‘रिकन्स्ट्रक्टीव्ह युरोलॉजी’वर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
Newsworld Pune : मूत्राशयाच्या किचकट शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक, मूत्राशय व प्रोस्टेट संबंधित गुंतागुंतीचे आजार, तसेच आधुनिक उपचार पद्धती याविषयी चर्चा करण्यासाठी बाणेर येथील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूटच्या वतीने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजिली आहे. येत्या ७ व ८ डिसेंबर २०२४ रोजी ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, युरोलॉजिस्ट डॉ. पंकज जोशी आदी उपस्थित होते.
डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, “दोन दिवसांच्या या कार्यशाळेत जवळपास ३५ ते ४० शस्त्रक्रिया होणार असून, ‘युरोकुल’मध्ये होणाऱ्या या शस्त्रक्रियांचे लाईव्ह प्रक्षेपण बंतारा भवन येथील सभागृहात जगभरातून आलेले युरोलॉजिस्ट पाहणार आहेत.
डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. पंकज जोशी यांच्यासह लंडन येथील प्रा. अँथनी मंडी, इटली येथील डॉ. गुइडो बार्बगली, तामिळनाडू येथील डॉ. गणेश गोपालकृष्णन, लंडन येथील ज्युलियन शाह, डॉ. मिरोस्लाव्ह दोर्डोव्हिक, कतार येथील डॉ. तारिक अब्बास, अमेरिकेतील डॉ. ली झाह, डॉ. दिमित्री निकोलावास्की या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा होणार आहे. भारतातील पाचशे, तर विदेशातील ८० तज्ज्ञ युरोलॉजिस्ट या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.”
‘युरेथ्रोप्लास्टी’मुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही मुलांना जन्मतःच मूत्रविसर्गाची जागा शिश्नाच्या खालील बाजूस असते. अशा रुग्णांसाठी अद्ययावत शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. तसेच संभोग करण्यास पुरुषाचे लिंग जर अकार्यक्षम असेल, तर रुग्णाच्या शरीरात ‘थ्री पीस पिनाईल प्रोस्थेसिस’ हे उपकरण शस्त्रक्रियेद्वारे बसवले जाते. त्यानंतर रुग्णाच्या इच्छेनुसार अंडकोषाजवळ बसवलेले बटन दाबल्यानंतर पुरुषाचे लिंग ताठ होते आणि तो संभोग करण्यास सक्षम होऊ शकतो, असे डॉ. संजय कुलकर्णी यांनी नमूद केले.
पुरुषांचे लिंग जर ताठ झाल्यावर वाकत असेल, तर तेही ऑपरेशन करून सरळ करता येते. याला ‘पेरोनीज डिसीज ‘असे म्हणतात. ऑपरेशननंतर पेशंटची लघवी गळत असेल, तर लघवीच्या मार्गाभोवती आर्टिफिशियल स्नायू बसवला जाऊ शकतो, जेणेकरून पेशंटचे लघवी गळणे थांबते, हेही ऑपरेशन युरोकूलमध्ये केले जाते. अपघातामध्ये किडनी व लघवीची पिशवी जोडणारी नळी तुटली व पोटात लघवी होऊ लागली तर त्या रुग्णाची नाजूक नळी परत जोडण्याचे ऑपरेशन रोबोटच्या साह्याने केले जाणार आहे. जगातील सर्वात अद्ययावत टेक्नॉलॉजी, रोबोटिक सर्जरी युरोकुलमधे मागील दीड वर्ष होत आहेत. ही शस्त्रक्रिया ‘दा विंची रोबोट’ वापरून केली जात आहे. या कार्यशाळेत विविध प्रकारच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया रोबोटमार्फत केल्या जाणार आहेत, असे डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले.
*’युरोकुल’ची बांधिलकी’*
युरोलॉजी’ व ‘नेफ्फरोलॅाजी’साठी समर्पित १०५ बेडचे ‘युरोकुल’ भारतातील तिसरे मानांकित हॉस्पिटल आहे. मूत्रमार्गाच्या विकारांवरील अद्ययावत व सुसज्ज सेवा एकाच छताखाली २४ तास उपलब्ध आहेत. रुग्णांवर परवडणाऱ्या किंमतीत शस्त्रक्रिया, तसेच बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णाला परत पाठवले जात नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे. या सामाजिक बांधिलकीमुळे देश-विदेशातील रुग्णांमध्ये ‘युरोकुल’ आपलेसे झाले आहे. जगातील सुमारे ५० देशांमध्ये जाऊन प्रात्यक्षिकांसह ‘युरेथ्रोप्लास्टी’ शस्त्रक्रिया करणारे डॉ. संजय कुलकर्णी ‘युरोकुल’चे प्रमुख आहेत, असे डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी सांगितले.
