अन सभागृहात अवतरल्या शेकडो सावित्रीबाई!

0
Newsworldmarathi Pune : महात्मा फुलें, ज्ञानज्योती सावित्रीबाई व फातिमाबी शेख यांच्या वेशभूषेतील कवी-कवयित्रीनी सादर केलेल्या काव्यरचना, फुले दाम्पत्याचा गौरवपूर्ण उल्लेख, विचारांचा जागर, सावित्री-ज्योति यांच्यासह आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे उद्घाटन गुरुवारी झाले. अंगावर हिरवे इरकल, कपाळी आडवा गंध, हाती पुस्तक, ओठी सावित्री-ज्योतिचा जागर अशा स्वरूपात शेकडो महिला सावित्रीबाईंच्या पेहरावात अवतरल्या! डोक्यावर फुले फेटा, अंगात कोट घालून आयोजक महात्मा फुलेंच्या पेहरावात आल्याने सभागृहात जणू सावित्रीबाई, ज्योतिराव आल्याची भावना उपस्थितांच्या मनात होती. भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २ ते ५ जानेवारी या कालावधीत होत आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात महाराष्ट्रासह देशविदेशातून ६०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरु केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन केले आहे. देश-विदेशातील सहाशे कवींचा काव्य महोत्सव, भिडेवाडा या विषयावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम फेस्टिव्हलमध्ये होणार आहेत. लंडन, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी आदी देशांतून, तसेच केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, उत्तरप्रदेश आदी राज्यातून कवी-कवयित्री सहभागी झाले आहेत. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा त्याग, समर्पण आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान अमूल्य आहे. फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळायला हवा. ही एक चळवळ असून, फुले विचार पुढच्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर फुले दाम्पत्याचा कार्यजागर करणारे कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. ज्यांनी कर्मठ व्यवस्थेच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, लोकांचा शिव्याशाप, चिखलफेक, शेणाचे गोळे अंगावर झेलले, त्याग व समर्पण भावनेने कार्य केले, त्या फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी अभियान राबवणार आहोत, असे वडवेराव म्हणाले.

पुणे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी स्वीकाराला पदभार

0
Newsworldmarathi Pune : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला. जिल्हाधिकारी डुडी यांनी यापूर्वी सन २०१९ मध्ये सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा, नंदूरबार, सन २०१९ ते २०२० या कालावधीत सहायक जिल्हाधिकारी मंचर तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव, पुणे तर सांगली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सातारा जिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे. डूडी यांच्या सेवा कालावधीत पोषण अभियानातंर्गत ५ व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात अधिकाधिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यात तृतीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय मतदान दिन २०२४ च्यावेळी पुणे विभागात उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून प्रथम पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

गुरू गोविंद सिंग यांच्या ३५८व्या जयंतीनिमित्त भव्य सोहळा

0
Newsworldmarathi Pune : अध्यात्मिक शिकवण आणि खालसा पंथाच्या स्थापनेसाठी ओळखले जाणारे शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंग यांच्या 358 व्या जयंतीनिमित्त पुण्यात भव्य उत्सव साजरा झाला. शीख समुदायाने नगर कीर्तन (धार्मिक मिरवणूक) आयोजित केले ज्यामध्ये भक्ती, एकता आणि समानता आणि निःस्वार्थतेचा गुरुचा कालातीत संदेश प्रतिबिंबित झाला. ही मिरवणूक गुरुवारी सायंकाळी गुरुद्वारा गुरुनानक दरबार, पुणे कॅम्प येथून निघाली आणि शहरातील प्रमुख भागातून फिरून गणेशपेठ येथील गुरुद्वारा गुरु सिंह सभा येथे समारोप झाला. हजारो भाविक, पारंपारिक पोशाख परिधान करून, पवित्र निशाण साहिब (शीख ध्वज) घेऊन आणि शीख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमधील भजन म्हणत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. मिरवणुकीची प्रमुख वैशिष्ट्ये -शीख मार्शल कलाकारांनी गतका सादर केला, एक पारंपारिक मार्शल आर्ट, उल्लेखनीय चपळता, शिस्त आणि शौर्याचे प्रदर्शन. गुरू गोविंदसिंग जी यांनी कायम ठेवलेल्या योद्धा भावनेचे प्रतीक असलेल्या या कामगिरीने प्रेक्षकांची प्रशंसा केली. -भजन आणि भक्ती गायन: पुण्यातील रस्त्यावर शांतता आणि अध्यात्माचे वातावरण भरून भक्तांनी एकसुरात कीर्तन (अध्यात्मिक भजन) गायले. या श्लोकांचे पठण गुरुजींच्या प्रेम, एकता आणि विश्वासाच्या शिकवणीचे स्मरण करून देणारे ठरले. – लंगर (सामुदायिक स्वयंपाकघर): शीख परंपरेचा अविभाज्य भाग असलेली लंगर सेवा मार्गावरील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. – मिरवणुकीमुळे वाहतूक अडकलेल्यांसह सर्वांसाठी स्वयंसेवकांनी मोफत जेवण दिले, गुरुजींच्या निःस्वार्थ सेवा आणि समानतेच्या तत्त्वांना मूर्त रूप दिले. -मिरवणुकीची सांगता गुरुद्वारा गुरु सिंह सभा, गणेशपेठ येथे सार्वत्रिक शांतता आणि सौहार्दासाठी प्रार्थना आणि आशीर्वादाने झाली

