Newsworldmarathi Pune: प्रभागाच्या विकासासोबतच सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.“प्रभागाचा विकास करताना केवळ भौतिक सुविधा निर्माण करणे एवढाच आमचा उद्देश नव्हता, तर परिसराच्या सौंदर्यीकरणासोबतच भावी पिढीवर उत्तम संस्कार व्हावेत, याकडे विशेष लक्ष दिले आहे. प्रभागात साकारलेली महापुरुषांची शिल्पे आणि विविध चित्रसृष्टी ही केवळ शोभेची वास्तू नसून, त्या आपल्या गौरवशाली इतिहासाची आणि विचारधारेची साक्ष देतात,” असे प्रभाग २२ च्या भाजपच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी सांगितले.
आपल्या कार्यकाळातील विविध कामांचा आढावा घेताना अर्चना पाटील म्हणाल्या की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक ‘चवदार तळे सत्याग्रहा’चे भव्य शिल्प उभारून सामाजिक समतेच्या आणि न्यायाच्या चळवळीला अभिवादन करण्यात आले आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पांच्या माध्यमातून शिक्षण, समता आणि समाजसुधारणेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भक्ती आणि श्रद्धेचा सन्मान राखत महर्षी मार्कंडेय यांचे शिल्पही प्रभागात उभारण्यात आले आहे.
तरुणाई आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जनसंपर्क कार्यालयावर माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची भव्य चित्रसृष्टी साकारण्यात आली आहे. यासोबतच क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चित्रसृष्टीद्वारे त्यांच्या सामाजिक व क्रांतिकारी कार्याचा गौरव करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्र’ सुरू करून त्यांना हक्काचे व्यासपीठ देण्यात आले आहे.
जागेचा योग्य वापर आणि सुशोभीकरणाच्या दृष्टीने पुलाखालील जागेत हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांचे भव्य शिल्प उभारून त्या परिसराचे रूप पालटण्यात आले आहे. हा वैचारिक, सांस्कृतिक आणि सर्वांगीण विकास अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन अर्चना पाटील यांनी यावेळी नागरिकांना केले.


Recent Comments