पावसामुळे शहरात वाहतूक नियोजन कोलमडले; वाहतूक पोलीस व महापालिकेची निष्क्रियता; रोहन सुरवसे यांचा आरोप

0
Newsworldmarathi Pune : शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहराचा ताळमेळच बिघडवला आहे. थोडा पाऊस पडला तरी रस्ते जलमय होणे, वाहतूक ठप्प होणे, पाणी तुंबणे आणि हाल होणे या गोष्टी आता पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. महापालिकेच्या पावसाळीपूर्व नियोजनातील अभाव आणि ढिसाळपणामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, खड्डेमुक्ती आणि रस्त्यांची देखभाल यासाठी नियोजन जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात शहराच्या विविध भागांमध्ये अजूनही नाले तुंबलेले आहेत, रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या वाढली आहे आणि अनेक ठिकाणी खोदकाम अपूर्ण अवस्थेत आहे. परिणामी, अगदी थोड्या पावसातही शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये गुडघाभर पाणी साचत आहे. चेंबरमधून पाण्याचे प्रवाह दिवसभर रस्त्यावर वाहत आहेत. पुण्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड कोंडी निर्माण होत आहे. मेट्रोचे काम, पाइपलाइन बदलण्याचे प्रकल्प, आणि रस्ते दुरुस्ती अशी अनेक कामे महापालिकेने एकाच वेळी सुरू ठेवली असून, यांचे योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. अपूर्ण कामांमुळे रस्त्यांवर चिखल, खड्डे आणि अडथळे निर्माण होत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस उपलब्ध नसतात त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे. पुणे महापालिकेने तातडीने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी अपूर्ण नालेसफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करणे, खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करणे, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे. नागरिकांकडून वेळोवेळी महापालिकेला सूचना, तक्रारी आणि मागण्या केली जात असल्या तरी त्याला प्रतिसाद अत्यंत कमी मिळत असल्याचे चित्र आहे.
पुणे महापालिकेकडून दरवर्षी सांगण्यात येते की, पावसाळ्याच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली आहे, मात्र प्रत्यक्षात ही हमी फसवी ठरत आहे. अपूर्ण नालेसफाई , रस्ते खोदकाम, विस्कळीत झालेले वाहतुकीचे नियोजन, प्रचंड वाहतूक कोंडी ही केवळ महापालिका प्रशासनाची निष्क्रियता नसून पुणेकरांच्या सुरक्षिततेशी आणि आरोग्याशी खेळ आहे.
-रोहन सुरवसे पाटील अध्यक्ष, स्वाभिमानी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य.

किल्ले सिंहगडावर वि.हिं.परिषदेतर्फे पालखी सोहळा थाटात

0
Newsworldmarathi Pune : जय भवानी, जय शिवराय… छत्रपती संभाजी महाराज की जय चा अखंड जयघोष… शंख, हलगी आणि पारंपरिक वाद्यांचा गजर… भंडारा व फुलांची उधळण… आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर झालेली पुष्पवृष्टी… अशा शिवमय वातावरणात सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित पालखी सोहळा थाटात साजरा झाला. तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्याकरिता भगवे झेंडे घेवून सिंहगडावर मानवंदना देण्यासाठी शिवभक्तांचा जनसागर लोटला. विश्व हिंदू परिषद, पुणे व श्री शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅलीने झाला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शिल्पाचे पूजन झाले. यावेळी सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उपाध्यक्ष शरद जगताप, विभाग मंत्री केतन घोडके, धनंजय गायकवाड यांसह शिवभक्त उपस्थित होते. अभिवादन सोहळ्याचे यंदाचे हे आठवे वर्ष होते. छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅली विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा या मार्गाने सिंहगडावरील वाहनतळ येथे आली. त्यानंतर सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत हलगी पथक, केशव शंखनाद पथक, ढोल ताशा पथक आदी सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन आणि सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील झाले. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्याकरिता सर्व शिवभक्तांना राजगडावर उपस्थित राहता येते असे नाही. त्यामुळे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक गड-किल्ल्यावर हा सोहळा साजरा व्हायला हवा. हिंदू साम्राज्य दिन म्हणून हा दिवस साजरा केला जात आहे. स्वराज्य हे आपल्या सगळ्यांचे राज्य आहे. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हा सोहळा साजरा होत असून ही कौस्तुकास्पद गोष्ट आहे. गडावर केवळ सोहळा साजरा न करता गड स्वच्छता आणि वृक्षारोपणासारखे सामाजिक उपक्रम होतात, ही चांगली बाब आहे. किशोर चव्हाण म्हणाले, भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शु. त्रयोदशी नृपशालिवाहन शके १५९६ या दिवशी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. या घटनेने हिंदूचे सार्वभौमत्व पुनप्रस्थापित झाले.,म्हणून हा दिन सर्वांनी हिंदू साम्राज्य दिन म्हणून गौरवीला पाहिजे. या प्रसंगाचे मूक साक्षीदार म्हणजे स्वराज्यातील गड किल्ले होय. त्यामुळे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन प्रत्येक गड किल्ल्यावर झाले पाहिजे. यासाठी किल्ले सिंहगडावर आम्ही हा सोहळा दरवर्षी आयोजित करतो. सर्व शिवभक्तांनी आपापल्या परिसरातील गड-किल्ल्यांवर हा सोहळा आयोजित करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचा समारोप सिंहगड पायथ्याजवळ महाप्रसादाने झाला.

