श्रीमंत ‘दगडूशेठ’ गणपतीला माऊलींच्या अश्वराजांची अनोखी मानवंदना

0
Newsworldmarathi Pune: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. अश्वांनी मंदिराच्या थेट सभामंडपात प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी ज्ञानोबा माऊली तुकाराम… माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झाला. मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, प्रतीक घोडके, राजू वायकर, रोहित लोंढे यांसह श्रीमंत उर्जितसिंह शितोळे (सरकार), श्रीमंत महादजी राजे शितोळे (सरकार), युवराज विहानराजे शितोळे (सरकार), श्रीमंत सौ. मोहिनीराजे शितोळे (सरकार) यांसह पुणेकर मोठया संख्येने उपस्थित होते. शितोळे सरकार म्हणाले, दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिराबाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. आता दरवर्षी अश्व गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना देत असून ही शुभ गोष्ट आहे. माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. यंदा देखील गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदी कडे प्रस्थान करतील. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदा देखील या अश्वांनी मंदिरात येत गणरायाचे दर्शन घेतले. आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात. कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ट्रस्टतर्फे वारी अंतर्गत हरित वारी, स्वच्छता अभियान, रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी, भोजन सेवा अनेक उपक्रम राबविले जातात. त्या सर्व उपक्रमांची सुरुवात या कार्यक्रमाने होत असून ट्रस्ट नेहमीच वारक-यांच्या सेवेत नानाविध उपक्रम राबवित राहिल.

‘वारकरी संख्येचा अंदाज घेऊन चोख नियोजन करा’; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे प्रशासनाला निर्देश

0
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्राच्या वारकरी, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा शतकानुशतके अविभाज्य भाग असणारे पालखी सोहळे येत्या शुक्रवारी शहरात दाखल होत असून परंपरेनुसार पालख्यांचा दोन दिवस मुक्काम पुण्यात असणार आहे. यावेळी वारकऱ्यांची संख्या आणि पावसाची शक्यता गृहित धरूनच सर्व चोख नियोजन प्रशासनाने करावे. तसेच पावसाबाबत हवामान खात्याशी समन्वय ठेवावा, अशा सूचना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पालखी मार्गांची पाहणीदरम्यान प्रशासनाला दिल्या. संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी पुण्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर विश्रांतवाडी चौकातून पालखी मार्गांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करत फुलेनगर विसावा, संगमवाडी चौक, पाटील ईस्टेट चौक, सीओईपी परिसर, श्री निवडुंगा विठोबा मंदिर आणि भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी भेट देत पाहणी केली. प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या सोयी सुविधा, सुरक्षेसाठीचा बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी आमदार हेमंत रासने, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार, वाहतूक पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्यासह पालखी मार्गावर असेलेले स्थानिक नगरसेवक, भाजपासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पाहणीदरम्यान वारकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांचा आढावा घेत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. तसेच स्वच्छतेची व्यवस्था चोख ठेवावी. शिवाय आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेबाबतही काही महत्वाच्या मुद्द्यांवर सूचना केल्या’. ‘शुक्रवार आणि शनिवारी शहरातील पार्किंगची व्यवस्था, वाहतूक करण्यात येणारे बदल, पालखी मार्गांची आणि रविवारी प्रस्थान मार्गावरील वाहतूक व्यवस्था, याबाबत सखोल माहिती घेतली. कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यंदाच्या वारीच्या नियोजनाच्या केंद्रस्थानी संभाव्य पाऊस ठेवा असे सूचित केले. तसेच पावसाबाबत हवामान खात्याशीही संपर्क ठेवा’, अशीही सूचना केली.

भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेणार नाही; शरद पवारांचे एक घाव, दोन तुकडे, युतीच्या चर्चांना पूर्णविराम?

