Newsworldmarathi Mumbai: Ladki Bahin Yojana:महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्र्यांच्या माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाखो महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळत आहे. मात्र, जून 2025 चा हप्ता अद्याप जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता आणि प्रश्न निर्माण झाले आहेत. जून महिना संपण्यास आता फक्त 10 दिवस शिल्लक असल्याने, “जूनचा हप्ता कधी मिळणार?” असा सवाल महिलांमधून उपस्थित होत आहे.
जून हप्त्याची प्रतीक्षा
मे 2025 चा हप्ता जूनच्या सुरुवातीला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला होता. त्यानंतर आता जूनच्या हप्त्याची वाट पाहिली जात आहे. सूत्रांनुसार, पुढील दोन आठवड्यांत, म्हणजेच जून अखेरपर्यंत हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जून 2025 च्या 12व्या हप्त्याची रक्कम 1,500 रुपये असणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे, परंतु नेमकी तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
कोणत्या महिलांना मिळणार नाही हप्ता?
लाडकी बहीण योजनेसाठी काही कठोर निकष निश्चित करण्यात आले आहेत. ज्या महिलांचे अर्ज या निकषांना बसत नाहीत, त्यांचे अर्ज बाद करण्यात आले असून त्यांना हप्त्याचा लाभ मिळणार नाही. योजनेच्या पात्रतेसाठी खालील निकष महत्त्वाचे आहेत. लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
लाभार्थ्याच्या घरी चारचाकी वाहन नसावे.
महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक नसावी. या निकषांनुसार पात्र न ठरणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले असून, त्यांना जूनचा किंवा पुढील हप्ते मिळणार नाहीत.
योजनेचा उद्देश आणि लाभ
लाडकी बहीण योजना ऑगस्ट 2024 मध्ये सुरू झाली असून, 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी दरमहा 1,500 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2.52 कोटी महिलांना लाभ मिळाला असून, मार्च 2025 पर्यंत 17,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींची प्रतीक्षा
जूनचा हप्ता लवकरच जमा होईल, अशी आशा लाभार्थी महिलांना आहे. सोशल मीडियावरही या योजनेच्या जून हप्त्याबाबत चर्चा सुरू आहे, आणि काही पोस्ट्सनुसार, काही महिलांचे अर्ज निकषांमुळे रद्द झाल्याने त्यांना हप्ता मिळणार नसल्याचे समोर आले आहे. यामुळे महिलांमध्ये जागरूकता आणि सतर्कता वाढली आहे.
लाडकी बहीण योजनेने महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक आधार दिला असला, तरी हप्त्याच्या तारखेबाबत स्पष्टता येणे बाकी आहे. पुढील काही दिवसांत सरकारकडून याबाबत अधिकृत माहिती येण्याची अपेक्षा आहे.
Newsworldmarathi Mumbai: Uddhav Thackeray mocks Nitesh Rane : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित भव्य कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवताना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांची ठाकरी शैलीत खिल्ली उडवली. “उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कोणासारखे माहीत नाही,” असा खोचक टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी नितेश राणेंच्या ‘बाप’ वक्तव्याचा समाचार घेतला. “कोणता तरी एक बाप ठरवा पहिल्यांदा,” असे म्हणत त्यांनी नितेश राणेंना डिवचले, ज्यामुळे सभागृहात हशा पिकला.
“कम ऑन, किल मी! पण अॅम्ब्युलन्स घेऊन या”
उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना थेट आव्हान देताना म्हटले, “हिंमत असेल तर अंगावर या, पण येताना अॅम्ब्युलन्स घेऊन या. येताना सरळ याल, पण जाताना आडवे व्हाल!” यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही टीकास्त्र सोडले. “देशाला पंतप्रधानाची गरज आहे, फक्त भाजपला पंतप्रधान आहे. देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, घरफोड्या अमित शहांची नाही. संरक्षणमंत्र्याची गरज आहे, गुंडांना अभय देणाऱ्या राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीसांची नाही,” असे घणाघाती टीका करत त्यांनी उपस्थित शिवसैनिकांचा उत्साह वाढवला.
महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात हिंदीची सक्ती कदापि होऊ देणार नाही. हिंमत असेल तर गुजरातमध्ये जा आणि तिथे हिंदीची सक्ती करून दाखवा!” त्यांनी ‘गद्दार मिंध्यां’वरही जोरदार टीका केली आणि शिवसेनेच्या 59 वर्षांच्या इतिहासाचा गौरव करताना म्हणाले, “आमचा नेता एकच, भगवा एकच, दैवत एकच आणि विचार एकच आहे.”
नितेश राणेंवर वैयक्तिक हल्ला
नितेश राणे यांच्या सततच्या वैयक्तिक टीकेवर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. “तुझी पार्श्वभूमी काय? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? आणि तू शिवसेनेवर बोलतोस? तुझा जीव काय, तू बोलतोस काय?” असे कठोर शब्द वापरत त्यांनी नितेश राणेंना सुनावले. यावेळी सभागृहात ‘नेपाळी, नेपाळी’ असे आवाज घुमले, ज्यावर उद्धव ठाकरे यांनी हसत हसत पुढील टीका केली.
हिंदू-मुस्लिम भांडणांवर टीका
भाजपवर हिंदू-मुस्लिम भांडणे लावण्याचा आरोप करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपचा एक बेडूक सतत ओरडत आहे, त्याला तेवढंच काम दिलं आहे.” त्यांनी धर्माच्या नावावर भांडणे लावण्याच्या राजकारणावरही तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेचा दमदार संदेश
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना एकजुटीने लढण्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण करण्याचे आवाहन केले. “59 वर्षांनंतरही शिवसेना बलशाली आहे. आमचा भगवा आणि विचार अढळ आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्याचे संकेत दिले आणि विरोधकांना पुन्हा एकदा सावध राहण्याचा इशारा दिला.
या कार्यक्रमाने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून, उद्धव ठाकरे यांच्या ठाकरी शैलीतील टीकेने विरोधकांना चांगलाच इशारा दिला आहे.
Newsworldmarathi Pune: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पडणाऱ्या जोरदार पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं आहे. यामुळे आज दुपारी 1 वाजता मुठा नदीत 2,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर आणि धरणाची स्थिती
गुरुवारी सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत खडकवासला धरण परिसरात 40 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. शहरासह आसपासच्या परिसरातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. धरणात पाण्याची वाढती आवक पाहता, पूर नियंत्रण कक्षाने विसर्गाचा निर्णय घेतला. पुढील काही तासांत पावसाच्या जोरानुसार विसर्गाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
प्रशासनाची तयारी
पुणे महापालिका (PMC), जिल्हा प्रशासन, पोलिस, PMRDA आणि महावितरण यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीकाठच्या वाहनं हटवावीत, असं आवाहन PMC ने केलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सज्ज ठेवण्यात आलं आहे.
नागरिकांना आवाहन
नदीकाठच्या रहिवाशांनी खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं. संपर्कासाठी PMC आपत्ती निवारण कक्षाचे क्रमांक: 020-25501269, 020-25506800, 020-67801500 उपलब्ध आहेत.
Newsworldmarathi Baramati: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. रात्री 11 वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (PDCC) बँक उघडी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, तिथे माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या सापडल्याचा दावा ‘सहकार बचाव पॅनल’ने केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारी बँकेत उपस्थित असल्याचा आरोप रंजन तावरे यांनी केला आहे. या प्रकरणाने बारामतीत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या ‘श्री नीळकंठेश्वर पॅनल’विरुद्ध चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार बचाव पॅनल’ यांच्यात चुरशीची लढत आहे. बुधवारी (18 जून) रात्री 11 वाजता बारामतीच्या आमराई परिसरातील PDCC बँक उघडी असल्याची माहिती ‘सहकार बचाव पॅनल’च्या कार्यकर्त्यांना मिळाली. बँकेत पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना तिथे माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या, सहकारी संस्था आणि शिक्षण संस्थांच्या याद्या सापडल्या. यावरून पैसे वाटपाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
रंजन तावरेंचे आरोप
‘सहकार बचाव पॅनल’चे नेते रंजन तावरे यांनी पत्रकार परिषदेत स्फोटक आरोप केले. “रात्री 11 वाजता अजित पवारांचे पीए सुनील मुसळे बँकेत काय करत होते? बँकेत मतदार, त्यांचे नातेवाईक आणि जबाबदारी स्वीकारणाऱ्यांच्या याद्या सापडल्या. इरिगेशनचे अधिकारी डुबल यांचं नावही यात आहे. त्यांनी पाणी वाटप संस्थांवर दबाव टाकला,” असा दावा तावरेंनी केला. त्यांनी अजित पवारांवर शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप लावला.
युगेंद्र पवारांचा संताप
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनीही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “PDCC बँकेची वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत असते. रात्री 11 वाजता बँक उघडी का होती? माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या आणि सहकारी-शैक्षणिक संस्थांच्या याद्या तिथे कशा काय? निवडणुकीत पैशाचा वापर वाढला असून, सर्वसामान्य सभासदांना त्रास होतोय. हे राजकारण बदललं पाहिजे,” असं युगेंद्र पवार म्हणाले.
PDCC बँकेचं स्पष्टीकरण
PDCC बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदाळे यांनी आरोप फेटाळले. “बँक सायंकाळी 5:30 वाजता बंद झाली होती. फोन आल्याने मी पुन्हा बँकेत आलो. संगणकीय कामामुळे काही कर्मचारी उशिरा थांबले होते. पण मतदार याद्या कशा आल्या, हे मला माहीत नाही,” असं त्यांनी सांगितलं. मात्र, या स्पष्टीकरणाने संशय कमी झालेला नाही.
अजित पवारांचं आश्वासन आणि वाद
अजित पवारांनी निवडणूक प्रचारात “पॅनल टु पॅनल मतदान करा, मी 5 वर्षांत माळेगाव कारखान्याला 500 कोटी रुपये देईन,” असं आश्वासन दिलं आहे. यावर विरोधकांनी “राज्याची तिजोरी निवडणुकीसाठी उघडली का?” असा सवाल केला. चंद्रराव तावरेंनी “अजित पवारांचे खासगी कारखाने चालतात, मग सहकारी का नाही?” असा टोला लगावला. तसेच, कारखान्याच्या गोडाऊनमधील 60 हजार साखरेच्या पोत्यांचं नुकसान झाल्याचा आरोपही तावरेंनी केला आहे.
अशी आहे निवडणूक?
माळेगाव कारखान्याच्या 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत. अजित पवारांच्या ‘श्री नीळकंठेश्वर पॅनल’ला राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचं पाठबळ आहे, तर ‘सहकार बचाव पॅनल’ आणि ‘बळीराजा पॅनल’ला शरद पवारांच्या विचारसरणीचा आधार आहे. 19,750 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
बारामतीत तणाव
रात्री बँकेत पोलीस दाखल झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यापूर्वीही PDCC बँकेतून पैसे वाटपाच्या घटना समोर आल्या असून, रोहित पवारांनी 2024 मध्ये असाच आरोप केला होता.
Newsworldmarathi Pune: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यात भव्य आणि आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ६१ फूट उंचीची श्री विठ्ठलाची भव्य प्रतिकृती व १६ फूट उंचीची तुळस, जी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या देखाव्याचे उद्घाटन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे अध्यक्ष ह.भ.प. श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते आणि यशोधा भिवाजी गदादे (पाटील) यांच्या शुभहस्ते भक्तिभावाने पार पडले. उद्घाटन सोहळ्याला विविध भजनी मंडळे, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Oplus_131072
या विशेष उपक्रमाबद्दल माहिती देताना प्रतिष्ठानचे शिवाजी गदादे पाटील यांनी सांगितले की, वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देणारा हा देखावा पुणेकरांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. पंढरीच्या वारीचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम भाविकांना पावन अनुभूती देणारा ठरत आहे. वारकरी सेवा प्रतिष्ठाच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे याचा जास्तीत जास्त वारकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा. नगरसेविका प्रिया गदादे व सामाजिक कार्यकर्ते प्रेम गदादे यांनी केले आहे.
Newsworldmarathi Mumbai: Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील तणाव आता नव्या वादात परावतला आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजा आणि मंत्रतंत्राचा वापर करून पालकमंत्रिपद मिळवण्याचा प्रयास केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केला आहे. याचबरोबर शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते वसंत मोरे यांनीही गोगावलेंच्या कथित अघोरी पूजेचे व्हिडीओ शेअर करत खळबळ उडवली आहे. या प्रकरणाने महायुती आघाडीत तीव्र अस्वस्थता पसरली असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
सूरज चव्हाण यांचा स्फोटक दावा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी 18 जून 2025 रोजी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये भरत गोगावले कथितरित्या मांत्रिकासोबत पूजा करताना दिसत आहेत. चव्हाण यांनी याला “अघोरी विद्या” संबोधत, “भरतशेठ + अघोरी विद्या = पालकमंत्री?” असा उपरोधिक सवाल उपस्थित केला.
चव्हाण म्हणाले, “काल मला सूत्रांकडून हा व्हिडीओ मिळाला. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणं चुकीचं आहे. ही पूजा एक महिन्यापूर्वी पालकमंत्रिपदासाठीच झाल्याची माहिती आहे. पूजेदरम्यान मंदिर किंवा देवतेची मूर्ती दिसत नाही, मग ही कसली पूजा? यात बळी दिला गेला का?”
चव्हाण यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाची चौकशी करावी, अन्यथा राष्ट्रवादी स्वतः पुढाकार घेईल, असा इशारा दिला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घ्यावी. महायुतीचा भाग म्हणून नाही, तर जागरूक नागरिक म्हणून हा प्रश्न उपस्थित करतोय,” असं ते म्हणाले.
वसंत मोरेंचेही गंभीर आरोप
शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते वसंत मोरे यांनी यापूर्वी 16 जून रोजी गोगावलेंवर असेच आरोप केले होते. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत गोगावले कथित अघोरी पूजा करताना दिसतात. मोरे म्हणाले, “17 ऑक्टोबर 2024 रोजी गोगावलेंनी गुवाहाटीच्या बगलामुखी मंदिरातून 11 मांत्रिक बोलावून विधानसभा निवडणुकीसाठी पूजा केली. इतर राज्यांतूनही मांत्रिक आणले गेले. तुमच्या कामावर विश्वास नसेल तर अशा पूजांचा आधार का? जर गोगावलेंनी हे नाकारलं, तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल करू.” मोरेंनी गोगावलेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “संविधान सन्मानाने काम करायचं सोडून अंधश्रद्धेचा अवलंब का?” असा सवाल केला.
भरत गोगावलेंचं प्रत्युत्तर
आरोपांना उत्तर देताना भरत गोगावले यांनी अघोरी पूजेचा दावा फेटाळला. “मी अघोरी पूजा केली असती, तर ती पालकमंत्रिपदासाठीच केली नसती का? मी पंढरपूर, सिद्धीविनायक, स्वामी समर्थ मंदिरात प्रार्थना करतो. अशा अंधश्रद्धेचा माझा संबंध नाही,” असं त्यांनी सांगितलं. गोगावलेंनी वसंत मोरेंच्या आरोपांना “राजकीय हेतूने प्रेरित” ठरवलं आणि व्हिडीओंची सत्यता तपासण्याचं आव्हान दिलं.
रायगड पालकमंत्रिपदाचा वाद
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून गोगावले आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यातील संघर्ष गेल्या सहा महिन्यांपासून तीव्र आहे. गोगावलेंनी तटकरे यांच्यावर “निवडणुकीत शिवसेना कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा” आरोप केला, तर तटकरे यांनी गोगावलेंचं वक्तव्य “अविवेकी” ठरवलं. जानेवारी 2025 मध्ये अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद देण्याचा निर्णय मागे घेण्यात आला, कारण गोगावलेंच्या समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला होता. सूरज चव्हाण यांनी यावर टिप्पणी केली, “मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला मान्य आहे, पण गोगावलेंच्या अशा कृती योग्य नाहीत.”
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मत
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाची दखल घेतली असून, व्हिडीओंची तपासणी सुरू आहे. समितीचे प्रवक्ते म्हणाले, “संविधानिक पदावरील व्यक्तींकडून अंधश्रद्धेला प्रोत्साहन मिळणं धोकादायक आहे. आम्ही याची चौकशी करू आणि कायदेशीर कारवाईचा विचार करू.”
महायुतीतील तणाव
रायगड पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू असलेला हा वाद महायुती आघाडीतील अंतर्गत मतभेद उघड करतो. सूरज चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंना गोगावलेंवर कारवाईची मागणी केली आहे, तर गोगावलेंनी तटकरे कुटुंबावर शिवसेना कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा पलटवार केला. या वादामुळे स्थानिक पातळीवरील निवडणुकांपूर्वी महायुतीची एकजूट धोक्यात येण्याची शक्यता आहे.
Newsworldmarathi Mumbai: मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेतील प्रतिष्ठित साठ्ये कॉलेजमध्ये आज सकाळी खळबळजनक घटना घडली. तिसऱ्या वर्षात अभियांत्रिकी शिकणारी 21 वर्षीय विद्यार्थिनी संध्या पाठक हिचा कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. पोलिसांनी प्राथमिक तपासात याला आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे, मात्र संध्याच्या कुटुंबीयांनी तिला कुणीतरी ढकलल्याचा गंभीर आरोप लावला आहे. या प्रकरणाने कॉलेज परिसरात आणि सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
साठ्ये कॉलेज, विलेपार्ले (पूर्व) येथे आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास संध्या पाठक कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. घटनेची माहिती मिळताच कॉलेज प्रशासनाने तिला तातडीने जवळच्या बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. संध्या बी.टेक.च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती आणि तिच्या शैक्षणिक प्रगतीबाबत प्राध्यापकांकडून सकारात्मक अभिप्राय होता.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि कॉलेजमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये संध्या तिसऱ्या मजल्याच्या कॉरिडॉरमधून एकटी चालताना दिसत आहे, परंतु ती खाली कशी पडली हे अस्पष्ट आहे. पोलिसांनी तिच्या मोबाईल फोन आणि सोशल मीडिया खात्यांचा तपास सुरू केला आहे, तसेच तिच्या मित्र-मैत्रिणी आणि प्राध्यापकांच्या जबान्या नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
कुटुंबीयांचा गंभीर आरोप
संध्याच्या कुटुंबीयांनी आत्महत्येच्या दाव्याला स्पष्ट नकार दिला आहे. त्यांच्या मते, संध्याला कोणत्याही मानसिक तणावाचा सामना करावा लागला नव्हता आणि ती नेहमी आनंदी स्वभावाची होती. तिच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं, “आमच्या मुलीला कोणीतरी ढकललं आहे. ती स्वतःहून असं काही करूच शकत नाही. आम्हाला संपूर्ण तपासाची मागणी आहे.” कुटुंबीयांनी संध्याच्या कॉलेजमधील काही सहाध्यायांवर संशय व्यक्त केला आहे, ज्यांच्याशी तिचा काही किरकोळ वाद झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
कॉलेज प्रशासनाचं म्हणणं
साठ्ये कॉलेज प्रशासनाने ही घटना आत्महत्या असल्याचं प्राथमिक मत व्यक्त केलं आहे. कॉलेजच्या प्राचार्यांनी निवेदन जारी करत म्हटलं, “संध्या एक हुशार आणि सक्रिय विद्यार्थिनी होती. तिच्या मृत्यूमुळे आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही पोलिसांच्या तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत.” कॉलेजने विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्रे सुरू केली आहेत आणि पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
पोलिसांचा तपास
विलेपार्ले पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद (ADR) केली असून, आत्महत्या आणि घातपात या दोन्ही शक्यतांचा तपास करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे म्हणाले, “सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक तपासणीतून आम्ही सत्य बाहेर काढू. संध्याच्या मृत्यूपूर्वीच्या हालचाली आणि तिच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू आहे.” पोलिसांनी तिच्या खोलीची झडती घेतली असता एक डायरी सापडली आहे, ज्यामध्ये तिने काही वैयक्तिक नोंदी केल्या आहेत. या नोंदी आत्महत्येच्या कारणांचा खुलासा करतात की अन्य काही संकेत देतात, याचा तपास सुरू आहे.
आत्महत्या की घातपात?
संध्याच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत:
तिने आत्महत्या केली असेल, तर त्यामागील कारण काय? शैक्षणिक दबाव, वैयक्तिक समस्या की अन्य काही?
जर घातपात असेल, तर संध्याला ढकलण्यामागील हेतू आणि संशयित कोण?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती एकटी दिसत असली, तरी तिसऱ्या मजल्यावर तिच्यासोबत कोणी होतं का?
सोशल मीडियावरही #JusticeForSandhyaPathak हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे, ज्यामध्ये अनेकांनी पोलिसांना पारदर्शक तपासाची मागणी केली आहे.
Newsworldmarathi Pune: श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 22 जून ते 3 जुलै 2025 दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. भाविकांचा त्रास टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी विशेष वाहतूक व्यवस्थेचे आदेश जारी केले आहेत.
सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद, फलटण, यवत, वरवंड, बारामती, इंदापूर आणि अकलूज परिसरातील प्रमुख मार्गांवर बंदी घालण्यात आली असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी नागरिकांनी हे पर्यायी मार्ग जाणून घ्यावेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावेळी वाहतूक व्यवस्था
२२ जून : पहाटे २ वाजल्यापासून २४ जून रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-सासवड मार्गावरील दिवेघाट आणि बोपदेवघाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या काळात पुण्याहून सासवडकडे जाणारी वाहतूक खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे, तर सासवडहून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येईल.
२४ ते २५ जून : पुणे-सासवड-जेजुरी-वाल्हे-नीरा मार्गे जाणारी वाहतूक २४ जून पहाटे २ वाजल्यापासून २५ जून रात्री १२ वाजेपर्यंत झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-नीरा मार्गे वळविण्यात येईल. २६ जून रोजी पालखी लोणंद येथे मुक्कामी असेल. या दिवशी पहाटे २ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे-सासवड-जेजुरी-वाल्हे-नीरा मार्गावरील वाहतूक सासवड-जेजुरी-मोरगाव मार्गे वळवली जाईल.
२६ ते २८ जून : फलटण-लोणंद-पुणे आणि पुणे-फलटण-लोणंद मार्गावरील वाहतूक शिरवळ मार्गे वळविण्यात येईल.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावेळी वाहतूक व्यवस्था
२३ जून रोजी : पहाटे २ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतूक वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला मार्गे, तर सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली मार्गे वळवली जाईल.
२४ जून रोजी : पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटा-केसनंद-राहू-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ मार्गे, तर सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहतूक कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-राहू-वाघोली-पुणे मार्गे वळवली जाईल.
२५ जून रोजी : पुणे-सोलापूर वाहतूक चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ मार्गे, तर सोलापूर-पुणे वाहतूक कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-चौफुला-पुणे मार्गे वळवली जाईल. याच दिवशी बारामती-पाटस आणि बारामती-दौंड मार्ग बंद राहील. या मार्गावरील वाहतूक भिगवण मार्गे वळवली जाईल.
२६ जून रोजी : बारामती-पाटस आणि बारामती-दौंड मार्ग बंद राहील, आणि वाहतूक भिगवण मार्गे वळवली जाईल. २७ जून रोजी पालखी सणसर येथे मुक्कामी असेल. यावेळी जंक्शन-बारामती मार्ग बंद राहील, आणि वालचंदनगर-इंदापूरहून येणारी वाहतूक जंक्शन-कळस-बारामती मार्गे, तर बारामतीहून येणारी वाहतूक भिगवण-कळस-जंक्शन मार्गे वळवली जाईल.
