Homeपुणेकारागृहाचे रूपांतर सुधारगृहात होण्याचा प्रयत्न कौतुकास्पद : खा.डॉ. मेधा...

कारागृहाचे रूपांतर सुधारगृहात होण्याचा प्रयत्न कौतुकास्पद : खा.डॉ. मेधा कुलकर्णी

Newsworldmarathi Pune: आपल्याकडे कारागृह ही स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी स्वातंत्र्य सैनिकांना डांबून ठेवून मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून बनवली होती. त्याकाळी नियम पण तसेच होते. गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये अमुलाग्र बदल होत असून कारागृह ही फक्त कारागृह न राहता ती सुधारगृह होत आहेत आणि या दृष्टीने महाराष्ट्र कारागृह प्रशासन ,भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांनी समाजासमोर स्तुत्य आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमांची व्यापकता वाढवून राज्यभर त्याचा प्रसार होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.

महाराष्ट्र कारागृह प्रशासन , भोई प्रतिष्ठान- पुणे आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा महिला कारागृहातील बंदी-भगिनींसाठी पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड्स बँक या अभिनव प्रकल्पाचा शुभारंभ खा.डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
या निमित्ताने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी अपर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक डॉ. सुहास वारके ,विशेष कारागृह महानिरीक्षक श्री योगेश देसाई, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ. मिलिंद भोई , येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक सौ.पल्लवी कदम, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सौ माया धतुरे, येरवडा खुले कारागृह अधीक्षक श्री श्याम शेडगे, बीड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.जनक चौरे, सौ प्राजक्ता चौरे, पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य सौ.बागेश्री मंठाळकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ अमृता चांदोरकर, प्रमिला देवकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

अपर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी बोलताना कारागृहातील बंदी बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बंदी बांधवांमध्ये शिक्षा भोगत असताना सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून त्यांच्यातील चांगला माणूस समाजासमोर आणण्यासाठी भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांनी केलेल्या प्रकल्पांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामाची भूमिका स्पष्ट करताना बंदी बांधवांच्या मानसिकतेत बदल केले तर त्यांच्यातील चांगला माणूस जागा होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेश होण्याची सुरुवात होईल. असे सांगितले. आज तुम्ही सर्वजण येथे आहात पण घरी तुमची आई वाट पाहत आहे. तुम्ही तुमची शिक्षा संपवून लवकरात लवकर घरी जाऊन आईच्या कुशीत डोके ठेवून बसा असे डॉ. भोई यांनी म्हणताच बहुसंख्य बंदी भगिनींच्या डोळ्यात आईच्या आठवणीने अश्रू
तरळले.

याप्रसंगी बंदी भगिनींना विशेष पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड्स चा वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिक डॉ. सौ. प्राजक्ता चौरे यांनी दिले. राज्यातील इतर कारागृहात सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक येरवडा मध्यवर्ती कारागृह अतिरिक्त अधीक्षक सौ पल्लवी कदम यांनी केले. आभार प्रदर्शन येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक श्री सुनील ढमाळ यांनी केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments