Newsworldmarathi Parali: परळी शहरातील शिवाजीनगर भागातील एक सामान्य बौद्ध कुटुंब – पण मोठ्या जिद्दीचे. क्रांतीसूर्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श ठेवत शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या तीन सख्ख्या बहिणींनी एकाच वेळी शासकीय नोकरी मिळवून संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोठ्या कष्टाने त्यांचे शिक्षण घडवणाऱ्या त्यांच्या आईवडिलांनी आज खऱ्या अर्थाने समाधानाचा श्वास घेतला आहे.
कदम कुटुंबातील मनिषा विजय कदम या ४० वर्षीय महिलेला चार अपत्यं आहेत. वंशाला दिवा पाहिजे या सामाजिक मानसिकतेमुळे तीन मुलींनंतर मुलगा झाल्यानंतर घरात आर्थिक ओढाताण सुरू झाली. नवऱ्याच्या उत्पन्नाची तुटवडा असल्यामुळे मुलींचं शिक्षण थांबू नये म्हणून मनिषाताईंनी औष्णीक वीजनिर्मिती केंद्र वसाहतीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरी धुणी, भांडी आणि स्वयंपाकाचं काम करत आपल्या मुलींचं शिक्षण सुरू ठेवलं. अवघ्या 10 बाय 25 फुटाच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबात शिकण्याची जिद्द मात्र मोठी होती.
मोठी मुलगी दिक्षा हिने दहावीत उत्तम गुण मिळवल्यानंतर तिला आयटीआय आणि इंजिनिअरिंगपर्यंत शिकवलं गेलं. ती सध्या मुंबई मेट्रोत 2019 पासून कार्यरत आहे. सोनाली आणि समिक्षा या दोघींचं प्राथमिक शिक्षण परळीत झालं. त्यानंतर त्यांना लातूर जिल्ह्यातील बावची येथील अनुसूचित जाती नवबौद्ध मुलींच्या निवासी शाळेत दाखल करण्यात आलं. तिथं त्यांनी मेहनत घेऊन आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन कोर्स पूर्ण केला.
या तिन्ही बहिणींनी महापारेषण विभागात नुकत्याच झालेल्या भरतीत भाग घेतला होता. त्या भरतीचा निकाल गेल्या आठवड्यात लागला असून, त्यामध्ये दिक्षाची निवड टेक्निशियन-२ व विद्युत सहायक पदासाठी, तर सोनाली व समिक्षा यांची निवड विद्युत सहायक पदासाठी झाली आहे.
शिक्षणासाठी आईने केलेल्या कष्टाचे चीज झाल्याने मनिषा कदम यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. दिक्षा ही बावची येथील आश्रमशाळेत शिकली होती, तर सोनाली व समिक्षा या शिवछत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांच्या यशामुळे त्यांच्या शिक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे.
Recent Comments