पुस्तकांच्या सहवासात राहणारे उच्च स्थान मिळवतात : गोयल
Newsworldmarathi Pune : वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते “ग्रंथालय स्वच्छता अभियान” राबविण्यात आले प्रथमतः ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी ग्रंथालयातील 34000 अधिक ग्रंथांचा तसेच 27 नियतकालिके आणि ग्रंथालयांची स्वच्छता व सर्वेक्षण केले.
अध्यक्षस्थानी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी वाचकांशी संवाद साधताना आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये त्यांनी “जे वाचक पुस्तकांच्या सहवासात राहणारे असतात ते कायम उच्च स्थान मिळवतात” असे प्रतिपादन केले तसेच 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 या पंधरवड्यात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.
या उपक्रमानिमित्त खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंदी छाजेड रमेश अवस्थे राजेंद्र भूतडा प्राचार्य डॉ.संजय चाकणे डॉ.गजानन आहेर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल आनंद नाईक यांनी केले व तर आभार प्रदर्शन डॉ शैलेंद्र काळे यांनी केले.
आमदार योगेश टिळेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद
Newsworldmarathi Pune : कात्रज-कोंढवा रोड या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा व स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे. या स्मारकाचे काम लोकवर्गणीतून होत आहे. रविवारी (दि. २८) आमदार योगेश टिळेकर यांच्या वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ, हार-तुरे, भेटवस्तू, मिठाई न आणता लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आमदारांच्या या आवाहनास शाळकरी विद्यार्थी, नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने आमदार टिळकेर यांच्या वाढदिनी सुमारे १४ लाखरुपयांचा निधी स्मारकासाठी लोकवर्गणीतून जमा झाला.
श्री छत्रपतींचा आशीर्वाद व प्रेरणेतून समाजासाठी काहीतरी भव्य घडविण्याच्या उद्देशाने आमदार योगेश टिळेकर यांच्या संकल्पनेतून कोंढवा भागात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मारक उभारण्यात येत आहे. शिवजयंती म्हणजेच दि. १९ फेब्रुवारी पूर्वी या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस आहे. मी काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे आवाहन केले होते त्याला नागरिकांनी दिलेला भरभरू प्रतिसाद हा खूपच मोठे समाधान देणारा असल्याचे आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले.
महात्मा फुले साहित्य संमेलन उत्साहात
Newsworldmarathi Pune : अंधश्रद्धा आणि अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाला सत्याची वाट दाखविण्याचे महान कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची गावोगावी पारायणे होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन न्यायाधिश वसंतराव पाटील यांनी केले.
सतरावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे मोठ्या उत्साहात झाले, त्यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून श्री पाटील बोलत होते.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे माजी पोलीस अधिक्षक सुरेश खोपडे यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाले.
यावेळी पुणे केंब्रिज स्कूल चे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कुंजीर, पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते गौरव कोलते, सासवडच्या माजी नगराध्यक्षा लताताई दिवसे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ लक्ष्मण हेंबाडे, सीताराम नरके, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष उत्तम कामठे, ज्येष्ठ पत्रकार तानाजी कोलते, एम जी शेलार, खानावडीचे माजी सरपंच चंद्रकांत फुले, रमेश बोरावके, दत्ता होले, शरद यादव, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष गणेश ढोले, अरविंद जगताप आदी उपस्थित होते.
पुरोगामी विचारांचा जागर झाल्याशिवाय समाज समृध्द होणार नाही, असे सांगून श्री पाटील म्हणाले, इंग्रज राजवटीत महात्मा फुले यांनी केलेले कार्य आणि मनुस्मृती च्या विरोधात घेतलेली भूमिका क्रांती करणारी आहे. भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून ज्ञानाची कवाडे खुली केली. पुरंदरची भूमी क्रांतीकारकांची आहे.
सुरेश खोपडे म्हणाले, सद्या समाजमन अस्वस्थ असून, शिक्षणाचं खेळखंडोबा झाला आहे. जगण्यासाठी उपयुक्त असे शिक्षण मिळाले पाहिजे. माणूस शिकला तर शहाणा होईल. शिक्षणाचे महत्त्व ओळखून महात्मा फुले यांनी दोनशे वर्षा पूर्वी पुण्यात मुलींची शाळा सुरू केली. सध्याचे शिक्षण महाग आहे, गरीब लोक शिक्षणापासून वंचित राहावी जणू असेच धोरण राज्यकर्ते राबवीत आहेत. स्वस्त शिक्षणासाठी कुडाची शाळा हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव म्हणाले,” महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर व्हावा म्हणून सुरू केलेले हे संमेलन सतराव्या वर्षात पदार्पण करीत आहे, पुरंदर ही शूरवीरांची भूमी आहे. येथील माती इतिहासाने मंतरलेली आहे. शासनाने अशा साहित्य संमेलनाला अनुदान देण्याची गरज आहे. बांधावरच्या कवी, लेखकांना न्याय देण्याची भूमिका घेऊन साहित्य चळवळ उभी केली आहे.
