पुणे हादरलं! 18 वर्षीय तरुणाची नैराश्यातून आत्महत्या, हृदयद्रावक व्हिडीओत बहिणींसाठी व्यक्त केलं प्रेम

0
Newsworldmarathi pune: पिंपरी-चिंचवडमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. काळेवाडी येथील 18 वर्षीय संजयकुमार विनोदकुमार राजपूत या तरुणाने नैराश्य आणि आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संजयकुमारने आपल्या आईला एक व्हिडीओ आणि ऑडिओ पाठवला, ज्यामध्ये त्याने आपल्या दोन बहिणींप्रती असलेलं प्रेम आणि त्यांच्या भवितव्याची काळजी व्यक्त केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. देहूरोड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय 18) हा काळेवाडी येथे आपल्या आई-वडील आणि दोन बहिणींसह राहत होता. तो देहूरोड येथील विकासनगर परिसरात बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. 17 जून 2025 पासून तो बेपत्ता होता, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी देहूरोड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तांत्रिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्याचा शोध घेतला असता, मावळ तालुक्यातील घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी त्याचा मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ विषाची बाटली सापडल्याने संजयकुमारने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. व्हिडीओतील हृदयस्पर्शी संदेश आत्महत्या करण्यापूर्वी संजयकुमारने आपल्या आईला पाठवलेल्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “जसे इतर लोक मरतात, तसा मीही मरेन. मला आता कोणाशी बोलायचं नाही, मला काही नको. फक्त माझ्या आई-वडिलांना सांगायचं आहे की, माझ्या बहिणींना कुणी त्रास देऊ नका. मला फक्त त्यांचीच चिंता आहे. त्यांचं पालनपोषण चांगलं व्हायला हवं.” ऑडिओमध्ये तो म्हणतो, “मम्मी, मला मरायचं आहे. मी विष प्यायलो आहे, मी मोबाइल फोडून टाकतोय. पुरावा राहणार नाही. मी लोकेशन पाठवलं आहे, येऊन माझा मृतदेह घेऊन जा.” या संदेशाने संजयकुमारच्या मनातील नैराश्य आणि कुटुंबाप्रती असलेली आपुलकी स्पष्ट होते. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. संजयकुमारच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात नैराश्य आणि आर्थिक अडचणी हे आत्महत्येचे कारण असल्याचे नमूद केले आहे. मात्र, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील ८ हजार पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे किट

0
Newsworldmarathi Pune: पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पुनीत बालन ग्रुप’कडून जीवनावश्यक वस्तूंचे आठ हजार कीट देण्यात आले आहेत. यामध्ये ६ हजार पुरुष तर २ हजार महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या किटचा समावेश आहे. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने वारीच्या बंदोबस्ताच्या कालावधीतील पोलीस बांधवाची गैरसोय टळणार आहे आणि परिणामी त्यांना चांगली सेवा देता येणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संताच्या पालखी समवेत लाखो वारकरी पंढरपुरमध्ये दर्शनासाठी येत असतात. यावर्षी येत्या ६ जुलैला आषाढी वारी सोहळा आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांसह दर्शनासाठी येणार्या महत्वाच्या आणि अति महत्वाच्या व्यक्तींसाठी सहा हजार पुरुष कर्मचारी आणि दोन हजार महिला कर्मचारी असे जवळपास आठ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी असणार आहेत. आषाढी वारी सोहळ्याच्या आठ दिवस हे सर्व अधिकारी कर्मचारी पंढरपुरमध्ये मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे या सर्वांसाठी दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक वस्तूंचे कीट बॅगेसह उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी पंढरपुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार बालन यांनी तत्काळ हे कीट उपलब्ध करून दिले आहेत. पंढरपूरचे पोलिस उपनिरीक्षक महादेव पिसाळ यांच्याकडे हे कीट सुपूर्त करण्यात आले. गतवर्षीही ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून हे किट देण्यात आले होते. किटमधील वस्तू कोलगेट पाऊच, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज, डेटॉल साबण, शेंगदाणा चिक्की, मास्क, पाणी बॉटल आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड.
“उन, वारा, पाऊस यांची तमा न करता विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची सुरक्षा व्यवस्था राखण्याचं महत्त्वाचं आणि अत्यंत जोखमीचं काम हे पोलिस बांधव करत असतात. त्यामुळे त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार दैनंदिन वस्तूंचे कीट देण्यात आले आहे. या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेचा खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याचं समाधान आहे.”
– पुनीत बालन, युवा उद्योजक