राज्यात कोसळधार, मुंबई पुण्यात मुसळधार पाऊस, रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट, पुढील 48 तास महत्त्वाचे

0
Newsworldmarathi Pune: Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा आपला जोर दाखवला आहे. हवामान खात्याने (IMD) पुढील 48 तासांत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टीवर विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघरसह इतर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली असून, काही ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात पावसाचा कहर कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. रायगडमधील माणगाव, महाड आणि रोहा शहरांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. माणगावमधील नागाव गावात घरांमध्ये पाणी शिरले, तर लोणेरे भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील पालशेत गावात नदीला पूर आल्याने आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी साचले आहे. परशुराम घाटात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली, तर आडिवरे गावात ढगफुटीसदृश पावसामुळे महाकाली मंदिर परिसरात पाण्याचा लोंढा आला. मुंबई-ठाण्यातही पावसाचा जोर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पुढील 48 तासांत गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रविवारी या भागात विजांसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, तर सोमवार आणि मंगळवारी (17-18 जून) पावसाचा जोर कायम राहील. मुंबईला येलो अलर्ट असला, तरी काही भागात अतिवृष्टीची शक्यता नाकारता येत नाही. कोकणातील इतर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून, पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. हवामान खात्याचा इशारा हवामान खात्याने 18 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रविवारी रत्नागिरी आणि सोमवारी सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीलाही येलो अलर्ट आहे. प्रशासनाचे आवाहन पावसामुळे कोकणात पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. शेतीसाठी हा पाऊस फायदेशीर असला, तरी अतिवृष्टीमुळे दैनंदिन जीवन आणि वाहतुकीवर परिणाम होत आहे. कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट? रेड अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस) ऑरेंज अलर्ट: मुंबई, ठाणे, कोकणातील इतर जिल्हे, पुणे (घाटमाथा), सातारा (घाटमाथा), कोल्हापूर (घाटमाथा) येलो अलर्ट: पालघर, नाशिक (घाटमाथा), नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली (गडगडाटासह पाऊस) नागरिकांना सावधगिरीचा सल्ला हवामान खात्याने आणि प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावरील रहिवाशांनी पूर आणि भूस्खलनाच्या धोक्यापासून सावध राहावे. पावसाचा आनंद घेताना सुरक्षिततेची काळजी घ्या, असा संदेश प्रशासनाने दिला आहे.

वैविध्यपूर्ण, मनमोहक नृत्याविष्कारांनी सजला ‘रज महोत्सव’