यावेळी गौरव कोलते, उत्तम कामठे, निमंत्रक सुनील धीवार यांनी मनोगत व्यक्त केले. सुनीता निकम यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
संमेलनाच्या संयोजनासाठी राजाभाऊ जगताप, गंगाराम जाधव, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, गंगाराम जाधव, अरविंद जगताप, दीपक पवार, संजय सोनवणे, मुकुंद काकडे, प्रफुल्ल देशमुख, राजेश काकडे, देविदास झुरुंगे आदीनी सहकार्य केले.
महात्मा फुले यांच्या मूळ खानवडीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी सहभागी झाले होते. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष रवींद्र फुले यांनी केले. आभार निमंत्रक छायाताई नानगुडे यांनी मानले.
नववर्ष स्वागतासाठी पबकडून कंडोम अन् ओआरएसचे पाकीट वाटप
Newsworldmarathi Pune : नववर्षाच्या पार्टीच्या निमंत्रणासोबत कंडोम आणि ओआरएसचे पाकीट पाठवण्याच्या घटनेने पब कल्चरबाबत नवीन वाद निर्माण केला आहे. महाराष्ट्रातील पब आणि बार रेस्टॉरंट्समधील नियमांचे उल्लंघन, अनैतिक वर्तन, आणि समाजावर होणाऱ्या परिणामांबाबत आधीच चर्चा सुरू आहे. अशा प्रकारच्या मार्केटिंग तंत्रामुळे पब मालकांचा उद्देश आणि अशा गोष्टींच्या प्रभावाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
युवक काँग्रेसच्या अक्षय जैन यांनी या प्रकाराविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यांनी हा प्रकार समाजात चुकीचे संदेश पोहोचवणारा असल्याचा आरोप केला आहे. या घटनेवर पोलीस आणि प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पब आणि बारसंदर्भातील अशा घटनांमुळे सामाजिक आणि सांस्कृतिक परिणामांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. प्रशासनाने या क्षेत्रातील नियमन आणि जबाबदारीबाबत कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
ही घटना पुण्यातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरणात एक महत्त्वाचा मुद्दा बनली आहे. युवक काँग्रेसने केलेल्या तक्रारीत पबच्या या कृतीवर गंभीर आक्षेप घेतला आहे, ज्यामुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पसरतील, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी याला शहराच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे कृत्य ठरवले आहे.
दुसरीकडे, पब प्रशासनाने आपल्या कृतीचे समर्थन करताना म्हटले आहे की, गिफ्ट पिशव्या तयार करताना त्यांनी “सुरक्षा आणि उत्सव” या थीमला अनुसरून जबाबदार वर्तनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. कंडोम आणि इलेक्ट्रोलाइट पॅकेटचा समावेश हा सुरक्षित लैंगिक संबंध आणि पार्टीत मद्यपानानंतर होणाऱ्या त्रासांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी करण्यात आला होता. यासोबतच, मद्यपानानंतर वाहन चालवू नये म्हणून वाहनचालक सेवा देखील उपलब्ध करून दिली गेली होती.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे गृहखात्याला पत्र
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या आजी-माजी महिला पदाधिकाऱ्यांनी मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला नेत्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवत संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
महिला काँग्रेसने या अमानवी कृत्याचा निषेध करताना न्यायाची मागणी केली. गृहखात्याला या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्यासाठी पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये आरोपींना त्वरित अटक आणि कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांसोबत सहानुभूती व्यक्त करण्यात आली. महिला पदाधिकाऱ्यांनी हत्येच्या विरोधात कडक शब्दांत आपला संताप व्यक्त केला आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली.
संतोष देशमुख हत्येतील सर्व दोषींना लवकरात लवकर अटक करावी. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा. राज्यातील गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी गृहखात्याने ठोस पावले उचलावी अन्यथा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस आणखी तीव्र आंदोलन छेडल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी दिला आहे.
पं. बबनराव हळदणकर यांना ‘स्वरआदरांजली’
Newsworldmarathi Pune : राग देसी व राग गौड सारंगमधील कै. पं. बबनराव हळदणकार रचित बंदिशी, राग बहादुर तोडीमधील बडा ख्याल तसेच धमार, तराणा यांनी परिपूर्ण अशा विशेष मैफलीची मेजवानी आज (दि. 29) पुणेकर रसिकांना अनुभवयला मिळाली.