प्राध्यापक डॉ. स्वाती कर्वे यांचे निधन
Newsworld Pune : मराठीच्या अभ्यासक-संशोधक स्वाती सुहास कर्वे (वय ७२) यांचे दीर्घकालीन आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. चिंचवड येथील फत्तेचंद विद्यालयात व पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात त्यांनी मराठीचे अध्यापन केले होते.
स्वाती कर्वे यांनी ललित, वैचारिक, समीक्षा व संशोधनात्मक लेखन केले असून ‘दशावतार’, ‘भारतीय सण व उत्सव’, ‘चिरंजीव’, ‘पंचकन्या’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘लघुकादंबरीचे साहित्य स्वरूप’, ‘आठवणीतील पुस्तके’, ‘दळवींची नाटकेः एक अंतर्वेध’, ‘स्त्रियांच्या परिषदांचा इतिहास’ (१८५० ते २०१०) ही समीक्षात्मक पुस्तकेही त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘स्त्री विकासाच्या पाऊलखुणा’ (१९५० ते २००७), ‘स्त्री विकासाचे नवे क्षितिज’ (१९५० ते २००७) हे स्त्रियांच्या वैचारिक लेखनाचे दोन खंड त्यांनी संपादित केले होते. ‘स्त्रियांच्या पत्रव्यवहाराचे सामाजिक मूल्यमापन’ या प्रकल्पाला महाराष्ट्र फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अभ्यासू संशोधक व समीक्षक म्हणून त्या साहित्य वर्तुळात परिचित होत्या.
कर्वे यांच्या दोन ग्रंथांना महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार, आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार, ना.ह. आपटे पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळाले होते.
चीनमध्ये लोकशाही अस्तित्वात आली तर भारताला फायदा – धर्माधिकारी
Newsworld Pune : चीनने 1950 साली तिबेटवर आक्रमण केले त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी चीन कडून धोका असल्याचे म्हंटले होते. मात्र पुढे पं. जवाहरलाल नेहरूंनी हिंदी – चीनी भाई भाई ची घोषणा दिली, पुढे 1962 साली आपल्याला किंमत चुकवावी लागली. अलीकडे गलवान मध्ये तसे करण्याचा प्रयत्न केले मात्र आजच्या भारताने आरे ला कारे उत्तर दिले. आजच्या परिस्थितीत चीनमध्ये लोकशाही अस्तित्वात आली तर भारताला आणि जगाला देखील फायदा होईल असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
चेतक बुक्सने प्रकाशित केलेल्या आणि पराग देव यांनी लिहिलेल्या ‘ड्रॅगनच्या लोकशाहीची प्रेमकथा’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धर्माधिकारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे होते. यावेळी लेखक पराग देव, अनय जोगळेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. मोरे म्हणाले, बौद्ध धम्म चीन मध्ये गेला त्यावेळी अनेक चीनी अभ्यासक, विचारवंत भारतात आले, त्यांनी आपल्या देशाचा अभ्यास केला, इथले आणेक ग्रंथ चीनी, तिबेटी मध्ये अनुवादित केले. आपल्याकडे परकीय आक्रमणा नंतर अनेक ग्रंथ नष्ट झाले मात्र ते तिकडे उपलब्ध आहेत, त्यांचे आपल्याकडे पुन्हा येणे गरजेचे आहे. जागतिक राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरी योग्य वेळी प्रकाशित झाली असून ती इंग्रजी मध्ये भाषांतरीत व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
जोगळेकर म्हणाले की भारताच्या शेजारी असलेला आणि जागतिक राजकारणात महत्वाचा देश असलेल्या चीन बद्दल आपल्याला फार काही माहिती नसते पण अशा स्वरूपाच्या कादंबरीमुळे आपल्याला शेजारच्या देशाबद्दल नक्कीच माहिती मिळू शकते.
