Newsworldmarathi Raigad: ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या राजगड किल्ल्यावर एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. पुण्यातील २० वर्षीय तरुणी बालेकिल्ल्यावरून १५० फूट दरीत कोसळून ठार झाली. कोमल सतीश शिंदे (वय २०, रा. आळंदी) ही आपल्या पतीसोबत पर्यटनासाठी आली होती. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उतरताना तिचा पाय घसरून ती दरीत कोसळली.
तात्काळ मदत, पण जीव वाचला नाही
अपघातानंतर कोमलला तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस जवान युवराज सोमवंशी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकातील तानाजी भोसले, गणेश सपकाळ यांनी मृतदेह गडावरून खाली आणण्यासाठी महत्त्वाची मदत केली.
राजगड ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध, पण सुरक्षिततेचा अभाव?
राजगड किल्ला पुण्यापासून सुमारे ४० किमी अंतरावर असून, ट्रेकिंगप्रेमींसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. बालेकिल्ला हा गडाचा सर्वोच्च आणि देखणं भाग मानला जातो. परंतु, या ठिकाणी सुरक्षेच्या पुरेशा सुविधा नाहीत, अशी तक्रार स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर राजगडवरील पर्यटक सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
पोलिस तपास सुरू
या घटनेनंतर वेल्हे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाने गडावरील सुरक्षा उपाय पुन्हा एकदा विचारात घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
Recent Comments