निमित्त होते आग्रा घराण्याचे थोर गायक आणि बंदिशकार कै. पंडित बबनराव हळदणकर स्मृतिप्रित्यर्थ गानवर्धन आणि पंडित बबनराव हळदणकर यांच्या शिष्यवर्गातर्फे आयोजित ‘स्वरआदरांजली’ या शास्त्रीय गायन मैफलीचे. मैफल लोकमान्य हॉल, केसरी वाडा येथे आयोजित करण्यात आली होती.
मैफलीची सुरुवात मानस विश्वरूप या युवा पिढीतील गायकाने राग बहादुर तोडीमधील बडा ख्यालातील ‘महादेव देवन पती पार्वती पती ईश्वरेश’ या बंदिशीने केली. यानंतर द्रुत लयीत त्यांनी ‘साजन की सावरी’ ही बंदिश सादर केली. अलवार आवाज, शुद्ध उच्चार, दमदार ताना आणि भावपूर्ण गायनाने त्यांनी रसिकांना आनंदित केले. धमार या गीत प्रकारातील ‘भिजो दयी सारी रंग मे आयो है अनोखे खिलाडी’ ही रचना सादर करून त्यांनी गायनाची सांगता केली.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका कविता खरवंडीकर यांनी आपले गुरू पंडित बबनराव हळदणकर यांचे अस्तित्व आजही प्रत्येक मैफलीत जाणवते, असे सांगून मधुर अशा राग देसीमधील ‘अधिक मन आयो है’ ही रचना सादर केली. त्याला जोडून द्रुतमध्ये ‘म्हारो डेरे आवो’ ही बंदिश सादर केली. यानंतर गौड सारंग रागातील ‘तोरे कारण जागी हूँ निस दिन’ आणि द्रुत लयीत ‘मै तो लरूंगी लराई तो से सैय्या’ ही रचना ऐकविली. दमदार पण समधुर आवाज, उत्तम रागविस्तार आणि आवाजाची सहज फिरत ही वैशिष्ट्ये रसिकांना खूप भावली. खरवंडीकर यांनी मैफलीची सांगता करताना रसिकांच्या आग्रहास्तव ‘दीम् तोम् तान्न देरेना’ या तराण्याने केली. खरवंडीकर यांनी सादर केलेल्या सर्व रचना गुरू पंडित बबनराव हळदणकर यांनी रचलेल्या होत्या.
कलाकारांना धनंजय खरवंडीकर (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी), श्रुती खरवंडीकर (तानपुरा, सहगायन), धरित्री जोशी-बापट (सहगायन) यांनी समर्पकपणे साथ केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस गानवर्धन संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगर येथील युवा गायिका युगंधरा केचे हिला दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती पंडित बबनराव हळदणकर यांच्या पत्नी उषा हळदणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या वेळी बोलताना उषा हळदणकर म्हणाल्या, या माध्यमातून बुवांचे शास्त्रशुद्ध, भावपूर्ण गाणे पुढच्या पिढीत प्रवाहित होते आहे याचा आनंद आहे.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिक शुभदा दादरकर यांनी शिष्या असलेल्या युगंधरा केचे हिने सुरुवातीस राग नटभैरव मध्ये ‘भोर भयी’ ही बंदिश सादर करून आपल्या गायन कौशल्याचे सादरीकरण उपस्थितांना दाखविले.
अरुण कशाळकर यांच्या हस्ते पंडित बबनराव हळदणकर लिखित आणि राज्य शासन पुरस्कारप्राप्त ‘जुळू पाहणारे दोन तंबोरे’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे तसेच ‘राग भेद आणि भावदर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन विद्या गोखले, दयानंद घोटकर, चंद्रशेखर महाजन, उषा हळदणकर, गौतम हळदणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
पंडित बबनराव हळदणकर यांचे ‘राग भेद आणि भावदर्शन’ हे पुस्तक गायकांना व रसिकजनांना विचार करायला प्रोत्साहित करेल तसेच ते प्रवर्तक बनेल अशी आशा ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित अरुण कशाळकर यांनी व्यक्त केली.
वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘राग भेद आणि भावदर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले याचे समाधान आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी चंद्रशेखर महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, असे गौतम हळदणकर म्हणाले.
