सोरतापवाडी येथे बळीराजा मोफत आरोग्य शिबिर; साडेचार हजार नागरिकांनी घेतला लाभ

0
Newsworldmarathi Pune: सोरतापवाडी पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सुदर्शन चौधरी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि लक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोरतापवाडी येथे भव्य बळीराजा मोफत आरोग्य शिबिरbआयोजित करण्यात आले होते. या शिबिरास सोरतापवाडी, तरडे, शेंदवणे, वळती तसेच हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळपास साडेचार हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला. या शिबिरात सुमारे १६० मोतीबिंदूचे रुग्ण आढळून आले असून १७०० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच सुमारे १८० रुग्णांची स्कॅन व एमआरआय तपासणीसाठी नावनोंदणी करण्यात आली आहे. दिव्यांग नागरिकांसाठी अत्याधुनिक कृत्रिम हातपाय व कॅलिपर्ससाठी सुमारे ३० जणांनी नोंदणी केली. या आरोग्य शिबिरात हाडांचे आजार, कॅन्सर, दंतरोग, लहान मुलांचे आजार, किडनीवरील आजार, एक्स-रे तपासणीसह विविध व्याधींवर मोफत उपचार करण्यात आले. या उपक्रमात रुबी हॉल क्लिनिक, डॉ. डी. वाय. पाटील फिजिओथेरपी व डेंटल हॉस्पिटल, श्री काशीबाई नवले हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, विश्वराज हॉस्पिटल, प्राईम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांसह पुण्यातील अनेक अत्याधुनिक रुग्णालयांनी सहभाग नोंदवला. या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शशिकांतदादा गायकवाड, रोहिदास शेठ उंद्रे, दिलीपदादा काळभोर, प्रशांतदादा काळभोर, राजारामदादा कांचन, प्रकाश हरपळे, लक्ष्मण केसकर तसेच वळती गावचे सरपंच एल. बी. कुंजीर आणि पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिर भरवण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, ग्रामीण भागातील आरोग्य समस्यांची तीव्रता या शिबिरातून अधोरेखित झाली आहे.

पुण्यात ८० हजार कोटींच्या विकासकामांच्या योजना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात सुमारे ८० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यातील कात्रज चौक येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहरातील आमदार व भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर असून राज्याचे आर्थिक इंजिन आहे. मागील पाच वर्षांत पुणे महापालिकेत सत्तेत असताना शहराचा सर्वांगीण विकास करण्यात आला. त्यामुळे टीका करणाऱ्या विरोधकांनी वस्तुस्थिती तपासावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने पुण्यासाठी भरीव विकास आराखडा तयार केला आहे. पुणे मेट्रोचे ११० किमी मार्ग नियोजित असून त्यातील ३१ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर २४ किमी मार्ग अंतिम टप्प्यात आहे. २४/७ पाणीपुरवठा योजनेचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून सांडपाणी प्रक्रिया व ८८ किमी नदी सुधार प्रकल्पामुळे पूरनियंत्रण व पर्यावरण संरक्षण होणार आहे. शहरासाठी ४४ हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, रिंग रोड, ५४ किमी भुयारी मार्ग, तसेच इंटेलिजेंट ट्रॅफिक सिस्टिम योजना राबविण्यात येणार आहे. एआय आधारित सीसीटीव्ही, स्मार्ट शाळा आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, मागील पाच वर्षात पुणे मनपात भाजपने ठोस काम केले त्यामुळे शहरात आमूलाग्र बदल झाला. विविध निवडणुकीत पुणेकर यांनी भाजपला साथ दिली आहे. पुणे शहराचं विस्तारीकरण आगामी काळात होणार त्यामुळे दूरदृष्टी ठेवून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे हे पालकमंत्री अजित पवार यांना कारभार सांभाळताना यापूर्वी लक्षात आले नाही का? आता पुणेकर विरोधकांना सत्तेत येण्यासाठी कोणती संधी देणार नाही. पुन्हा एकदा पुण्याचा महापौर भाजपचाच होईल कारण, जनतेचे आशीर्वाद भाजपसोबत आहे. केंद्रात पंतप्रधान आमचे, राज्यात मुख्यमंत्री आमचे तर पुण्याचा विकास देखील विरोधक नाही तर भाजपच करणार. जनतेने त्यांचा आशीर्वाद भाजपच्या उमेदवारांना द्यावा. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे सरकार वर्षानुवर्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा मध्ये होते. मागील निवडणुकीत बहुमत मिळून सलग पाच वर्ष भाजपचे सरकार दोन शहरात होते त्यामुळे अनेक विकासकामे सुरू झाली. मात्र, अजित पवार मागील काही दिवस विकासकामांच्या नावाने भाजपवर टीका करत आहेत. परंतु अजितदादा अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत त्यांनी त्यांच्या काळात भरीव विकास का केला नाही अशी विचारणा जनता आता करत आहे.

