वर्षांत निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करून न्याय्य व परवडणारे भाडे निश्चित करण्यात यावे, अशी मागणी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक व विश्रामबागवाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी स्थायी समिती अध्यक्षांना लेखी निवेदन देत गाळेधारकांच्या वतीने ही मागणी केली. कोविड-१९ महामारी, दीर्घकाळाचे लॉकडाऊन, ग्राहकसंख्येत झालेली घट तसेच मंडई परिसरातील मेट्रोसह विविध कारणांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा येथील व्यवसायावर मोठा परिणाम झाला. या आर्थिक अडचणींमधून गाळेधारक अद्याप पूर्णपणे सावरलेले नसताना वाढीव भाड्याचा अतिरिक्त भार त्यांच्यावर पडत असल्याचे मानकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. यावेळी महात्मा फुले मंडई व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ कासूर्डे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर २२०० गाळेधारकांच्या भाडेवाढीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, कोणतेही भाडे निश्चित करण्यापूर्वी गाळेधारकांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी प्रमुख मागणी मानकर यांनी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याकडे केली आहे. तसेच कोरोना महामारी आणि विविध कारणांमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या गाळेधारकांच्या २०२१ ते २०२५ या ५ वर्षांतील थकीत भाड्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती सवलत द्यावी व थकीत भाडे हप्त्यांमध्ये भरण्याची सोय करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
“महात्मा फुले मंडईचे ऐतिहासिक आणि वैभवशाली स्वरूप जपणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांचे हित जपणेही आवश्यक आहे. मुंबई व दिल्ली येथील भाडेनिश्चितीच्या पद्धतीचा अभ्यास करण्यात यावा. गाळेधारकांवर एकतर्फी आर्थिक भार न टाकता त्यांना विश्वासात घेऊन, त्यांचे म्हणणे ऐकून न्याय्य निर्णय व्हावा, ही आमची भूमिका आहे.”
— राघवेंद्र (बाप्पू) मानकर नगरसेवक, प्रभाग क्र. २५-ब, शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई अध्यक्ष, विश्रामबाग वाडा प्रभाग समिती

तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय प्रवासाचा उलगडा होणार; ८ ऑगस्ट रोजी पुण्यात प्रकट मुलाखत

0
Newsworldmarathi Pune: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, प्रशासकीय कारकिर्दीतील धाडसी निर्णयांचा आणि जनहितासाठी केलेल्या कामांचा उलगडा करणारी विशेष प्रकट मुलाखत शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. “भविष्यवेध – संवाद भविष्याचा” या उपक्रमांतर्गत “अनस्टॉपेबल तुकाराम” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या मुलाखतीत तुकाराम मुंढे आपल्या बालपणापासून ते भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) केलेल्या उल्लेखनीय प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधणार आहेत. विविध पदांवर कार्यरत असताना घेतलेले कठोर निर्णय, आलेली आव्हाने, प्रशासनातील अनुभव, पारदर्शक कारभाराची भूमिका तसेच समाजहितासाठी केलेल्या उपक्रमांबाबत ते उपस्थितांशी संवाद साधतील. ही विशेष मुलाखत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप घेणार असून, त्यांच्या प्रश्नांमधून तुकाराम मुंढे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणार आहेत. पुणे लोकल कनेक्ट आणि माय जनसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून होणारी गर्दी लक्षात घेता, पूर्वनोंदणी करण्यासाठी. https://myjansevak.com/event/unstoppable-tukaram या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन आयोजक अमित रुके आणि विरेश आंधळकर यांनी केले आहे.

कोसळणाऱ्या पावसात, गुडघाभर चिखलात, महिला शेतकऱ्यांचा ‘फ्रेंडशिप डे’ जोरात!

Newsworldmarathi Pune: नव्या ‘लाइफस्टाईल’मध्ये मैत्री दिन धडाक्यात साजरा होत असतानाच, या आणि अशा उत्सवाची पुसटशीही कल्पना नसलेल्या आणि रोज केवळ १०-१२ तास डोंगरदऱ्यांत, रानावनात, ऐन पावसात भात लावणी करणाऱ्या, शेतीत राबराब राबणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी रविवारी आयुष्यातील पहिलावहिला मैत्री दिन अनुभवला! हा क्षण पाहून भारावलेल्या महिला शेतकऱ्यांनी बांधावर एकत्र येत खरोखरीच मैत्री दिन फुलविला.. या साऱ्याचे निमित्त ठरले, ते नवी मुंबईतील ‘आरबीजी फाऊंडेशन’ने ‘फ्रेंडशिप डे’चे औचित्य साधून हाती घेतलेल्या ‘चला बांधावर जाऊ, महिला शेतकऱ्यांना बळ देऊ’! या उपक्रमाचे! फाऊंडेशनच्या अध्यक्षा मधुरा गेठे यांनी शेतीत जाऊन ५०० महिलांना रेनकोट देऊन, अनोखा ‘मैत्री दिन’ उत्साहात साजरा केला. शेतकरी हा पोशिंदा आहे. प्रतिकूल हवामानातही तो शेतात राबून समाजाच्या अन्नाची गरज पूर्ण करतो. त्याच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी महिलांना बांधावर जात रेनकोट देण्यात आले. पावसाने जोर धरल्याने सध्या भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. पावसाचा जोर किती आणि कसाही असला तरीही, भातलावणी थांबत नाही. या कामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला शेतकरी ऐन पावसात दिवसभर राबत असतात. पावसापासून बचावासाठी डोक्यावर काही नसले तरीही ही मंडळी आनंदाने भातलावणी करीत असतात. मात्र, अशा पावसात शेतकरी महिला भिजू नयेत, याकरिता फाऊंडेशनच्या माध्यमातून रेनकोटचे वाटप करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कसारा परिसरातील भातलावणी करणाऱ्या महिला शेतकरी, शेतकरी बांधवांसह गोविंद तळपाडे, संतोष कचरे, राजेंद्र बागुल, मारोती काशिदे, पंकज मनोहर, जगदीश जाधव, उत्तम वाघ आदी उपस्थित होते. महिला शेतकरी फोरम ! महिला शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महिला शेतकरी फोरम सुरू करण्याचे नियोजन असल्याचे मधुरा गेठे यांनी जाहीर आहे. महिला शेतकरी, राज्य सरकार आणि सरकारचे विविध कृषी विभाग यांना एकत्र आणून हा फोरम काम करणार आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांचा समावेश असेल.
“घर, मुलाबाळांचा सांभाळून करून महिला आता शेतीतही आघाडीवर आहेत, हे चित्र आशादायी आहे. शेतीतील कष्टातून हाती काय लागेल, याची हमी नसतानाही महिला शेतकरी प्रचंड मेहनत घेतात. त्यात पाऊस, वारा याची चिंता न करता महिला दिवस-दिवस राबत आहेत, अशा महिलांसोबत मैत्रीचे नाते जोडून सामाजिक धागा घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.”
मधुरा गेठे, अध्यक्षा, आरबीजी फाऊंडेशन, नवी मुंबई.

अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने माजी मंत्री दिलीप कांबळे व आमदार अमित गोरखे सन्मानीत

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहर जिल्हा मातंग समजाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित असा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी मंत्री दिलीप कांबळे तर समाजामध्ये शैक्षणिक व समाज जागृती मध्ये उल्लेखनीय योगदान असणारे युवा आमदार अमित गोरखे यांना आज प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आमदार सुनील कांबळे ,पुणे शहर मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष अनिल हातागळे ,सचिव अँड.महेश सकट,समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक एकनाथ सुगावकर, नगरसेविका मृणाल कांबळे, वृशाली रिठे, माजी नगरसेवक आंनद रिठे, बापू कांबळे, डॉ.भरत वैरागे, स्वाती लोखंडे तसेच अशोक लोखंडे,प्रकाश वैराळ, रवि आरडे, निलेश वाघमारे,दत्ता जाधव ,सचिन जोगदंड, राजू अडागळे, रामभाऊ कसबे यासह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल श्रीफळ असे होते . लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. विविध सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावर्षी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वीर लढवय्या फकीरा पुरस्कार दुर्गेश हातागळे व दिगंबर जोगदंड यांना, तर सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार कोमल शिंदे यांना प्रदान करण्यात आला. स्वारगेट येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा परिसरात भव्य सभा मंडपात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, मातंग समाजाचे पदाधिकारी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांच्या विचारांवर आधारित समाजकार्य अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचेही यावेळी वक्त्यांनी नमूद केले. पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे नियोजन आणि संयोजन उत्कृष्टरीत्या करण्यात आले. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले. कार्यक्रमामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर आणि समाजातील कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा; २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा

0
Newsworldmarathi Pune: आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या लाखो वारकऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा ( डायल १०८) अंतर्गत २७ रुग्णवाहिका २४ तास सेवेत तैनात करण्यात आल्या होत्या. या सेवेमार्फत एकूण २,४४५ वारकऱ्यांना वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. राज्यात महाराष्ट्र्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा बीव्हीजीद्वारे संचालित केली जाते. वारकऱ्यांना तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पंढरपूर येथे विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. या नियंत्रण कक्षातून पालखी सोहळ्याचे सातत्याने निरीक्षण करून आवश्यकतेनुसार तात्काळ रुग्णवाहिका पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. या नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन सेवा व्यवस्थेची पाहणी केली.
Oplus_16908288
याबाबत प्रतिक्रिया देताना बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड म्हणाले, “पंढरीच्या वारीत भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश अबिटकर यांच्या सूचनेनुसार आम्ही अल्पावधीत २७ रुग्णवाहिकांचे नियोजन केले. वारकऱ्यांना सुरक्षित व आरोग्यमय वारीचा अनुभव मिळावा, यासाठी बीव्हीजीचे आरोग्यदूत अहोरात्र सेवेत कार्यरत होते.” मानाच्या दहा पालख्यांसाठी १०८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या पालख्यांमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज (त्र्यंबकेश्वर), संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत सोपानकाका महाराज (सासवड), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत तुकाराम महाराज (देहू), संत नामदेव महाराज (पंढरपूर), संत एकनाथ महाराज (पैठण), रुक्मिणी माता (कौडानेपूर, अमरावती), संत निळोबाराय (पिंपळनेर, पारनेर) आणि संत चांगाटेश्वर महाराज (सासवड) यांचा समावेश होता. आषाढी वारीदरम्यान ‘गुड समरीटन’ स्वयंसेवकांनी ॲपचा प्रभावी वापर करून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ माहिती १०८ नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचवली. त्यामुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी मदत झाली. याबाबत स्वयंसेवक दयानंद मेंशेके म्हणाले, “आषाढी वारीपूर्वी शासनामार्फत आयोजित प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याचा आत्मविश्वास मिळाला. एक महिला भाविक बेशुद्ध पडताच मी तात्काळ ‘गुड समरीटन’ ॲपद्वारे माहिती दिली. ॲप प्रभावीपणे कार्यरत असल्याने १०८ रुग्णवाहिका अल्पावधीत घटनास्थळी पोहोचली आणि संबंधित महिलेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले.”

दप्तराविना शाळा उपक्रमात भातुकलीतून आनंददायी शिक्षण

0
Newsworldmarathi Pune: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, शनिवार पेठ येथील पूर्व प्राथमिक विभागात शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना कृतीतून शिकण्याचा आनंद मिळावा आणि दैनंदिन जीवनातील विविध गोष्टींची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उद्देशाने भातुकलीचा खेळ आयोजित करण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी भातुकलीचा खेळ मांडण्यात आला होता. भातुकलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या भांड्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाजी धुणे, सोलणे, किसणे, चिरणे, पुरी लाटणे, दाणे कुटणे अशा विविध सोप्या कृती उत्साहाने आणि आनंदाने केल्या. या सर्व कृती करताना विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने सहभाग नोंदवला. या कृतीशील उपक्रमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विविध वस्तू, त्यांचा उपयोग आणि विविध कृतींची प्रत्यक्ष ओळख झाली. तसेच विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीत वाढ होण्यास, सूक्ष्म स्नायूंच्या विकासास तसेच निरीक्षण क्षमता आणि कृतीतून शिकण्याच्या सवयीला चालना मिळाली. खेळाच्या माध्यमातून शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आनंददायी अनुभव घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षकांनी या उपक्रमाचे नियोजन व आयोजन केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, आत्मविश्वास वाढविणे आणि शिक्षण अधिक आनंददायी व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.