0
Newsworldmarathi Pune: ‘बनस्ते डाकीला गजा, बरसके थरे आसीची रज’ यावरील ओडिशाचा पारंपरिक नृत्याविष्कार, ‘रंगबती’ लोकनृत्य, एकाच मंचावर सादर झालेल्या भरतनाट्यम, ओडिशी, गौडियो, कथकली, कथ्थक, कुचिपुडी, मोहिनीअट्टम, मणिपुरी, सात्रीया अशा वैविध्यपूर्ण, मनमोहक नृत्य नवरत्न कार्यक्रमातून रज महोत्सव सजला. नृत्यांतून उमटलेल्या ह्रदयस्पर्शी भावमुद्रा, नजाकत अन् अभिनयाने उपस्थितांची वाहवा मिळवली. मासिक पाळी आरोग्याबाबत जनजागृती आणि मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी कलिंगा कला केंद्र ट्रस्टतर्फे ओडिशाच्या पारंपरिक ‘रज महोत्सव २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित महोत्सवात भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडले. नृत्यांगना व गायिका, कलिंगा कला केंद्र ट्रस्टच्या संस्थापक डॉ. ममता मिश्रा, ट्रस्टचे अध्यक्ष व आयपीएस संजीब पटजोशी, महासचिव संदीप राणा, सोंदिपा राणा, सुब्रकांता मोहंती, हिरकणी सोशल फाउंडेशनच्या सीईओ पूर्णिमा लुनावत, नृत्यांगना स्वागतिका मोहापात्र, अनुपमा सेन, मीनाक्षी पुलगावकर, प्रायोजक लीना मोदी, उद्योजक अतुल गुंजाळ, अरविंद बुधानी, ट्रस्टच्या सहसचिव पौलमी चॅटर्जी, खजिनदार लोकनाथ सारंगी, सदस्य निक्षिता सारंगी यांची विशेष उपस्थिती होती. वेगवेगळ्या राज्यांच्या पारंपरिक नृत्याचे मिश्रण असलेल्या नृत्य नवरत्न या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. ओडिशा सरकारच्या ओडिया लँग्वेज लिटरेचर अँड कल्चरल डिपार्टमेंटच्या सहकार्याने हा महोत्सव पार पडला. ‘बनस्ते डाकीला गजा, बरसके थरे आसीची रज’ या सामूहिक नृत्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. डॉ. ममता मिश्रा, स्वागतिका महापात्रा, रश्मीता प्रसाद, स्मिता दास, अरुणिमा मोहंती, ओडिशी नृत्यांगना मधुमिता मिश्रा यांच्या शिष्यांनी डोळ्याचे पारणे फेडणारे सादरीकरण केले. नृत्य नवरत्न या कार्यक्रमात पुजायिता भट्टाचार्य (ओडिशाचे ओडिशी), पौलोमी साखळकर (पश्चिम बंगालचे गौडीयो), सुजा दिनकर (केरळचे मोहिनीअट्टम), धनिया मेनन (आंध्रप्रदेशचे कुचिपुडी), मौसमी रॉय-देव (उत्तरप्रदेशचे कथक), पारोमिता मुखर्जी (केरळचे कथकली), सुमना चॅटर्जी (मणिपूरचे मणिपुरी), योषा रॉय (आसामचे सात्रीया), प्रिया भट्टाचार्य (तामिळनाडूचे भरतनाट्यम) नृत्यप्रकार सादर केले. ‘रंगबती’ गाण्यावरील लोकनृत्याने उपस्थितांना ताल धरायला लावला. सर्व महिला कलाकारांना ‘रज क्वीन’चा क्राऊन देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. ममता मिश्रा म्हणाल्या, “ट्रस्टतर्फे गेल्या १५ वर्षांपासून ‘एक विचार, अनेक राज्ये’ या कल्पनेवर आधारित भारतीय शास्त्रीय नृत्य, संगीत, कला व संस्कृतीचे शिक्षण देण्यासह त्याचा प्रचार करत आहे. ओडिशामध्ये रज महोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा रज महोत्सव मासिक पाळी स्वच्छता आणि जागरूकता यांना संस्कृतीशी जोडतो. रज हा मूळ शब्द ‘रजस्वला’ आहे. हा चार दिवसांचा उत्सव असून, ओडिशात प्राचीन काळापासून साजरा केला जातो. हा धरणीमातेच्या मातृत्वाच्या तयारीचे प्रतीक आहे. या चार दिवसांत मुलींना राणीसमान मान असतो. पारंपरिक पोशाख, झुला, गोडधोड पदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने यंदाचा रज महोत्सवी उत्साहाने साजरा झाला.”

Pune Indrayani Bridge : इंद्रायणीच्या कुंडमळा पूल दुर्घटनेत आत्तापर्यंत काय काय घडलं? किती जण बेपत्ता? सविस्तर अपडेट एकाच क्लिकवर…