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर ! शून्य टक्के व्याजदराने मिळणार 1 लाखांचे कर्ज

Newsworldmarathi Mumbai: राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेअंतर्गत कोट्यवधी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून, अनेकींनी लहान-मोठे उद्योगही सुरू केले आहेत. आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबईतील महिलांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई बँक आता शून्य टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही योजना अधिक गतिमान झाली आहे. यापूर्वी 9 टक्के व्याजदराने मिळणारे कर्ज आता शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली. राज्य सरकारच्या चार महामंडळांमार्फत (पर्यटन महामंडळ, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचे महामंडळ आणि ओबीसी महामंडळ) 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थी महिलांना मिळणार आहे. यामुळे कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होईल. कशी मिळणार कर्ज सुविधा? एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते, तर 5 ते 10 महिला एकत्र येऊन संयुक्त व्यवसाय सुरू करू शकतात. कर्जासाठी अर्ज केल्यानंतर व्यवसायाची पडताळणी केली जाईल. मुंबई बँकेकडे सध्या 1 लाख सभासद असून, 12 ते 13 लाख लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, असे दरेकर यांनी सांगितले. या योजनेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चारही महामंडळांच्या संचालकांसह झालेल्या बैठकीत शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठ्याचा शासन निर्णय घेतला आहे. महिलांना सक्षम करण्याचा संकल्प ही योजना मुंबईतील महिलांना उद्योग-व्यवसायात पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे. पर्यटन महामंडळाची ‘आई’ योजना आणि इतर महामंडळांच्या माध्यमातून व्याज परताव्याचा लाभ मिळणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे बाजारात फिरतील आणि त्यांच्या उद्योगांना चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. मुंबई बँकेमार्फत या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

बीडमध्ये भीषण अपघात ! भरधाव कारच्या धडकेत युवकाचा मृत्यू, दोघे जखमी; रस्त्याच्या समस्येवर रास्ता रोको

Newsworldmarathi Beed: बीड जिल्ह्यातील केज-अंबाजोगाई रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगातील कारने पायी चालणाऱ्या एका युवकाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील दोन जण जखमी झाले. अपघातानंतर कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना माहिती दिली. गेल्या काही दिवसांत अंबाजोगाई रोडवर अपघातांचे प्रमाण वाढले असून, यामागील कारणांचा शोध आणि उपाययोजना गरजेची बनली आहे. रस्त्याच्या समस्यांमुळे संताप बीड जिल्ह्यात रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, माजलगावच्या जायकोचीवाडी येथील ग्रामस्थांनी खामगाव-पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या 35 वर्षांपासून रस्त्याअभावी गावकऱ्यांचे हाल होत असून, गर्भवती महिला, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. आझाद क्रांती सेनाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पुरूषोत्तमपुरी रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे आणि जायकोचीवाडी फाट्यावर थांबा देण्याच्या मागण्या करण्यात आल्या. अपघात रोखण्यासाठी उपाय हवेत केज-अंबाजोगाई रोडवरील वाढत्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या रस्त्यावरील खराब परिस्थिती आणि वाहनांच्या वेगावरील नियंत्रणाचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

जागतिक योगदिनानिमित्त कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात योग शिबिर

