स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी पक्ष सोडला , भारतीय जनता पार्टीचा पत्रकार परिषदेत खुलासा
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ०९ हे केंद्रस्थानी आले असताना, अमोल बालवडकर यांच्या पक्षत्यागामागील खरी कारणे उघड करणारी भारतीय जनता पार्टीची पत्रकार परिषद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. विकासाचे मुद्दे पुढे करत केलेले आरोप हे केवळ मुखवटा असून, पदांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहिल्यानेच हा पक्षत्याग झाला, असा गंभीर आणि थेट आरोप भाजपाने केला.
महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात यावे, अशी वैयक्तिक अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळेच अमोल बालवडकर यांनी पक्ष सोडला, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री. अमोल बालवडकर यांनी केलेल्या बिनबुडाच्या, तथ्यहीन व दिशाभूल करणारे आहेत. असे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ०९ मधील अधिकृत उमेदवारी आणि नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेत प्रभाग क्रमांक ०९ चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. लहू गजानन बालवडकर व श्री. गणेश कळमकर, तसेच भाजपाचे पदाधिकारी श्री. प्रकाश बालवडकर आणि श्री. राहुल कोकाटे या पदाधिकाऱ्यांनी अमोल बालवडकर यांनी केलेल्या आरोपांचा सविस्तर व तथ्यात्मक खंडन केले.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अमोल बालवडकर यांनी जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे आरोप पूर्णतः खोटे व बिनबुडाचे आहेत. “महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात यावे, अशी वैयक्तिक अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळेच त्यांनी पक्ष सोडला,” असा आरोप यावेळी करण्यात आला.
तसेच गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत अमोल बालवडकर कोणत्याही पक्षकार्यक्रमात सहभागी नव्हते व पूर्णतः राजकीयदृष्ट्या अनुपस्थित होते, हेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. “आज विकासाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी स्वतः आजवर कोणते प्रकल्प राबवले, हे जनतेसमोर मांडावे तसेच भविष्यातील नियोजनही स्पष्ट करावे,” असे आवाहन भाजपाने केले.
“पक्षात अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, तरीही त्यांनी पक्ष सोडलेला नाही. कारण भारतीय जनता पार्टी हा पदांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे,” असे स्पष्ट मत भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केले.
विधानसभेपासूनच अमोल बालवडकर यांची पक्ष सोडण्याची तयारी होती आणि पक्षावर दबाव टाकण्याचा हुकुमशाही पद्धतीचा प्रयत्न त्यांनी केला, असा आरोपही यावेळी करण्यात आला. “त्यांच्या आव्हानाला आम्ही प्रचाराचा नारळ फोडून, विकासाच्या कामातून उत्तर देत आहोत,” असे भाजपाच्या उमेदवारांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ०९ मधील मतदारांनी विकासालाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून, विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाणार आहे. असे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
६८व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धेत युवान भोरेची चमकदार कामगिरी; ‘निष्णात नेमबाज’ होण्याचा मान
Newsworldmarathi Pune: दिल्ली येथे पार पडलेल्या ६८व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धेत युवा नेमबाज युवान भोरे याने दमदार आणि उल्लेखनीय कामगिरी करत नेमबाजी विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डबल ट्रॅप या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत युवानने ‘निष्णात नेमबाज’ होण्याचा मान पटकावला असून, त्याच्या या यशामुळे क्रीडाविश्वात त्याचे कौतुक होत आहे.
युवान भोरे हा अमनोरा येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत असून तो शाळेचा स्पोर्ट्स कॅप्टन म्हणूनही जबाबदारी सांभाळतो. मे २०२५ मध्ये नेमबाजी खेळात पदार्पण करून अल्पावधीतच त्याने राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले आहे. केवळ काही महिन्यांतच त्याने सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे.
याआधी मागील महिन्यात दिल्ली येथे झालेल्या शॉटगन शोडाऊन चॅलेंज टूर्नामेंटमध्ये युवानने सुवर्णपदक पटकावत आपली गुणवत्ता दाखवून दिली होती. त्याची ही यशस्वी वाटचाल अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणादायी ठरत आहे.
नेमबाजी क्षेत्रातील युवानचा प्रवास जे. बी. कुसळे फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तेजस कुसळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. त्यानंतर अर्जुन पुरस्कार विजेते आणि वर्ल्ड चॅम्पियन अंकुर मित्तल सर** यांचेही त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच युवानच्या यशामागे त्याचे मामा प्रचीत इंगवले यांचे विशेष योगदान आहे. स्वतः गोल्ड मेडलिस्ट असलेल्या प्रचीत इंगवले यांनी दिलेले योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन यामुळेच युवानने हे उल्लेखनीय यश साध्य केले आहे.
लहू बालवडकरांच्या वाढदिवशी ‘विकासाचा धमाका’; महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रभाग ०९ साठी भव्य विकास आराखड्याची घोषणा
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भारतीय जनता पार्टीने विकासाच्या अजेंड्यावरून आक्रमक आणि नियोजनबद्ध खेळी खेळल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार लहू गजानन बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेला भव्य विकास आराखडा हा केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न राहता, प्रभागातील राजकीय समीकरणे बदलणारा ठोस राजकीय संदेश ठरला आहे.
राजकारणात प्रतीकात्मक कार्यक्रमांना विशेष महत्त्व असते. वाढदिवशी विकास आराखड्याची घोषणा करणे म्हणजे ‘व्यक्तीपूजा नव्हे, विकासपूजा’ असा स्पष्ट संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. महाळुंगे टी.पी. स्कीम, शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो, मुळशी धरणातून पाणीपुरवठा आणि पुणे–कात्रज सिमेंट काँक्रीट सर्व्हिस रोड यांसारख्या घोषणांनी प्रभागातील ज्वलंत प्रश्नांवर थेट बोट ठेवण्यात आले आहे.
घोषणा नाहीत, तर दीर्घकालीन नियोजन
या विकास आराखड्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ आश्वासनांपुरता मर्यादित नाही. महाळुंगे टी.पी. स्कीमसारखा प्रकल्प नियोजनबद्ध शहरी विकासाशी थेट जोडलेला आहे, तर मेट्रो आणि पाणीपुरवठा हे प्रभागातील लोकसंख्या वाढ आणि आयटी हबच्या गरजांचा विचार करून मांडलेले दीर्घकालीन उपाय आहेत. त्यामुळे ‘भविष्याचा विचार करणारा आराखडा’ अशी या घोषणांची प्रतिमा तयार झाली आहे.
बाणेर येथील माऊली गार्डनमध्ये झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महसूल मंत्री बावनकुळे यांची उपस्थिती लाभणे हे केवळ औपचारिक नव्हते. ही उपस्थिती म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा लहू बालवडकर यांच्यावर असलेला विश्वास आणि प्रभाग ०९ साठीचा स्पष्ट राजकीय संदेश होता. कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम प्रभावी शक्तिप्रदर्शन ठरला.
लहू बालवडकर यांनी या संधीचा वापर केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यापुरता न ठेवता, विकासासाठीची आपली भूमिका आणि जबाबदारी स्पष्टपणे मांडली. “हा सन्मान वैयक्तिक नसून नागरिकांसाठी आहे” हा संदेश देत त्यांनी ‘नेतृत्वाचा परिपक्व चेहरा’ समोर आणला. निवडणुकीत मतदार अशाच विश्वासार्ह नेतृत्वाकडे झुकतात, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर प्रभाग ०९ मध्ये विरोधकांकडे विकासाचा ठोस अजेंडा आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. अंतर्गत मतभेद आणि विस्कळीत प्रचारात अडकलेल्या विरोधी पक्षांसमोर भाजपने विकासाचा स्पष्ट नकाशा मांडत आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
लहू बालवडकरांच्या वाढदिवशी जाहीर झालेला विकास आराखडा हा केवळ एक कार्यक्रम नसून, आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीतील भाजपची रणनीती स्पष्ट करणारा राजकीय टर्निंग पॉइंट ठरत आहे. विकास, संघटनात्मक ताकद आणि वरिष्ठ नेतृत्वाचा पाठिंबा या त्रिसूत्रीच्या जोरावर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भाजप निर्णायक आघाडी घेत असल्याचे संकेत या घटनेतून स्पष्टपणे दिसून येतात.
विरोधकांनी ६० वर्षांचा हिशोब द्यावा : मंत्री चंद्रकांत पाटील
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेत २०१७ ते २०२१ काळात पाचच वर्षे भाजपचे सरकार होते. पण महाराष्ट्राची आणि महापालिकेच्या स्थापनेपासून विरोधी पक्षाचीच सत्ता होती, त्यामुळे विरोधकांनी ६० वर्षांचा हिशोब द्यावा, असा घणाघात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारच्या काळात पुणे शहरात अनेक विकास कामे झाल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले.