0
Newsworldmarathi Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी (17 जून 2025) पिंपरी-चिंचवड येथील मेळाव्यात अजित पवार यांच्या गटाला लक्ष्य करत एक स्पष्ट संदेश दिला. “सत्तेसाठी भाजपसोबत (BJP) गेलेल्या संधीसाधूंना आपण सोबत घेऊ शकत नाही. गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे लोक सोबत घेऊ, पण काँग्रेसचा विचार भाजपशी सुसंगत नाही,” असे पवार म्हणाले. या वक्तव्याने अजित पवार गटासोबतच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, दोन्ही गटांच्या एकीकरणाच्या आशेवर पाणी फिरले आहे. संधीसाधूपणाला नकार शरद पवार यांनी अजितदादा गटाला अप्रत्यक्षपणे टोला लगावत सांगितले, “काही जण सर्वांना बरोबर घ्या असा सल्ला देतात, पण सर्व म्हणजे कोण? जे सत्तेच्या लालसेने भाजपसोबत गेले, त्यांच्यासोबत जाणे आमचा विचार नाही. संधी साधून राजकारण करणाऱ्यांना आम्ही प्रोत्साहन देणार नाही.” या शब्दांनी त्यांनी अजित पवार गटाला दूर ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. निवडणुका येतील आणि जातील पवार यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी तयार करण्यावर भर दिला. “निवडणुका येतील आणि जातील, पण विकासाच्या कामाला गती देण्यासाठी चित्र बदलावे लागेल. गेलेल्यांची चिंता करू नका, नवीन लोक येत आहेत. संघटना मजबूत करून नागरिकांच्या प्रश्नांना हात घालायला हवा,” असे ते म्हणाले. त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देत, “कोण आला किंवा गेला याची काळजी करू नका, लोक शहाणे आहेत आणि लोकशाही त्यांच्याच बळावर टिकली आहे,” असे सांगितले. अनुभवांचा आधार शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील एक किस्सा सांगत कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. “1978 मध्ये मी मुख्यमंत्री होतो. 80 मध्ये सरकार बरखास्त झाले. 70 आमदारांसोबत निवडणूक लढवली, पण 10 दिवसांत 64 जणांनी साथ सोडली. मी चिंताग्रस्त झालो नाही, पुन्हा संघटनेत लक्ष घातले आणि पाच वर्षांनंतर पक्ष पुन्हा उभारी घेतला. जे गेले त्यांचा पराभव झाला,” असे ते म्हणाले, ज्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. या वक्तव्याने पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण तापले असून, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील दरी आणखी स्पष्ट झाली आहे.

मोठा निर्णय…! कुंडमळा दुर्घटनेनंतर पुणे प्रशासन सतर्क; जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल पडणार?

0
Newsworldmarathi Pune: मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेने पुणे जिल्हा हादरला असून, या घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. रविवारी (15 जून) घडलेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर 51 पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते. सुदैवाने सर्वांना वाचवण्यात यश मिळाले, पण ही घटना प्रशासनाला जागे करणारी ठरली आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल पाडण्याचा निणर्य घेतला आहे, तर पुणे महानगरपालिकेने पुलांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रीत केले आहे. धोकादायक पुलांवर कात्री कुंडमळा दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व जुन्या आणि कमकुवत पुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. धोकादायक ठरलेले पूल पाडून त्यांच्या जागी नवीन संरचनांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. पालिकेची गती वाढवली दरम्यान, पुणे महानगरपालिकेनेही पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटला गती दिली आहे. यापूर्वी 98 मोठ्या पुलांचे ऑडिट पूर्ण झाले असून, त्यापैकी 38 पुलांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. 11 पुलांची दुरुस्ती पूर्ण झाली असून, उर्वरित 62 पूल आणि 438 कल्व्हर्टचे ऑडिट बाकी आहे. तज्ज्ञ सल्लागारांच्या नेमणुकीत होणारा विलंब लक्षात घेता, पालिकेने नव्या निविदा काढून या प्रक्रियेला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपाययोजनांमुळे शहरातील सार्वजनिक संरचनेची सुरक्षितता लवकरच सुधारण्याची शक्यता आहे. या निर्णयांमुळे कुंडमळा दुर्घटनेसारख्या घटना पुन्हा होणार नाही, याची काळजी घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे दिसते. प्रशासनाचे तातडीचे निर्णय १) ५०० धोकादायक ठिकाणांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील ५०० मुलभूत धोका असलेल्या ठिकाणांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. यात पूल, वाहतूक मार्ग, पाण्याच्या प्रवाहामुळे प्रभावित ठिकाणे आणि कट्याराखाली येणारी जागा अनेक प्रकारे समाविष्ट आहेत. २) संपूर्ण पूलांचा पुनरावलोकन आणि ढळणाऱ्या पूलांची रचना पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व जुने पूल संरचनात्मक तपासणीसाठी आदेश दिले आहेत; आढळल्यास, पूल ताबडतोब बंद, काढून टाकला किंवा नव्याने बांधला जाईल. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील सर्व नदीवरील पूलांची तपासणी करण्याचा आदेश दिला आहे .

अजित पवारांचा मिश्कील फटका! ‘बायको म्हणते, कुठून याची नजर इतकी बारीक…’

Newsworldmarathi Baramati: Ajit Pawar : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उल्लेख करत एक हसवणारे विधान केले, ज्याने उपस्थितांना हसण्याची संधी दिली. तसेच, साखर कारखान्यावरील कर्जाच्या आरोपांना खोडून लावत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. 24 जूनच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आपली कामगिरी आणि चेअरमनपदाची तयारीही मांडली. काय म्हणाले अजित पवार? “अर्ध पुतळ्याला हार घालण्यासाठी गेलो होतो. तिथे वठलेली झाडं पाहून लगेच सांगितलं की ती काढून टाका. माझी नजर एवढी बारीक आहे की माझी बायको म्हणते, कुठून याची नजर इतकी बारीक आहे. मला नीट लक्ष ठेवायला आवडतं, हे माझं पॅशन आहे,” असे म्हणत अजित पवारांनी मंचावर हशा पिकवला. त्यांनी पुढे सांगितले की, “विरोधक सांगतात साखर कारखान्यावर कर्ज आहे, पण 239 कोटींचा साखर साठा आणि वसंतराव शुगर इन्स्टिट्यूटचा पुरस्कार हे त्यांचे दावे खोटे ठरवतात.” निवडणूक आणि चेअरमनपद “मीच तुमचा प्रतिनिधी आहे, घाबरून जाण्याचं कारण नाही. 24 जूननंतर मी कुठे पळून जाणार नाही. मीच चेअरमन होणार आहे आणि सर्व नियमानुसार काम करेन. एफआरपीपेक्षा जास्त दर दिला आहे,” असे पवार म्हणाले. त्यांनी विरोधकांच्या “शेवटची निवडणूक” या टिकेवरही प्रत्युत्तर देत, “वय झालं की विस्मरण होते, पण माझ्या काळातील प्लॅनिंग आणि इमारती बघा. कामगार भरतीत संधी देणार आहे,” असे आश्वासन दिले.या मिश्कील आणि आत्मविश्वासपूर्ण भाषणाने माळेगावातील सभेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक विलंब! न्यायाधीश रजेवर, सुनावणी 24 जूनपर्यंत पुढे