0
Newsworldmarathi Pune: पुण्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील लोखंडी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ही दुर्घटना रविवारी (15 जून 2025) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली, ज्यामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून, 32 जण जखमी झाले आहेत. यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. सध्या 2 ते 3 जण बेपत्ता असण्याची शक्यता असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) सोमवारी सकाळी पुन्हा बचावकार्यासाठी नदीपात्रात उतरले आहे. मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह तीव्र झाल्याने बचावकार्याला मोठे आव्हान आहे. कुंडमळा हे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे, विशेषतः पावसाळ्यात येथील धबधबा आणि इंद्रायणी नदीच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. रविवारी, सुट्टीमुळे आणि पावसाळ्याच्या आकर्षणामुळे, या पुलावर सुमारे 100 ते 125 पर्यटक उपस्थित होते. हा पूल 30 वर्षांहून अधिक जुना असून, तो जीर्ण झाला होता. स्थानिक पोलिसांनी यापूर्वीच पुलावर “प्रवासासाठी अयोग्य” असा फलक लावला होता, तरीही पर्यटकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते. पुलावर पर्यटकांबरोबरच काही दुचाकीही होत्या, ज्यामुळे पुलावर अतिरिक्त भार पडला. दुपारी 3:30 ते 4:00 च्या सुमारास हा पूल अचानक कोसळला, आणि त्यावरील अनेकजण इंद्रायणी नदीच्या तीव्र प्रवाहात पडले. काहींनी पोहून किनारा गाठला, तर काही प्रवाहात वाहून गेले. आत्तापर्यंत काय काय घडलं? कुंडमाला दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. यापैकी दोघांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर या घटनेत 32 जण जखमी झाले असून, यापैकी आठ जण गंभीर अवस्थेत आहेत. गंभीर जखमींवर पवना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयात 10 जणांवर उपचार झाले, त्यापैकी दोघे आयसीयूमध्ये होते, तर इतरांना किरकोळ जखमांमुळे घरी सोडण्यात आले आहे. अथर्व रुग्णालयात 17 जखमींवर उपचार झाले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत NDRF, स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि गावकऱ्यांनी मिळून 51 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, 2 ते 3 जण अजूनही बेपत्ता असण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाकडे नेमकी माहिती उपलब्ध नाही, परंतु NDRF पथक बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. बचावकार्य आणि आव्हाने NDRF चे प्रयत्न: रविवारी दुर्घटनेनंतर तातडीने NDRF च्या दोन तुकड्या, स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि गावकऱ्यांनी बचावकार्य सुरू केले. रात्रीच्या वेळी पुलाचा लोखंडी सांगाडा नदीपात्रातून काढण्यात आला. सोमवारी सकाळी NDRF पुन्हा नदीपात्रात उतरून बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. पावसाचे आव्हान: मावळ तालुक्यात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळीही मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे इंद्रायणी नदीचा प्रवाह अधिक तीव्र झाला आहे. यामुळे बचावकार्याला मोठी अडचण येत आहे. नदीपात्रातील पाण्याचा वेग आणि ढगाळ वातावरणामुळे शोधकार्य कठीण झाले आहे. तांत्रिक अडचणी: NDRF गॅस कटर आणि क्रेनचा वापर करून पुलाच्या अवशेषांखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. एक व्यक्ती अजूनही अवशेषांखाली अडकली असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेसंदर्भात तीव्र दुखः व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये नुकसानभरपाई आणि जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे जाहीर केले आहे. ते विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि तहसीलदार यांच्याशी सतत संपर्कात असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, पुलाच्या देखभालीसाठी जबाबदार कोण होते, याचा शोध घेतला जाईल. दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यांनी प्राथमिक अंदाजानुसार पूल जीर्ण आणि गंजलेला असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी जितेंद्र दूडी यांनी सांगितले की, दुर्घटना दुपारी 3:15 वाजता घडली आणि 3:30 वाजता माहिती मिळताच 250 जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर 30 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि नागरिकांना पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. तर स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, पुलाच्या जीर्ण अवस्थेमुळे आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे ही दुर्घटना घडली आहे. एका जखमी पर्यटक निलेश कोलम यांनी सांगितले की, “पुलावर 200 हून अधिक लोकांची गर्दी होती. मधला भाग अचानक कोसळला आणि 50 हून अधिक लोक एकमेकांवर पडले. नदीचा प्रवाह इतका जोरदार होता की काहीजण वाहून गेले.” स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, पावसाळ्यात कुंडमळा परिसरात मोठी गर्दी होते आणि पूल हा सेल्फी पॉइंट म्हणून लोकप्रिय आहे. पुलाच्या जीर्ण अवस्थेचा प्रश्न हा पूल 100 वर्षांहून अधिक जुना असल्याचे काही स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले, तर काहींच्या मते तो 1992 मध्ये बांधला गेला. तसेच चार वर्षांपूर्वीच यावर “प्रवासासाठी अयोग्य” असा फलक लावण्यात आला होता, परंतु पर्यटकांनी याकडे दुर्लक्ष केले. नवीन पूल बांधण्यासाठी 7-8 कोटींची निविदा मंजूर झाली होती, परंतु पावसामुळे कामाला विलंब झाला. सध्याची परिस्थिती काय? सोमवारी सकाळी NDRF चे पथक पुन्हा नदीपात्रात उतरले असून, बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्याला अडचणी येत आहेत, परंतु क्रेन आणि गॅस कटरच्या साहाय्याने अवशेष हटवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर जाताना खबरदारी घेण्याचे आणि प्रशासकीय सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश ऐरणीवर पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटना ही पावसाळ्यातील पर्यटनस्थळांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. जीर्ण पूल, पर्यटकांची गर्दी आणि मुसळधार पावसाचा तडाखा यामुळे ही दुर्घटना घडली. NDRF आणि प्रशासन युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे. परंतु बेपत्ता लोकांचा शोध आणि पावसाचे आव्हान यामुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. सरकारने नुकसानभरपाई आणि चौकशीचे आश्वासन दिले असले, तरी या दुर्घटनेतून धडा घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