२८ जून रोजी : बारामती-इंदापूर वाहतूक बारामती-कळंब-बावडा-इंदापूर किंवा बारामती-भिगवण-इंदापूर मार्गे वळवली जाईल. २९ जून रोजी पालखी निमगाव केतकी ते इंदापूर दरम्यान इंदापूर येथे मुक्कामी असेल. यावेळी निमगाव केतकी-इंदापूर मार्ग बंद राहील, आणि इंदापूर-बारामती वाहतूक लोणी देवकर-कळस-जंक्शन किंवा लोणी देवकर-भिगवण मार्गे वळवली जाईल.
३० जून रोजी : पहाटे ४ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत अकलूज-बारामती वाहतूक अकलूज-बावडा-नातेपूते-बारामती मार्गे, तर अकलूज-पुणे वाहतूक इंदापूर मुख्य महामार्गावरून वळवली जाईल. इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर रोड बंद राहील, आणि वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक बाह्यवळण मार्गे वळवली जाईल. १ जुलै आणि ३ जुलै रोजी इंदापूर-अकलूज मार्ग बंद राहील. या मार्गावरील वाहतूक इंदापूर-हिंगवण-टेंभुर्णी-गणेशव-माळीनगर-अकलूज किंवा अकलूज-नातेपूते-वालचंदनगर-जंक्शन-भिगवण मार्गे वळवली जाईल.
नागरिकांना आवाहन
पुणे जिल्हा प्रशासनाने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आणि पालखी सोहळ्याच्या वेळी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. भाविक आणि वाहनचालकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं, तसेच सोहळ्यादरम्यान गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता बाळगावी, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. पालखी सोहळ्याच्या सुरळीत आयोजनासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासन सज्ज असून, आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी हेल्पलाइन क्रमांक (उदा. 020-26122880) उपलब्ध आहेत.
Newsworldmarathi Pune : कात्रज परिसरातील आंबेगाव येथे बुधवारी सायंकाळी एका ३१ वर्षीय महिलेने तिच्या सहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मयुरी शशिकांत देशमुख आणि तिचा मुलगा विष्णू शशिकांत देशमुख अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येपूर्वी मयुरीने लिहिलेल्या चिठ्ठीत नणंदेच्या सततच्या छळामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे नमूद आहे.
आंबेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी एका खासगी शाळेत बालवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, तर तिचे पती शशिकांत हे बँकेत नोकरी करतात. देशमुख कुटुंब मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहे. घटनेच्या वेळी शशिकांत घरी नव्हते. सायंकाळी सहाच्या सुमारास मयुरीने मुलासह उडी मारली.
घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांनी मायलेकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. मयुरी आणि विष्णू यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून आत्महत्येची चिठ्ठी ताब्यात घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
Newsworldmarathi Mumbai: महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला असून, पुढील चार दिवस (19 ते 22 जून) मुंबई, पुणे, कोकणासह राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. मागील 12 तासांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि नवी मुंबई परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये 19 जून रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये कालच्या पावसाने कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली असून, आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या गावांमधील रहिवाशांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
मुंबईत ऑरेंज अलर्ट, वाहतूक मंदावली
मुंबईत आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली असून, काही भागांत 70 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यलो अलर्टला अपग्रेड करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा वेग मंदावला असून, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क असून, नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात पावसाची बॅटिंग, लोणवळ्यात विक्रमी नोंद
पुण्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून, शहरातील अनेक भागांत सततधार सुरू आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत असून, पर्यटननगरी लोणवळ्यात गेल्या 24 तासांत तब्बल 221 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने जोरदार कामगिरी केली आहे. 2024 मध्ये आजच्या तारखेपर्यंत 323 मिमी पाऊस झाला होता, तर यंदा 1166 मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर आज आणि उद्या (20 जून) जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर
पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर 19 जून रोजी मुसळधार पाऊस पडेल, तर 20 ते 22 जूनदरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात अहमदनगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूरमध्ये 20 जूनला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा आहे. हवामान विभागाने शेतकरी आणि नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः नदीकिनारी आणि डोंगराळ भागातील रहिवासी व पर्यटकांनी खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सुचवले आहे.
प्रशासन सतर्क, नागरिकांना सावधगिरीचे आवाहन
राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथके कार्यरत आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील पूरपरिस्थिती आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.