Homeपुणेबाजीराव पेशवे यांच्या युद्धनिती अंगिकारल्यास देशाच्या सीमा भविष्यातही सुरक्षित : अमित शहा

बाजीराव पेशवे यांच्या युद्धनिती अंगिकारल्यास देशाच्या सीमा भविष्यातही सुरक्षित : अमित शहा

Newsworldmarathi Pune: मृत्यूपर्यंत पराजयाला जवळही येऊ न देणाऱ्या अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा एनडीए येथे उभारला ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पुढील पिढीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराजाची स्थापना केली त्यातून स्वराज्याचे संस्कार पेरले. ही ज्योत छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी, तानाजी यांनी तेवत ठेवली. हीच परंपरा पुढे चालवत थोरले बाजीराव पेशवे यांनी स्वराजाची मशाल पेटती ठेवली. युद्ध कौशल्याच्या माध्यमातून स्वराज्याची सीमा विस्तारण्याचे मोठे कार्य पेशवे यांनी केले आहे. मातृभूमी, धर्मभूमी आणि स्वराज्यासाठी सातत्याने युद्ध करणारे ते एकमेव अजेय आणि पराक्रमी योद्धा आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काढले.

Advertisements

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे साडेतेरा फुट उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात आला असून या पुतळ्याचे अनावरण आज (दि. 4 जुलै) केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

Advertisements

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंह, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण मंचावर होते.

श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास मोलाचे सहकार्य करणारे सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, शिल्पकार विपुल खटावकर, वास्तुविशारद अभिषेक भोईर यांचा या वेळी अमित शहा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करून लोकमान्य टिळक, वीर सावरकर यांच्या क्रांतिकारी विचारांना उजाळ देऊन अमित शहा पुढे म्हणाले, युद्ध नियम कालबाह्य नसतात. व्यूहरचना, त्वरा, समर्पणभाव, देशभक्ती, बलिदानाची वृत्ती योद्ध्याला नेहमीच प्रेरित करते आणि यश देते. या सर्वांचा संगम असलेले श्रीमंत बाजीराव पेशवे हे एकमेव लढवय्ये होत. त्यामुळे अवघ्या 19व्या वर्षी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर पुढील 20 वर्षात 41 लढाया लढूनही पेशवे एकही लढाई हरले नाहीत.

ते पुढे म्हणाले, संरक्षण दलांमधील तीनही विभागांचे प्रशिक्षण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दिले जाते. या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा कायम प्रेरणा देईल. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या युद्धनितीच्या कौशल्यातून देशाच्या सीमा भविष्याही सुरक्षित राहतील. छत्रपती शिवाजी महाराज तसेच श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे शौर्य वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात.

मला निराशा आली तर बाल शिवाजी, श्रीमंत बाजीराव पेशवे या वीर योद्ध्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आठवतो आणि माझी निराशा नाहीशी होते. देशासाठी समर्पण, बलिदान देणाऱ्या अनेक योद्ध्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडला गेला तसेच पुसलाही गेला. विकास आणि विरासत या पंतप्रधान मोदी यांच्या सूत्रातून प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा, वीर योद्ध्यांचा खरा इतिहास जगासमोर यावा यासाठी हा इतिहास भावानुवादीत होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही अमित शहा यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील नामांकित प्रबोधिनीत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजीगिषु वृत्तीने स्वराज्याची ज्योत सामान्य मराठी माणसाच्या रक्तात फुलविली ती अखंडित ठेवत तिचा विस्तार करण्याचे महान कार्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी केले. सर्व दिशांना हिंदवी स्वराज्य स्थापन करीत असताना त्यांनी वेगाची रणनिती अवलंबिली. आज अनेक महानायकांचा इतिहास पुसला गेला आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या भव्य पुतळा उभारणीतून मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल.

विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनित उभारलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याने पराक्रमाची पूजा बांधण्याचा अनुषेश भरून निघाला आहे. हा केवळ पुतळा नसून हे पराक्रमाचे स्मारक आहे. वीर सेनानींच्या पराक्रमाच्या गाथांचे विविध भाषांत अनुवाद व्हावेत ज्यायोगे विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला उजाळा मिळेल.

प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण गोखले म्हणाले, वीर योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार असून देशासाठी आयुष्य समर्पित करण्याची भावना वाढीस लागणार आहे. सेवा परमो धर्म या भावनेतून कार्य करणाऱ्या देशाच्या सेनेला पेशवे यांच्या युद्धनितीची शिकवण मिळणार आहे.

मान्यवरांचे स्वागत भूषण गोखले, कुंदनकुमार साठे, चिंतामणी क्षीरसागर, पुष्करसिंह पेशवा, श्रीपाद करमरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शेटे यांनी तर आभार कुंदनकुमार साठे यांनी मानले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments