Newsworldmarathi Mumbai: राज्यातील राजकारण हादरवून टाकणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील नाव आणि पक्षीय चिन्हांच्या वादावर तब्बल दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंडखोरी करून त्यांनी स्वतंत्र गट तयार करत आपली शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा केला. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड पुकारत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने पक्ष आणि चिन्हांबाबत निकाल दिला.
त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या नेत्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. आता दीड वर्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील पक्ष-चिन्हांबाबत वादंगावर सुनावणी होणार आहे. सप्टेंबर २०२३ नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा यादीवर आले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता ७मे रोजी सुनावणी होणार आहे.
तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर १४ मे रोजी सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर ही सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणात निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.


Recent Comments