Newsworldmarathi Pune : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभर पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जागतिक दर्जाचे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ज्ञानपीठाच्या उभारणीबाबत माहिती दिली. या वेळी हभप शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर, आमदार उमा खापरे, शंकर जगताप, बाबाजी काळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, ॲड. रोहणी पवार, पुरुषोत्तम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी नमूद केले की, “ज्ञानपीठ उभारण्याचे कार्य आपल्या हातून घडत आहे, ही ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानही यातच असावे.” या भव्य प्रकल्पासाठी ७०१ कोटी रुपयांचा विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. या ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात पोहोचवण्याचा हेतू आहे.
याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी तयार केलेल्या विकास आराखड्याची माहितीही दिली. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून, लवकरच त्यास मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनेद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिकेसह ३९ गावांचे सांडपाणी शुद्ध करून इंद्रायणी नदीत सोडले जाईल. यामुळे नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली.


Recent Comments