Newsworldmarathi Pune : खाचखळगे, चिखल आणि मातीच्या रस्त्यांवरून काही मैलांचा खडतर प्रवास करत शाळा गाठणाऱ्या नांदगाव फाटा-वऱ्हाणे परिसरातील विद्यार्थिनींच्या वाट्याला आता सायकलचे स्वातंत्र्य आले आहे. स्वातंत्र्यदिनी नव्या सायकलींवरून शाळेत पोहोचलेल्या या सव्वाशे विद्यार्थिनींनी ध्वजारोहण सोहळ्यात सहभाग घेतला. तिरंग्याला सलाम करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता; मात्र त्याहून मोठा आनंद होता – आता रोजचा शाळेचा प्रवास काहीसा सोपा होणार याचा.
शाळा गाठण्यासाठी या विद्यार्थिनींना दररोज पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते. रस्त्यातील खड्डे, निसरडी माती, पावसाचे पाणी आणि वाहतुकीचा अभाव यामुळे त्यांचा प्रवास अनेकदा कष्टदायक ठरतो. उन्हाळ्यात धुळीचे लोट, तर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य – अशा परिस्थितीतही शिक्षणाची ओढ त्यांना रोज शाळेपर्यंत घेऊन येत होती. सायकल मिळाल्याने त्यांच्या वेळेची बचत होणार असून, शाळेत जाण्या-येण्याचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुसह्य होणार आहे.
आर. बी. जी. फाऊंडेशन, नवी मुंबई आणि मधुरा गेठे यांच्या वतीने विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या मुली सायकलींवरून शाळेत आल्या आणि स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्यामुळे सायकल वाटपाचा उपक्रम केवळ वस्तू देण्यापुरता मर्यादित न राहता त्याचा प्रत्यक्ष परिणामही दिसून आला.
या कार्यक्रमाला सुरेश जी शेलार, विकी खैरनार, रतन हलवर, प्रा. डॉ. डी. के. हलवर, सोमनाथ दुकळे,
साहेबराव बच्चाव, रामचंद्र दुकळे , विक्रम मार्कंड उपस्थित होते.
“ग्रामीण विद्यार्थिनींच्या शिक्षणाला पाठबळ देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. मुलींना साधने आणि संधी मिळाल्या, तर त्या आत्मविश्वासाने पुढे जातील,” असे मधुरा गेठे यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणातील अडथळे कमी होऊन त्यांच्या स्वप्नांना चाकांची नवी गती मिळाली आहे. पालक, नागरिक आणि विद्यार्थिनींनी आर. बी. जी. फाऊंडेशनच्या उपक्रमाचे स्वागत केले.


Recent Comments