Newsworldmarathi Beed: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष मकोका न्यायालयात पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायाधीश रजेवर असल्याने आज (16 जून 2025) होणारी सुनावणी आता 24 जून रोजी होणार आहे. या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडच्या आरोप निश्चितीबाबत महत्त्वाचा युक्तिवाद होणार होता, पण न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमुळे कारवाई लांबणीवर पडली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतरांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. गेल्या सुनावणी (3 जून) मध्ये सरकारी वकील उज्वल निकम यांनी पुरेसे पुरावे असल्याचे सांगत आरोप निश्चितीची मागणी केली होती. मात्र, कराड यांच्या वकिलांनी डिजिटल पुरावे मिळाले नसल्याचा युक्तिवाद केला असून, त्यांच्या दोषमुक्तीचा अर्जही दाखल आहे. आज या मुद्द्यावर पुन्हा चर्चा होणार होती, पण ती आता पुढील तारखेला होईल. दरम्यान, आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. विराजच्या शिक्षणाची जबाबदारी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतले होते. त्यांनी मुलगा विराज याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली असून, तो आता सांगलीतील रेठेधरण सैनिकी शाळेत शिकणार आहे. याबाबतचे पत्र धनंजय देशमुख (संतोष यांचे भाऊ) यांना वर्षा निवासस्थानी सुपूर्द करण्यात आले, ज्यावेळी आमदार अभिमन्यू पवार आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते. पित्याचे छत्र हरपल्यानंतरही नीट परीक्षेत यश सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने १२वी विज्ञानच्या यशानंतर नीट परीक्षेतही यश संपादन केले आहे. आता ती वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. तिच्या शिक्षणाची जबाबदारी अनेक राजकीय नेत्यांनी घेतलेली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना आणि पित्याचे छत्र हरपल्यानंतरही वैभवीने खचून न जाता १२ वी विज्ञान परीक्षेत ८५.३३ टक्के मिळविले होते. या यशानंतर तिने नीट परीक्षेतही यश संपादन केले आहे.

शेतीला AI क्रांती ! आणीबाणी कारावासीयांचं मानधन दुप्पट, मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय

Newsworldmarathi Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (17 जून 2025, दुपारी 3:30 IST) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय घेण्यात आले, ज्यांनी राज्याच्या विकासाला नवी दिशा दिली आहे. या बैठकीत शेतीसाठी ‘महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण 2025-2029’ मंजूर करत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर सुरू करण्यात आला, तर आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यासह धारावी पुनर्विकास आणि अनिवासी भारतीयांच्या मुलांच्या शिक्षणाला चालना देणारे निर्णयही मंजूर झाले. शेती आणि तंत्रज्ञानाला बळ ‘महाॲग्री-एआय’ धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, रोबोटिक्स आणि डिजिटल शेतीशाळा यांचा वापर करून शेती क्षेत्रात क्रांती घडवण्याचा मानस आहे. हवामान आधारित सल्ले आणि ‘क्रॉपसॅप’सारख्या प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे (AWS) उभारण्यासाठी ‘WINDS’ प्रकल्पाला मुदतवाढ मिळाली. आणीबाणीतील हुतात्म्यांना सन्मान आणीबाणीच्या काळात (1975-77) कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे हयात जोडीदारालाही लाभ मिळेल, ज्यामुळे ‘गौरव योजना’ला नवा आयाम प्राप्त होईल. इतर महत्त्वाचे निर्णय नाशिकमध्ये ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर: जांबुटके येथील 29.52 हेक्टर जमीन आदिवासी उद्योजकांसाठी राखीव ठेवण्यात आली. MMRDA प्रकल्प: रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी मुद्रांक शुल्कात सवलत, विदेशी गुंतवणुकीस चालना. मुंबई मेट्रो: मार्ग 2A, 2B आणि 7 साठी कर्ज मिळण्यास मुदतवाढ. धारावी पुनर्विकास: विशेष हेतू कंपनीसाठी मुद्रांक शुल्क माफ, पुनर्वसनाला गती. विरार-अलिबाग मार्गिका: ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्त्वावर प्रकल्प मंजूर. शैक्षणिक सुविधा: पहाडी गोरेगाव येथील जमिनीवर विधि विद्यापीठासाठी मुद्रांक शुल्क माफी. NRI मुलांचा प्रवेश: व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन धोरण मंजूर. या निर्णयांनी महाराष्ट्राच्या शेती, उद्योग आणि सामाजिक कल्याणाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बैठकीनंतर मंत्र्यांनी सविस्तर माहिती जाहीर केली असून, लवकरच अंमलबजावणीला सुरुवात होईल.