लेखक पराग देव यांनी मनोगत व्यक्त करताना पुस्तकामागील प्रेरणा आणि भूमिका मांडली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
एक्सपिरीयन्स एनलाईटेनमेंट कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन
Newsworld Pune : संपत्ती व समृद्धीसाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या गोष्टींची जाणिव करून देण्याचे काम वन्नेस मूव्हमेंटच्या वतीने करण्यात येते. वन्नेस मूव्हमेंटचे संस्थापक मुक्ती गुरु श्री. कृष्णाजी यांच्या “एक्सपिरीयन्स एनलाईटेनमेंट” या कार्यक्रमाचे आयोजन येत्या 8 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आल्याची माहिती वन्नेस मूव्हमेंटच्या महाराष्ट्र प्रमुख रोमा दासाजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला ॲड वसंत पाटील, उद्योजक दत्ता बोडके, तृप्ती शहापूर, शेफ सर्वेश जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमांबद्दल अधिक माहिती देताना रोमा दासाजी म्हणाल्या, कृष्णाजी, त्यांच्या पत्नी प्रीताजी यांच्यासह, वन्नेस संस्थेचे सह-संस्थापक आहेत. ते ज्ञानी ऋषी आणि गूढवादी, चेतनेचे तंत्रज्ञ आणि ज्ञानाचे जागतिक केंद्र असलेल्या एकमचे सह-संस्थापक आहेत. त्यांनी ध्यान, अंतर्दृष्टी, प्रक्रिया आणि पद्धतींची संपूर्ण परिसंस्था स्थापन केली आहे. जी असंख्य समस्यांचे निराकरण करण्यात, विपुलतेला चालना देण्यासाठी आणि व्यक्तींना चेतनेच्या शक्तिशाली अवस्थेत मार्गदर्शन करण्यास मदत करते. ते जागतिक नेते, साधक आणि जगभरातील लाखो तरुणांना मार्गदर्शन करतात. प्रबोधनाची उत्कट इच्छा जागृत करण्यासाठी ते सध्या 6 खंडांमध्ये जगाच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या जागतिक दौऱ्याचा एक भाग म्हणून पुणे शहराला भेट देत आहेत.
मुक्ती गुरु श्री.कृष्णाजी यांच्या नेतृत्वाखालील हा ४ तासांचा “एक्सपिरीयन्स एनलाईटेनमेंट” कार्यक्रम तुमच्यासाठी ऐश्वर्य चैतन्याचे एक प्रवेशद्वार म्हणून कार्य करते. तुमची आंतरिक स्थिती तुमच्या जीवनात घटना आणि परिस्थिती यावर भाष्य करते. जर तुम्ही संकटाचे, समस्यांचे प्रगतीमध्ये रूपांतर करू इच्छित असाल तर चैतन्याच्या शक्तिशाली अवस्थेला जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम एक प्रेरणा असेल.
८ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ४ ते रात्री ८ यावेळेत मुहूर्त लॉन्स सर्व्हे क्र. १२६, फ्लेम रिंग रोड, खंडोबा मंदिराजवळ, मुंडे वस्ती, बावधन, पुणे येथे होणार आहे. उद्योजक, व्यावसायिक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, ध्यान करणारे व्यक्ती किंवा आर्थिक व वैयक्तिक बदल शोधणाऱ्या प्रत्येकासाठी हा कार्यक्रम उपयुक्त असून कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असल्याचे रोमा दासाजी यांनी सांगितले.
फडणवीसांच्या निवडीचा पुणे भाजपकडून जल्लोष
Newsworld Pune : भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्या निमित्त पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतः ढोल वादन करत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्या निमित्त आनंद साजरा केला.
यावेळी पुणे शहर सरचिटणीस , ,पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर, राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, सुभाष जंगले,वर्षा तापकीर, प्रमोद कोंढरे,,रवींद्र साळे गावकर गणेश घोष,माजी नगरसेवक जयंत भावे आदित्य माळवे, अजय खेडेकर, राजेंद्र काकडे, पुष्कर तुळजापूरकर,राजू परदेशी ,प्रणव गंजीवाले, उमेश शाह, दिलीप उंबरकर, संदीप काळे उपस्थित होते.