इंद्रायणी नदीत पूल कोसळल्याने चार मृत; अनेकजण बेपत्ता

0
Newsworldmarathi Pune: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, यात अनेक पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ३० ते ४० जण प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, रविवारी रात्रीपर्यंत चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून, यामुळे इंद्रायणी नदीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पूल कोसळल्यावर त्यावर उभे असलेले अनेक पर्यटक अचानक नदीत पडले. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच, जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालू नका” – मंत्री महाजन ही दुर्घटना घडताना पुलावर अनेक पर्यटक फोटो व सेल्फी काढण्यासाठी एकत्र जमले होते, हे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. यावर भाष्य करताना मंत्री महाजन म्हणाले, “पर्यटकांनी आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. केवळ फोटो किंवा सेल्फीसाठी आपला जीव धोक्यात घालू नये,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सध्या मदत आणि शोधकार्य सुरू इंद्रायणी नदीतील प्रवाह वेगवान असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. तरीही NDRF, SDRF व पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, अद्यापही काही जण बेपत्ता आहेत. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठी जाण्याचे टाळावे, असा इशारा देण्यात आला आहे.

बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; कर्जमाफी ते शेतमजूर अन् ग्रामीण विकासासाठी आग्रह; जाणून घ्या प्रमुख मागण्या कोणत्या?

