शालेय जीवनापासून स्पोर्ट्स कडील कल वाढावा : डॉ राजेश शहा

Newsworldmarathi Pune: द पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात युथ, ज्युनिअर व सिनियर गटाच्या जिल्हा पातळीवरील वेट लिफ्टिंग स्पर्धा आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठीच्या जिल्हा संघाची निवड चाचणी दि १४ आणि १५ सप्टेंबर रोजी पार पडली. यावेळी बोलताना अधिकाधिक तरुण तरुणींनी योग्य वेळेत खेळांकडे लक्ष देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या देशाचे नांव उज्ज्वल करावे, यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत संस्था व संस्थेच्या पीजीकेएम स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत पुरविली जाईल असे संस्थेचे चेअरमन डॉ. राजेश शहा यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी बोलताना डॉ शहा यांनी शालेय जीवनापासूनच पालक व शिक्षक यांनी स्पोर्ट्स बाबत मुला-मुलींना जागरूक करावे आणि खेळाकडील त्यांचा कल वाढवण्यास मदत करावी असे नमूद केले. याप्रसंगी यशस्वी झालेल्या खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्रे देण्यात आले. त्यावेळी देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र गुरव, शारीरिक क्रीडा संचालक डॉ ऋषी दुबे, वाणिज्य विभाग अधिष्ठाता यशोधन मिठारे आणि प्रशासकीय अधिकारी संदीप देशपांडे तसेच पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर तर उपाध्यक्ष शरद काळे उपस्थित होते.

बुधवारी होणार ड्रोन लाईट शो ; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आयोजन

0
Newsworldmarathi Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेला ड्रोन लाईट शो पावसाच्या शक्यतेने एक दिवस पुढे ढकलण्यात आला असून मोदी यांच्या वाढदिवस दिनी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता हा ड्रोन लाईट शो स.प. महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या औचित्याने केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पैकी महाराष्ट्रात प्रथमच होणारा ड्रोन लाईट शो आणि अवधूत गुप्ते यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट ही १६ सप्टेंबर रोजी नियोजित होती. मात्र मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे आणि पावसाच्या संभाव्य शक्यतेमुळे दोन्ही कार्यक्रम मोदींच्या वाढदिवस दिनीच होणार आहेत. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस दिनी अवधूत गुप्ते यांची लाईव्ह कॉन्सर्ट सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत तर ड्रोन लाईट शो हा रात्री आठ ते नऊ या वेळेत होत आहे. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा प्रथमच भव्य-दिव्य ड्रोन शो होणार असून यात एकाच वेळी एक हजार ड्रोनच्या माध्यमातून पुणेकरांना तंत्रज्ञानाची नवी अनुभूती मिळणार आहे. यात महाराष्ट्राच्या मानबिंदूंसह पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाचे प्रतिबिंब अनुभवयास मिळणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. स.प. महाविद्यालयाच्या मैदानात नागरिकांना हा ड्रोन शो पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी शैलेश काळे; कार्यवाहकपदी पुढारीचे पांडुरंग सांडभोर

0
Newsworldmarathi pune: पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ‘आज का आनंद’चे शैलेश काळे यांची निवड झाली. कार्यवाहपदी ‘पुढारी’चे पांडुरंग सांडभोर, तर खजिनदारपदी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सुनीत भावे यांची निवड करण्यात आली. पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या झालेल्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. इतर विश्वस्त पुढीलप्रमाणे : विठ्ठल जाधव (सामना), राजेंद्र पाटील (सार्वमत) आणि अंजली खमितकर (प्रभात). पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील हे प्रतिष्ठानचे पदसिद्ध विश्वस्त आहेत.

भारत-पाक सामना म्हणजे आमच्या भावनांशी खेळ; शहिदांच्या कुटुंबीयांची संतापजनक प्रतिक्रिया

