पुणे विमानतळाला ‘संत तुकाराम महाराजां’चे नाव

0
Newsworldmarathi Pune : पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव बदलून’जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ,पुणे’असे करण्याचा शासकीय ठराव आज महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा नियम 110 अंतर्गत हा ठराव सादर केला,याला तातडीने मंजुरी मिळाली. या ठरावाद्वारे केंद्र शासनाला विमानतळाच्या नाव बदलण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. संत तुकाराम महाराज यांचे समाजासाठी असलेले योगदान आणि त्यांच्या विचारांचा वारसा लक्षात घेऊन हे नामकरण करण्यात आले आहे. यामुळे विमानतळाचा स्थानिक, सांस्कृतिक, आणि ऐतिहासिक संदर्भ अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निवडणूक खर्च सादर करा : संतोष पाटील

0
Newsworldmarathi Pune : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ तपासण्यावर विशेष भर देण्यात आला. बैठकीत विविध स्तरांवरील अधिकारी उपस्थित होते, ज्यांनी निवडणूक खर्च व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नमूद केले की ३०३ उमेदवारांपैकी ३०१ उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च सादर केला आहे, तर उर्वरित उमेदवारांना तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, निवडणूक आयोगाकडे निवडणूक खर्च न सादर करणाऱ्या उमेदवारांची माहिती पाठवली जाईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींना खर्च नोंदीसंदर्भात आवश्यक मार्गदर्शन केले. या बैठकीमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जबाबदारीसाठी एक सकारात्मक पाऊल उचलले गेले. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार, प्रेमप्रकाश मीना, उमेश कुमार, अमित कुमार, डॉ. ए. वेंकादेश बाबू, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक खर्च सोनाप्पा यमगर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह निवडणूक खर्च विषयक कामकाज पाहणारे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

परदेशी मालमत्ता व उत्पन्न स्वयंघोषित करावे : सतीश शर्मा

0
Newsworldmarathi Pune : “केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना जागरूक करण्यासाठी, तसेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुधारीत प्राप्तिकर विवरण परतावा (आयटीआर) भरून परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता स्वयंघोषित करण्यासाठी जागरूकता कार्यक्रम हाती घेतला आहे. काळा पैसा कायदा (ब्लॅकमनी ऍक्ट) परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न भारतात परत आणण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे काळा पैसा कायद्यातील कठोर तरतुदी समजून घ्यायला हव्यात. जागरूकतेच्या अभावामुळे अनेक करदात्यांना परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न न घोषित केल्यामुळे दंड आणि कारवाईला सामोरे जावे लागते,” असे प्रतिपादन प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त व महासंचालक (अन्वेषण) सतीश शर्मा यांनी केले. आर्थिक पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि काळा पैसा कायद्याच्या पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण संचालनालय व दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने ‘परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाची घोषणा’ यावर आयोजित आउटरीच प्रोग्रॅमच्या उद्घाटनावेळी सतीश शर्मा बोलत होते. ही मोहिम सरकारच्या पारदर्शक आणि जबाबदार कर प्रणालीच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, करदात्यांनी स्वेच्छेने आपल्या मालमत्तेची घोषणा करून दंडात्मक कारवाई टाळावी व आपल्या देशाच्या आर्थिक अखंडतेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही सतीश शर्मा यांनी केले. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी प्राप्तिकर (अन्वेषण) विभागाचे प्रधान संचालक मोहित जैन, ‘आयसीएआय’च्या विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे उपाध्यक्ष सीए सचिन मिणियार, सचिव सीए ऋषिकेश बडवे, कार्यकारिणी सदस्य सीए प्रितेश मुनोत, सीए प्रणव आपटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला २५० पेक्षा अधिक सनदी लेखापाल, प्रमुख व्यापारी, करतज्ञ, करदाते उपस्थित होते. प्राप्तिकर (अन्वेषण) विभागाचे अतिरिक्त संचालक सुधांशु शेखर, प्राप्तिकर (अन्वेषण) विभाग-१चे उपसंचालक महादेव धारूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काळा पैसा कायद्यासंबंधी सखोल माहिती दिली. दोन्ही वक्त्यांनी कायद्यातील तरतुदी, त्याची व्याप्ती आणि लागू होणारे नियम यावर सुस्पष्ट माहिती दिली. परदेशी मालमत्तेतून पैसा निर्माण करण्याची, तसेच तो भारतात आणण्याची प्रक्रिया, बँकांची कार्यप्रणाली, कोणत्या बँकेत खाते असावे, याविषयी महादेव धारूरकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. सीए ऋता चितळे यांनी या कार्यक्रमातून आपल्याला परदेशी मालमत्ता कशी तयार केली जाते व त्याचा आपल्या देशाला कसा फायदा होतो याबद्दल जाणून घेता आल्याचे नमूद केले. कार्यक्रमात उपस्थितांना परदेशी मालमत्तेतील विविध घटकांची माहिती देण्यात आली. ज्यात परदेशी बँक खाते, समभाग व कर्ज, व्याज, इतर व्यवसाय/संस्था मध्ये वित्तीय व्याज, चल-अचल मालमत्ता आणि परदेशी मालमत्तेत लाभकारक हक्क यांचा समावेश आहे. तसेच, परदेशी उत्पन्नामध्ये व्याज, लाभांश, एकूण प्राप्ती, आणि विमोचन यांचा समावेश केला आहे. या सर्व गोष्टींच्या घोषित न करण्याचे गंभीर परिणाम, जसे की काळा पैसा कायदा २०१५ अंतर्गत मूल्यांकन, दंड, व्याज आणि कारवाई यावर चर्चा करण्यात आली. कायदेशीर कामांबद्दल अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्यासह त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही एक उत्तम संधी असल्याचे सीए सचिन मिणियार यांनी स्वागत-प्रास्ताविकात सांगितले. सीए प्रितेश मुनोत यांनी सूत्रसंचालन केले. सीए ऋषिकेश बडवे यांनी आभार मानले.