प्रभाग २७ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद; उमेदवार अक्षा‌ता गदादे पाटील यांना नागरिकांचा पाठिंबा

0
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) कडून प्रभाग क्रमांक २७ (क) – नवी पेठ, पर्वती परिसरात प्रचाराला वेग आला असून पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. अक्षा‌ता प्रेमराज गदादे पाटील यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या भव्य प्रचार फेरीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आपला पाठिंबा व्यक्त केला. या प्रचार फेरीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्वज, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध समाजघटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचारादरम्यान उमेदवार अक्षा‌ता गदादे पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली. स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा आणि महिलांच्या सुरक्षिततेसह मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. “नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले. या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रभागात पक्षाची ताकद अधिक भक्कम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्वयं पुनर्विकासातून झोपडपट्टीवासीयांना ‘आहे तिथे हक्काची घरे’ देणार; आबा बागुल यांचा निर्धार

0
Newaworldmarathi Pune: स्वयं पुनर्विकासातून प्रत्येक झोपडपट्टीवासीयांना ‘आहे तिथे हक्काची घरे’ देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभागासह संपूर्ण पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याची आणि प्रत्येक झोपडपट्टीवासियाचे हित जोपासण्याची जबाबदारी सोपवली आहे.त्यामुळे प्रत्येक झोपडपट्टीधारकाला ‘आहे तिथे हक्काची घरे’ कायदेशीररित्या देण्याचा निर्धार असल्याचे प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल आणि पॅनलच्या तीनही उमेदवारांची शाहू वसाहत येथे झालेल्या प्रचार सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांनी एसआरएबाबत व्यथा मांडल्या. त्यावर आबा बागुल म्हणाले, आज झोपडपट्टीवासीय एसआरए योजनेतील अनागोंदीच्या कारभारामुळे त्रस्त आहेत. मूठभर विकसकांच्या फायद्यासाठी झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून झोपडपट्टीवासियांनाच वेठीस धरले जात आहे.धाक दडपशाहीच्या जोरावर गरिबांचे छत्र हिसकवण्याचा कारभार सुरु आहे. त्यामुळे अशा या ‘एसआरए’ योजनेला माझा तीव्र विरोध आहे. शाहू वसाहत, दाते बस स्टॉप, तावरे कॉलनी, ५४/२ अण्णाभाऊ साठे वसाहत, संजयनगर, पद्मावती वसाहत असो प्रभागातील प्रत्येक झोपडीधारकाचे जीवनमान उंचावणे ही माझ्यासाठी योजना नाही,तर हा माझा शब्द आहे.शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर प्रभागच काय संपूर्ण पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याची आणि प्रत्येक झोपडपट्टीवासियाचे हित जोपासण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे कोणत्याही झोपडपट्टीवासीचा हक्क हिरावला जाणार नाही हे शिवसेनेचे धोरणच आहे. त्यामुळे स्वयं पुनर्विकासातून प्रत्येक झोपडपट्टीवासीयांना साडेसहाशे स्के. फुटाचे आहे तिथे घर मिळणार आहे. अशी ग्वाही आबा बागुल यांनी दिली.

महापुरुषांच्या विचारांतून प्रभागाचा सर्वांगीण विकास : अर्चना पाटील

0
Newsworldmarathi Pune: प्रभागाच्या विकासासोबतच सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.“प्रभागाचा विकास करताना केवळ भौतिक सुविधा निर्माण करणे एवढाच आमचा उद्देश नव्हता, तर परिसराच्या सौंदर्यीकरणासोबतच भावी पिढीवर उत्तम संस्कार व्हावेत, याकडे विशेष लक्ष दिले आहे. प्रभागात साकारलेली महापुरुषांची शिल्पे आणि विविध चित्रसृष्टी ही केवळ शोभेची वास्तू नसून, त्या आपल्या गौरवशाली इतिहासाची आणि विचारधारेची साक्ष देतात,” असे प्रभाग २२ च्या भाजपच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळातील विविध कामांचा आढावा घेताना अर्चना पाटील म्हणाल्या की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक ‘चवदार तळे सत्याग्रहा’चे भव्य शिल्प उभारून सामाजिक समतेच्या आणि न्यायाच्या चळवळीला अभिवादन करण्यात आले आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पांच्या माध्यमातून शिक्षण, समता आणि समाजसुधारणेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भक्ती आणि श्रद्धेचा सन्मान राखत महर्षी मार्कंडेय यांचे शिल्पही प्रभागात उभारण्यात आले आहे. तरुणाई आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जनसंपर्क कार्यालयावर माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची भव्य चित्रसृष्टी साकारण्यात आली आहे. यासोबतच क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चित्रसृष्टीद्वारे त्यांच्या सामाजिक व क्रांतिकारी कार्याचा गौरव करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्र’ सुरू करून त्यांना हक्काचे व्यासपीठ देण्यात आले आहे. जागेचा योग्य वापर आणि सुशोभीकरणाच्या दृष्टीने पुलाखालील जागेत हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांचे भव्य शिल्प उभारून त्या परिसराचे रूप पालटण्यात आले आहे. हा वैचारिक, सांस्कृतिक आणि सर्वांगीण विकास अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन अर्चना पाटील यांनी यावेळी नागरिकांना केले.

राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यासह भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद

0
Newaworldmarathi Pune: प्रभाग २५ मधील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पदयात्रा काढली. आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत झालेल्या या पदयात्रेत शेकडो नागरिकांनी यावेळी उमेदवारांचे स्वागत केले व राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्यासह भाजपाच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिला. प्रभाग २५ चे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर, स्वरदा गौरव बापट आणि कुणाल शैलेश टिळक, स्वप्नाली नितीन पंडित यांच्या प्रचारार्थ ही पदयात्रा काढण्यात आली होती. पंताचा गोट येथून सायंकाळी ५ वाजता या पदयात्रेला सुरुवात झाली. ‘प्रभाग २५ मधील पुणेकरांचा निर्धार, निवडून येणार भाजपचेच उमेदवार’, ‘पुण्याची शान, भाजपचा मान; प्रभाग २५ चा वाढवू सन्मान’ अशा कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पदयात्रा कुमठेकर रस्ता, चित्रशाळा चौक आणि फडतरे चौकात पोहोचली तेव्हा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. पेरुगेट, पावन मारुती आणि लिमयेवाडी परिसरात स्थानिक रहिवाशांनी घराच्या बाल्कनीतून उमेदवारांवर पुष्पवृष्टी केली. उमेदवारांचे ठिकठिकाणी पुणेकर औक्षण करून स्वागत करत होते, बाल्कनीतून पुष्पवृष्टि केली जात होती. नवजवान चौक, नागनाथपार, गायआळी आणि निंबाळकर तालीम परिसरात मतदारांशी थेट संवाद साधत उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. खजिना विहीर, स्वामी समर्थ मंदिर आणि माडीवाले कॉलनीमार्गे बाजीराव रस्त्यावरील भिकारदास मारुती मंदिर येथे दर्शन घेत विजयाचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर महाराणा प्रताप उद्यान येथे पदयात्रेचा समारोप झाला. या वेळी भाजपच्या चारही उमेदवारांनी तत्पर लोकसेवेतून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. यावेळी अनेक गणेश मंडळांकडून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, सुरेखाताई पाषाणकर, उज्वलाताई पावटेकर, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले व सर्व भाजपा बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वस्तीभागातील तरुणांसाठी ‘आशेचा किरण’, बिडकरांच्या लाईट हाऊस प्रोजेक्टमुळे हजारोंचे आयुष्य उजळले