घाटे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आहे. राज्यातील युवक आणि महिला यांचा सन्मान आणि उद्धार करण्यासाठी फडणवीस यांची निवड पदावर करण्यात आली आहे. राज्यातील लाडकी बहीण यांना त्यांचा हक्काचा देवाभाऊ मिळणार आहे. पुण्यातील सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी असे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शपथविधीसाठी उद्या मुंबई मध्ये जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस हे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन यापुढील काळात वाटचाल करतील. 2014 ते 2019 या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे राज्याची धुरा सांभाळलेली आहे .त्यामुळे ते पुन्हा एकदा चांगल्याप्रकारे राज्याला विकासाच्या वाटेवर नेतील असा विश्वास राज्यातील जनतेला आहे. लाडक्या बहिणी सोबत लाडके भाऊ देखील भाजपच्या पाठीशी विधानसभा निवडणूकीत राहिलेली आहे. महायुतीला राज्यात ऐतिहासिक यश मिळालेले असून विरोधकांचा सुफडा साफ झालेला आहे.
बालाजीनगरला होणार मेट्रो स्टेशन
Newsworld Pune : बालाजीनगरला अतिरिक्त भुयारी मेट्रो स्टेशन, “स्वारगेट-कात्रज” मेट्रो मार्गिकेला सुधारित मान्यता देण्यात आली आहे.
पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या “स्वारगेट ते कात्रज” (टप्पा क्र. २) भुयारी मेट्रो मार्गिकेत आता ४ भुयारी मेट्रो स्थानके असणार आहेत, ज्यामध्ये बालाजीनगर हे नवीन स्टेशन समाविष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय सुधारित प्रकल्प आराखड्यांतर्गत घेतला गेला असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक सहभाग मान्य करण्यात आला आहे.
अतिरिक्त भुयारी स्टेशन:
बालाजीनगर हे अतिरिक्त भुयारी स्टेशन मेट्रो प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.
स्थायी समितीचा प्रस्ताव:
या प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांवर काम सुरू होईल.
-स्थानिक प्रवाशांना मोठा लाभ: बालाजीनगर भागातील रहिवाशांना मेट्रो स्टेशनमुळे अधिक सोयीचा व जलद प्रवास शक्य होणार आहे.
– वाहतुकीवरील ताण होणार कमी : या स्थानकामुळे स्वारगेट-कात्रज भागातील वाहतूक समस्या कमी होण्यास मदत होईल.
– आर्थिक कार्यक्षमतेची खात्री: महापालिकेवर कोणतेही अतिरिक्त आर्थिक ओझे नसल्याने हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या शाश्वत ठरण्याची अपेक्षा आहे.
या निर्णयामुळे पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा सुधारेल व मेट्रो प्रकल्पाचा विस्तार अधिक प्रभावी ठरेल.
आनंदाची सहल उपक्रमाचे आयोजन
Newsworld Pune : आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग व कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी “आनंदाची सहल” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने हडपसर मतदारसंघातील महाराष्ट्र फेलोशिप ऑफ डीफ, पुणे या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग व कर्णबधिर विद्यार्थ्यांना अभ्यासात्मक व प्रेरणादायी स्थळांना भेटी देण्याची संधी मिळावी या उद्देशाने “आनंदाची सहल” उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. विविध वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या सहलीत सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक जाणीवेचा अनुभव मिळाला तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक ठरला असून, अशा प्रयत्नांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सामाजिक सहभागामध्ये सकारात्मक बदल होण्यास मदत होईल असे मत नाना भानगिरे यांनी सांगितले.