0
Newsworldmarathi Pune: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांचा बळी गेला. या घटनेत पुण्यातील दोन कुटुंबांचे सदस्यही शहीद झाले. गणबोटे आणि जगदाळे कुटुंबातील सदस्यांना आपला जीव गमवावा लागला. देशभरात या घटनेचे दुःख अद्यापही ओसरलेले नाही. अशा परिस्थितीत आज होणारा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना केंद्र सरकार आणि बीसीसीआयवर तीव्र टीकेचा विषय ठरला आहे. जगदाळे कुटुंबातील आसावरी जगदाळे यांनी या संदर्भात संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “आमच्या भावना अजून सावरलेल्या नाहीत. सहा महिनेही झाले नाहीत या हल्ल्याला, तरीही पाकिस्तानसोबत सामना खेळला जातोय. ज्यांना भावना नाहीत तेच असे निर्णय घेतात. बीसीसीआयने किमान हा सामना रद्द करायला हवा होता.” त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, “पाकिस्तानचे दहशतवादी आमच्या जवानांना, आमच्या नागरिकांना मारून टाकतात आणि त्याच देशाच्या खेळाडूंशी आपण मैदानात सामना खेळतो, हे आमच्यासाठी दु:खदायक आहे. हा सामना म्हणजे आमच्या भावनांशी खेळ आहे.” या हल्ल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. शहीद जवानांच्या बलिदानाची वेदना अजूनही ताजी असताना पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे योग्य आहे का, असा सवाल सामान्य नागरिकांपासून ते शहीदांच्या नातेवाईकांपर्यंत सर्वत्र विचारला जात आहे. देशासाठी प्राण देणाऱ्यांचा सन्मान करताना किमान अशा सामन्यांवर निर्णय घेताना संवेदनशीलता दाखवली गेली असती तर शहीद कुटुंबीयांच्या जखमा आणखी खोल झाल्या नसत्या, असा सूर आता उमटतो आहे.

पंतप्रधान मोदींना पुणेकरांकडून मिळणार अनोख्या शुभेच्छा; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतील उपक्रम

Newsworldmarathi Pune: देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि वैश्विक नेतृत्व नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस १७ सप्टेंबरला देशभरात सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दि. १६ रोजी पुण्यात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा ड्रोन शोसह दिव्यांग सहाय्यता शिबीर आणि संगीत रजनीचे आयोजन स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर केले आहे. ‘ज्योतीने तेजाची आरती’ या ड्रोन शोव्दारे पुणेकरांच्या वतीने पंतप्रधान मोदींना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा ड्रोन शो प्रथमच होणार असून यातून विकसित भारताच्या संकल्पाचे दर्शन पुणेकरांना घडणार आहे. केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या वतीनं या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून थ्रीडी स्वरूपात असलेला हा ड्रोन शो ४५ मिनिटे असेल. त्यात मोदी सरकारच्या कामगिरीसह पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मानबिंदूंचे दर्शनही पुणेकरांना घडेल. तसेच पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकसित भारताचा संकल्पही याद्वारेल पुणेकरांना अनुभवता येईल. हजारो ड्रोन्स जेव्हा अवकाशात झेपावतील, तेव्हा पुण्याच्या ३-४ किलोमीटर परिसरापर्यंतच्या भागातील नागरिकांना हा शो अवकाशात पाहता येणार आहे. मोदीजींच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला हजारो ड्रोन पुण्याच्या अवकाशात झेपावतील आणि त्यांच्या विविध फॉर्मेशन्समधून विकसित भारताच्या दिशेने झालेल्या प्रवासाचे नयनरम्य दर्शन पुणेकरांना घडेल. केंद्रीय मंत्री मोहोळ पुढे म्हणाले, ‘या निमित्ताने मंगळवार दि. १६ सप्टेंबर या दिवशी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी सहाय्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात १२०० हून अधिक दिव्यांगांना १७५० आवश्यक साहित्यांचे मोफत वितरण या शिबिरात करण्यात येणार आहे. शिबिरानंतर याच ठिकाणी सायंकाळी ५ ते १० ख्यातनाम संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांची लाईव्ह कॉन्सर्ट होईल. दरम्यान रात्री ८ वाजता ‘ज्योतीने तेजाची आरती’ हा ऐतिहासिक ड्रोन शो होणार आहे. या सर्व कार्यक्रमात आपण सहभागी होत या सर्व क्षणांचे साक्षीदार होऊन आपल्या लाडक्या पंतप्रधानांना शुभेच्छा देऊ या’. ‘२६ मे २०१४ या दिवशी संसदेच्या पायरीवर नतमस्तक झालेल्या मोदींचे दृष्य आजही भारतीयांच्या मनावर कोरलेले आहे. त्यांनी गेल्या अकरा वर्षात १४० कोटी देशवासीयांना ‘राष्ट्रहित सर्वतोपरी’ हा मंत्र देत देशात आणि देशाबाहेर ताठमानेने उभे रहाण्याचे बळ दिले. ‘मै देश को झुकने नहिं दुंगा’ हा वज्रनिर्धार करत विकसित भारताचा संकल्प करुन देशवासीयांसाठी ते प्रेरणास्रोत झाले आहेत. सर्वसामान्य देशवासीयांचे जीवनमान उंचाविण्यापासून ते मंगळापर्यंत झेप घेणारे नवे अवकाश धोरण राबविणारे, करोनाची लस मोफत देऊन आफ्रिकेसह १४० लहान, गरीब देशांतील नागरीकांच्या जीवनाचे रक्षण करण्यापासून ते पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांची नांगी ठेचणे, हे मोदींचे कर्तृत्व आहे. भारतवर्षाचा उर्जा स्त्रोत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून हजारो ड्रोन्सच्या माध्यमातून मोदींना पुणेकरांच्या वतीने शुभेच्छा देणारा, डोळ्यांचे पारणे फेडणारा अनोखा कार्यक्रम सादर होतो आहे. या दिवशी आपण सर्व पुणेकर त्यांना शुभेच्छा देऊ या’ असेही मोहोळ म्हणाले. पुण्यातील ७५ हजार विद्यार्थी देणार पंतप्रधान मोदींना शुभेच्छा! पंतप्रधान मोदी यांचा अमृतमहोत्सव विविध उपक्रमांद्वारे साजरा होत असताना पुण्यातील ७५ हजार विद्यार्थी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टकार्डद्वारे शुभेच्छा देणार आहेत. यात पुणे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दिलेले शुभेच्छा संदेश एकत्र करुन थेट पंतप्रधान मोदी यांना पाठविण्यात येणार आहेत, अशीही माहिती केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी यावेळी दिली.

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या उत्तम नियोजनामुळे भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन

Newsworldmarathi Pune: कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव काळात गणेश मूर्ती विसर्जन भक्तिमय वातावरणात पार पडले. प्रभाग क्रमांक ३८, ४१, ४२ तसेच गुजर–निंबाळकरवाडी, पिसोळी व वडाचीवाडी या नव्याने समाविष्ट गावांसह एकूण १२ ठिकाणी पुणे महानगरपालिकेने विसर्जनाची व्यवस्था केली होती. याशिवाय शाडू मातीच्या गणेश मूर्तींसाठी स्वतंत्र टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या. अकरा दिवसांच्या या गणेशोत्सव काळात एकूण २५,७८३ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचबरोबर पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत तब्बल ३२,५५६ किलो निर्माल्य वेगळे संकलित करण्यात आले. उत्सव काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी स्वच्छता, विद्युत व्यवस्था, टेबल-खुर्च्या, शौचालये (स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र), सीसीटीव्ही कॅमेरे तसेच निर्माल्य संकलनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या संपूर्ण कालावधीत विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी जवळपास २०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात सहाय्यक महापालिका आयुक्त, उपअभियंता, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, अधीक्षक, कनिष्ठ अभियंता, उपअधीक्षक, लिपिक, शिपाई, मोकादम व सेवक वर्ग यांचा सक्रिय सहभाग होता. पोलिस प्रशासनाच्याही सहकार्यामुळे विसर्जनस्थळी शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण राहिले. या उपक्रमासाठी महापालिका आयुक्त मा. नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त मा. पृथ्वीराज बी. पी., उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन मा. संदीप कदम, परिमंडळ क्रमांक ४ चे उपायुक्त मा. प्रशांत ठोंबरे व उपायुक्त मा. खलाटे यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली कामकाज पार पडले. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मा. राजेश कादबाने तसेच पाटणकर, खिलारे, पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महापालिकेच्या नियोजनामुळे व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे या वर्षीचे गणेश विसर्जन कोणत्याही अडचणीशिवाय, भक्तिमय आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पडले.

