आनंददायी शिक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध; नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची ग्वाही
Newsworldmarathi Pune: विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची वाटावी यासाठी कृतीयुक्त आनंददायी शिक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक कलानुसार करिअरसाठी आवडीचे कौशल्य विकास शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
बिबवेवाडीतील पुणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात ‘शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमा’च्या निमित्ताने, विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करताना मिसाळ बोलत होत्या. सहाय्यक शिक्षणप्रमुख सुभाष रावत, जयेश शेंडकर, पर्यवेक्षिका शोभा घोडे आणि मुख्याध्यापिका आरती पोळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मिसाळ म्हणाल्या, “आजपासूनच राज्यातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणात क्रांतिकारी बदल होत आहेत. केवळ पाठांतरावर भर न देता, अनुभवावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. खेळ, गाणी, गोष्टी, कोडी, नाटक, चित्रकला, प्रकल्प यांचा शिक्षणात समावेश असेल. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील आणि शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल.”
मुलांनो खूप मोठे व्हा आम्ही तुमचा पाठीशी आहोत; सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा
Newsworldmarathi Pune: मुलांनो, तुमच्यावर आलेले संकट हे दुर्दैवी आहे तरीपण तुम्ही त्याच्यातून उभे राहा, खूप खूप शिका तुम्हाला शिक्षणासाठी जी काय मदत लागेल ती करायला मी स्वतः आणि सर्व पुणेकर सदैव तयार राहतील असे प्रतिपादन पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी व्यक्त केले.
पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने पुण्य जागर या प्रकल्पांतर्गत गेली दहा वर्षे अर्धापूर, जि. नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. या मुलांचा शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ मा. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर ,माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उद्योगपती कृष्णकुमार गोयल, ललित जैन, शिक्षण तज्ञ डॉ. फुलचंद चाटे,श्रीमती प्रमिला गायकवाड, अजय पाटील , विचारवंत श्रीकांत शिरोळे, ज्येष्ठ विधीज्ञ एड. प्रताप परदेशी, एड. शिवराज कदम, प्रशांत गोरे, सुपर माईंड च्या अर्चिता मडके आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पाचे समन्वयक आणि भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.मिलिंद भोई यांनी या प्रकल्पाची माहिती देताना, नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले पुण्यातील अस्तित्व गुरुकुल या निवासी शाळेत शिक्षण घेत असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावला आहे. ही आपल्या सर्वांसाठी समाधानाची बाब आहे असे सांगून अजूनही नांदेड मधील अर्धापूर बरोबरच इतर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची साडेतीनशे विद्यार्थी या प्रकल्पातून शिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहेत असे सांगितले.
पुण्यातील शिक्षण तज्ञ डॉ. फुलचंद चाटे, प्रा. सुधाकर जाधवर, कृष्णकुमार गोयल, ललित जैन, श्रीमती प्रमिला गायकवाड, अजय पाटील या संवेदनशील पुणेकरांनी त्वरित या साडेतीनशे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पालकत्व घेण्याची तयारी दर्शवली आणि या मुलांना चांगले नागरिक घडवण्यासाठी जे काही लागेल ते मदत करण्याचे आश्वासन दिले.
आता लवकरच नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या साडेतीनशे मुलांचा या प्रकल्पात प्रवेश निश्चित झाला असून त्यांच्या प्रगतीसाठी पुणेकर सदैव कार्यरत राहणार आहेत.
या प्रकल्पातील विद्यार्थिनी दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले यांनी मनोगत व्यक्त करताना , आमचे वडील गेल्यानंतर आम्ही शेती कामात आईला मदत करत होतो त्यामुळे आमचे शिक्षण थांबले होते पण या प्रकल्पामुळे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये आम्हाला शिक्षण घेण्याचे संधी मिळाली हे आमचे भाग्य असून या संधीचे आम्ही नक्की सोने करू करून दाखवू असे प्रतिपादन करताच उपस्थित त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी बोलताना केवळ वडिलांनी आत्महत्या केली म्हणून तुम्ही शिक्षण अर्धवट सोडू नका, तुम्ही फक्त जिद्द धरा आम्ही भोई फाउंडेशनच्या माध्यमातून सदैव तुमच्या पाठीशी राऊ असा विश्वास या विद्यार्थ्यांना दिला. या निमित्ताने इयत्ता दहावी आणि बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला .
मराठवाडा आणि विदर्भातील विविध तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिले. आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले.उदय जगताप यांनी आभार प्रदर्शन केले.
मोठी बातमी…! देशात दोन टप्प्यात जनगणना होणार; केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी, जाणून घ्या सर्वेक्षणाच्या 10 महत्त्वाच्या बाबी!
Newsworldmarathi Delhi : केंद्र सरकारने 2027 मध्ये होणाऱ्या जातनिहाय जनगणनेसाठी अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा करताना सांगितले की, ही जनगणना दोन टप्प्यांत होईल आणि डिजिटल पद्धतीने पार पडेल. यासाठी 34 लाख सर्वेक्षक आणि 1.3 लाख जनगणना अधिकारी देशभरात घरोघरी आणि शेतात जाऊन माहिती गोळा करतील.
ही जनगणना मोबाईल ॲप्लिकेशन आणि स्वगणना सुविधा यांच्या माध्यमातून पूर्ण होईल. देशाच्या स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि एकूण सोळावी जनगणना असणाऱ्या या सर्वेक्षणाबाबत 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
2027 जनगणनेच्या 10 महत्त्वाच्या बाबी
दोन टप्प्यांत सर्वेक्षण: जनगणना दोन टप्प्यांत होईल. पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि मोजणी (HLO) केली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक माहिती गोळा केली जाईल.
जातनिहाय माहिती: यावेळी प्रथमच जातनिहाय जनगणना होणार असून, प्रत्येक व्यक्तीच्या जातीबाबत प्रश्न विचारले जातील.
डिजिटल पद्धत: संपूर्ण जनगणना मोबाईल ॲप्लिकेशन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे होईल, ज्यामुळे प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल.
घरांची मोजणी: पहिल्या टप्प्यात प्रत्येक कुटुंबाची निवासी स्थिती, मालमत्ता, आणि सुविधा यांची माहिती गोळा केली जाईल.
विशाल मनुष्यबळ: 34 लाख सर्वेक्षक आणि 1.3 लाख जनगणना अधिकारी देशभरात घरोघरी आणि शेतात जाऊन माहिती गोळा करतील. यामुळे संपूर्ण डेटाचा डिजिटल रेकॉर्ड तयार होईल.
स्वगणना सुविधा: नागरिकांना स्वगणना (सेल्फ-एन्युमरेशन) ची सुविधा उपलब्ध असेल, ज्यामुळे ते स्वतः ऑनलाइन माहिती भरू शकतील.
डेटा गोपनीयता: डेटा गोळा करणे, हस्तांतरित करणे आणि साठवणे यासाठी कठोर गोपनीयता आणि सुरक्षितता व्यवस्था लागू केली जाईल, जेणेकरून डेटा गळती होणार नाही.
संदर्भ तारीख: देशातील बहुतांश भागांसाठी जनगणनेची संदर्भ तारीख 1 मार्च 2027 असेल, तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील बर्फाच्छादित भागांसाठी 1 ऑक्टोबर 2026 असेल.
ऐतिहासिक संदर्भ: ही जनगणना स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि एकूण सोळावी जनगणना आहे, जी भारताच्या सामाजिक-आर्थिक संरचनेचा सर्वसमावेशक आढावा घेईल.
2019 अधिसूचनेची रद्दबातल: 2019 मधील जनगणना अधिसूचना रद्द करण्यात आली आहे, परंतु त्याअंतर्गत केलेली कार्यवाही वैध राहील.
अधिसूचनेचा तपशील
जारी तारीख: 16 जून 2025 रोजी भारत सरकारने अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी केली.
जनगणना वर्ष: 2027 मध्ये जनगणना सुरू होईल.
क्षेत्रीय व्याप्ती: संपूर्ण भारतात, विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागात सर्वेक्षण होईल.
डेटा संरक्षण: डेटाची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील.
प्रकाशन: अधिसूचना भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने जनगणनेसाठी व्यापक तयारी केली आहे. 34 लाख सर्वेक्षक आणि 1.3 लाख जनगणना अधिकारी यांचे प्रशिक्षण आणि तैनाती युद्धपातळीवर सुरू आहे. मोबाईल ॲप्लिकेशन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मची चाचणी पूर्ण झाली असून, डेटा सुरक्षिततेसाठी सायबर सुरक्षा उपाय लागू केले जाणार आहेत. गृहमंत्रालयाने सांगितले की, “ही जनगणना भारताच्या सामाजिक-आर्थिक संरचनेचा सर्वसमावेशक आढावा घेईल आणि विकासाच्या नव्या दिशा ठरवेल.”
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…! आता रांगेत ताटकळण्याची गरज नाही; एसटी पास थेट तुमच्या शाळेत
Newsworldmarathi Mumbai: महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एक दिलासादायक पाऊल उचलत, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (MSRTC) ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबवणार आहे. या योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांना मासिक पास मिळवण्यासाठी आगारात किंवा पास केंद्रावर रांगेत ताटकळावे लागणार नाही.
आता एसटीचे पास थेट शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री आणि MSRTC चे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राला 16 जूनपासून सुरुवात होत असताना, ही मोहीम विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचवणार आहे.
‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’
नवीन शैक्षणिक वर्ष 16 जून 2025 पासून सुरू होत आहे. यानिमित्ताने, MSRTC ने विद्यार्थ्यांसाठी प्रवास सुलभ आणि त्रासमुक्त करण्यासाठी ही अभिनव मोहीम हाती घेतली आहे. शासनाच्या धोरणानुसार, विद्यार्थ्यांना 66.66 टक्के सवलत देऊन केवळ 33.33 टक्के भाडे भरून मासिक पास मिळतो. यामुळे विद्यार्थ्यांना घरापासून शाळा-महाविद्यालयापर्यंतचा प्रवास परवडणारा होतो.
मोफत पास योजना
‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत, बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पास उपलब्ध करून दिले जातात. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळत आहे.
यापूर्वी विद्यार्थ्यांना पास मिळवण्यासाठी एसटी आगारात किंवा पास केंद्रावर लांबचलांब रांगेत थांबावे लागत होते. आता शाळा आणि महाविद्यालयांनी पुरवलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीच्या आधारे, MSRTC चे कर्मचारी थेट शाळेत जाऊन पास वितरित करतील. यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही.
MSRTC ने सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना पत्र पाठवून, पासची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. ही यादी आगार व्यवस्थापकांना सादर केल्यानंतर, पास वितरणाची प्रक्रिया त्वरित सुरू होईल.
मोहिमेचा उद्देश आणि फायदे
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले, “विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात येत आहे. ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ योजनेद्वारे विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचतील, आणि त्यांना प्रवासासाठी सवलतीचे किंवा मोफत पास सहज उपलब्ध होतील.”
या योजनेचे प्रमुख फायदे:
वेळेची बचत: विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळण्याची गरज नाही, आणि त्यांचा शैक्षणिक वेळ वाचेल.
सुलभ प्रवास: सवलतीच्या आणि मोफत पासमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक बोजा न पडता नियमित प्रवास करता येईल.
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन: ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत मुलींना मोफत पास मिळतील, ज्यामुळे त्यांचे शिक्षण सुलभ होईल.
प्रशासकीय कार्यक्षमता: शाळा आणि MSRTC यांच्यातील समन्वयामुळे पास वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होईल.
प्रशासनाची तयारी
MSRTC ने या मोहिमेची तयारी पूर्ण केली आहे. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना पत्र पाठवून, विद्यार्थ्यांच्या यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. MSRTC चे आगार व्यवस्थापक यादीच्या आधारे पास तयार करतील आणि शाळांमध्ये वितरणासाठी पाठवतील. ही मोहीम 16 जूनपासून सुरू होत असून, येत्या काही आठवड्यांत राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
ही मोहीम विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार आहे. अनेक विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांसाठी लांबचा प्रवास करतात, आणि सवलतीचे पास त्यांच्यासाठी मोठा आधार आहे. एका विद्यार्थ्याने सांगितले, “आम्हाला पाससाठी आगारात जावे लागायचे, आणि तिथे खूप वेळ लागायचा. आता पास शाळेतच मिळणार असल्याने खूप सोपे होईल.”
भुगांव येथे बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Newsworldmarathi Pune : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या भुगांव परिसरात बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भुगांव येथील खंडोबा मंदिर रस्त्यावर रात्रीच्या सुमारास बिबट्या मुक्तपणे संचार करताना दिसला. या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला आहे.
सदर प्रवासी रात्री त्या रस्त्यावरून वाहनातून प्रवास करत असताना अचानक त्याच्या गाडीसमोर बिबट्या आला. या प्रसंगी सजगतेने मोबाईल काढून त्या व्यक्तीने बिबट्याचा संपूर्ण व्हिडीओ शूट केला. व्हिडीओमध्ये बिबट्या वॉल कंपाउंडच्या भिंतीवरून फिरताना स्पष्टपणे दिसत आहे.
अलीकडच्या काही दिवसांत भुगांव परिसरात बिबट्याचे अनेकदा दर्शन झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरी वस्तीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लहान मुले, शाळकरी विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. अनुचित घटना घडू नयेत यासाठी वनविभागाने तात्काळ पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
मंत्री राठोड यांच्या ताफ्यातील पोलिस गाडीचा अपघात
Newsworldmarathi Akola : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असून आता राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात होताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याही ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून यात ४ पोलिस शिपाई जखमी झाले आहेत.
हा अपघात अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजूजवळ झाला आहे. तर या अपघाताची भिषणता इतकी होती की वाहनाने तब्बल तीनवेळी पलटी खाली होती. सुदैवाने कोणतेही जीवितहानी झालेली नसून जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की मंत्री राठोड यांचा जळगाव जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा ठरला होता. त्याप्रमाणे आजचा पहिला दिवस होता. ते जळगाव येथील पोलिसांचा कार्यक्रम संपवून पुढच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील नागपूर पोलिसांच्या वाहनाचा समोरील डाव्या बाजूचा टायर फुटला. यामुळे वाहनाने तब्बत तीन वेळी पलटी खाली. ज्यात चार पोलिस शिपाई अनिल ओंकार मडपाडे, फहीम खान अस्लम खान, प्रफुल वाळके आणि अनिल मडपाडे हे जखमी झाले.
या जखमी पोलिसांना तातडीने अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर येथे त्यांच्यावर उपचार केले जातायत. दरम्यान मंत्री राठोड यांनी जखमी पोलिसांची भेट रूग्णालयात येऊन घेतली असून त्यांनी त्यांची विचारपूस केली आहे.
दरम्यान या अपघातात एका पोलिसाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत असून त्याच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. तर इतर पोलिसांना पाठीवर आणि इतर ठिकाणी मुक्कामार लागला आहे.
राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार? घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
Newsworldmarathi Mumbai: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील जुन्या लोखंडी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. रविवारी (15 जून 2025) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, 32 जण जखमी झाले, तर 2-3 जण अजूनही बेपत्ता असण्याची शक्यता आहे.
या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये नुकसानभरपाई आणि जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे जाहीर केले आहे.
कुंडमळा पूल दुर्घटना; नेमकं काय घडले?
मावळ तालुक्यातील कुंडमळा हे इंद्रायणी नदीवरील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे, विशेषतः पावसाळ्यात येथील धबधबा आणि नदीचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. रविवारी, सुट्टीचा दिवस असल्याने 100 हून अधिक पर्यटक या 30 वर्षांहून अधिक जुन्या लोखंडी पुलावर उपस्थित होते.
हा पूल आधीच जीर्ण झाला असून, त्यावर “प्रवासासाठी अयोग्य” असा फलक लावण्यात आला होता. तरीही, पर्यटकांनी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गर्दी केली, आणि काहींनी दुचाकीही पुलावर चढवल्या. अचानक मोठा आवाज होऊन पूल कोसळला, आणि अनेकजण नदीच्या तीव्र प्रवाहात पडले.
आतापर्यंत या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. 32 जण जखमी झाले असून, यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींवर पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर तळेगाव दाभाडे येथील मायमर आणि अथर्व रुग्णालयात इतर जखमींवर उपचार झाले. काही किरकोळ जखमींना घरी सोडण्यात आले.
NDRF, स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि गावकऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 51 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. रविवारी रात्री अंधारामुळे बचावकार्य थांबवण्यात आले, परंतु सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू झाली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, 2-3 जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले असण्याची शक्यता आहे. NDRF सध्या त्यांचा शोध घेत आहे.
मावळ तालुक्यात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळीही मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे इंद्रायणी नदीचा प्रवाह तीव्र झाला आहे. यामुळे NDRF समोर बचावकार्याचे मोठे आव्हान आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश
दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून खालील निर्देश दिले:
बचावकार्याला वेग: NDRF च्या तुकड्या, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्या. शिंदे यांनी बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश दिले.
स्ट्रक्चरल ऑडिट: अशा दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्याचे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिले. यामुळे जीर्ण आणि धोकादायक पूल ओळखून त्यांची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी केली जाणार आहे.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज: पर्यटनस्थळांवर, विशेषतः सुट्टीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा तत्पर ठेवावी, असे शिंदे यांनी सांगितले.
शिंदे यांनी या दुर्घटनेसंदर्भात शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत की, यापुढे अशा घटना घडणार नाहीत,” असे त्यांनी नमूद केले.
थोडक्यात बचावलेले योगेश भंडारे यांनी सांगितलं अनुभव
या दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेले योगेश भंडारे यांनी सांगितले, “पुलावर 100 हून अधिक लोक होते. लोकांना ‘घाई करू नका’ असा इशारा दिला गेला, पण कोणी ऐकले नाही. मी तिघांचा मृत्यू डोळ्यांनी पाहिला. पूल कोसळताच सगळे पाण्यात पडलो.” स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, पावसाळ्यात कुंडमळा परिसरात मोठी गर्दी होते, आणि पूल हा सेल्फी पॉइंट म्हणून लोकप्रिय आहे.
पुण्यात कॉँग्रेसला आणखी एक झटका; सोनाली मारणे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम
Newsworldmarathi Pune : कॉँग्रेस पक्षामधून सुरू झालेले आऊट गोइंग थांबायला तयार नसल्याचे दिसते. सात वर्षे महिला पुणे शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या सोनाली मारणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठविल्याचे समजते. मारणे या सध्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर कार्यरत होत्या.
हर्षवर्धन सपकाळ यांना लिहिलेल्या पत्रात सोनाली मारणे यांनी म्हंटले आहे की, 2011 पासून कॉंग्रेस पक्षाची कार्यकर्ती म्हणून मी काम करत आहे. ज्याप्रमाणे विरोधी पक्ष म्हणून काम पक्षाने करायला हवा त्याप्रमाणे पक्ष काम करताना दिसत नाही याची खंत वाटते. जे काम करू शकतात त्यांना योग्य न्याय दिला जात नाही.
तसेच निवडणूक आकडेवारी पेक्षा कार्यकर्त्यांच्या भावनांकडे लक्ष देण्यात पक्षाला अपयश आल्याचे नमूद करत राष्ट्रीय कार्यकारणी कडून महाराष्ट्राला कायमच दुय्यम दर्जा दिला जात आहे, पक्षाकडे पुढील पंचवार्षिकसाठी कोणतीही योजना नाही असेही मारणे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
धक्कादायक खुलासा…! पुण्यातील 13 शाळा अनधिकृत, तर 24 शाळा चुकीच्या जागी; पालकांना सतर्कतेचा इशारा!
Newsworldmarathi Pune : शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात शालेय शिक्षणासंदर्भात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत 13 शाळा पूर्णपणे अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे, तर 24 शाळा मूळ जागेवर नसून दुसऱ्या ठिकाणी बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे आढळून आले आहे.
नवीन शालेय वर्षाच्या पहिल्याच दिवशी (16 जून 2025) ही माहिती समोर येताच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुणे जिल्हा परिषदेने पालकांना सतर्क राहण्याचे आणि अधिकृत मान्यता असलेल्या शाळांमध्येच प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे.