समाज सुधारण्यासाठी दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्ही महत्वाचे : जान्हवी धारीवाल बालन

0
Newsworldmarathi Pune : रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाऊंडेशन द्वारा आयोजीत शोभाताई आर धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त एच व्ही देसाई आय हॉस्पिटल येथे मोफत नेत्र तपासणी , ५०१ मोतीबिंदूं रुग्णांच्या तपासणी व शस्त्रक्रिया , वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप, रक्तदान शिबीर व आर एम डी इंग्रजी शाळा कोंढवा, लोणीधामणी गाव , कासारी गाव , नवलेवाडी पिंपरी पेंढार या गावांमध्ये वृक्षारोपण असे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी शोभाताई आर धारीवाल उपाध्यक्षा,जान्हवी धारीवाल बालन अध्यक्षा आर एम डी फाऊंडेशन, नितीनभाई देसाई विश्वस्त एच व्ही देसाई आय हॉस्पिटल , इंद्राणी बालन फाऊंडेशन व बालन ग्रुप चे अध्यक्ष पुनीतदादा बालन , परवेझ बिलिमोरिया कार्यकारी संचालक तसेच रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग व शिकावू विध्यार्थी ,विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी, उपस्थित होते. या प्रसंगी जान्हवी धारीवाल बालन यांनी श्री रसिकशेठ धारीवाल यांनी आर एम डी फाऊंडेशनची स्थापना करून समाजातील सर्वच घटकांसाठी विविध योजना यामध्ये मोफत गुजरात राज्यातील कॅन्सर हॉस्पिटल, ससून पुणे येथील सर्व सोयीयुक्त अपघात रुग्णालय , नाशिक येथील आर एम डी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर , पूना हॉस्पिटल येथे कार्डीयाक कक्ष , तसेच शिक्षण क्षेत्रात फार्मसी , व्यवस्थापन , अभियांत्रिकी महाविद्यालय सोबतच इंग्रजी शाळांची स्थापना , हुशार व गरजू विध्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती , पर्यावरण क्षेत्रात खडवासला धरणाचा गाळ काढून पाण्याचा स्तर वाढविणे , शेकऱ्यांसाठी बंधारे बांधणे इत्यादी समाजपयोगी कामं केलीत. हे सर्व प्रकल्प आखतांना आई शोभाताई यांचा सिंहाचा वाटा असे अशी माहिती दिली . मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले . श्री पुनीत बालन यांनी समाजाचे ऋण फेडतांना कमाईतील वाटा समाजासाठी खर्च करणे हि सामाजिक जबाबदारी असून आज शोभाताईच्या जन्मदिनानिमित्त नक्कीच हॉस्पिटल च्या कार्यात आमचाही सहभाग असेल असे आश्वासन दिले. त्यानंतर फाऊंडेशनद्वारा प्रायोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा धनादेश व शिष्यवृत्तीच्या विध्यार्थ्यांचे धनादेश वाटप करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले .

ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती

Newsworldmarathi sambhajinagar: महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तसेच त्यांना तक्रारी दाखल करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी महिला आयोग कायम आपल्या सोबत आहे. ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘आरोग्य मित्र’ उपक्रम राबविण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज येथे केले. बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी असे आवाहनही त्यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशवी काढणे तसेच त्यांच्या आरोग्य समस्या, बालविवाह, महिला अत्याचार याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. चाकणकर म्हणाल्या की, महिला आयोगाच्या वतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्या आदींबाबत जनजागृती करण्यात येत आहे. बालविवाह रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामामध्ये गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका असून गावातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कोणाच्या दबाबाला बळी न पडता बालविवाह आदी कुप्रथा रोखण्यासाठी संकल्प करावा. समाजातील वाढती बालविवाहाची कुप्रथा रोखणे हे सर्वांचे कर्तव्य असून बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. बीडसह मराठवाडयातील अनेक जिल्हयात ऊसतोड महिला कामगार स्थलांतर करतात, त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत, यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संकल्पनेतून यावर्षी ‘आरोग्य मित्र’ उपक्रम राबविण्यात येत आहे, या उपक्रमा अंतर्गत ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलेसाठी त्याच समुहातील एकाची आरोग्य मित्र म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे, आरोग्य मित्र ऊसतोड महिलेला येणाऱ्या आरोग्याच्या समस्याबाबात गावातील आशासेविका तसेच अंगणवाडी सेविकांच्या संपर्कात असेल. यातून ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांना आरोग्याच्या सेवा तत्परतेने देणे शक्य होणार आहे, ही अभिनव संकल्पना नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास श्रीमती चाकणकर यांनी व्यक्त केला. ऊसतोड महिलांनी गर्भपिशवी काढण्याच्या प्रकाराबाबतही श्रीमती चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली. महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांना सहकार विभागाने आरोग्यासह त्यांना आवश्यक सोईसुविधा देण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी यंत्रणेला दिले. आरोग्याच्या उपसचिव डॉ. बैनाडे म्हणाल्या, महिलांना आरोग्यासह सर्व सुविधा मिळतात की नाही, याबाबत महिनानिहाय आढावा घेण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्याची तपासणी नियमित होण्याची गरज असून बीड जिल्हयातील गर्भपिशवी काढण्याच्या प्रकाराबाबत त्यांनी सबंधित यंत्रणेकडून माहिती जाणून घेतली. स्वंयसेवी संस्थांना सोबत घेत चांगले काम करूया, असे त्या म्हणाल्या. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, जनजागृती, प्रशिक्षण व तपासणी या तीनही बाबीवर आपले काम सुरू आहे. सर्व विभागांनी महिलांच्या अडचणीवर समन्वयाने काम केले तर निश्चित महिलांच्या अडचणी मार्गी लागतात, असे ते म्हणाले. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ऊसतोड महिलांसाठी नव्याने सुरू केलेल्या आरोग्य मित्र या उपक्रमाबाबत माहिती दिली. महिलांना ‘आरोग्य मित्र’ उपक्रमातून निश्चितपणे मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले. विभागीय महिला व बालविकास उपायुक्त रेश्मा चिमंद्रे यांनी विभागातील महिला विषयक उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी सामाजिक चर्चेत सामजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत महिला, सामजिक संस्थांच्या प्रतिनिधी महिला तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यासाठी ६१ फूट श्री विठ्ठल मूर्ती व १६ फूट तुळशीचा देखावा; वारकरी सेवा प्रतिष्ठानची भव्य तयारी

0
Newsworldmarathi Pune: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, पुण्यात वारकरी सेवा प्रतिष्ठानच्यावतीने एक भव्य आणि देखणा देखावा साकारण्यात येत आहे. या देखाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे तब्बल ६१ फूट उंचीची श्री विठ्ठलाची मूर्ती आणि १६ फूट उंचीची तुळस. प्रतिष्ठानचे शिवाजी गदादे पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, सध्या या देखाव्याच्या तयारीला वेग आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो वारकरी भक्त टाळ, मृदुंग आणि अभंगाच्या गजरात पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने, विठुरायाच्या प्रतिकात्मक रूपात उभारण्यात येणारी ६१ फूट उंच मूर्ती आणि १६ फूट उंच तुळस, भक्तांच्या श्रध्दास्थानाला भव्य रूप देणार आहेत. या देखाव्याच्या माध्यमातून वारकरी परंपरेची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समृद्धी अधोरेखित करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. यासाठी खास रोषणाई, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि वारकरी भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्थानिक तरुण, स्वयंसेवक आणि प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा सहभाग या उपक्रमात मोठ्या प्रमाणात असून, सर्वजण एकत्र येऊन या सोहळ्याचे उत्सवात रूपांतर करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. या भव्य आयोजनामुळे पालखी मार्गावरील वातावरण आध्यात्मिकतेने भारले जाईल, असा विश्वास आयोजक व्यक्त करत आहेत. वारकरी परंपरेचा प्रचार आणि प्रसार साधण्याच्या दृष्टीने ही कलाकृती विशेष महत्त्वाची ठरणार आहे.