पुणे नवरात्रौ महोत्सवात यंदा मीनाक्षी मंदिराचा देखावा

0
Newsworldmarathi Pune: पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात सातत्याने मोलाची भर टाकणारा “पुणे नवरात्रौ महोत्सव” यंदा विशेष आकर्षण घेऊन येत आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या श्री लक्ष्मी माता मंदिर, शिवदर्शन येथे यंदा मदुराई येथील सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिराचा देखावा साकारण्यात येणार आहे. या भव्य देखाव्याचे उद्घाटन सोमवारी, २२ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध सिने अभिनेत्रीच्या हस्ते होणार असून पुणेकरांसाठी हा एक आगळावेगळा सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे. या देखाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तब्बल ७० फुटी उंच गोपुर. दक्षिण भारतीय शैलीत उभारण्यात आलेला हा गोपुर महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य ठरणार आहे. उद्घाटनावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांनी केले आहे. शिवदर्शन–सहकारनगर परिसरात आबा बागुल यांनी १९९३ च्या सुमारास दाक्षिणात्य धाटणीचे श्री लक्ष्मीमातेचे भव्य मंदिर उभारले. देवीच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी त्यांनी “पुणे नवरात्रौ महोत्सव” सुरू केला. या महोत्सवाची सुरुवात कै. भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीने झाली होती. तसेच भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी य प्रसंगी पसायदान गाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीपासूनच या उत्सवाला एक वेगळा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक आयाम लाभला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवात पुणेकरांना धार्मिक आणि सांस्कृतिक देखाव्यांचा संगम अनुभवायला मिळणार आहे. या वर्षीचा मीनाक्षी मंदिराचा देखावा पुणेकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार असून देवीच्या चरणी सेवा अर्पण करताना दक्षिण भारताच्या मंदिर स्थापत्यशैलीचा अप्रतिम अनुभव घेण्याची संधी लाभणार आहे. पुणे नवरात्रौ महोत्सव हे केवळ धार्मिक सोहळा न राहता सांस्कृतिक जडणघडणीतही महत्त्वाचे योगदान देत आहे. यंदा हा महोत्सव पुणेकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

रावसाहेब पटवर्धन विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

0
Newsworldmarathi Pune: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या 25 विद्यार्थ्यांनी शिक्षकांची व 4 विद्यार्थ्यांनी सेवकांची भूमिका पार पाडली. प्राचार्य म्हणून सुमित सरोज तर पर्यवेक्षक म्हणून सार्थक थिटे यांनी जबाबदारी सांभाळली. यावेळी विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचे अध्यापन केले. यासाठी विद्यार्थ्यांनी गेली चार दिवस पाठ टाचणासहित विषय आणि आशयाची तयारी केली होती. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनीदेखील विद्यार्थी शिक्षकांना चांगल्या प्रकारे सहकार्य केले उत्कृष्ट तासिका घेतल्याबद्दल अपेक्षा सुरवसे, सुशांत सूर्यवंशी,अनुष्का सितापुरे, सोनाली बनसोडे या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले तर परिपाठाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल कौस्तुभ भालेराव या विद्यार्थी शिक्षकाचेही अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर, विद्यालयाचे प्राचार्य अनिल कांबळे, पर्यवेक्षक जीवन इंगळे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते शिवाजी खांडेकर यांनी सर्व उपस्थितांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन शिक्षकांचा समाज व देशाच्या जडणघडणीत असलेल्या योगदान विशद केले. विद्यार्थी शिक्षकांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना समोर बसून शिकणे जितके सोपे तितकेच शिक्षक म्हणून उभे राहून शिकवणे अवघड आहे याची आम्हाला जाणीव झाली तसेच आजचा शिक्षक दिन हा आम्हाला मोलाचा अनुभव देणारा ठरला जो आम्ही कधीच विसरणार नाही असे सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक मानसिंग गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

चला संकल्प करूया… जलप्रदूषण टाळूया; व्हिजन सोशल फाउंडेशनचा उपक्रम

0
गणेशोत्सव काळात तयार होणाऱ्या निर्माल्याचे खतामध्ये रूपांतर करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी व्हिजन सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने “निर्माल्य वाहन आपल्या दारी” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या निर्माल्य वाहनाचे उद्घाटन अभि ग्रुप ऑफ कंपनीजचे जितेंद्र जोशी व माजी सभागृह नेते निलेश निकम यांच्या हस्ते पार पडले. गणेश पूजनासाठी वापरल्या जाणाऱ्या फुले, फळे, नारळ यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य तयार होते. या निर्माल्याची थेट नदीत विल्हेवाट लागून जलप्रदूषण होऊ नये म्हणून नागरिकांच्या दारापर्यंत निर्माल्य वाहन जाऊन संकलन केले जाते. व्हिजन सोशल फाउंडेशन गेली २० वर्षे हा उपक्रम सातत्याने राबवत असून, “तुम्ही आम्हाला निर्माल्य द्या – आम्ही तुम्हाला खत देऊ” या संकल्पनेतून हा उपक्रम जनतेत लोकप्रिय झाला आहे. निर्माल्यावर प्रक्रिया करून दीड-दोन महिन्यांनी दिवाळीच्या सुमारास खत तयार केले जाते आणि नागरिकांना ते मोफत वितरित केले जाते. तसेच गेल्या सात-आठ वर्षांपासून खताबरोबरच रोपेही दिली जात आहेत. या उपक्रमामुळे दरवर्षी दोन ते तीन टन निर्माल्य जमा होऊन पर्यावरणपूरक खत तयार होते. फाउंडेशनचे अध्यक्ष विकास डाबी म्हणाले की, विसर्जनानंतर नदीपात्रात साचणारा निर्माल्याचा थर हे प्रदूषणाचे मोठे कारण ठरते. ज्या गणरायाची भक्तिभावाने पूजा करतो, त्याचे निर्माल्य योग्य पद्धतीने वापरले जावे या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. नागरिकांना ही संकल्पना आवडल्याने या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. उद्घाटन प्रसंगी आदित्य माळवे, सतीश बहिरट, शैलेश बडदे, सचिन वाडेकर, संतोष काळे, सचिन मानवतकर, केशवराज धर्मावत, लक्ष्मण नलावडे, सुरेश शिंदे, विनोद बांदल, मुकेश जाधव तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. यंदा या उपक्रमाचे २० वे वर्ष असून संयोजन विकास डाबी यांनी केले.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप

0
Newsworldmarathi Pune:रत्नजडीत रथाला पुष्पांची आकर्षक सजावट, त्यावर कोल्ड फायरची विद्युत रोषणाई, भंडाऱ्याची उधळण, ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्ठी आणि ढोल ताशांचा गजरात व मोरया मोरया जयघोषात दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित होते. अनंत चतुर्दशीला शनिवारी सकाळी साडेसात वाजता पोलिस उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या हस्ते बाप्पाची पूजा व आरती झाली. त्यानंतर सकाळी आठ वाजता रत्न महालातून बाप्पा विराजमान झालेला ‘श्री गणेशरत्न रथ’ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ झाला. टिळक पुतळा येथे प्रथा परंपरेनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी ‘श्री गणेशरत्न रथाचे सारथ्य केले. रात्री अकरा वाजता बेलबाग चौकात रंगारी बाप्पाच्या रथाचे आगमन झाले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा आणि त्यावर नगारा मिरवणुकीत पुढे होते. त्यापाठोपाठ श्रीराम आणि रमणबाग यांच्या यांच्या ढोल पथकांच्या वादनाने मिरवणुकीचा उत्साह वाढवला. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून भंडाऱ्याची उधळण आणि पुष्पवृष्टी केली जात होती, तर रथावर कोल्ड फायरची होणारी विद्युत आतषबाजी त्यामुळे ही मिरवणूक भक्तांच्या डोळांचे पारणे फेडणारी अशीच ठरली. पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ‘श्री गणेशरत्न रथ’ टिळक चौकात आल्यानंतर सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा व उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली आणि बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी पांचाळेश्वर विसर्जन घाटावर महापालिकेच्या हौदात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भक्ती भावाने भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. श्री गणेश रत्नरथाची आकर्षक सजावट श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक १३४ वर्षांपासून पारंपारिक रथात केली जात होती. मात्र, गतवर्षी पासून विसर्जन मिरवणुकीसाठी दरवर्षी आकर्षक रथ तयार केला जातो. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रस्टने श्री गणेशरत्न रथ’ तयार केला होता. रत्नजडीत रथावर पिंक वेलवेट फुलांची करण्यात आलेली सजावट, विद्युत रोषणाई आणि त्यावरील रंगारी बाप्पाची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे हा रथही भाविकांचे लक्ष वेधून घेत होता, हजारो भाविकांनी त्याची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेतली.
“श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट च्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात आणि उत्साहात पार पडली. पोलिस प्रशासनाने लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीसाठी प्रवेश दिल्यानंतर आम्ही सहभागी झालो. आमच्या मंडळासाठी जो मिरवणुकीचा कालावधी निश्चित केला होता, त्यापेक्षा कमी कालावधीत विसर्जन मिरवणूक संपवून आम्ही पोलिस प्रशासनाला दिलेला शब्द पाळला. मात्र, आम्हाला दिलेल्या वेळेनुसार मिरवणुकीत सहभागी होता आले असते तर बाप्पाच्या दर्शनासाठी येऊन थांबलेल्या हजारो भाविकांना प्रतीक्षा करावी लागली नसती. मात्र, हा संपूर्ण गणेश उत्सव उत्साहात आणि शांततेने पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन, महापालिका, मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार!
– पुनीत बालन विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट