Newsworldmarathi Pune : भोर तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले संग्राम थोपटे मंगळवारी (दि. २२) मुंबईत भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत थोपटे कमळ हातात घेणार आहेत.

दरम्यान, थोपटे यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केला असून, घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातील लोकांना बाहेर झोपावे लागते, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करणारे पत्र चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना लिहिले आहे.
पुण्यातील भोर तालुक्यात गेली ४० वर्षे वर्चस्व राखलेल्या थोपटे कुटुंबीयांच्या राजकारणाला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत घरघर लागली. संग्राम थोपटे यांचा पराभव झाला. अखेर भविष्याची राजकीय दिशा व गरज ओळखून संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. त्यानुसार, मंगळवार, २२ एप्रिल रोजी प्रदेश भाजप कार्यालयात थोपटे यांचा मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश होत आहे.
तालुक्यातील गेली अनेक वर्षे काम करत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता बाहेरच्या लोकांना पक्षात घेतले जात आहे. ज्यांचा आयुष्यभर तिरस्कार केला ते आता आपल्यासोबत येत आहेत. घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातील लोकांना बाहेर झोपावे लागते, अशा शब्दांत नेत्यांनी वरिष्ठांकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.
नेत्यांच्या पायाशी लुडबूड करणारे लोक पुढे निघून जातात आणि हाडाचा कार्यकर्ता कायम दुर्लक्षित राहतो? हे असे का याचे उत्तर वरिष्ठांनी अवश्य द्यावे, असे या पत्रात म्हटले आहे.


Recent Comments