जितेंद्र डुडी पुण्याचे नवे जिल्हाधिकारी

0
Newsworldmarathi Pune : पुण्यात प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात आपले स्थान मजबूत केल्यानंतर प्रशासनिक पातळीवरही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली करून त्यांना जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, पुणे या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र डुडी हे 2016 बॅचचे आयएएस अधिकारी असून मूळचे जयपूर (राजस्थान) येथील आहेत. त्यांनी झारखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून सुरुवात केली होती आणि केंद्र शासनात सहाय्यक सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 2018 मध्ये त्यांची महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती झाली, जिथे त्यांनी पुण्यातील जुन्नर प्रांताधिकारी म्हणूनही कामगिरी बजावली आहे. डुडी यांचा प्रशासनातील अनुभव आणि कार्यक्षमता पाहता त्यांच्याकडून पुणे जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

क्रीडा पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंचे अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

0
Newsworldmarathi Mumbai : केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धीबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रित सिंह, पॅराअॅथलिट प्रवीणकुमार यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय क्रीडा कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला, नेमबाज स्वप्नील कुसाळे, पॅराअॅथलिट सचिन खिलारे यांच्यासह सर्व खेळाडूंचे तसेच द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या दिपालीताई देशपांडे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार आपल्या अभिननंदपर संदेशात म्हणतात की, या पुरस्कारविजेत्या खेळाडूंना जाहीर झालेला पुरस्कार हा या खेळाडूंनी भारतीय क्रीडाक्षेत्राचे नाव जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी केलेल्या परिश्रमांचा गौरव आहे. नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकून भारतवासियांना दिलेल्या आनंदाची, अभिमानस्पद क्षणांची तुलना होऊ शकत नाही. डी गुकेश यांने नुकतंच बुद्धीबळातल्या विश्वविजेतापदावर आपलं नाव कोरलं. विश्वविजेता होताना त्याने केलेला खेळ संस्मरणीय होताच, त्याचबरोबरीनं विश्वविजेता जाहीर झाल्यानंतरचं शांत, संयमी, सभ्य वर्तनानं केवळ भारताचीच नव्हे तर जागतिक क्रीडाक्षेत्राची मान उंचावली. भारतीय हॉकी संघासाठी सलग दोन ऑलिंपिक पदके जिंकून देणारा हरमनप्रित सिंह आणि पॅराअॅथलिट प्रवीणकुमार यांचीही कामगिरी खेलरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारी आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. खेलरत्न, अर्जून, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी पुरस्कारांसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडू, संस्था, संघटनांचे उपमुख्यमंत्रांनी विशेष अभिनंदन केले असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

धनंजय मुंडे यांच्याकडून कराडला वाचविण्याचे प्रयत्न?

0
Newsworldmarathi mumbai : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात खळबळ उडवली असून, या प्रकरणात अद्यापही तपास सुरू आहे. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली तरी काही आरोपी अजूनही फरार असल्याचे समजते. याच प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव चर्चेत आले आहे. पवनचक्की प्रकल्पातील दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात कराड यांना अटक झाली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. धनंजय मुंडे यांनी मात्र या आरोपांवर स्पष्ट भूमिका घेत, “माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. राजीनामा द्यावा तर त्यासाठी काही ठोस कारण असणे आवश्यक आहे,” असे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधकांच्या मागण्या आणि या प्रकरणाची चौकशी पुढे कशा प्रकारे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरेगाव भीमा येथे लोटला भीमसागर

0
Newsworldmarathi Pune : कोरेगाव भीमा येथे २०७ व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्थंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातून तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. काल रात्रीपासून मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या आहे. Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव भीमा येथे २०७ व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्थंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातून तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. काल रात्रीपासून मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या आहे. आज जवळपास ७ ते ८ लाख नागरिक या ठिकाणी येण्याची शक्यता असल्याने जवळपास १० ते १२ हजार पोलिसांच्या बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे नगर मार्गावरील वाहतूक देखील वळवण्यात आली आहे. येथे येणाऱ्यांसाठी प्रशासनातर्फे ‘विजयस्तंभ सुविधा’ हे अॅप विकसित करण्यात आले आहे.कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी ३१ डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात नागरिक कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा या ठिकाणी जमले आहे. आज सकाळपासून या ठिकाणी भीम अनुयायी येत असून विजयस्थंभा जवळ मोठी गर्दी झाली आहे. या ठिकाणी देश व राज्यभरातून लाखो अनुयायी येत असतात. गेल्या काही वर्षांपासून येथे येणाऱ्या अनुयायांच्या संख्येत वाढ झाली आहे. या वर्षी १० लाख अनुयायी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या नुसार जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.

मंत्री दत्तात्रय भरणे यांचे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन

0
Newsworldmarathi Pune : पेरणे येथील विजयस्तंभ हे एक प्रेरणास्थान असून देशातील, राज्यातील लाखो अनुयायी येथे अभिवादनासाठी येत असतात. येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाकडून चांगल्या प्रकारच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. मंत्री भरणे यांनी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, बार्टीचे महासंचालक सुनील वारे आदी उपस्थित होते. अनुयायांसाठी ज्या काही सुविधा आवश्यक असतील त्या भविष्यात करण्याच्या दृष्टीने राज्य शासन काम करेल, असेही भरणे यावेळी म्हणाले. सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून विजयस्तंभास अभिवादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सकाळी विजयस्तंभास अभिवादन केले. पेरणेफाटा येथील विजयस्तंभास अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी समाधान व्यक्त केले.

कोण आहेत वाल्मिक कराड?

Newsworldmarathi Mumbai : बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि खून प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास संतोष देशमुख हे चुलत भावासोबत कारने जात होते. या वेळी स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या सहा जणांनी त्यांच्या गाडीला अडवून जबरदस्तीने त्यांचे अपहरण केले. संतोष देशमुख हे केवळ एक युवा सरपंचच नव्हे, तर समाजासाठी कार्यशील व्यक्तिमत्व होते. त्यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात चर्चेत आलेले नाव म्हणजे वाल्मिक कराड. वाल्मिक कराड हे महाराष्ट्रातील परळी मतदारसंघातील एक प्रभावशाली राजकीय व्यक्तीमत्व आहेत. ते परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत आणि सध्या राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मागील दहा वर्षांपासून, परळी मतदारसंघातील प्रशासन आणि राजकीय कार्याचा मुख्य कारभार ते पाहत असल्याचे बोलले जाते. परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला असून परळी नगरपालिकेचे कामकाज पाहिले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला झाल्यानंतर, ते धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली काम करू लागले. धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत, परळी मतदारसंघातील समस्या सोडविण्यात त्यांची भूमिका असते. वाल्मिक कराड यांचे नाव आक्षेपार्ह गुन्हेगारी प्रकरणांमध्ये जोडले गेले आहे: 307 (खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा) यासारखे गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला गेला होता. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात कराड यांचे नाव समोर आले आहे. केज पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याच्याशी त्यांचे संबंध असल्याचा आरोप केला जातो. विष्णू चाटे हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. संतोष देशमुख खून प्रकरणानंतर, धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांच्यावरही जोरदार राजकीय टीका होत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी, हा प्रकरण राजकीय षड्यंत्राचा भाग असल्याचे काहींनी म्हटले आहे. वाल्मिक कराड यांची ओळख परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे नेते अशी आहे, परंतु त्यांचे नाव वारंवार गुन्हेगारी प्रकरणांत येत असल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्यावरून मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.

अखेर वाल्मिक कराड सीआयडीला शरण

Newsworldmarathi Pune : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले होते. विरोधकांनी कराड यांच्यावर टीका करत, त्यांना मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर वाल्मिक कराड गायब झाले होते, आणि त्यांचा शोध सुरू होता. अखेर, वाल्मिक कराड यांनी पुण्यात सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. त्यांनी स्वतःहून सीआयडी कार्यालयात हजर होऊन आत्मसमर्पण केले. सीआयडीने त्यांची चौकशी सुरू केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर २२ दिवस उलटले आहेत, आणि या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात होते. त्यांच्या शरणागतीनंतर, या प्रकरणातील तपासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्या, सीआयडी त्यांची कसून चौकशी करत आहे, आणि पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातील ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, कारण या घटनेने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. वाल्मिक कराड यांच्या शरणागतीनंतर, या प्रकरणातील सत्यता उघड होण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला गती मिळाल्यानंतर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे असून, गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकारी बीड जिल्ह्यात तपासासाठी उपस्थित आहेत. वाल्मिक कराड याचे नाव या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून घेतले जात आहे. सीआयडीने कराडच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी करून महत्त्वाचे धागेदोरे मिळवले आहेत. तसेच, हत्या घडवून आणण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा आणि व्यक्तींचा वापर झाला याचा तपशील तपासला जात आहे. कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कराडचे नाव समोर येऊ लागले.कराडच्या हालचालींवर आणि संपर्कांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते.अखेर कराडने पुण्यात शरणागती पत्करली, ज्यामुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या चौकशीनंतर या प्रकरणातील मास्टरमाईंडची भूमिका, हत्येचे कारण, आणि यामागील राजकीय किंवा वैयक्तिक वैर स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. सीआयडीने या प्रकरणात कठोर कारवाई करत आरोपींवर कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवली आहे.