कोथरुडमधील प्रभाग क्रमांक ३१ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ना. चंद्रकांतदादा पाटील यांची चौक सभा आज झाली. यावेळी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी भाजप मध्य मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, प्रभाग क्रमांक ३१ चे भाजप उमेदवार पृथ्वीराज सुतार, ज्योत्स्ना कुलकर्णी, वासंती जाधव, दिनेश माथवड यांच्यासह भाजपचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले की, पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्ष २०१७ ते २०२१ या पाच वर्षाच्या काळातच भाजप सत्तेत होता. या काळात मेट्रोसह, समान पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात बसेसची उपलब्धता, नदीसुधार प्रकल्प, वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रमुख चौकांत उड्डाणपूल असे एक ना अनेक प्रकल्प राबवले. कोथरुड मध्ये घरापासून ते मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी बसेसची देखील व्यवस्था केली आहे.
ते पुढे म्हणाले की, आज विरोधक भाजपवर टीका करत आहेत की, भाजपच्या काळात विकास झालेला नाही. वास्तविक, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आणि पुणे महापालिकेच्या स्थापनेपासून ६० वर्षे महापालिकेत तुमचीच सत्ता होती. तुमच्या काळात पुण्याची स्थिती काय होती, ज्यामुळे २०१४ पासून पुणेकरांनी तुम्हाला सातत्याने नाकारले आहे. तुमच्या काळात मंजूर झालेला आणि उभारलेला विद्यापीठ चौकात उभारलेला उड्डाणपूल पाडण्याची नामुष्की तुमच्यावर ओढावली. हे तुमचे पुणे शहराच्या विकासाचे नियोजन आहे का? असा घणाघात ना. पाटील यावेळी केला.
भाजपलाच मतदान करुन भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यावर परमहंसनगर आणि गुजरात कॅालनीमधील नागरिकांनी भाजपालाच विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
राणी भोसले यांची संकल्पना ठरली दिशादर्शक; ‘लाईट हाऊस’मुळे शेकडो तरुणांना रोजगाराची नवी संधी
Newsworldmarathi Pune: वस्तीभागातील तरुण-तरुणींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणारा ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ हा उपक्रम आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ३८ मधील भाजप नेत्या व माजी नगरसेविका राणी भोसले यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अप्पर डेपो परिसरात लाईट हाऊस प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून, त्याचा थेट फायदा वस्तीभागातील तरुणांना होत आहे.
आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अपूर्ण राहिलेल्या अनेक तरुणांमध्ये कला, कौशल्य आणि काम करण्याची प्रबळ जिद्द असते. हीच बाब ओळखून राणी भोसले यांनी तरुणांच्या कौशल्यांना दिशा देण्यासाठी लाईट हाऊस प्रकल्पासाठी प्रयत्न केले. अप्पर डेपो येथील या केंद्रामुळे प्रभाग ३८ तसेच आसपासच्या भागातील तरुण-तरुणींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
या प्रकल्पांतर्गत १८ ते ३० वयोगटातील तरुणांना सघन प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणपूर्व करिअर टेस्ट घेऊन त्यांच्या आवडीनुसार योग्य कोर्सची निवड केली जाते. टॅली, कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलरिंग, ब्युटी पार्लर, हेल्थ सेक्टर, नर्सिंग असिस्टंट, जिम ट्रेनर, कुकिंग, ग्राफिक डिझाईन व विविध सॉफ्टवेअर कोर्सेसचे प्रशिक्षण येथे दिले जाते.
या उपक्रमामुळे अनेक तरुणांना नोकरीच्या संधी मिळाल्या असून, काहींनी स्वतःचा व्यवसायही सुरू केला आहे. विशेष म्हणजे तरुणांना चुकीच्या मार्गापासून दूर ठेवत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य या प्रकल्पातून घडत आहे. राणी भोसले यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला अप्पर डेपो येथील लाईट हाऊस प्रकल्प प्रभाग ३८ साठी विकासाचा मजबूत आधार ठरत आहे.
प्रभाग 22 मधील लोहियानगरामध्ये अर्चना पाटील यांच्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद
Newsworldmarathi Pune: ‘विकास’ हेच अंतिम ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सातत्याने काम करणाऱ्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांच्या प्रभाग क्रमांक २२ ‘क’ मधील लोहियानगर येथे काढलेल्या भव्य पदयात्रेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले असून, हा प्रतिसाद त्यांच्या विजयाची नांदी असल्याचे चित्र दिसून आले.