0
Newsworldmarathi Pune: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्व विद्यालय यांच्या वतीने कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या पुढाकाराने करण्यात आले. शिबिरामध्ये लक्ष्मण कादबाने यांनी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्व स्पष्ट करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांना योगाभ्यासाचे मार्गदर्शन केले. यावेळी ब्रह्मकुमारी आश्विनी दीदी यांनी मनःशांतीचे महत्व पटवून दिले. जीवराज भाई यांनी शिबिराची प्रस्तावना सादर करत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय संस्थेचा थोडक्यात परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि प्रशासन अधिकारी सुनील मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम, जालिंदर कदम, अधीक्षक राजकुमार कोंडे, कनिष्ठ अभियंता अशोक पवार यांची उपस्थिती लाभली. अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

जनवाडी जनता वसाहतीत मोफत छत्री वाटप उपक्रम, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते वितरण

0
Newsworldmarathi Pune: छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील जनवाडी जनता वसाहत येथे “मोफत छत्री वाटप उपक्रम” आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा. सतीश बहिरट (पाटील) यांनी केले होते. कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आमदार शिरोळे म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाच्या कार्यसंस्कृतीत सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ही संकल्पना केवळ घोषवाक्य नाही, तर ती आमच्या प्रत्यक्ष कृतीतून दिसून येते. अशा उपक्रमांद्वारे आम्ही मतदारसंघात सेवा आणि विकासाचा ठोस ठसा उमटवत आहोत.” ते पुढे म्हणाले की, “सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनात थेट उपयोगी ठरणारे उपक्रम हेच खरे जनतेचे प्रतिनिधित्व आणि विकासाचे खरे प्रतिबिंब आहे. हीच आमची कार्यपद्धती आणि आमचे उद्दिष्ट आहे.” कार्यक्रमात अपर्णा कुऱ्हाडे, संतोष काळे, विकास डाबी, सुरेश शिंदे, सुजित गोटेकर, रमेश भंडारी, शशिकांत अंबेडे आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

लग्नाच्या आनंदावर काळाची छाया; ट्रक-कार अपघातात ९ जणांचा करुण अंत

Newsworldmarathi team: West Bengal Accident : पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील पुरूलिया-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग-१८ वर शुक्रवारी पहाटे एक हृदयद्रावक रस्ते अपघात घडला. भरधाव ट्रकने एका कारला जोरदार धडक दिल्याने कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही कार लग्न समारंभ आटपून घरी परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळींनी भरलेली होती. अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.

प्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे गरजेचे : आमदार चंद्रकांतदादा पाटील

0
Newsworldmarathi Pune : महिलांचे जीवन अतिशय खडतर असते. त्यांना घरातील विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष होत असते. आनंदी जीवनासाठी प्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे आवश्यक आहे असे मत यावेळी व्यक्त केले. मानसी उपक्रमामुळे कोथरुड मधील वस्ती भागातील मुलींना योगाभ्यासाची गोडी निर्माण झाली असून, आगामी काळात पुणे शहरात ही हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवू, अशी भावना आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मतदारसंघातील वस्ती भागातील मुलींसाठी सुरु केलेल्या ‘मानसी’ उपक्रमातील मुलींचे एकत्रिकरण महालक्ष्मी लॉन्स येथे करण्यात आले होते. जवळपास एक हजार पेक्षा जास्त मुलींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन योग प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी माजी नगरसेविका मोनिका वहिनी मोहोळ, उद्योजिका स्मिता पाटील, भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, योग गुरू मुग्धा भागवत, माजी नगरसेविका छाया मारणे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. ना. पाटील म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. स्त्रित्वाने मासिक पाळी, प्रसूती वेदना, अशा विविध आव्हानांवर मात करत, त्या कुटुंबातील विविध जबाबदाऱ्या पार पाडून, आपापल्या क्षेत्रात नावलौकिक कमावत आहेत. ह्या सर्वांमध्ये अनेकदा त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे यातून त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. अशा काळात योगाभ्यास हे त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, या कार्यक्रमाअंतर्गत मानसी उपक्रमातील १००० मुलींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच, काही महिलांनीही पारंपरिक वेशभूषेत योगाची प्रात्यक्षिके सादर केली.

बारामतीत आज शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर; सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारही उपस्थित!

0
Newsworldmarathi Baramati : बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे आयोजित दोनदिवसीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कार्यशाळेचा आज, 20 जून 2025 रोजी, समारोप होत आहे. या कार्यशाळेच्या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांच्यासह इतर मान्यवरही हजेरी लावणार आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांचे एकाच व्यासपीठावर येणे, राजकीय दृष्टिकोनातून चर्चेचा विषय ठरत आहे. कार्यशाळेचा उद्देश आणि महत्त्व विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे 19 आणि 20 जून 2025 रोजी आयोजित या कार्यशाळेचे नाव ‘AI-Driven Technological Solutions for Crop Stress Management and Phenotyping in the Indo-Pacific’ असे आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेती क्षेत्रातील ताण व्यवस्थापन आणि पीक फिनोटायपिंगसाठी उपयोग यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शेतीसाठी AI तंत्रज्ञानाच्या संधी आणि आव्हाने यावर सखोल चर्चा झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यास प्रोत्साहन मिळाले. या कार्यशाळेत ‘AI Career Pathways: Exploring Opportunities in Artificial Intelligence’ या विषयावरही एका सत्रात चर्चा झाली, ज्यामध्ये AI क्षेत्रातील करिअरच्या संधींवर प्रकाश टाकण्यात आला. राजकीय संदर्भ आणि चर्चा शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय मतभेद आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट यामुळे त्यांचे एकाच मंचावर येणे नेहमीच लक्ष वेधते. यापूर्वीही दोघांनी काही कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावली होती, जसे की जानेवारी आणि एप्रिलमधील AI-संबंधित शेती चर्चा. यावेळीही त्यांचे एकत्र येणे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे, विशेषतः राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये संभाव्य जवळीकतेच्या पार्श्वभूमीवर. तथापि, या कार्यक्रमात त्यांच्यात प्रत्यक्ष संवाद होतो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, कारण यापूर्वीच्या काही भेटींमध्ये त्यांनी एकमेकांशी संवाद टाळला होता.

भाजपच्या गणेश बिडकर यांना महापालिकेची मोठी जबाबदारी

0
Newsworldmarathi Pune: भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार असतानाही अंतिम क्षणी संधीपासून वंचित राहिलेले माजी गटनेते गणेश बिडकर यांच्याकडे आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या रणनीतीची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बिडकर यांच्याकडे ही जबाबदारी दिल्याचे सांगण्यात येत असून, त्यांनी तत्काळ कामाला सुरुवातही केली आहे. महापालिकेतील माजी नगरसेवकांशी बिडकर सध्या चर्चा करत असून, प्रभाग रचना, निवडणूक तयारी आणि स्थानिक राजकीय समिकरणांचा अभ्यास सुरू आहे. पक्षाच्या रणनीतीसाठी स्थानिक पातळीवरील माहिती संकलित करून त्यानुसार पुढील दिशा ठरवण्याचे काम बिडकर करत आहेत. भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी बिडकर यांचे नाव आघाडीवर होते. त्यांचा महापालिकेतील प्रदीर्घ अनुभव, स्थायी समिती अध्यक्ष आणि २०१७ मधील सभागृह नेते या नात्याने त्यांनी बजावलेली भूमिका लक्षात घेता, त्यांची निवड निश्चित मानली जात होती. मात्र, पक्षातील अंतर्गत राजकीय समीकरणे आणि तडजोडीमुळे त्यांना संधी नाकारण्यात आली. त्यानंतर माजी शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावरच पुन्हा जबाबदारी ठेवण्यात आली होती, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बिडकर यांना विधानपरिषदेवर संधी मिळेल, अशीही शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्या ठिकाणी देखील त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या निवडणुकीतच त्यांना निर्णायक भूमिका मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फाटफुटीनंतर हे दोन्ही पक्ष सध्या भाजपसोबत सत्तेत आहेत. पुण्यातही या तिन्ही पक्षांकडून महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे बिडकर यांचा स्थानिक राजकारणातील अनुभव आणि संघटन कौशल्य महत्त्वाचे ठरणार आहे.