अनधिकृत शाळांचा धक्कादायक प्रकार
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून हा खुलासा झाला आहे. राइट टू एज्युकेशन (RTE) कायद्याचे उल्लंघन करत या 13 शाळा शासनाच्या परवानगीशिवाय आणि आवश्यक कागदपत्रांविना सुरू होत्या. याशिवाय, 24 शाळांनी शासनाची मान्यता घेतली असली, तरी त्या मंजूर केलेल्या जागेवर नसून दुसऱ्या ठिकाणी चालवल्या जात आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात असून, पालकांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय नाईकाडे यांनी सांगितले, “RTE कायद्याच्या तरतुदीनुसार, कोणतीही शाळा स्थानिक प्राधिकरणाची मान्यता आणि ना-हरकत प्रमाणपत्र (NoC) शिवाय सुरू करता येत नाही. या अनधिकृत शाळा कायद्याचे उल्लंघन करत असून, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पालकांनी आपल्या मुलांना अशा शाळांमध्ये प्रवेश देऊ नये.”
अनधिकृत शाळांची यादी
पुणे जिल्हा परिषदेने खालील 13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे:
एस.पी. इंग्लिश मिडियम स्कूल, वाघोली
कलर स्कूल, ताथवडे
न्यू विस्डम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे
किंग्जवे पब्लिक स्कूल, लोणावळा
माय स्कूल, ताथवडे
न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडियम स्कूल, बिबवेवाडी
आयडियल पब्लिक स्कूल, धायरी
महात्मा गांधी प्रशाला
टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब, कोंढवा
सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा
इमॅन्युअल पब्लिक स्कूल, हडपसर
मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल, सोलापूर रोड
आर्यन वर्ल्ड स्कूल, नऱ्हे
या शाळांनी शासनाची परवानगी न घेता प्रवेश प्रक्रिया आणि जाहिराती सुरू केल्या होत्या, जे कायद्याचे उल्लंघन आहे.
24 शाळा चुकीच्या जागी
तपासणीत असेही आढळले की, 24 शाळांना शासनाची मान्यता मिळाली असली, तरी त्या मंजूर केलेल्या ठिकाणी चालवल्या जात नाहीत. या शाळा मूळ जागेपासून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्या असून, याबाबत शासनाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे या शाळांचे अधिकृत दर्जाही संशयास्पद आहे. या शाळांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
प्रशासनाची कारवाई आणि पालकांना आवाहन
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या अनधिकृत शाळांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. RTE कायद्यांतर्गत या शाळांवर 1 लाख रुपये दंड आणि बंद न झाल्यास रोज 10,000 रुपये दंड आकारला जाईल. याशिवाय, काही शाळांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संजय नाईकाडे यांनी पालकांना आवाहन केले आहे की, “पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश देण्यापूर्वी शाळेची अधिकृतता तपासावी. यासाठी Unified District Information System for Education (U-DISE) पोर्टलवर शाळेची नोंदणी तपासावी. अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि पालकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.”
पुणे जिल्हा परिषदेने पालकांना खालील सूचना दिल्या आहेत:
शाळेची मान्यता तपासण्यासाठी स्थानिक पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.
U-DISE पोर्टलवर शाळेची नोंदणी आणि मान्यता तपासावी.
अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेणे टाळावे.
शाळेच्या प्रवेशद्वारावर “अनधिकृत शाळा” असा फलक आहे का, हे तपासावे.
पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
नवीन शालेय वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा खुलासा झाल्याने पालकांमध्ये संभ्रम आणि चिंता पसरली आहे. एका पालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “आम्ही मुलाला इंग्लिश मिडियम शाळेत प्रवेश दिला, पण ती अनधिकृत आहे हे कळलं तेव्हा धक्काच बसला. आता मुलाला दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागेल.”
पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक पालक इंग्लिश मिडियम शाळांमध्ये प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क भरतात. अशा परिस्थितीत अनधिकृत शाळांमुळे पालकांचा विश्वासघात होत असल्याची भावना आहे.
जिल्हा परिषदेची अनधिकृत शाळांवर कारवाई
पुणे जिल्हा परिषदेने यापूर्वीही अनधिकृत शाळांविरोधात कारवाई केली आहे. 2024 मध्ये, 49 अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती, त्यापैकी 13 शाळा बंद करण्यात आल्या आणि 10 शाळांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल झाले. याशिवाय, 5 शाळांना मान्यता मिळाली, तर 3 शाळांना सरकारकडून हेतुपत्र (Letter of Intent) प्राप्त झाले.