लोहियानगर येथील श्रीराम मंदिरापासून अत्यंत पवित्र आणि मंगलमय वातावरणात या पदयात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर ही रॅली संपूर्ण प्रभागातून मार्गक्रमण करत पुढे सरकली. रॅलीदरम्यान महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. गेल्या आठ वर्षांत सौ. अर्चना पाटील यांनी रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि अन्य मूलभूत सुविधांसाठी केलेल्या प्रभावी कामाची दखल घेत नागरिकांनी त्यांना पुन्हा संधी देण्याचा निर्धार केल्याचे या रॅलीतून स्पष्ट झाले. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी फुलांची उधळण करत आपला उत्साह आणि प्रेम व्यक्त केले. अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपाच्या या रॅलीमुळे संपूर्ण प्रभाग भाजपमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पदयात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना सौ. अर्चना पाटील यांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “आज मिळालेला हा प्रतिसाद माझ्या आठ वर्षांच्या मेहनतीचे आणि तपश्चर्येचे फळ आहे. सर्व जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. जनतेने दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य असून, याच विश्वासातून पुढील कार्यकाळातही मी अधिक जोमाने जनसेवा करेन,” असे त्या म्हणाल्या.
या रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साह दाखवत सौ. अर्चना पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि मजबूत जनसंपर्कामुळे त्या मोठ्या बहुमताने विजयी होतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
ग्राहक पेठेत तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन
Newsworldmarathi Pune: स्वदेशी वस्तू विकत घ्याव्यात अशी जेव्हा सुरुवात झाली व मॉल असा प्रकारही नव्हता तेव्हा घरगुती वस्तू योग्य दरात मिळण्यासाठी सहकारी तत्त्वावर ग्राहक पेठेची सुरुवात झाली. आजही मोठ्या मॉलच्या स्पर्धेत ग्राहक पेठ तितक्याच ताकदीने उभी आहे. हे ग्राहक पेठेचे खऱ्या अर्थाने यश आहे असे मत ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्राहक पेठेच्या उपाध्यक्षा संध्या भिडे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक,जयराज अँड कंपनीचे डॉ.राजेश शहा आणि कोहिनूर कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर फिरोज शेख इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ म्हणाल्या मागील 34 वर्षापासून उत्पादक ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ग्राहक पेठ तांदूळ महोत्सव सुरू आहे. खरा बासमती कोणता बासमती मधील तिबार दुबार म्हणजे काय या सर्वाची माहिती तांदूळ महोत्सवात ग्राहकांना दिली जाते. वर्षाच्या साठवणीसाठी पुणेकरांना उत्तम दर्जाचा तांदूळ रास्त दरात देण्याची प्रथा तांदूळ महोत्सव सुरू झाली. प्रतिवर्षी पुणेकरांचा महोत्सवास वाढता प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी सूर्यकांत पाठक म्हणाले उत्पादकांपासून थेट ग्राहकांपर्यंत वर्षाच्या साठवणी करिता रास्त दरात तांदूळ मिळवण्याकरिता हा तांदूळ महोत्सव सुरू आहे. बासमती पासून आंबेमोहर पर्यंत व इंद्रायणी पासून कोलम चिनोर पर्यंत सुमारे 48 प्रकारचे तांदूळ या ठिकाणी उपलब्ध आहेत. यावर्षी आंबेमोहोर तांदुळाचे दर बासमतीपेक्षा अधिक आहेत व ते वाढतच जाणार आहेत तरीदेखील महोत्सवात बाजारातील दर वाढले तरी याच दरात 25 जानेवारी पर्यंत तांदुळाचा पुरवठा ग्राहकांना केला जाईल.
डॉ.राजेश शहा म्हणाले ग्राहक पेठ गुणवत्ता व विश्वासासाठी ओळखली जाते. तांदूळ महोत्सव ही कल्पना ग्राहक पेठेची आहे. ग्राहक पेठेच्या सहकार्यामुळेच आम्ही उत्पादक तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांना थेट तांदूळ उपलब्ध करून देत आहोत. आजच्या या विशेष कार्यक्रमात अहमदाबाद वरून ग्राहक पेठे तांदूळ खरेदी करण्यासाठी ज्योत्स्नाताई तांबे उपस्थित होत्या.
बाप्पु मानकर यांचा प्रभाग २५ मध्ये घरोघरी संपर्क दौरा
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई येथील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी प्रभागातील विविध भागांमध्ये घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. या वेळी अनेक ठिकाणी नागरिकांनी औक्षण करून त्यांचे स्वागत करत आशीर्वाद दिले.
हा संवाद दौरा शनिवार पेठेतील आपटे घाट, महालिरकर टेकडी, उभा शनिवार, तांबे बोळ, घोडके आळी, वीर मारुती चौक, कडबे आळी, हसबनीस बखळ, काळभे वस्ती, मेहुनपुरा तसेच शनिवार पेठेतील विविध परिसरांमध्ये पार पडला. यावेळी नागरिकांनी ‘२४ तास जनसेवा’ कार्यालय व ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ मार्फत कौतुक करत, झालेल्या कामांच्या आठवणी सांगितल्या. भविष्यात अधिक कामाची अपेक्षा व्यक्त केली.