त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला : चव्हाण
Newsworld Mumbai : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. “माजी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या. पण निर्णय न घेऊन त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. “भारतीय लोकशाही बळकट असली पाहिजे असं सर्वांचं मत आहे. प्रत्येकाच्या मनात ईव्हीएमबद्दल शंका आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मोदींनी निवडणूक आयुक्त नेमण्याचा कायदा बदलला. तक्रार करायची कोणाकडे? निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. पण त्यांच्यावर विश्वास राहिला नाही”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
या देशातील लोकशाही सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण काम करतोय. त्या लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झालाय. विधानसभा निकाल अनपेक्षित लागले. आणीबाणीबद्दल अनेक वेळा काँग्रेसने माफी मागितली आहे. या निवडणुकीत विरोधात वातावरण नव्हतं. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. हरियाणा आणि महाराष्ट्रात जर भाजप विरोधात सत्ता गेली तर केंद्रातील सरकारला धोका होणार होता. निकाल लागल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. बाबा आढाव यांनी आंदोलन केलं. या देशात लोकशाही नांदतेय हे सिद्ध करणं निवडणूक आयोग आणि सरकारची जबाबदारी आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
“माझा 2019 चा ईव्हीएमबद्दलचा माझा जुना व्हिडीओ दाखवला जातोय. ईव्हीएम मशीनमध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर नाही अशी माझी माहिती आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम हॅक करता येणार नाही ,असं माझं मत त्यावेळी होतं. जगात अशी मशीन कुठेही निवडणुकीसाठी वापरली जात नाही. माझी मागणी अशी आहे, 100 टक्के VVPAT ची मोजणी करा. खर्च होईल, काही दिवस लागतील. पण हे करा. तुम्ही जर केलं नाही तर संशय वाढणार आहे”, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले
पक्षांतर बंदी कायद्याचा सर्वात मोठा निर्णय होता, तो झाला नाही”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच “लोकशाहीचा जर खून झाला तर संविधानाला काही अर्थ राहणार नाही.
गृहखात अखेर देवेंद्र फडणवीसांकडेच
Newsworld Mumbai : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गृहखात्याच्या वाटपावरून सुरु असलेल्या वादावर आता तोडगा निघाल्याचे दिसत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, गृहखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून गृहमंत्री पदाच्या वाटपावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव होता. शिंदे गटाने गृहखातं मिळावं यासाठी आग्रह धरला होता, परंतु भाजपने हे खाते सोडण्यास नकार दिल्याचे समजते. शेवटी भाजपने फडणवीस यांची ताकद कायम ठेवत त्यांच्याकडेच हे खाते ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामुळे शिंदे गटाच्या असंतोषाला थोडासा आळा बसेल की हा वाद आणखी चिघळेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. याचवेळी अजित पवार गटाने केलेल्या मागण्यांवरही चर्चा सुरू असल्याने, आगामी काळात महाराष्ट्रातील सत्ताकारणात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.
महायुतीत मंत्रीपदावरून पेच
Newsworld Mumbai :
महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वीच मंत्रिमंडळातील नावांवरून भाजप BJP आणि शिंदे गटामध्ये तणाव उफाळून आला आहे. मंत्र्यांच्या निवडीवरून सुरू असलेल्या या चर्चांमुळे महायुतीतील एकजूट आणि सत्तेची वाटणी यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मुख्य मुद्दे:
कलंकित चेहऱ्यांना भाजपचा विरोध:
– शिवसेनेने पाठवलेल्या मंत्र्यांच्या यादीतील संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आणि दीपक केसरकर यांच्या नावांवर भाजपने आक्षेप घेतला आहे.भाजपची भूमिका आहे की, कलंकित किंवा वादग्रस्त नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ नये.
शिंदे गटाची नाराजी:
– भाजपने मंत्रिमंडळासाठी पाठवलेल्या शिवसेना नेत्यांची यादी फेटाळल्यामुळे शिंदे गटात असंतोष आहे. आमच्या मंत्र्यांची नावे भाजपच ठरवणार का? असा थेट सवाल शिंदे गटाने केला आहे. मुख्यमंत्रीपद गमावल्यानंतर शिंदे गटाने गृहखात्याचा आग्रह धरला आहे, मात्र त्यालाही भाजपकडून विरोध केला गेला आहे.
नेत्यांमधील चर्चा:
मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली.या बैठकीत मंत्र्यांची नावे आणि खाती यावर चर्चेचा मुख्य फोकस होता. अद्याप या चर्चेचा अधिकृत तपशील समोर आलेला नाही.
शपथविधीतील मंत्रिमंडळाची रचना:
गुरुवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात प्रत्येक पक्षाचे सात मंत्री शपथ घेतील, अशी शक्यता आहे. एकूण २१-२२ मंत्र्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात केला जाणार आहे.
महायुती सरकार स्थापन होण्यापूर्वीच भाजप आणि शिंदे गटातील तणाव उघड झाला आहे. शपथविधीपूर्वी या तणावावर तोडगा निघाला तरच सरकार स्थिर आणि प्रभावी होऊ शकेल.