0
Newsworldmarathi Pune: Bachchu Kadu : मागील सात दिवासांपासून अन्नत्याग करत असलेले प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या हक्कांसाठी सरकारकडे खालील 14 मागण्या लावून धरल्या होत्या. त्यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे आंदोलन तीव्र झाले होते. अमरावतीपासून ते पुण्यापर्यंत त्याचे पडसाद उमटले आहेत. दरम्यान, शेतकरी, मजुरांच्या, दिव्यांगांच्या हक्कासाठी मी हे आंदोलन करतो आहे. कर्जमाफीच्या मागणीत 90 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. दिव्यांगांचे मानधन वाढवणार आहेत, असे सांगत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर दोन ऑक्टोबर मंत्रालयात घुसणार असा इशारा देत बच्चू कडूंनी आपले उपोषण स्थगित केले. बच्चू कडूंच्या 14 प्रमुख मागण्या : दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी मानधन: दिव्यांग आणि विधवा महिलांना दरमहा 6,000 रुपये मासिक मानधन देण्यात यावे. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी: शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे आणि शेतमालाला MSP (किमान आधारभूत किंमत) वर 20% अनुदान द्यावे. 7 एप्रिल 2025 च्या बैठकीनुसार शासन निर्णय: 7 एप्रिल 2025 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार तातडीने शासन निर्णय जारी करावा. युवकांसाठी रोजगार: युवकांना रोजगार उपलब्ध करावा किंवा सन्मानजनक वेतन द्यावे. सरकारी रिक्त जागा तातडीने भरणे आणि नव्या जाहिराती प्रसिद्ध कराव्यात. ग्रामीण घरकुलांसाठी अनुदान: शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल योजनेसाठी समान निकष लागू करून किमान 5 लाख रुपये अनुदान द्यावे. शेतमजुरांसाठी संरक्षण: शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांच्या अपघाती मृत्यूसाठी आर्थिक सहाय्य द्यावे आणि शेतमजुरांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करावे. MSP आधारित मजुरी आणि फळपिके: पेरणी ते कापणी सर्व कामांसाठी MSP आधारित मजुरी द्यावी. फळपिकांना 3:5 रेशो लागू करावा आणि दुग्ध व्यवसायाला MSP जोडावा. अन्यथा, तेलंगणाच्या धर्तीवर प्रति एकर 10,000 रुपये मदत किंवा भाव चढ-उतार निधी द्यावा. सेंद्रिय खतांना अनुदान: रासायनिक खतांप्रमाणे शेणखत आणि सेंद्रिय खतांना अनुदान द्यावे. मेंढपाळ आणि मच्छीमारांसाठी धोरण: मेंढपाळ आणि मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न सोडवावेत. मनरेगा मजुरी वाढ: मनरेगा अंतर्गत मजुरी 312 रुपये वरून 500 रुपये करावी. निवासी अतिक्रमण नियमितीकरण: निवासी अतिक्रमणे नियमित करावीत. दुधाला आधारभूत किंमत: दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाय करावेत. गायीच्या दुधाला 50 रुपये/लिटर आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये/लिटर आधारभूत किंमत द्यावी. कांदा निर्यातबंदी टाळणे: कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी बाजारभाव 40 रुपये/किलो होईपर्यंत निर्यातबंदी लागू करू नये. ऊस पिकाला योग्य दर: 2025-26 साठी ऊस पिकाला 4,300 रुपये/टन (1% रिकव्हरी) आणि 11% रिकव्हरीसाठी 430 रुपये FRP द्यावे. स्वतंत्र रिकव्हरी यंत्रणा स्थापन करावी आणि 15 दिवसांत पेमेंट न झाल्यास व्याजासह वसुलीचे अधिकार स्थानिक यंत्रणेला द्यावेत. ठोस निर्णयाची प्रतीक्षा बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, आणि ग्रामीण समाजाच्या हक्कांसाठी 7 जून 2025 पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे तिवसा वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज माने यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची गरज व्यक्त केली आहे. 16 जूनपासून जलत्याग करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले असले, तरी ठोस निर्णयाची प्रतीक्षा आहे. आंदोलनाचे पुण्यात पडसाद पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रहार कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कर्जमाफी आणि कडू यांच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली. या आंदोलनाने अमरावतीपासून पुण्यापर्यंत व्यापक पडसाद उमटले असून, सरकार कशी प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हरित ऊर्जेला गती द्या! ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

Newsworldmarathi Mumbai : महाराष्ट्रात जनतेला स्वस्त आणि मुबलक वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाला हरित ऊर्जा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी कालबद्ध नियोजन आणि वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पीएम सुर्यघर: मोफत वीज योजनें अंतर्गत सर्व शासकीय इमारतींचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी महाऊर्जाने सर्वेक्षण त्वरित पूर्ण करावे, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. मॉडेल सोलर व्हिलेजसाठी महाऊर्जा आणि महावितरणने संयुक्तपणे काम करावे, तसेच गती शक्ती योजनेच्या धर्तीवर सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. वीज गळती कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या थकबाकी वसुलीची योजना आणि जनजागृतीवरही भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हायड्रोजन परिसंस्थेच्या विकासासाठी संशोधन, कौशल्य विकास आणि शाश्वत योजनांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी ऊर्जा विभागातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे (दूरदृश्यप्रणालीद्वारे), राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुण्यात पावसाचा हाहाकार ! दिवेघाटात धबधब्यांचे रौद्र रूप, पिंपरीत वाहने वाहून गेली; गेस्ट हाऊसही जलमय

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने थैमान घातले. दिवे घाट परिसरात ढगफुटी झाल्याने धबधबे रौद्र रूपात वाहताना दिसले. घाटातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली उतरल्याने सखल भाग जलमय झाले. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, आयबी गेस्ट हाऊससारख्या महत्त्वाच्या शासकीय इमारतीतही पाणी शिरले. गेस्ट हाऊसमध्ये आमदार, माजी आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वास्तव्याची सोय असून, जिन्यापर्यंत पाणी साचल्याने मोठा गोंधळ उडाला. पिंपरी चिंचवडमध्ये चऱ्होलीतील ओढा ओसंडून वाहत गेल्याने चार ते पाच वाहने प्रवाहात वाहून गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने क्रेनच्या सहाय्याने वाहने बाहेर काढली. हिंजवडी आयटी पार्क परिसरात देखील मुसळधार पावसाचा फटका बसला. अवघ्या तासाभरात झालेल्या पावसाने रस्ते नद्यांमध्ये रूपांतरित झाले. गुडघाभर पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आणि अनेक दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यात अडकली. गेल्या आठवड्यात नालेसफाई करण्यात आली असली तरी पुन्हा एकदा पाणी साचल्यामुळे प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनावर प्रश्नचिन्ह हिंजवडीत अवघ्या तासाभराच्या पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले. गेल्या आठवड्यातील पाणी साचण्याच्या घटनेनंतर प्रशासनाने नालेसफाई केली असली, तरी पावसाळ्यापूर्वीच्या कामात सुधारणा आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक वाहने पाण्यात अडकली, तर काही ठिकाणी पाण्याची पातळी गुडघ्यापर्यंत पोहोचली.

“महाराष्ट्र पोलिसांचा गौरव ! 11 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट अन्वेषण पदक”

0
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना 2022 साठीचे केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान करण्यात आले. शुक्रवारी (13 जून 2025) पुण्यातील पोलीस संशोधन केंद्रात आयोजित समारंभात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते या अधिकाऱ्यांना पदके आणि प्रशस्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. 2018 ते 2022 या कालावधीत राज्यातील 54 पोलीस अधिकाऱ्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त, मुंबई: विधानसभा निवडणुकीदरम्यान सोलापूर ग्रामीणमधील पंचायत समिती सचिवाच्या खुनाचा तांत्रिक पुराव्यांद्वारे उलगडा करून तीन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा मिळवून दिली. प्रमोद तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कुर्ला: वाशी येथील अज्ञात महिलेच्या खुनाचा डीएनए आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 20 दिवसांत उलगडा. मनोज पवार, सहायक पोलीस निरीक्षक, सोलापूर ग्रामीण: अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरण आणि खुनाचा फॉरेन्सिक आणि सीसीटीव्हीच्या साहाय्याने तपास करून आरोपीला फाशीची शिक्षा. दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, कोल्हापूर: लोणावळ्यातील 66 लाखांच्या दरोड्याचा 7 दिवसांत छडा लावून 20 आरोपींना अटक. अशोक विरकर, पोलीस अधिक्षक, दहशतवाद विरोधी पथक: सांगलीतील 7 वर्षीय मुलीच्या खुनाचा तपास करून अल्पवयीन आरोपीला 12 वर्षांची शिक्षा मिळवून दिली. अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर: अहिल्यानगरमधील महिलेच्या खुनाचा 2 दिवसांत तांत्रिक तपासाद्वारे उलगडा. राणी काळे, सहायक पोलीस निरीक्षक, नवी मुंबई: 73 लाखांचा 377 किलो गांजा जप्त करून दोन आरोपींना 13 वर्षे कारावास. दिपशिखा वारे, पोलीस निरीक्षक, मुंबई: कोविड लसीकरण फसवणुकीच्या प्रकरणात 11 आरोपींना अटक, 2259 पानांचे दोषारोपपत्र सादर. सुरेशकुमार राऊत, पोलीस उपअधिक्षक, लातूर: बँक दरोड्यातील 2.51 कोटींचा मुद्देमाल जप्त करून सर्व आरोपींना अटक. जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मिरा-भाईंदर: सराफा दुकान दरोड्यातील 1.54 कोटींचा मुद्देमाल जप्त, मोक्का अंतर्गत कारवाई. समीर अहिरराव, पोलीस निरीक्षक, वसई विरार: ज्वेलर्स शॉप खुनाचा तपास करून सशस्त्र हल्लेखोरांना अटक. पुरस्कार निवड प्रक्रिया राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग, विशेष महानिरीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने अर्जांची कसून पडताळणी करून 22 अधिकाऱ्यांची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली. यापैकी 11 अधिकाऱ्यांची अंतिम निवड झाली. या कार्यक्रमाला अतिरिक्त महासंचालक सुनिल रामानंद, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे, उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली, अधीक्षक पल्लवी बर्गे, सौरभ आग्रवाल, पी. आर. पाटील, वैशाली माने यांच्यासह पदक विजेत्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे यशस्वी तपास करून महाराष्ट्र पोलिसांचा गौरव वाढवला.