शिक्षकेतर पदभरती प्रक्रियेतील दिरंगाईचा निषेध; पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
Newsworldmarathi Pune : राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांवर भरती प्रक्रियेबाबत शासनाने ४ एप्रिल २०२५ रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. अनेक वर्षांनंतर सुरू झालेली ही पदभरती प्रक्रिया शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी संधी ठरली होती.
मात्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी २८ मे २०२५ रोजी काढलेल्या पत्रकानुसार, पदभरतीसाठी २०२३–२४ ऐवजी २०२४–२५ या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यतेनंतरच रिक्त पदांचा आढावा घेऊन समायोजन प्रक्रियेनंतर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. वास्तविक २०२४–२५ हे शैक्षणिक वर्ष संपत आले असतानाही अद्याप संच मान्यता प्रक्रियेत दिरंगाई सुरूच आहे.
यामुळे पदभरती प्रक्रियेला विलंब होत असून शाळांमधील शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थापनावर गंभीर परिणाम होत आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध शिक्षकेतर कर्मचारी संघटना, मुख्याध्यापक संघटना आणि संस्थाचालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केलं.
आंदोलनादरम्यान, शिक्षण संचालकांचे पत्रक फाडून त्याचा निषेध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सेक्रेटरी शिवाजी खांडेकर, संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष विजय कोलते, मुख्याध्यापक महामंडळाचे सेक्रेटरी नंदकुमार सागर, तसेच अन्य पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते. यानंतर यासंदर्भातील निवेदन अपर्णा देशपांडे, नायब तहसीलदार यांना देण्यात आले.
अप्पर ओटा परिसरातील लाईट समस्येवर तातडीने उपाय; मा. नगरसेविका रुपाली धाडवे यांचा पुढाकार
Newsworldmarathi Pune : प्रभाग क्रमांक अ 37, अप्पर ओटा (276) भागातील नागरिकांना गेल्या काही काळापासून सातत्याने लाईटच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे नागरिकांचे हाल सुरू होते. ही बाब मा. नगरसेविका रुपाली दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तातडीने या समस्येकडे लक्ष दिले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी तत्काळ योग्य त्या उपाययोजना राबवण्याची मागणी केली. विशेष म्हणजे स्वखर्चातून बसबार बसविण्याची जबाबदारी स्वतः रुपाली धाडवे यांनी स्वीकारली आणि काम तात्काळ पूर्ण करून दिले.
या कामानंतर मा. नगरसेविका धाडवे स्वतः अप्पर ओटा भागात भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून इतर अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनीही यावेळी आपली मते मांडत समाधान व्यक्त केले.
हा उपक्रम म्हणजे समस्या ऐकून घेऊन तातडीने कृती करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा आदर्श उदाहरण ठरतो. नागरिकांनी या कामाबद्दल मा. नगरसेविका रुपाली धाडवे यांचे आभार मानले आहेत.
प्रेमाच्या छायेत दडलेलं अंधाराचं कटू सत्य… शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित
Newsworldmarathi Pune: ‘सजना’ हा एक खास आगळावेगळा मराठी चित्रपट २७ जून २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सूड! मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे ‘सजना’ चित्रपट, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून, तो एक खास प्रसंग ठरला आहे. या ट्रेलरचे थेट प्रक्षेपण मराठीतील मनोरंजनशी संबंधित विविध चॅनेलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर करण्यात आले.
या ट्रेलरच्या माध्यमातून सजना चित्रपटाची एक खास झलक समोर येते. सुंदर प्रेमाची सुरुवात, विचारसरणीतील अंतर, भावनिक संघर्ष, सुडाची भावना आणि प्रत्येक वळणावर धक्कादायक ट्विस्ट यात पाहायला मिळणार आहे. नायक आणि नायिकेच्या आयुष्यात येणारे संघर्ष, मैत्रीचं प्रेमात रूपांतर, प्रेमाचं तुटणं आणि त्यातून उगम पावणारा सूड हे सगळं अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. प्रत्येक वळणावर गोष्ट बदलते, पात्रांचे रंग बदलतात आणि कथा एका अनपेक्षित शेवटाकडे प्रवास करते. शेवट अकल्पनीय आहे.
जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की सारं काही संपलं आहे, तेव्हाच ही कथा एक अनपेक्षित वळण घेते जी प्रेक्षकांचे मन सुन्न केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एक विलक्षण सिनेमॅटिक अनुभव सिनेप्रेमींना या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे.
‘सजना’ या चित्रपटाची निर्मिती शशिकांत धोत्रे यांनी केली असून कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनही धोत्रे यांचेच आहे. छायाचित्रण रणजित माने यांनी केलं आहे. संगीत ओंकारस्वरूप यांचं असून सिनेमातील रोमान्टिक गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली बनली आहेत.
https://youtu.be/67FR6YMbXOQ?si=yg1QCmHkbT5HkJzU
वन्यजीव संरक्षण कायद्यात सुधारणा करण्यासाठी तज्ञांची समिती नेमवी; राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Newsworldmarathi Pune: मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी वन्यजीव कायद्यात सुधारणा तसेच पावसाळ्यात सह्याद्री रांगांच्या परिसरातील दरड कोसळू नये याबाबत उपाय योजना करण्यासाठी जागतिक पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमावी व त्यांच्या अहवालानुसार कार्यवाही करावी अशी विनंती राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबतचे पत्र त्यांनी ई-मेल द्वारे पाठवले आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, जागतिक दर्जाचे ज्येष्ट पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्याशी मी नुकत्याच चर्चा केली. महाराष्ट्रातील वन्यजीव संरक्षण कायद्यात काळानुसार बदल करणे व सह्याद्री रांगांच्या परिसरातील दरडी कोसळणे यावर उपाय योजना करण्याबाबत या भेटीत मी त्यांच्याशी विशेष चर्चा केली.
या चर्चेत वेगाने होणारे शहरीकरण, जंगलांचा होणारा ऱ्हास, शेती पद्धतीत होणारे बदल, वन्यजीवांच्या संख्येतील प्रादेशिक चढउतार यामुळे मानव आणि जंगली प्राणी यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे ते म्हणाले. अनेकदा जंगली प्राणी मानवी वस्तीत येऊन मानव तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत. रानडुक्कर, हत्ती, माकड यांसारखे प्राणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. मात्र वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मुळे आपण जंगली प्राण्यांना इजा पोहचवू शकत नाही. केरळने या कायद्यात सुधारणा करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. महाराष्ट्रातही अशा जंगली प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
मात्र या प्राण्यांना मारण्याची किंवा त्यांना इजा पोहचवण्याची परवानगी या कायद्यानुसार कोणालाही नाही. किंबहुना आपत्कालीन स्थितीत नुकसान करणाऱ्या प्राण्यांना मारण्यासाठी अनेक जाचक अटी आहेत. मानव आणि जंगली प्राणी दोघेही त्यांच्या अधिवासात सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी या कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. डॉ. गाडगीळ यांनी या समस्या सोडवण्यासाठी तज्ञांची समिति नेमणे आवश्यक असल्याचे सांगितले.
डॉ, गाडगीळ यांच्या व्यापक अभ्यासानुसार येत्या काही दिवसांत सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची आणि त्यातून पर्यावरण व मनुष्य हानी होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी डॉ. गाडगीळ यांना संबंधित जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांनी भेटून उपाययोजना सुरू कराव्यात. सध्या हवामानातील बदल आणि पाऊस यामुळे याबाबत तातडीने आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का ! 35 पदाधिकारी करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Newsworldmarathi kolhapur: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेत राजकीय घडामोडींनी जोर धरला आहे. काँग्रेसला मोठा झटका देत तब्बल 35 पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या रविवारी (22 जून 2025) मुंबईत होणाऱ्या या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी तयारी सुरू असून, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह 12 प्रमुख नेते पहिल्या टप्प्यात दाखल होणार आहेत.
शिवसेनेचा बालेकिल्ला मजबूत
कोल्हापूर हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असून, शिंदे गट निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी जोमाने कामाला लागला आहे. शिंदे यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांना काँग्रेस नेत्यांना गळाला लावण्याची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये दोन माजी महापौर, उपमहापौर आणि माजी नगरसेवकांचा समावेश असलेली 35 जणांची यादी तयार झाली असून, टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहे.
देशमुखांचा मोठा निर्णय
काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी नुकतीच शिंदे यांची भेट घेतली असून, त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. रविवारी होणाऱ्या सोहळ्यात देशमुख यांच्यासह 12 नेते शिवसेनेत दाखल होतील, तर पुढील टप्प्यात इतर पदाधिकारीही प्रवेश करणार आहेत. या हालचालींनी कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ माजली असून, काँग्रेसला मोठं भगदाड पत्करावं लागणार आहे.
पुण्यातील फायरब्रँड महिला नेत्याची शिंदे गटात एन्ट्री
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश सचिव सोनाली मारणे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज दुपारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. पक्षातील अंतर्गत कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
कोची-दिल्ली विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग, 157 प्रवाशांचा जीव धोक्यात?
Newsworldmarathi Nagapur: Emergency Landing : कोचीहून दिल्लीकडे रवाना झालेल्या इंडिगो विमानाला (फ्लाइट नं. 6E 2706) मंगळवारी (17 जून ) दुपारी बॉम्ब धमकीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. विमानात 157 प्रवासी आणि क्रू मेंबर्स असताना ही धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. विमान सुखरूप उतरल्यानंतर सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, आता विमानाची कसून तपासणी सुरू आहे. या घटनेमुळे विमानतळावर एकच गोंधळ निर्माण झाला आहे.
धमकीनंतर तातडीची कारवाई
विमान सकाळी 9.20 वाजता कोचीहून उड्डाण करून दुपारी 12.35 वाजता दिल्लीत पोहोचणार होते. मात्र, मध्यंतरी बॉम्ब असल्याचा इशारा मिळताच पायलटने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (ATC) संपर्क साधला आणि नागपुरात आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. लँडिंगनंतर पोलीस, बॉम्बशोधक पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, प्रवाशांचीही चौकशी सुरू आहे. आतापर्यंत तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही.
सुरक्षा व्यवस्था कडक
याआधी विमानांमध्ये बॉम्ब धमक्या मिळाल्या असल्या तरी त्यातून ठोस पुरावा मिळाला नव्हता. तरीही या प्रकरणात कोणतीही जोखीम न घेता प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. नागपूर विमानतळावर सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली असून, इतर विमानांच्या उड्डाण-लँडिंगवरही लक्ष ठेवले जात आहे. धमकीचा हेतू आणि सत्यता याबाबत तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्टता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या सर्वांचे लक्ष पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाच्या तपासाकडे लागले आहे.
काम एकाच रस्त्याचं, पण भूमिपूजन दोन; भोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाचा संघर्ष
Newsworldmarathi Pune: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी एकाच रस्त्याचं दोन वेळा भूमिपूजन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांकडून करण्यात आलं आहे.
७ जून रोजी खासदार सुप्रिया सुळे यांनी या रस्त्याचे भूमिपूजन केलं होतं. या रस्त्याच्या कामासाठी त्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुप्रिया सुळे यांनी ९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केलं होतं. त्यानंतर पीएमआरडीएकडून २ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता.
मात्र, काल अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते त्याच रस्त्याचं पुन्हा भूमिपूजन करण्यात आलं. त्यामुळे आता या रस्त्याच्या कामावरून दोन्ही गटांमध्ये श्रेयवाद चांगलाच रंगलेला पाहायला मिळतो आहे.
एका रस्त्याचं दोन वेळा भूमिपूजन केल्याने स्थानिकांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. काम लवकर व्हावं ही स्थानिकांची अपेक्षा असली तरी राजकीय गटांमधील श्रेय घेण्याची स्पर्धा सध्या केंद्रस्थानी आली आहे.
वरंधा घाट मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद; प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
**
पुणे – पुण्याहून भोरमार्गे कोकणात, विशेषतः महाडकडे जाणाऱ्या वरंधा घाट मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीसाठी वरंध घाट मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, हवामान खात्याच्या रेड आणि ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर, मुसळधार पावसाच्या दिवसांत हलक्या वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूकही बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पावसाळ्यात वरंधा घाटात दरवर्षी दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, रस्ते खचणे आणि माती वाहून जाणे अशा घटना घडतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि अपघातांची शक्यता वाढते. यंदा घाट रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला असून, वाहनधारकांसाठी धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले असून, नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पंढरीच्या वारीची लगबग ! संत ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज पालख्यांचे 18-19 जूनला प्रस्थान, वाचा संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लीकवर…
Newsworldmarathi Pune: पावसाळ्याच्या आगमनासोबतच विठ्ठल भक्तांच्या मनात पंढरीच्या वारीची ओढ जागी होते. “माऊली… माऊली…”चा गजर करत हजारो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत येतात.
यंदा 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी असून, मानाच्या 10 पालख्यांसह लाखो भक्त पंढरीच्या वाटेवर भक्तीत लीन होत आहेत. यामध्ये आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूतील संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. अनुक्रमे 18 आणि 19 जून रोजी या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वेळापत्रक 2025
19 जून: आळंदीहून प्रस्थान (गुरुवारमुळे संध्याकाळी 8 वाजता)
20 जून: आळंदी ते पुणे
21 जून: पुणे मुक्काम
22 जून: पुणे ते सासवड (दिवेघाटात वारकरी खेळ)
23 जून: सासवड मुक्काम
24 जून: सासवड ते जेजुरी (भंडारा उधळण)
25 जून: जेजुरी ते वाल्हे (खंडोबा दर्शन)
26 जून: वाल्हे ते लोणंद (सातारा जिल्हा प्रवेश)
27 जून: लोणंद ते तरडगाव
28 जून: तरडगाव ते फलटण
29 जून: फलटण ते बरड
30 जून: बरड ते नातेपुते (सोलापूर जिल्हा प्रवेश, बरड येथे गोल रिंगण)
1 जुलै: नातेपुते ते माळशिरस (सदाशिवनगर येथे गोल रिंगण)
2 जुलै: माळशिरस ते वेळापूर (खुडूस येथे गोल रिंगण)
3 जुलै: वेळापूर ते भंडी शेगाव (ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण, टप्पा येथे बंधू भेट)
4 जुलै: भंडी शेगाव ते वाखरी (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
5 जुलै: वाखरी ते पंढरपूर, पौर्णिमेपर्यंत मुक्काम (वाखरी येथे गोल रिंगण)
6 जुलै: आषाढी एकादशी, नगरप्रदक्षिणा
10 जुलै: पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास
संत तुकाराम महाराज पालखी वेळापत्रक 2025
18 जून: देहू येथे प्रस्थान, इनामदार वाड्यात मुक्काम
19 जून: देहू ते निगडी-आकुर्डी, आकुर्डी मुक्काम
20 जून: आकुर्डी ते पुणे (नाना पेठ मुक्काम)
21 जून: पुणे (निवडुंगा विठ्ठल मंदिर मुक्काम)
22 जून: पुणे ते हडपसर-लोणी काळभोर, मुक्काम
23 जून: लोणी काळभोर ते यवत, मुक्काम
24 जून: यवत ते वरवंड चौफुला, मुक्काम