पायलट चेश्ताने उभारला आदर्श

0
Newsworldmarathi Pune : दि. ९ डिसेंबर रोजी बारामती आणि इंदापूरच्या वेशीवर घडलेल्या भीषण अपघाताने दोन तरुणांचे जीवन हिरावले, तर आणखी दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात राजस्थानच्या चेश्ता बिष्णोई यांनी १० दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी (दि. १७) अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूनंतर केलेल्या अवयवदानामुळे आठ जणांना नवी आशा मिळाली. चेश्ता, कृष्णाशू सिंग, दक्षू शर्मा, आणि आदित्य कणसे हे चार जण उजनी धरणाकडे जात होते. टाटा हॅरीहर गाडीचा वेग अतिवाढल्याने (१९० किमी/तास) चालकाचे नियंत्रण सुटले. गाडी झाडाला धडकल्यानंतर लोखंडी पाइपलाइनवर पलटी झाली आणि तब्बल १५० फूट लांब घसरत गेली. यात आदित्य कणसे आणि दक्षू शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. चेश्ता आणि कृष्णाशू गंभीर जखमी झाले होते. चेश्ता गंभीर जखमी होती. तिला पुण्यात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिने जगण्याची लढाई गमावली. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. तिच्या हृदय, किडनी, डोळे, आणि आतड्यांचे दान केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. चेश्ताच्या मृत्यूनंतर मंगळवारी तिला पुण्यात साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. तिच्या कुटुंबीयांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय आदर्श ठरला आहे, आणि तो अनेकांसाठी प्रेरणादायक आहे.

‘ती’ने बांधकाम व्यवसायात आले पाहिजे : हिरानंदानी

0
Newsworldmarathi Pune : देशातील अन्य उद्योग, व्यवसायापेक्षा बांधकाम व्यवसायात वाढीचा वेग अधिक आहे. भारतात आज साधारणात 20 टक्के व्यवसायवृद्धीचा दर बांधकाम क्षेत्रात आहे, भविष्यात यात अधिक वाढ होईल. यामुळे पुरुष प्रधान समजल्या जाणाऱ्या बांधकाम व्यवसायात अधिकाधिक महिलांनी आले पाहिजे असे मत नॅशनल रिअल स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO/ नरडेको) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांनी केले. नॅशनल रिअल स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO/ नरडेको) माहीची स्थापना केली आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, सर्व क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संस्था आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील महिला उद्योजकांना त्यांच्या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी ‘माही’ व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे. हॉटेल शेरटॉन ग्रॅण्ड येथे ‘नरडेको माही’ आयोजित ‘अध्यक्ष पदभार स्विकारण्याचा सोहळा’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानवरून हिरानंदानी बोलत होते. यावेळी शेखर सिंह (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका), नेरडेको चे जी. हरिबाबू, राजन बांदेलकर, अपेक्षिता तिपसे (महाव्यवस्थापक, कॉसमॉस बँक) डॉ. विद्या येरवडेकर (प्र. कुलगुरू, सिम्बायोसिस विद्यापीठ), देव गिल (प्रसिद्ध अभिनेते ), नवनिर्वाचित अध्यक्ष स्मिता पाटील, मावळत्या अध्यक्षा अनंता रघुवंशी, नरडेको पुणेचे अध्यक्ष भरत अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना निरंजन पुढे बोलताना निरंजन हिरानंदानी म्हणाले, रोटी कपडा और मकान या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, मात्र आजही अनेकांचे हक्काचे घर झालेली नाही यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली परवडणाऱ्या दरात घर देण्यासाठी नरडेको वचनबद्ध आहे. आज मुंबई सारख्या शहरात जबाळपास पन्नास टक्के नागरिक झोपडपट्टी भागात राहतात, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी येत्या 10 वर्षांचा प्लॅन आम्ही सरकारला देणार आहोत, जेणेकरून मुंबई झोपडपट्टी मुक्त होईल आणि सर्वांना परवडणारी घरे मिळतील. माही च्या माध्यमातून बांधकाम व्यवसायत अधिकाधिक महिलांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणार, त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार असल्याचेही हिरानंदानी यांनी नमूद केले. आयुक्त शेखर सिंह म्हणाले, बांधकाम व्यवसायातील राष्ट्रीय पातळीवरील सनआस्थेने महिलांसाठी केवळ स्वतंत्र विंग सुरू करून थांबू नये, बांधकाम क्षेत्रातील महिला मंजुरांची संख्या लक्षणीय आहे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना यथायोग्य मंजूरी देण्यासाठी प्रयत्न करावेत. आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, आपल्या महाराष्ट्रात मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुख्य वनसंरक्षक अशा तीनही महत्वाच्या पदावर महिला आहेत यामुळे केवळ माही नाही तर नरडेको च्या अध्यक्षपदी महिला बांधकाम व्यावसायिक आल्या पाहिजे असे मत व्यक्त केले. माहीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा स्मिता पाटील म्हणाल्या, बांधकाम व्यवसायात महिलांचा सहभाग वाढविणे, मजूर महिलांचे प्रश्न सोडवणे या गोष्टी तर आम्ही करणार आहोतच, मात्र पर्यावरण पूरक घरांच्या निर्मितीसाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. राजन बांदेलकर म्हणाले, बांधकाम क्षेत्र पुरुष प्रधान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव, बेटी पढाव असा नारा दिलेला आहे. मेडिकल, फायनान्स सह अन्य क्षेत्रात महिलांची संख्या मोठी आहे, मात्र बांधकाम व्यवसायात ती तुलनेने फार कमी आहे. महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी चार वर्षांपूर्वी माहीची स्थापना झाली आहे, आज एक मराठी महिला माहीची राष्ट्रीय अध्यक्ष होतेय याचा आनंद वाटतो. याप्रसंगी नेरडेको चे जी. हरिबाबू, अपेक्षिता तिपसे, डॉ. विद्या येरवडेकर, देव गिल, अनंता रघुवंशी, भरत अग्रवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त करत नरडेको माहीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासातूनच भारत होईल महाशक्ती

0
Newsworldmarathi Pune : ‘भारतीय ज्ञान परंपरा हा विज्ञान, तत्वज्ञान आणि अध्यात्मज्ञानाचा संगम असून, ब्रिटिश सत्तेने भारतीयांना या ज्ञान परंपरेपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. आता नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश करण्यात आला असून, त्यातून भावी पिढी विचार प्रवर्तक होऊन भारत महाशक्ती होण्यास मदत मिळेल,’ असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी गुरुवारी व्यक्त केला. निमित्त होते, भूषण पटवर्धन व इंदू रामचंदानी लिखित ‘जिनोम टू ओम’ या पुस्तकावरील परिसंवादाचे. ‘पुणे पुस्तक महोत्सवा’त ‘लिटररी कॉर्नर’ येथे आयोजित या परिसंवादात ज्येष्ठ तत्वज्ञ शरद देशपांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, लेखक भूषण पटवर्धन यांनी सहभाग घेत आपली भूमिका मांडली. ‘युरोपात प्रबोधनयुगात विज्ञान-अध्यात्म हा भेद निर्माण झाला. ब्रिटिशांची सत्ता आल्यावर भारतीय विज्ञानाकडे झुकले आणि अध्यात्माची परंपरा विसरले. आधुनिक काळात या दोन्हीचे महत्त्व अधोरेखित झाल्याने हा भेद मिटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ‘जिनोम टू ओम’ हे पुस्तक म्हणजे ‘मल्टिव्हिटॅमिन’ची गोळी असून, विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही बाजूंकडे पाहायला शिकविते,’ असे शरद देशपांडे म्हणाले. ‘या पुस्तकामध्ये विज्ञान, तत्वज्ञान, मनोविज्ञान, अध्यात्म यांची चांगली सांगड घालण्यात आली असून, स्वत:च्या समस्यांकडे वैज्ञानिक व अध्यात्मिक दृष्टीने कसे पाहायचे, याची माहिती दिली आहे, तसेच शारीरिक, मानसिक, सामाजिक व अध्यात्मिक आरोग्याचा उहापोह करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे,’ असे डॉ. सुरेश गोसावी म्हणाले. ‘वेद-उपनिषदांमध्ये व्यष्टी, सृष्टी, समष्टी आणि परमेष्टी या सूत्रांचा उल्लेख असून, त्याचा संबंध मानवी उत्क्रांतीशी आहे. या भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश आता नवीन शैक्षणिक धोरणात करण्यात आला असून, त्याला राजाश्रय लाभलेला आहे. भारतीय ज्ञान परंपरेत विज्ञान व जीवनपद्धतीची सांगड घालण्यात आली असून, त्याचे सार या पुस्तकात मांडण्यात आले आहे, असे डॉ. करमळकर म्हणाले. ‘विज्ञानातून तत्वज्ञानाकडे प्रवास मांडणारे हे पुस्तक सर्व वयोगटातील वाचकांनी वाचले पाहिजे. त्यातून विचारप्रवर्तक व्यक्ती घडून, भारत महाशक्ती होण्यास मदत मिळेल,’ असा विश्वास डॉ. विद्या येरवडेकर यांनी व्यक्त केला. भूषण पटवर्धन यांनी लेखनामागची प्रेरणा उलगडली. ‘विज्ञान हे विशेष ज्ञान असून, त्याहून व्यापक असलेल्या प्रज्ञानाकडे जाण्याची गरज आहे. आतापर्यंत मानवाने स्वत:चा फायदा, लालसेपोटी विज्ञानाचा उपयोग केला. त्याचा चराचरासाठी व्यापक उपयोग करण्यास प्रज्ञान शिकवते. या संदर्भातील उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे,’ असे पटवर्धन यांनी सांगितले.

प्रेमीयुगलांसाठी ‘सेफ हाऊस’

Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र शासनाने समाजातील समता, सहिष्णुता, आणि प्रेमाला प्रोत्साहन देण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गेस्ट हाऊसना “सेफ होम (Safe Home)” म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा निर्णय आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षित निवास उपलब्ध करून देण्यासाठी क्रांतिकारी ठरणार आहे. निर्णयाचे उद्दिष्ट: •समाजात समता व सहिष्णुतेचा प्रसार: या निर्णयामुळे सामाजिक एकतेला चालना मिळेल. •प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण: अशा जोडप्यांना त्यांच्या सुरक्षेबाबतची भीती दूर करून सुरक्षित जीवन जगता येईल. •शांततामय निवास: जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात विश्वासाने आणि आनंदाने करता येईल. महत्त्वाचे मुद्दे: 1.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गेस्ट हाऊस “सेफ होम” म्हणून घोषित करण्यात आले आहे. 2.विशेष कक्ष (Special Cell) स्थापन करून या जोडप्यांना मदत व मार्गदर्शन केले जाणार आहे. 3.विशेष कक्षामार्फत या सेफ होमच्या सुविधेबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. अनहद सोशल फाउंडेशनच्या “राईट टू लव्ह” उपक्रमाच्या वतीने, आम्ही महाराष्ट्र शासनाच्या या स्वागतार्ह निर्णयाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. फाउंडेशनचे मत आहे की, “हा निर्णय समाजातील समता व सहिष्णुतेचा पाया अधिक मजबूत करेल. अनेक जोडप्यांना त्यांच्या प्रेमाचा अधिकार निर्भयपणे बजावता येईल. शासनाच्या या पुढाकारामुळे प्रगत समाजाची उभारणी शक्य होईल.” सर्व जोडप्यांना आवाहन: जर तुम्ही आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केला आहे आणि तुम्हाला सुरक्षित निवासाची गरज आहे, तर या सेफ होम सुविधेचा लाभ घ्या.अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील विशेष कक्ष (Special Cell) किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.

दिल्लीतील संमेलन अभूतपूर्व ठरेल : प्रतिभाताई पाटील

0
Newsworldmarathi Pune सरहद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या https://abmssdelhi.org या संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आज (दि. 19) करण्यात आले. दिल्लीत सुमारे 70 वर्षांनंतर होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देऊन हे संमेलन अभूतपूर्व ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रतिभाताई पाटील यांच्या 90व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‌‘रायगड‌’ या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सतिश देसाई, ॲड. प्रताप परदेशी, शैलेश वाडेकर, अनुज नहार, संतोष देशपांडे, पाटील यांच्या कन्या ज्योती राठोड आदी उपस्थित होते. दिल्लीत होत असलेल्या संमेलनाविषयी माहिती देताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, सुमारे 70 वर्षांपूर्वी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते तर स्वागताध्यक्ष बॅरिस्टर काकासाहेब गाडगीळ होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील संमेलन झाले होते. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा योग परत जुळून आला असून या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वीकारले आहे. ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली 98वे संमेलन होत आहे. प्रतिभाताई पाटील यांच्या 90व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा. मिलिंद जोशी यांनी मसापने प्रकाशित केलेला अक्षरधन हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान केला. तर सरहदच्या वतीने काश्मीरी गब्बा देऊन शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांनी त्यांचा सन्मान केला. प्रतिभाताई पाटील यांच्या कुटुंबियांच्यावतीने पाटील यांच्यावरील गौरव ग्रंथ महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सरहद संस्थेला भेट देण्यात आला. संकेतस्थळाची निर्मिती करताना त्याची रचना साधी-सोपी आणि आकर्षक करण्यात आली आहे. संमेलनाविषयी अद्ययावत माहिती, प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथ दालनाची नोंदणी या संकेतस्थळाद्वारे करता येणार आहे. तसेच मराठी भाषा, महाराष्ट्र आणि दिल्लीचे संबंध यावर प्रकाशझोत टाकणारी छायाचित्रे, व्हिडिओ क्लिप्स, पॉडकास्ट, न्यूज क्लिप्स पाहण्याची सोय आहे. विश्वकोश या विशेष विभागातून मराठी साहित्य आणि साहित्यिकांविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभरातील कोट्यवधी मराठी लोकांपर्यंत या संमेलनाविषयीची माहिती पोहोचेल. संकेतस्थळाची निर्मिती संतोष देशपांडे यांच्या मीडियाक्युरा या संस्थेने केली असून मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे विशेष सहकार्य लाभले आहे.

