Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. प्रभागातील पदयात्रा आणि कोपर सभांमधून नागरिकांशी संवाद साधताना सौ. अर्चना पाटील यांनी आपल्या नगरसेवक कार्यकाळात केलेल्या विकासकामांची आणि मंजूर करून घेतलेल्या महत्त्वपूर्ण ठरावांची माहिती दिली.
प्रचारादरम्यान बोलताना पाटील म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षांत केवळ रस्ते-पाणीच नाही तर सर्वसामान्य नागरिक आणि कामगारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आपण ठोस काम केले आहे. काशेवाडी येथील राजीव गांधी हौसिंग सोसायटी (एस.आर.ए प्रकल्प) च्या रहिवाशांवर थकीत वीज बिलाचे मोठे संकट होते. या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी आपण पाठपुरावा करून सोसायटीचे तब्बल २ कोटी २८ लाख रुपयांचे सामाईक वीज बिल पुणे महानगरपालिकेमार्फत भरण्याचा ठराव मंजूर करून घेतला.
महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या (उदा. मेहतर कामगार) प्रश्नांनाही त्यांनी वाचा फोडली. या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या उचल रक्कमेत (Advance) वाढ करून ती ८,००० वरून १२,००० रुपये करण्याचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळात घेण्यात आला.
याशिवाय, सामाजिक आणि सांस्कृतिक बाबींवरही त्यांनी प्रकाश टाकला. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले पुरंदर येथे पुणे मनपाच्या वतीने महाराजांचे भव्य शिल्प उभारण्याच्या प्रस्तावास आणि कोरोना काळात पालक गमावलेल्या अनाथ मुलांचा खर्च राज्य शासनाने करावा, या संवेदनशील ठरावास त्यांनी मान्यता मिळवून दिली असल्याचे त्यांनी मतदारांना सांगितले. मतदारांनीही त्यांच्या या कामांचे कौतुक करत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.


Recent Comments