या प्रचार दौऱ्यात कसबा मतदारसंघ सरचिटणीस निलेश कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, धनंजय डेंबळे, उमेश नवरे, अनंत कुंटे, राम दहाड, भूषण बोकील, अतुल मुरकुटे, अमित मुनोत, सर्वेश पवार, मनीष जाधव, ओंकार डिंबळे, कौस्तुभ गोखले, महेश काटदरे, यश थोपटे, कौस्तुभ गाडे आणि संतोष नामजोशी सहभागी झाले होते. यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षालाच विजयी करण्याचे आश्वासन दिले.
प्रभाग २४ मध्ये राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Newsworldmarathi Pune: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा गड असलेला कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल हा प्रभाग क्रमांक 24 हा अधिक बळकट होताना पाहायला मिळत आहे.
भारतीय जनता पक्षाला (भाजप) मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज प्रभाग क्रमांक 24 मधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला प्रभागात मोठा धक्का बसला असून, भाजपसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून प्रभागातील राजकीय चित्र बदलले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेत्यांच्या या प्रवेशाने ते चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या उपाध्यक्ष वनिता विश्वास जगताप, सरचिटणीस अमर सुभाष कोरे आणि सदस्य आयेशा अमर कोरे यांचा समावेश आहे. या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
वनिता विश्वास जगताप या प्रभागात सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय आहेत, तर अमर सुभाष कोरे आणि आयेशा अमर कोरे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या प्रभागातील पायाभूत संरचनेला खिंडार पडले असून, गणेश बिडकर यांच्या विजयला अधिक बळ मिळाले आहे.
गणेश बिडकर यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढला आहे. कमला नेहरू आणि केईएम हॉस्पिटलसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये सुविधा वाढवणे, ‘लाईट हाऊस’ उपक्रमातून महिलांना रोजगाराच्या संधी देणे यासारख्या कामांमुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास झाला आहे. आम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये येण्याचे कारण म्हणजे हेच विकासाभिमुख नेतृत्व आहे,” अशी भावना प्रवेशावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
बाणेरमध्ये भाजपचा ‘सोसायटी टू सोसायटी’ प्रचार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
Newsworldmarathi Pune: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील बाणेर परिसर सध्या भाजपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रोहिणी सुधीर चिमटे, गणेश जानोबा कळमकर, मयुरी राहुल कोकाटे व लहू गजानन बालवडकर यांनी बाणेरमधील प्रमुख गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सलग भेटी देत नियोजनबद्ध, थेट आणि परिणामकारक प्रचार मोहिमेला वेग दिला आहे.
सुप्रीम एस्ताडो, सन हॉरायझन, एस्टोनिया, अंजोर को-ऑप हाउसिंग, पार्क एक्सप्रेस आणि एसेन्सिया हाइट्स या नामांकित सोसायट्यांमध्ये झालेल्या संवाद दौर्यांमुळे बाणेरमध्ये भाजपच्या निवडणूक प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ औपचारिक भेटी न करता, उमेदवारांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांवर सविस्तर चर्चा केल्याने प्रचाराला वेगळी धार मिळाल्याचे चित्र आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षितता, स्वच्छता आणि नागरी सुविधा यांसारख्या दैनंदिन ज्वलंत मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडत भाजपच्या विकासाभिमुख धोरणाचा मॅप नागरिकांसमोर ठेवण्यात आला.
विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी नागरिकांनी थेट अपेक्षा मांडत निवडणुकीत सक्रिय सहभाग आणि पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. उमेदवारांकडूनही समस्या सोडवण्यासाठी पारदर्शक, वेळबद्ध आणि जबाबदार कारभाराचे आश्वासन देण्यात आले. या संवादातून भाजपचा प्रचार केवळ राजकीय न राहता विश्वासार्ह आणि लोककेंद्री ठरत असल्याचे स्पष्ट झाले.
बाणेरमधील या सलग प्रचार दौर्यांमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपची संघटनात्मक ताकद, नियोजन आणि जनाधार अधिक मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. वाढता नागरिक सहभाग, सकारात्मक प्रतिसाद आणि आक्रमक प्रचारयंत्रणा पाहता, बाणेरमधील ही घडामोड निवडणूक गणित बदलणारी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
एकूणच, ‘कमळ’ चिन्हाभोवती मतदारांचे वाढते ध्रुवीकरण आणि प्रचार फेऱ्या प्रभाग ९ मधील निवडणूक लढतीला निर्णायक वळण देणार असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.

