Newsworldmarathi Pune: महसूल विभागातील कलम १५५ च्या कथित गैरवापरप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच संबंधित अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह इतर सक्षम यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
निवेदनात सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे की, पावसाळी अधिवेशनात महसूल मंत्री बावनकुळे यांनी कलम १५५ चा गैरवापर केल्याप्रकरणी पुण्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये न्याय मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
कलम १५५ चा वापर केवळ शुद्धलेखन किंवा लिपिकीय स्वरूपातील चुका दुरुस्त करण्यापुरता मर्यादित असताना त्याचा गैरवापर करून जमिनींच्या मालकी हक्कांमध्ये फेरफार करण्यात आल्याचे गंभीर आरोप आहेत. सातबारा उताऱ्यातील नावे कमी करणे, मालकी हक्कांमध्ये बदल करणे तसेच काही प्रकरणांत पुरावे नष्ट करण्यासाठी संचिका गायब करण्यात आल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
सुरवसे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी नसून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. अशा कठोर कारवाईमुळे भविष्यात कोणताही अधिकारी अधिकारांचा गैरवापर करण्याचे धाडस करणार नाही आणि महसूल विभागात पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.
याशिवाय, संबंधित अधिकाऱ्यांनी कथितरित्या भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळविल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर सक्षम यंत्रणांकडून सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे.


Recent Comments