संगमनेर शहरालगतच्या गावांमध्ये तुकडेजोडबंदी कायदा लागू होत नाही, अंमलबजावणीबाबत स्पष्टता द्यावी. 1947 च्या तुकडेजोडबंदी कायद्याच्या कलम ३ नुसार नगरपालिका हद्दीपासून दोन मैलांपर्यंतचा भाग व रिजनल प्लॅनमधील गावे या कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. संगमनेर नगरपरिषद हद्दीलगत घुलेवाडी, गुंजाळवाडी, सुकेवाडी, कासारवाडी, समनापूर, संगमनेर खुर्द या गावांमध्ये नागरिकांनी एक-दोन गुंठ्याचे भूखंड खरेदी केले आहेत. मात्र तुकडेबंदी कायद्यामुळे अडथळा निर्माण होत आहे,”अमोल खताळ, आमदार
तुकडे बंदी कायदा रद्द! संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या लक्षवेधी प्रश्नावर राज्य सरकारची मोठी घोषणा
Newsworldmarathi Mumbai: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण लक्षवेधी सभागृहात मांडली. यामध्ये तुकडे बंदी कायदा रद्द करून नागरी क्षेत्रामध्ये जे जमिनीचे तुकडे झाले आहेत, त्यांना कायदेशीर करावे अशी मागणी आमदार खताळ यांनी केली. यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा विधानसभेत केली आहे. या निर्णयाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तुकडेबंदी कायद्यामुळे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र राज्यभर आहे. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे जमीनीची खरेदी-विक्री मोठ्याप्रमाणावर होत आहे. यामध्ये लाखो कुटुंबांनी एक-दोन गुंठे जमीन खरेदी करून बांधकामे केली आहेत, मात्र यानंतर कायदेशीर बाबींमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात आमदार अमोल खताळ यांनी सभागृहात अत्यंत महत्वाची लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधले असता, राज्य सरकारकडून मोठ्या क्रांतीकारी निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.
या संदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात सांगितले की, 15 दिवसात याबाबत एसओपी केली जाणार आहे. यामध्ये 1 जानेवारी 2025 पर्यंत जे तुकडे झाले, तुकडी बंद कायदा असल्याने व्यवहार करता येत नाही. तुकडे बंदी कायदा रद्द केला जाईल. एक एसओपी केली जाईल. महसूल, नगरविकास, जमाबंदी आयुक्त या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठित केली जाईल. ही समिती एसओपी करेल. सुमारे 50 लाख लोकांना याचा फायदा होईल. या संदर्भातील 15 दिवसात सूचना असतील, तर कराव्यात असेही बावनकुळे यांनी आवाहन केलं आहे.
सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण; पडळकरांच्या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड; पवार कुटुंबावर नाव न घेता टीका
Newsworldmarathi Mumbai: भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी हिंदुत्ववादी मोर्चादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुण्यात सांगलीतील ऋतुजा पाटील हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात भाषण करताना पडळकरांनी पवार कुटुंबावर नाव न घेता टीका केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
पडळकरांनी आपल्या भाषणात “एका गटाचे लोक एका मोर्चामध्ये पुढे पुढे करत आहेत. ते घर पण तसंच आहे. संकष्टीच्या दिवशी उपवास असतो, पण त्या दिवशी मटण आणायचं. एकादशीच्या दिवशी चिकन आणायचं. त्या घरातील लोक एकादशीच्या दिवशी दगडूशेठ गणपतीला मटण खाऊन जातात,” असे म्हटले. याचवेळी त्यांनी “तिची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे आणि आई दुसरीच आहे. असं ते कॉकटेल कुटुंब आहे,” असे विधान करून अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबावर निशाणा साधला.
