Homeपुणेयुवकांनी नवकल्पना आणि तंत्रकौशल्य घेऊन अवकाश उद्योजक व्हावे : डॉ. के. सिवन

युवकांनी नवकल्पना आणि तंत्रकौशल्य घेऊन अवकाश उद्योजक व्हावे : डॉ. के. सिवन

Newsworldmarathi Pune : “विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तंत्रकौशल्य, विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखांचे ज्ञान आणि नवकल्पना यांच्या आधारावर अवकाश संशोधन क्षेत्रातील असंख्य संधी हेराव्यात. अवकाश तंत्रज्ञानाचे विस्तीर्ण क्षेत्र आपलेसे करावे आणि अवकाश उद्योजक होण्याच्या दिशेने वाटचाल करावी,” असे आवाहन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी विद्यार्थ्यांना केले.

दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एआयटी) ३१ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘एआयटी’तर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार डॉ. के. सिवन यांना भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर अभय भट, सहसंचालक एम. के. प्रसाद, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील, लष्करी अधिकारी, ‘एआयटी’चे अनेक माजी विद्यार्थी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘द सक्सेसफुल यंग आंत्रप्रेन्युअर पुरस्कार’ २००२ च्या तुकडीचे माजी विद्यार्थी प्रीतपालसिंग यांना देण्यात आला. ईशान कपूर यांना अष्टपैलू विद्यार्थी सन्मान देण्यात आला. सर्वोत्कृष्ट क्रीडापटू साठीचा जी. राजशेखर स्मृती करंडक वंशिका या विद्यार्थिनीने पटकावला. सर्वोत्कृष्ट संशोधन व सल्लासेवा हा पुरस्कार डॉ. एल. डी. जठार यांना, तर सर्वोत्कृष्ट अध्यापक हा पुरस्कार डॉ. सीता यादव यांना देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.

डॉ. के. सिवन यांनी इस्रोच्या वाटचालीचा आढावा घेत ‘विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधनाकडेही करिअर म्हणून बघावे’, असा सल्ला दिला. “अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगभर युवकांना अनेक संधी आहेत. संशोधनाला मोठा वाव आहे. या क्षेत्रात खासगीकरणाचे युग सुरू झाले आहे. केंद्र सरकारचा त्याला पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या करिअरसोबत आपल्या देशाप्रती आणि आपल्या समाजाप्रती असलेली बांधीलकी ओळखून, या क्षेत्रात योगदान दिले पाहिजे. ‘एआयटी’सारख्या संस्थेतील विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा अधिक आहे,” असे ते म्हणाले.

ब्रिगेडियर अभय भट यांनी स्वागत प्रास्ताविकात ‘एआयटी’च्या गेल्या वर्सभरातील कामगिरीचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील वाटचालीविषयी माहिती दिली. ‘एआयटी’चे संचालक मेजर जनरल के. के. चक्रवर्ती यांनी आभार मानले. रोशनी गौडा आणि रजत सिंग यांनी सूत्रसंचालन केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments