Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने आता गंभीर राजकीय वळण घेतले असून, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याची शक्यता शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
23 वर्षीय वैष्णवी हगवणे हिने सासरकडील मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली. याप्रकरणी तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मात्र राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाशी संबंधित असल्याने या प्रकरणाची पारदर्शकता आणि पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रोहिणी खडसे यांनी याप्रकरणी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, “त्या प्रकरणातही सुरुवातीला पोलीस तपास ढिसाळ होता. पण जेव्हा तपास सीआयडीकडे गेला, तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या. तसेचच काही वैष्णवी प्रकरणातही दिसून येत आहे.”
त्यांनी एक व्हिडीओ जारी करत पोलिसांच्या भूमिकेवर थेट आरोप केले. त्यांनी म्हटले की, “वैष्णवीच्या मृत्यूच्या दिवशीच तिच्या अंगावर 29 जखमा असल्याचे स्पष्ट झाले होते, तरीसुद्धा सौम्य कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला. ही एफआयआर आरोपींना मदत करणारी वाटते.” त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आहे का?”
याशिवाय त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शंका घेतली असून, अशा प्रकारे पीडितेला दुहेरी शिक्षा मिळत आहे.”
मुख्यमंत्र्यांकडे मागणी
“सत्य लपवले जात आहे. वैष्णवीच्या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी ही केस सीआयडीकडे वर्ग करावी, जेणेकरून निर्दोष व्यक्तींचा छळ होणार नाही आणि दोषींना शिक्षा मिळेल,” असे रोहिणी खडसे यांनी ठामपणे म्हटले आहे.
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून, आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात.
Recent Comments