या वक्तव्यामुळे पडळकरांना टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांनी वापरलेली भाषा आक्षेपार्ह ठरू शकते, अशी प्रतिक्रिया अनेक राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. आता या विधानावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुदर्शन चौधरी यांच्या उपक्रमातून समाजसेवेचा आदर्श
Newsworldmarathi Pune: कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ अथवा भेटवस्तू देण्याऐवजी शालेय साहित्य दान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाला मित्र परिवाराने भरभरून प्रतिसाद दिला असून, सुमारे १४,००० वह्या व इतर शालेय साहित्य जमा करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत, आज सोरतापवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत २१० विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच वह्या वाटप करण्यात आल्या. एकूण १०५० वह्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या उद्योगपती तानाजीशेठ चोरघे यांनी शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी मोठ्या क्षमतेचा वॉटर फिल्टर देण्याची घोषणा केली, ज्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमासाठी गावच्या सरपंच सुप्रियाताई चौधरी, तानाजीशेठ चोरघे, डॉ. नितीन चौधरी, सनी चौधरी, अमित चौधरी, सोनाशेठ कड सुहास चौधरी, राहुल गाढवे तसेच मंडळातील अनेक तरुण सहकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुदर्शन चौधरी यांच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून, वाढदिवस साजरा करण्याचा हा अनोखा आणि विधायक मार्ग सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
विठूरायाच्या पंढरीत १०८ रुग्णवाहिकेद्वारे १०९५ भाविकांची आरोग्यसेवा
Newsworldmarathi Pune: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठूरायाच्या पंढरीत भाविकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी १०८ रुग्णवाहिका अहोरात्र कार्यरत होती. या वेळी १०९५ भाविकांना आरोग्यसेवा देण्यात महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेला यश आले आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक, वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. या वेळी पंढरीत तत्काळ आरोग्य सेवा मिळाली पाहीजे अशी सूचना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश अबिटकर यांनी केली होती. त्यानुसार राज्याच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेने डायल १०८ नावाचा कक्ष उभारण्यात आला होता. विशेष नियंत्रण कक्षाद्वारे भाविकांना आरोग्य सेवा देण्यात आली. राज्यात भारत विकास गृप (बीव्हीजी) द्वारे १०८ रुग्णवाहिका सेवा पुरवली जाते.
भाविकांच्या सेवेसाठी १०८ रुग्णवाहिकासेवेद्वारे शहरात २४ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. यात १४ रुग्णवाहिका ॲडव्हांस लाईफ सपोर्ट (ALS) तर १० रुग्णवाहिका बेसिक लाईफ (BLS) सपोर्ट या प्रकारातल्या होत्या. विशेषबाब म्हणजे ३५ डॉक्टर,३० चालक, १० प्रशासकीय अधिकारी व नियंत्रण कक्षातील १० कर्मचाऱ्यांनी अरोग्यसेवा देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
अशी दिली आरोग्य सेवा
१) हृदयविकार : ११
२) वैद्यकीय : ९८१
३) इतर : ८०
४) पॉली ट्रॉमा : २२
५) हल्ला : १
एकूण : १०९५
डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार
Newsworldmarathi Pune: पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नसून अवघ्या जगाचे आकर्षण झाला आहे. हा गणेशोत्सव डीजेमुक्त आणि धार्मिक व आपल्या संस्कृती परंपरेप्रमाणे साजरा झाला पाहिजे, यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात डीजेवर लावणाऱ्या गणेश मंडळांना जाहिरात स्वरूपात आर्थिक साह्य न करण्याची भूमिका ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी जाहीर केली आहे.
‘समर्थ प्रतिष्ठान’च्या ढोल-ताशा पथकाच्या वाद्य पूजन कार्यक्रमात बालन बोलत होते. खासदार मेधा कुलकर्णी, कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बालन म्हणाले, ‘‘पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला १३२ वर्षाहून अधिक काळ झाला आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत जनतेने एकत्र येऊन लढा देण्यासाठी लोकमान्य टिळक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते.
मात्र, अलीकडच्या काळात काही मंडळे मोठमोठ्या स्पीकर्सच्या भिंती उभारून त्यावर अश्लील गाणी लावून गणेशोत्सव साजरा केल्याचे आढळते. यामुळे गणेशोत्सवाला गालबोट लागत आहे, हे आपल्या संस्कृतीला शोभत नाही. त्यामुळे डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची गरज असून त्यासाठी आता पावले उचलण्याची गरज आहे.’’