महिलांसाठी विमा उद्योगाचे पहिले उत्पादन लॉन्च

0
Newsworldmarathi Mumbai : ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने आज ‘ICICI प्रू विश’ हे जीवन विमा उद्योगातील पहिल्याच प्रकारचे आरोग्य उत्पादन लाँच केले आहे, जे खास करून महिलांचे विशिष्ट गंभीर आजार आणि शस्त्रक्रियांसाठी सेवा पुरवते. हे उत्पादन ICICI प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सने एक अग्रगण्य जागतिक जीवन आणि आरोग्य पुनर्विमा कंपनी, रिइन्शुरन्स ग्रुप ऑफ अमेरिका, इनकॉर्पोरेटेड (RGA) च्या सहकार्याने विकसित केले आहे. स्तन, गर्भाशय, गर्भाशयाचा कर्करोग आणि हृदयाचे आजार यासारख्या गंभीर आजारांच्या निदानावर ICICI प्रू विश आरोग्य कव्हरच्या रकमेच्या 100% पर्यंत त्वरित पेआउट ऑफर करते. मानक योजनांच्या विपरित, जेथे पेआउट परतफेड स्वरूपात असतात, हे उत्पादन ग्राहकांना लवचिकता प्रदान करून निदानावर निश्चित एकरकमी देते. या संदर्भात केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षानुसार, ग्राहकांच्या चिंतेचे एक कारण म्हणजे दर काही वर्षांनी प्रीमियममध्ये वाढ होण्याची शक्यता. ICICI प्रू विश, 30 वर्षांच्या प्रीमियम गॅरंटी कालावधीसह, ग्राहकांना त्यांच्या प्रीमियम पेमेंटसाठी अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यास सक्षम करू शकते आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना मानसिक शांतता देते. हे उत्पादन ग्राहकांना प्रीमियम पेमेंट टर्म दरम्यान कधीही 12 महिन्यांसाठी प्रीमियम सॅबॅटिकल प्रदान करते. हे वैशिष्ट्य ग्राहकांना आर्थिक लवचिकता देते, तसेच त्यांना त्यांच्या आरोग्याच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सज्ज करते. याशिवाय, हे उत्पादन ग्राहकांना बाळंतपणातील गुंतागुंत आणि नवजात बाळाचे जन्मजात आजार कव्हर करण्याचा पर्याय देखील देते. ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य उत्पादन आणि वितरण अधिकारी अमित पल्टा म्हणाले, “आयसीआयसीआय प्रू विश हे जीवन विमा उद्योगाचे पहिले आरोग्य उत्पादन महिलांच्या विशिष्ट आरोग्यविषयक आजारांसाठी देताना आम्हाला आनंद होत आहे. हे उत्पादन त्यांना त्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी एकरकमी पेआउट ऑफर करून आर्थिकदृष्ट्या तयार होण्यास सक्षम करते. भारतीय महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक आव्हानांबाबत आमचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि त्यासंदर्भात RGA इंडियाचे सखोल ज्ञान यांचा मिलाफ करून ICICI प्रू विश विकसित करण्यात आले आहे. महिला ग्राहक वर्ग मोठ्या बाजारपेठेची संधी देतो आणि हे उत्पादन विशेषतः या विभागाच्या विमा गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. महिलांना होणाऱ्या आरोग्य जोखमींमुळे होणाऱ्या आर्थिक संकटातून हे उत्पादन मुक्ती देईल. ICICI प्रू विश ग्राहकांना 30 वर्षांसाठी प्रीमियम गॅरंटी देऊन त्यांना काही वैद्यकीय घटनांसाठी एकाधिक दावे करण्याची लवचिकता देऊन आकर्षक प्रस्ताव देते. महत्त्वाचे म्हणजे, हे अतिरिक्त पेआउट करते ज्यामुळे आजारातून बाहेर पडण्याचा खर्च कव्हर होण्यास मदत होते.” सुनील शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, रिइन्शुरन्स ग्रुप ऑफ अमेरिका, इंडिया म्हणाले, “ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स सोबत ‘ICICI Pru Wish’ सोबत आमच्या सहकार्याची घोषणा करताना आनंदी आहोत. आजच्या जगातील भारतीयांच्या विशेषत: महिलांच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले हे एक अग्रगण्य आरोग्य उत्पादन आहे. ही भागीदारी बाजारातील बदलत्या मागणीनुसार नावीन्यपूर्ण, ग्राहक-केंद्रित उपाय ऑफर करण्याच्या आमच्या परस्पर समर्पणावर प्रकाश टाकते.”

आरोग्याची काळजी घेणारे ते देवदूतच : संदीप खर्डेकर

0
Newsworldmarathi Pune : मशाल संस्थेच्या माध्यमातून वस्ती विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे देवदूतच आहेत असे गौरवोदगार क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी काढले.आज मशाल संस्थेच्या आरती भोर आणि कविता तडवी यांना ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणी साठी सात (7) रक्तदाब तपासणी यंत्र भेट देताना कर्तव्यपूर्तीचे समाधान आहेच पण भविष्यात देखील त्यांना अधिकाधिक सहाय्य करणार असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले. यावेळी ट्रस्ट चे सदस्य सारंग राडकर, सोशल वर्कर आणि मशाल च्या कम्युनिटी ऑफिसर आरती भोर, कविता तडवी, वंशिका ट्रस्ट चे विशाल सातपुते इ मान्यवर उपस्थित होते. मशाल संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करणाऱ्या व त्यांना औषधोपचार उपलब्ध करून देणाऱ्या आरती भोर व कविता तडवी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्यात हाडांचा ठिसूळपणा, रक्तदाब, मधुमेह इ आरोग्याच्या समस्या वाढल्या असून परिस्थिती मुळे ते दुखणं अंगावर काढतात असे सांगितले. त्यावर संदीप खर्डेकर यांनी “ग्लोबल ग्रूप, वेस्टर्न इंडिया फोर्जिंग, नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट” या सह अनेक दानशूर अश्या कार्याला मदत करत असतात त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला जी मदत लागेल ती उपलब्ध करेन असे वचन दिले.