Newsworldmarathi Pune: धनकवडी येथील जमीन व टीडीआर प्रकरणावरून सुरेंद्र दत्तात्रय कडू यांनी उषा चव्हाण आणि हृदयनाथ कडू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिकेविरोधात खोटे व तथ्यहीन आरोप करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा दावा कडू यांनी पत्रकार परिषदेत केला. संबंधितांनी न्यायालयात सर्व कागदपत्रे व पुरावे सादर करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.
कडू यांच्या निवेदनानुसार, त्यांचे वडील दिवंगत दत्तात्रय मारुतीराव कडू यांच्याशी अभिनेते म्हणून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत काही रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कडू कुटुंबीयांच्या नावाचा गैरवापर करून मालमत्तेबाबत चुकीचे दावे केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उषा चव्हाण यांनी स्वतःचे नाव कडू असल्याचे सांगणेही चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला.
उषा चव्हाण यांनी त्यांची आई दिवंगत सुमन दत्तात्रय कडू यांचा संसार उद्ध्वस्त केला असून आता कडू कुटुंबीयांच्या मागे लागल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. या आरोपांसाठी त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांचा आधार घेतला आहे. संबंधितांनी आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ न्यायालयीन कागदपत्रे आणि टायटल सर्च रिपोर्ट जनतेसमोर सादर करावेत, असे आवाहन कडू यांनी केले.
दरम्यान, धनकवडीतील टीडीआर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही कडू यांनी उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, रिट पिटिशन क्रमांक ५६१८/२०२४ मध्ये न्यायालयाने संपूर्ण टीडीआर त्यांच्या नावावर देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ४ मार्च २०२६ रोजीच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने कार्यवाही सुरू केल्याचा दावाही त्यांनी केला.
उषा चव्हाण व हृदयनाथ कडू यांनी कायदेशीर कागदपत्रांसह आपले दावे सिद्ध करावेत, अन्यथा आरोप मागे घ्यावेत, असे आव्हान सुरेंद्र कडू यांनी दिले आहे. त्यामुळे धनकवडीतील जमीन आणि टीडीआरचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.


Recent Comments