गणेश मंडळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी माणिकचंद ऑक्सिरीच आणि पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून जाहिरातीच्या स्वरुपात गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणात आर्थिक साह्य केले जाते. परंतु आपल्या गणेशोत्सवाचे वैभव कायम राखण्यासाठी डीजे वर नको ती गाणी लावून आपल्या बाप्पाचे पावित्र्य भंग करणार्या मंडळांना यापुढील आर्थिक साह्य केले जाणार नाही, असे बालन यांनी स्पष्ट करतानाच आपल्या हिंदू देवतांचा उत्सव हा धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीनेच साजरा झाला पाहिजे अशी ठाम भुमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेचे समाजातील सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक तयारीला वेग; प्रभाग रचना जुनीच, आरक्षण बदलणार
Newsworldmarathi Pimpri: आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची चाहूल लागताच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रभागरचनेच्या संभाव्य रूपाची चाचपणी सुरू केली आहे. यावेळी राज्य सरकारने पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रभागसंख्या व रचना मागील निवडणुकीप्रमाणेच राहणार असून, केवळ आरक्षणामध्ये फेरबदल होणार आहे. या निर्णयाला राजकीय वर्तुळातून दुजोरा मिळत आहे.
महापालिकेची मागील निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडली होती. त्या नगरसेवकांचा कार्यकाळ १२ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. २०१७ मध्ये भाजप सरकारने पूर्वीच्या द्विसदस्यीय प्रभागपद्धतीऐवजी चार सदस्यीय पद्धती लागू केली होती. सध्याचे राज्य सरकारदेखील त्याच धोरणावर ठाम असून, महापालिकांना त्या पद्धतीनेच प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया न्यायप्रविष्ट झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात राज्य सरकारला चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रभागांची संख्या ३२ इतकी राहणार असून, प्रत्येक प्रभागात चार सदस्य निवडले जातील. परिणामी, महापालिकेत एकूण १२८ नगरसेवक निवडून दिले जातील. सध्या १३ मार्च २०२२ पासून महापालिकेत प्रशासक राजवट लागू आहे. आता निवडणुकीच्या हालचालींना गती मिळण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात बाप-लेकाकडून दोन तरुणींचा विनयभंग; दोन्ही आरोपी फरार
Newsworldmarathi Beed: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या विनयभंगाच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये बाप आणि लेक अशा नातेसंबंधीत आरोपींचा सहभाग समोर आला असून, सध्या दोघेही फरार आहेत. केज पोलीस ठाण्यात दोघांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना ४ जुलै रोजी दुपारी लव्दुरी गावात घडली. येथे ३० वर्षीय अपंग आणि मतिमंद तरुणी घरात एकटी असताना बाळू जालिंदर कांबळे या व्यक्तीने घरात शिरून तिचा विनयभंग केला. पीडित तरुणीने आरडाओरड केल्यावर तिच्या चुलतीने धाव घेतली आणि आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर पीडितेच्या चुलतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बाळू कांबळेविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
या गंभीर घटनेला अवघे काही तास उलटले असताना दुसरी घटना उघडकीस आली असून, त्यात बाळू कांबळेचा मुलगा आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित घटनेबाबत तपास सुरू असून, पोलिसांनी दोन्ही घटनांची गंभीर दखल घेतली आहे.
दरम्यान, दोन्ही आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या दुहेरी घटनांमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, स्थानिक नागरिकांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
हिंजवडी परिसरात वीजपुरवठा खंडित; आयटी कंपन्यांचे कामकाज ठप्प
Newsworldmarathi Pune: हिंजवडीत रविवारी (29 जून) सायंकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने आयटी कंपन्यांच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. महावितरण विभागाने सांगितले की, वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी ३ ते ४ दिवस लागणार आहेत.
महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस या अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत रविवारी दुपारी २.१० च्या सुमारास बिघाड झाल्यामुळे हा विस्कळीत वीजपुरवठा झाला. या बिघाडामुळे महावितरणच्या एमआयडीसी व आयटी पार्क भागातील ९१ उच्चदाब व सुमारे १२ हजार लघुदाब वीजग्राहकांवर परिणाम झाला आहे.
महावितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल *६३ मेगावॅटहून अधिक भार इतरत्र मार्गाने वळविण्याचे काम सुरु* असून, *हिंजवडी एमआयडीसी, आयटी पार्क, रायसोनी पार्क, डॉहलर कंपनी परिसर आणि विप्रो सर्कलच्या* आसपासच्या भागांतील वीजग्राहक यामुळे प्रभावित झाले आहेत.
या बिघाडामुळे अनेक मोठ्या आयटी कंपन्यांचे कामकाज ठप्प झाले असून, अनेकांना वर्क फ्रॉम होम पर्यायाचा अवलंब करावा लागत आहे. दरम्यान, महावितरणने नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
पुढील काही दिवस वीजपुरवठा असाच विस्कळीत राहण्याची शक्यता असल्याने स्थानिक रहिवाशांसह व्यावसायिकांनी पर्यायी व्यवस्था करून काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. महावितरण आणि महापारेषण विभागाचे कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत.
विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची आरोग्यसेवा
Newsworldmarathi Pune : पंढरीच्या लक्षावधी वारकऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन समस्येत तत्काळ आरोग्य सेवा उपलबद्ध होण्यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १२० रुग्णवाहिका २४ तास वारकऱ्यांना आरोग्य सेवा देत आहेत. राज्यात भारत विकास गृपद्वारे (बीव्हीजी) १०८ रुग्णवाहिका सेवेची अमंलबजावणी केली जाते. आजतागायत ८६४३ वारकऱ्यांनी आरोग्यसेवाचा लाभ घेतला आहे.
वारकरी बांधवांना तत्काळ आरोग्यसेवा मिळावी यासाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवेने पंढरपुर येथे नियंत्रण कक्ष तयार केला आहे. नियंत्रण कक्षाद्वारे पालखी सोहळ्याचे बारकाईने निरिक्षण करुन तत्काळ आरोग्यसेवा देण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करत आहेत. पायी वारी करताना भाविकांना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी. अशी सूचना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश अबिटकर यांनी आपत्कालीन वैद्यकीय सेवेला केली होती. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेची अमंलबजावणी करण्यासाठी बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी अवघ्या काही तासातच १२० रुग्णवाहिका पालखी सोहळ्यासाठी तैनात केल्या. रुग्णवाहिकेद्वारे १२० डॉक्टर व १२८ ड्रायवर वारकऱ्यांना २४ तास आरोग्यसेवा अर्पण करत आहेत.
‘भारताचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरीच्या वारीत भाविकांना आरोग्य सेवा देण्याची संधी आम्हाला मिळतेय, हे मी माझे भाग्य समजतो. माननीय आरोग्यमंत्री अबिटकर साहेबांनी केलेल्या सूचनेनुसार अवघ्या काही तासातच पालखी सोहळ्यासाठी १२० रुग्णवाहिकेचे नियोजन आम्ही केले. वारकऱ्यांना आरोग्यमय वारी अनुभवता यावी, यासाठी २४८ आरोग्यदूत अहोरात्र कार्यरत आहेत. अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी व्यक्त केली.
१०८ रुग्णवाहिकेचे वारीचे नियोजन
मानाच्या १० पालख्यांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १२० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. यात ९० बेसिक लाईफ सपोर्ट व ३० ॲडव्हांस लाईफ सपोर्ट या प्रकारातल्या रुग्णवाहिका आहेत.
पालखींची नावे खालिल प्रमाणे,
1) संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर )
2) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )
3) संत सोपान काका महाराज ( सासवड )
4) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )
5) संत तुकाराम महाराज ( देहू )
6) संत नामदेव महाराज ( पंढरपूर )
7) संत एकनाथ महाराज ( पैठण )
8) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )
9) संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर )
10) संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड )
बाजीराव पेशवे यांच्या युद्धनिती अंगिकारल्यास देशाच्या सीमा भविष्यातही सुरक्षित : अमित शहा
Newsworldmarathi Pune: मृत्यूपर्यंत पराजयाला जवळही येऊ न देणाऱ्या अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा एनडीए येथे उभारला ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पुढील पिढीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराजाची स्थापना केली त्यातून स्वराज्याचे संस्कार पेरले. ही ज्योत छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी, तानाजी यांनी तेवत ठेवली. हीच परंपरा पुढे चालवत थोरले बाजीराव पेशवे यांनी स्वराजाची मशाल पेटती ठेवली. युद्ध कौशल्याच्या माध्यमातून स्वराज्याची सीमा विस्तारण्याचे मोठे कार्य पेशवे यांनी केले आहे. मातृभूमी, धर्मभूमी आणि स्वराज्यासाठी सातत्याने युद्ध करणारे ते एकमेव अजेय आणि पराक्रमी योद्धा आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काढले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे साडेतेरा फुट उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात आला असून या पुतळ्याचे अनावरण आज (दि. 4 जुलै) केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंह, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण मंचावर होते.
श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास मोलाचे सहकार्य करणारे सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, शिल्पकार विपुल खटावकर, वास्तुविशारद अभिषेक भोईर यांचा या वेळी अमित शहा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करून लोकमान्य टिळक, वीर सावरकर यांच्या क्रांतिकारी विचारांना उजाळ देऊन अमित शहा पुढे म्हणाले, युद्ध नियम कालबाह्य नसतात. व्यूहरचना, त्वरा, समर्पणभाव, देशभक्ती, बलिदानाची वृत्ती योद्ध्याला नेहमीच प्रेरित करते आणि यश देते. या सर्वांचा संगम असलेले श्रीमंत बाजीराव पेशवे हे एकमेव लढवय्ये होत. त्यामुळे अवघ्या 19व्या वर्षी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर पुढील 20 वर्षात 41 लढाया लढूनही पेशवे एकही लढाई हरले नाहीत.
ते पुढे म्हणाले, संरक्षण दलांमधील तीनही विभागांचे प्रशिक्षण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दिले जाते. या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा कायम प्रेरणा देईल. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या युद्धनितीच्या कौशल्यातून देशाच्या सीमा भविष्याही सुरक्षित राहतील. छत्रपती शिवाजी महाराज तसेच श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे शौर्य वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात.
मला निराशा आली तर बाल शिवाजी, श्रीमंत बाजीराव पेशवे या वीर योद्ध्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आठवतो आणि माझी निराशा नाहीशी होते. देशासाठी समर्पण, बलिदान देणाऱ्या अनेक योद्ध्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडला गेला तसेच पुसलाही गेला. विकास आणि विरासत या पंतप्रधान मोदी यांच्या सूत्रातून प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा, वीर योद्ध्यांचा खरा इतिहास जगासमोर यावा यासाठी हा इतिहास भावानुवादीत होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही अमित शहा यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील नामांकित प्रबोधिनीत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजीगिषु वृत्तीने स्वराज्याची ज्योत सामान्य मराठी माणसाच्या रक्तात फुलविली ती अखंडित ठेवत तिचा विस्तार करण्याचे महान कार्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी केले. सर्व दिशांना हिंदवी स्वराज्य स्थापन करीत असताना त्यांनी वेगाची रणनिती अवलंबिली. आज अनेक महानायकांचा इतिहास पुसला गेला आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या भव्य पुतळा उभारणीतून मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल.
विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनित उभारलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याने पराक्रमाची पूजा बांधण्याचा अनुषेश भरून निघाला आहे. हा केवळ पुतळा नसून हे पराक्रमाचे स्मारक आहे. वीर सेनानींच्या पराक्रमाच्या गाथांचे विविध भाषांत अनुवाद व्हावेत ज्यायोगे विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला उजाळा मिळेल.
प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण गोखले म्हणाले, वीर योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार असून देशासाठी आयुष्य समर्पित करण्याची भावना वाढीस लागणार आहे. सेवा परमो धर्म या भावनेतून कार्य करणाऱ्या देशाच्या सेनेला पेशवे यांच्या युद्धनितीची शिकवण मिळणार आहे.
मान्यवरांचे स्वागत भूषण गोखले, कुंदनकुमार साठे, चिंतामणी क्षीरसागर, पुष्करसिंह पेशवा, श्रीपाद करमरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शेटे यांनी तर आभार कुंदनकुमार साठे यांनी मानले.