2023 मध्येही, पुणे जिल्ह्यात 12 अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती, आणि पालकांना आपल्या मुलांना या शाळांमधून काढून जवळच्या अधिकृत शाळांमध्ये प्रवेश देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
पुण्यात डेमू ट्रेनच्या डब्यात लागली आग, प्रचंड धूर अन् प्रवाशांची पळापळ
Newsworldmarathi Pune : Pune News : दौंड-पुणे डेमू धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग; प्रवाशांच्या समयसूचकतेने टळला मोठा अनर्थ!
दौंड : दौंडहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या दौंड-पुणे डेमू ट्रेनच्या तिसऱ्या बोगीतील शौचालयात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. ही घटना आज सोमवारी सकाळी 7:05 वाजता घडली आहे. धुराचे लोट आणि प्रवाशांच्या किंकाळ्यांनी ट्रेनमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.
सुदैवाने, काही धाडसी प्रवाशांनी समयसूचकता दाखवत शौचालयात अडकलेल्या एका व्यक्तीची सुटका केली, आणि तातडीच्या उपाययोजनांमुळे मोठा अनर्थ टळला. रेल्वे प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून, आगीचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दौंड-पुणे डेमू ट्रेन दररोज सकाळी 7:05 वाजता दौंड रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे रवाना होते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ही ट्रेन पुण्याच्या दिशेने निघाली होती. मात्र, दौंड आणि पुणे दरम्यानच्या मार्गावर, इंजिनपासून तिसऱ्या बोगीतील शौचालयात अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किट हे आगीचे कारण असावे, असा अंदाज आहे. आग लागताच बोगीत धुराचे लोट पसरले, आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
आग लागलेल्या शौचालयात एक व्यक्ती अडकली होती. दरवाजा लॉक झाल्याने तो उघडत नव्हता. या व्यक्तीने जोरजोरात आरडाओरड केल्याने इतर प्रवाशांच्या लक्षात आले. धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत असताना, काही धाडसी प्रवाशांनी तातडीने पुढाकार घेत दरवाजा तोडून त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले.
रेल्वेत लागलेल्या आग आणि धुरामुळे प्रवासी घाबरले, आणि जीव वाचवण्यासाठी काहींनी किंकाळ्या फोडत इकडे-तिकडे धावण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी तात्काळ ट्रेनच्या आपत्कालीन साखळी खेचून ट्रेन थांबवली. ट्रेन थांबवताच रेल्वे कर्मचारी आणि स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, आणि काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.
कोणतीही जीवितहानी नाही
या घटनेत प्रवाशांनी दाखवलेले धैर्य आणि समयसूचकता कौतुकास्पद आहे. शौचालयात अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी काही प्रवाशांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दरवाजा तोडला. एका प्रवाशाने सांगितले, “धूर आणि आगीच्या ज्वाळांनी आम्ही घाबरलो होतो, पण शौचालयातून येणारी आरडाओरड ऐकून आम्ही तातडीने दरवाजा तोडला. त्या व्यक्तीला वाचवणे गरजेचे होते.” आणखी एका प्रवाशाने नमूद केले, “आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले, आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.”
रेल्वे प्रशासनाची प्रतिक्रिया
रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी (DRM) सांगितले, “आगीचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचा अंदाज आहे. ट्रेनच्या सर्व बोग्यांचे तातडीने तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य आहे.” रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि तांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून, विद्युत यंत्रणेची तपासणी आणि शौचालयाच्या अवस्थेचा तपास सुरू आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे.
शॉर्ट सर्किटचा धोका
रेल्वे तज्ज्ञांच्या मते, डेमू ट्रेनच्या जुन्या बोग्यांमधील विद्युत यंत्रणेची झीज आणि अपुरी देखभाल यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. दौंड-पुणे डेमू ट्रेन ही स्थानिक प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे, परंतु तिच्या बोग्यांची नियमित तपासणी आणि दुरुस्ती यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वीही अशा ट्रेनमध्ये शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या असून, रेल्वे प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