Newsworldmarathi Pune: वस्तीभागातील तरुण मुला-मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख आणि प्रभाग २४ ड चे उमेदवार गणेश बिडकर यांनी राबवलेला ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ हा उपक्रम अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. शिक्षणाअभावी रोजगाराच्या संधींपासून वंचित राहणाऱ्या तरुणांच्या कला-कौशल्यांना दिशा देत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम या प्रकल्पातून सुरू आहे. वस्तीभागातील अनेक तरुण-तरुणींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता येत नाही. मात्र शिक्षण नसले तरी या तरुणांमध्ये विविध कला, कौशल्य आणि काम करण्याची जिद्द असते. या वास्तवाची जाणीव ठेवून गणेश बिडकर यांनी त्यांच्या कौशल्यांचा विकास करून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि इतर तरुणांप्रमाणेच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशातूनच २०२१ साली सोमवार पेठेतील भोलागिरी येथील महानगरपालिकेच्या शाळेत ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ची सुरुवात करण्यात केली. या प्रकल्पाचा मोठा फायदा कसबा पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, गणेश पेठ या भागांतील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या तरुणांना झाला आहे. वस्तीपातळीवरील तरुण-तरुणींसाठी रोजगारनिर्मिती हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू असून, १८ ते ३० वयोगटातील तरुणांना एक महिन्याचे सघन प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे तरुणांना स्वतःची करिअरविषयक स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्याची संधी मिळत असून, स्वतःसह कुटुंबासाठी उपजीविकेचे साधन निर्माण होत आहे. २०२१ ते २०२५ या कालावधीत १५०० हून अधिक तरुण-तरुणींनी या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण घेतले असून, त्यापैकी साडे पाचशेहून अधिक तरुण-तरुणींना प्रत्यक्ष नोकऱ्या मिळाल्या आहेत. हे आकडे या प्रकल्पाच्या यशाची साक्ष देणारे ठरत आहेत. लाईट हाऊस प्रोजेक्टमध्ये प्रशिक्षण देण्यापूर्वी इच्छुक तरुण-तरुणींची करिअर टेस्ट घेतली जाते. त्यांच्या आवडी, गुणवत्ता, क्षमता आणि व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून त्यानुसार योग्य क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते. या प्रकल्पाअंतर्गत टॅली, कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलरिंग, ब्युटी पार्लर, हेल्थ सेक्टर, जिम इन्स्ट्रक्टर, नर्सिंग असिस्टंट, कुकिंग, ग्राफिक डिझाईन, विविध सॉफ्टवेअर लँग्वेजेस यांसह अनेक व्यावसायिक कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते. उच्च दर्जाच्या आणि गरजाधिष्ठित प्रशिक्षणामुळे वस्तीभागातील अनेक तरुणांचे जीवनमान सुधारले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे अनेक तरुण गुन्हेगारी किंवा चुकीच्या मार्गाकडे वळण्यापासून वाचले असून, मुख्य प्रवाहात येत स्वतःचे करिअर घडवून उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’च्या माध्यमातून तरुणांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करत, समाजघडणीचे भक्कम कार्य गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