25 जून: वरवंड ते उंडवडी गवळ्याची, मुक्काम
26 जून: उंडवडी गवळ्याची ते बारामती, मुक्काम
27 जून: बारामती ते सणसर (काटेवाडी येथे मेंढी-बकऱ्यांचे रिंगण)
28 जून: सणसर ते बेलवाडी-निमगाव केतकी, मुक्काम (बेलवाडी येथे गोल रिंगण)
29 जून: निमगाव केतकी ते इंदापूर, मुक्काम (इंदापूर येथे गोल रिंगण)
30 जून: इंदापूर ते सराटी, मुक्काम
1 जुलै: सराटी ते अकलूज, मुक्काम (सोलापूर जिल्हा प्रवेश, अकलूज येथे गोल रिंगण)
2 जुलै: अकलूज ते बोरगाव, मुक्काम (माळीनगर येथे उभे रिंगण)
3 जुलै: बोरगाव ते पिराची कुरोली, मुक्काम
4 जुलै: पिराची कुरोली ते वाखरी, मुक्काम (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
5 जुलै: वाखरी ते पंढरपूर, मुक्काम (वाखरी येथे उभे रिंगण)
6 जुलै: आषाढी एकादशी, नगरप्रदक्षिणा, चंद्रभागा स्नान
10 जुलै: पंढरपुरातून देहूकडे परतीचा प्रवास
वारीची तयारी जोमात
ऊन-पावसाची पर्वा न करता विठुरायाच्या भक्तीने भारलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर चालतात. यंदाच्या वारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या सहभागी होत असून, प्रशासनानेही तयारी पूर्ण केली आहे. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे हे वेळापत्रक वारकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
नाशिक ते मुंबई….! सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशावर सस्पेन्स; बावनकुळेंना अंधारात ठेवत पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील, नेमकं काय घडलं?
BJP Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मधून हकालपट्टी झालेले नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला मंगळवारी (17 जून) दुपारी 1 वाजता मुहूर्त ठरला आहे. मात्र, या प्रवेशापूर्वी रात्री उशिरा पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत हिरवा कंदील मिळाला असला, तरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना याची माहितीच नव्हती, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बडगुजर हजारो समर्थकांसह मुंबईला रवाना झाले असताना, बावनकुळेंच्या अनभिज्ञतेच्या वक्तव्याने पक्षप्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली होती.
बावनकुळे काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, “बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत मला काहीच माहिती नाही. स्थानिक पदाधिकारी, खासदार आणि आमदारांशी सल्लामसलत न झाल्यास पक्षप्रवेश होत नाही. नाशिकमधील स्थानिक नेत्यांचा बडगुजरांच्या प्रवेशाला विरोध आहे, कारण निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात लढलो आहोत.” स्थानिक पातळीवरील नाराजी आणि गेल्या निवडणुकीतील वैरामुळे बडगुजरांचा प्रवेश रोखला जाऊ शकतो, असे त्यांनी सूचित केले.
बडगुजरांचा आत्मविश्वास
बावनकुळेंच्या वक्तव्याने संभ्रम निर्माण झाला असताना, बडगुजरांनी मात्र आत्मविश्वास दाखवला. “मी मुंबईत गेल्यावर सर्व काही स्पष्ट होईल. सर्व ठरलं आहे, त्याशिवाय मी जातोय का?” असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला. पक्षश्रेष्ठींच्या रात्रीच्या बैठकीत प्रवेशाला मंजुरी मिळाल्याने बडगुजरांचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिकच्या राजकारणात खळबळ
शिवसेना (UBT) मधून शिस्तभंगाच्या कारणास्तव हकालपट्टी झालेल्या बडगुजरांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले. मात्र, नाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आणि बावनकुळेंना माहिती नसल्याने हा प्रवेश सावळा गोंधळात सापडला होता. आता पक्षश्रेष्ठींच्या मंजुरीनंतर बडगुजरांचा प्रवेश निश्चित मानला जात असून, यामुळे नाशिकच्या राजकारणात नवे वादळ येण्याची शक्यता आहे.