मला लाभलेल्या गुरुंच्या सहवासामुळे पुस्तक निर्मितीला माझा हातभार लागला असून या पुस्तकाद्वारे गुरुजींचे विचार रसिकांपर्यंत पोहोचवायची इच्छा आहे, असे भाव पंडित बबनराव हळदणकर यांचे ज्येष्ठ शिष्य चंद्रशेखर महाजन यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी तर विश्वस्त डॉ. राजश्री महाजनी यांनी सूत्रसंचालन केले. कलाकरांचा सत्कार पंडित अरुण कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल
पुण्यातील नववर्ष स्वागताच्या उत्सवासाठी करण्यात आलेल्या वाहतूक बदलांविषयी ही महत्त्वाची माहिती आहे. हे बदल गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आले आहेत.३१ डिसेंबरच्या सायंकाळी पाच वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत हे बदल लागू असतील.
वाहनांसाठी बंद केलेले रस्ते
1. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता:
– १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौकपर्यंत वाहने बंद.
2. फर्ग्युसन रस्ता:
– गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहतूक बंद.
3. जंगली महाराज रस्ता:
– झाशीची राणी चौक ते उपरस्ते मार्गे वाहने वळवली जातील.
वाहन वळविण्याची व्यवस्था
– कोथरूड आणि कर्वे रस्त्याची वाहतूक:
खंडुजीबाबा चौकात थांबवून, विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळवली जाईल.
– जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक:
गोखले स्मारक चौक, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे वळवली जाईल.
ड्रंक अँड ड्राइव्ह तपासणी
– मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
– ब्रेथ ॲनलायझर यंत्राचा वापर करून तपासणी केली जाणार आहे.
सुरक्षिततेसाठी सूचना
– गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा.
– पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.
– मद्यप्राशन करून वाहन चालवणे टाळावे.
यामुळे पुण्यातील नागरिक आणि पर्यटकांसाठी नववर्ष स्वागत अधिक सुरक्षित आणि आनंददायी होईल.
भिमाकोरेगाव स्मारक माझ्याच कार्यकाळात पूर्ण होईल : शिरसाठ
Newsworldmarathi Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास भेट दिलेल्या घटनेस २०२७ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने त्या दृष्टीने याठिकाणी प्रलंबित स्मारकाचे काम तात्काळ सुरु करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल. तसेच शंभर कोटींचे नियोजीत भिमाकोरेगाव स्मारक माझ्याच कार्यकाळात पुर्ण होईल यासाठी माझा प्रयत्न राहील.” असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. ना. संजय शिरसाठ व्यक्त केला.
१ जानेवारी रोजी होणारा शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना देण्यात येणाऱ्या सुविधांची प्रत्यक्षपाहणी करण्यासाठी संजय शिरसाठ यांनी जिल्हाधिकारी व संपुर्ण प्रशासकीय समिती समवेत भिमाकोरेगाव विजयस्तंभास अभिवादन करुन भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित समाजबांधव संघटना प्रतिनीधी यांचेशी संवाद साधला.
भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी याठीकाणी येणार्या अनुयायांना कायम स्वरुपी सुविधा मिळुन स्मारकाच्या प्रलंबित कामास गती मिळावी अशी मागणी केली होती.
पेरणे गांवच्या सरपंच उषाताई वाळके यांनी नागरीकांच्या वतिने मंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी डॉ. सिध्दार्थ धेंडे , शैलेंद्र मोरे , यशवंत नडघम , निलेश आल्हाट इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
गोरक्षस्मृती फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
Newsworldmarathi Pune : कात्रज परिसरातील गुजर निंबाळकरवाडी येथील गोरक्षस्मृती फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी सरपंच व्यंकोजी खोपडे यांच्या कार्य अहवालाचा अंतर्भाव असलेल्या ‘दिनदर्शिका : २०२५’चे प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या दिनदर्शिकेचे नागरिकांना मोफत वाटप केले जाणार आहे.
मोहोळ म्हणाले, ‘राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यंकोजी खोपडे यांची समाजाप्रति असलेली बांधिलकी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून दिसते. समाजातील सर्व घटकांची तळमळीने सेवा करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असून, विविध उपक्रमांच्या माध्यामातून ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत.’ खोपडे म्हणाले, ‘कात्रजसह नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांतील मूलभूत सुविधा व विकासप्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून दिला जाईल. दक्षिण पुण्यात भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’
गोरक्षस्मृती फाउंडेशन व व्यंकोजी खोपडे यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षभरातील नागरी प्रश्नांची सोडवणूक, विकास प्रकल्पांचा पाठपुरावा, सामाजिक व धार्मकि उपक्रमाची माहिती या दिनदर्शकित देण्यात आली आहे. या वेळी सतीश कटके, मयूर लिंबोरे, कैलास त्रिवेदी, कैलास मोहोळ, किरण झेंडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