सूस-बाणेर-पाषाणमध्ये भाजप अनुकूल, अमोल बालवडकरांसमोर कठीण आव्हान

0
Newaworldmarathi Pune : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ (सूस–बाणेर–पाषाण) हा प्रभाग आता केवळ एक निवडणूक लढत न राहता, भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे आणि राजकीय धोरणात्मक आक्रमकतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. या प्रभागात भाजपने रचलेली रणनीती, निवडलेले उमेदवार आणि जमिनीवर उतरलेली संघटनयंत्रणा पाहता, भाजपने येथे विजयासाठी नव्हे तर स्पष्ट वर्चस्वासाठी तयारी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सर्व्हेवर आधारित उमेदवारी : भाजपचा पहिला आक्रमक डाव भाजपने प्रभाग क्रमांक ९ मध्ये उमेदवारी देताना भावनिक नव्हे, तर डेटा, सर्व्हे आणि ग्राउंड रिपोर्ट्स यांचा आधार घेतला. पक्षाच्या चार अंतर्गत सर्व्हे अहवालांमध्ये लहू बालवडकर हे सातत्याने आघाडीवर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भाजप नेतृत्वाने कोणतीही तडजोड न करता त्यांच्यावर विश्वास दाखवला. हा निर्णय म्हणजे भाजपची ‘परफॉर्मन्स-बेस्ड पॉलिटिक्स’ची ठळक घोषणा ठरली आहे. कार्यकर्ता ते नेतृत्व : भाजपचा विश्वासार्ह चेहरा लहू बालवडकर हे केवळ उमेदवार नाहीत, तर भाजपच्या संघटनात्मक संस्कृतीचे प्रतीक मानले जात आहेत. सामान्य कार्यकर्त्यापासून उभे राहिलेले नेतृत्व, पक्षनिष्ठा, सातत्यपूर्ण लोकसंपर्क आणि विकासकेंद्री दृष्टिकोन यामुळे ते मतदारांमध्ये विश्वासार्ह ठरले आहेत. भाजपसाठी ही केवळ निवडणूक नसून, ‘कार्यकर्त्याला न्याय’ देण्याची राजकीय लढाई आहे. आरएसएस आणि भाजप : जमिनीवर उतरलेली यंत्रणा या प्रभागात भाजपची खरी ताकद म्हणजे आरएसएसच्या शिस्तबद्ध केडरचा सक्रिय सहभाग. घराघरात पोहोचणारा संवाद, मुद्देसूद प्रचार आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे भाजपचा प्रचार केवळ घोषणा न राहता, प्रभावी जनसंवाद बनला आहे. त्यातच राज्याचे प्रभावी नेतृत्व, विशेषतः चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभत असल्याने भाजपची रणनीती अधिक धारदार झाली आहे. विरोधकांची गडबड : पक्षबदल, बंडखोरी आणि गोंधळ भाजपची आक्रमक वाटचाल जितकी ठळक आहे, तितकीच विरोधकांची राजकीय गोंधळलेली अवस्था समोर येत आहे. ऐनवेळी पक्षबदल, अंतर्गत असंतोष आणि अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या यामुळे विरोधकांची संघटनात्मक पकड सैल झाली आहे. विरोधी गटात नेतृत्वाचा अभाव आणि विश्वासाचा तुटवडा स्पष्टपणे जाणवत आहे. वोटबँक विभागली : भाजपसाठी सुवर्णसंधी प्रभागातील दिग्गज नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधकांची पारंपरिक मतं विभागली जाण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. ही परिस्थिती भाजपसाठी राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरणारी असून, भाजपने या संधीचे रूपांतर आक्रमक प्रचारात केले आहे. प्रभाग ९ – भाजपचा किल्ला? सर्व बाजूंनी विचार करता, संघटनबळ, सर्व्हे-आधारित निर्णय, मजबूत नेतृत्व आणि जमिनीवर काम करणारी यंत्रणा यामुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजप स्पष्टपणे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. ही निवडणूक भाजपसाठी केवळ विजयाची नव्हे, तर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याची ठरण्याची दाट शक्यता आहे.

प्रभाग ४० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दमदार प्रचार; चारही उमेदवारांचे भव्य शक्तिप्रदर्शन

0
Newsworldmarathi Pune : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. कोंढवा बुद्रुक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य प्रचार शुभारंभ करण्यात आला. या वेळी पक्षाच्या चारही उमेदवारांनी एकत्र येत जोरदार शक्तिप्रदर्शन केले असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचाराच्या शुभारंभी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यात आले. त्यानंतर पदयात्रा काढत परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. रस्त्यांच्या दुतर्फा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांचे स्वागत करत होते. महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश लक्ष्मण कडे, सतीश मारकड, सपना अमोल वाघमोडे आणि विश्वास खुराट यांनी सहभाग घेतला. तसेच पक्षाचे पदाधिकारी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारादरम्यान ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावर मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बोलताना उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि विकासकामांबाबत आपली भूमिका मांडली. “ज्या विश्वासाने नागरिक आमच्या पाठीशी उभे आहेत, त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे उमेदवारांनी सांगितले. एकूणच या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग ४० मधील निवडणूक वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार अधिक जोमात सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

प्रभाग २२ मध्ये अर्चना पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचे भव्य उद्घाटन; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार अर्चना पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. माजी राज्य मंत्री दिलीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यालय सुरू करण्यात आले. यावेळी परिसरात मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना दिलीप कांबळे यांनी अर्चना पाटील यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. प्रभागातील विकासकामे, नागरिकांशी असलेला थेट संवाद आणि सातत्यपूर्ण जनसेवा यामुळे त्या नागरिकांच्या विश्वासार्ह नेत्या ठरल्या असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या माध्यमातून भाजप अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अर्चना पाटील यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानत, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवणे हीच आपली प्राधान्यक्रमाची कामे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक कार्यालय हे केवळ प्रचाराचे केंद्र नसून नागरिकांच्या प्रश्नांसाठी खुले व्यासपीठ असेल, असेही त्यांनी नमूद केले. उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रभागातील भाजप कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. एकूणच अर्चना पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभाग २२ मधील निवडणूक प्रचाराला अधिक वेग आला असल्याचे चित्र दिसत आहे.