Homeपुणेआवाज महाराष्ट्राचा – पुण्याच्या परिवर्तनाचा” अंतर्गत “५ न्याय अभियान” राज्यभर युवक काँग्रेस...

आवाज महाराष्ट्राचा – पुण्याच्या परिवर्तनाचा” अंतर्गत “५ न्याय अभियान” राज्यभर युवक काँग्रेस राबविणार

Newaworldmarathi Pune : भारतीय युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर जिल्हा युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने “आवाज महाराष्ट्राचा – पुण्याच्या परिवर्तनाचा” तसेच “५ न्याय अभियान” राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आली.

देशभरातील विविध शहरांमध्ये वाढत्या नागरी समस्या, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी जनआंदोलन उभे करण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. पुणे शहरातील पाणी, वीज, रस्ते, वाहतूक कोंडी, महिला सुरक्षा, बेरोजगारी, आरोग्य व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण या प्रश्नांवर युवक काँग्रेसच्या माध्यमातून विविध स्तरांवर आंदोलन आणि जनजागृती करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर असंघटित क्षेत्रातील विविध कामगार घटकांच्या प्रश्नांवर “५ न्याय अभियान” अंतर्गत स्ट्रीट व्हेंडर्स, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, घरगुती कामगार आणि ऑटो-रिक्षा चालक यांच्या न्याय हक्कांसाठी स्वतंत्र मोहिमा राबविण्यात येणार आहेत. रेहडी-पटरी विक्रेत्यांवरील कारवाई, कथित वसुली, PF-ESI अंमलबजावणी, किमान वेतन, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग बंदी, सुरक्षा साधने, घरगुती कामगारांना कायदेशीर दर्जा, ई-चलान, अ‍ॅप कंपन्यांची मनमानी, वाढते इंधन दर, पार्किंग आणि सामाजिक सुरक्षेच्या प्रश्नांवर युवक काँग्रेस राज्यभर आवाज उठविणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने या अभियानांतर्गत नागरिक संवाद यात्रा, विभागनिहाय बैठक, निवेदन मोहीम, सोशल मीडिया जनजागृती आणि विविध जनआंदोलने राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, “शहर चालवणाऱ्या असंघटित कामगारांना आजही मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळत नाही. ‘५ न्याय अभियान’ हे केवळ आंदोलन नसून शहरातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी युवक काँग्रेसचा व्यापक संघर्ष आहे.”

ज्येष्ठ नेते मोहन जोशी म्हणाले, “पुण्यासारख्या वाढत्या शहरांमध्ये नागरी प्रश्न गंभीर बनले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर सरकार आणि प्रशासनाला उत्तरदायी धरण्यासाठी युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभे करणे ही काळाची गरज आहे.”

यावेळी प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सचिव शांभवी शुक्ला, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, इंटक अध्यक्ष चेतन अग्रवाल, बाळासाहेब आमराळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, प्रदेश सरचिटणीस व संघटन सचिव प्रवीण कुमार बिराजदार, माध्यम प्रमुख अक्षय जैन, पुणे शहराध्यक्ष सौरभ आमराळे, अभिषेक अवचार, स्नेहल देशमुख, विश्वजीत जाधव आदी उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments