Ajit Pawar : लाडकी बहीण योजना बंद होणार का? अजित पवार म्हणाले, ‘पैशांचं सोंग करता येत नाही…’

0
Newsworldmarathi Pune : जोपर्यंत मी महायुतीत आहे, तोपर्यंत “लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हे लक्षात ठेवा. मी पैसे खिशात घेऊन बसतो का? पैशांचं सोंग करता येत नाही,” अशा स्पष्ट आणि खरमरीत शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी विरोधकांवर निशाणा साधला. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत आणि विरोधकांच्या आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडली. अजित पवार म्हणाले, “विरोधक आरोप करतात की, लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. पण प्रत्यक्षात सामाजिक न्याय विभागाचा निधी यंदा अर्थसंकल्पात ४१ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे हा आरोप निराधार आहे. हे सगळं राजकारणापुरतं आहे, पण पैशाचं सोंग करता येत नाही.” ते पुढे म्हणाले, “शेतकरी, कामगार, तरुण आणि महिलांच्या कल्याणासाठीच आमचं सरकार कार्यरत आहे. लोकांचे खरे प्रश्न सोडवणे आणि विकासकामांना गती देणे हेच आमचं ध्येय आहे. मी मंत्री असेपर्यंत ‘लाडकी बहीण’ योजना कोलमडू दिली जाणार नाही, याची मी हमी देतो.” राजकीय समीकरणांबाबतही स्पष्टता राजकीय समीकरणावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आम्ही भाजपसोबत का गेलो, असा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र आजतागायत आम्हाला एकहाती बहुमत मिळालं नाही. त्यामुळे काँग्रेससोबत आणि शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झालो. केंद्रातही अनेक पुरोगामी नेते भाजपसोबत होते – मग आम्ही का नाही? पण विचारांशी तडजोड झाली नाही आणि होणारही नाही.” जातनिहाय जनगणनेची गरज स्पष्ट विशिष्ट समाजासाठी किती निधी द्यायचा, हे ठरवताना आवश्यक आकडेवारी महत्त्वाची असते. यासाठी केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. “सर्व घटकांना न्याय देण्यासाठी अशी गणना आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये तरुणांना संधी कार्यक्रमात अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. “तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल. पक्षात नवा उत्साह आणण्यासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे,” असे ते म्हणाले.

शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीपणे सुरू

0
Newsworldmarathi Pune: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बारा वर्षे व चोवीस वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज येथे सुरू आहे.प्राथमिक, माध्यमिक व ज्युनियर कॉलेजच्या सुमारे साडे चारशे शिक्षकांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या प्रभावी अंबालबजावणी, अध्यापनाची नवीन कौशल्य, अध्ययन क्षमता व बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक नवीन पर्यावरण शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन, शैक्षणिक संशोधन, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अशा अनेक विषयावर हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नामदेव शेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण केंद्र प्रमुख डॉ.प्रभाकर क्षीरसागर, तज्ञ मार्गदर्शक भगवान पांडेकर, स्नेहल पाटोळे, संगिता वरुडकर,भागवत शिंदे,अविनाश महाजन,मधुकर क्षीरसागर, प्रा.जितेंद्र देवकर,विलास लोंढे, सारंग पाटील आदींसह प्रशिक्षक यांच्याकडून प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शक केले जात आहे. सदर प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या यशस्वी अंबालबजावणी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? अध्ययन कौशल्य, नव नवीन अध्यापन पद्धती याविषयी सविस्तर माहिती, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे असे प्रशिक्षणार्थी सुनील पानसरे ,शिक्षिका गायत्री हिले यांनी सांगितले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर अंतर्गत वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणात ४८६ शिक्षकांनी सहभाग घेतला आहे.आठ वर्ग करण्यात आले असून २४ तज्ञ मार्गदर्शकांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व अद्यावत शिक्षण पद्धतीचे यशस्वीपणे प्रशिक्षण दिले जात आहे.
-डॉ.प्रभाकर क्षीरसागर.प्रशिक्षण केंद्र प्रमुख,अधिव्याख्याता डायट संस्था,पुणे.
या प्रशिक्षणातून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०,शिक्षण हक्क २००९ ,शिक्षण पद्धती आदींसह विविध बदल अभ्यासले जात आहे.याचा शिक्षकांना मोठा फायदा होईल.विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षकांनी अद्यावत असणे अवश्यक आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, उद्याच्या सक्षम भारतासाठी नवीन सुसंस्कृत अन आदर्श पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे.
-भगवान पांडेकर, शिक्षक समुपदेशक.

“मृत्यूचे खापर प्रवाशांवर फोडू नका”; रेल्वे व्यवस्थापनावर शरद पवारांचा संताप

Newsworldmarathi Mumbai: मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “प्रवाशांवर त्यांच्या मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. शनिवारी सायंकाळी कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये भीषण दुर्घटना घडली. दुसऱ्या दिशेने येणाऱ्या लोकलमुळे दोन ट्रेनमधील अंतर कमी झाल्याने फुटबोर्डवर उभ्या असलेल्या प्रवाशांचा तोल गेला आणि अनेकजण खाली पडले. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून, काही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शरद पवारांनी ट्विटरवरून भावना व्यक्त करत म्हटले, “या घटनेत मृत्यू झालेल्या निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मात्र, ही घटना गंभीर इशारा आहे.” दररोज मृत्यू… आणि कुणीच जबाबदार नाही? पवार यांनी यावेळी रेल्वेच्या व्यवस्थापनावरही कठोर टीका केली. “मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा मृत्यू होतो हे अत्यंत धक्कादायक आहे. वाढती गर्दी हे मुख्य कारण असतानाही रेल्वे प्रशासन गांभीर्याने उपाययोजना करताना दिसत नाही. अशा दुर्घटनांनंतर जबाबदारी टाळण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे,” असे ते म्हणाले. शरद पवारांनी ‘या’ केल्या मागण्या लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाज्यांची अंमलबजावणी तातडीने करावी गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवाव्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात रेल्वेच्या वेळापत्रकाचे अचूक नियोजन करण्यात यावे दुर्घटना ही केवळ आकडेवारी नाही “मृत्यू हे केवळ आकडेवारी नसतात, त्यामागे एक कुटुंब उद्ध्वस्त होतं. म्हणूनच अशा दुर्घटनांवर फक्त आकडे फेकून जबाबदारी झटकणं हा अन्याय आहे,” असे म्हणत पवारांनी रेल्वे प्रशासनाला जागं होण्याचे आवाहन केले.

Raj Thackeray : “बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांनी राज्याचा बोजवारा उडवला, सरकारने आता जागं व्हावं!” राज ठाकरेंचा संताप

Newsworldmarathi Mumbai: मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान आज सकाळी घडलेल्या भीषण लोकल अपघाताने संपूर्ण मुंबई हादरली. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, राज्यातील वाढत्या लोकवस्ती आणि नागरी व्यवस्थेच्या अपयशावर कडाडून हल्ला चढवला आहे. “बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे शहरांचा धागादोरा सुटला” पुण्यात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “राज्यात रोज होणाऱ्या अपघातांमागे नियोजनशून्य नागरीकरण आणि बाहेरून येणाऱ्या अनियंत्रित लोंढ्यांचा मोठा वाटा आहे. कोण कुठून येतंय, काय करतंय हे कुणालाच माहित नाही. मुंबईसह राज्यातील शहरांचा बोजवारा उडाला आहे.” “रेल्वे अपघात ही फक्त यंत्रणांची चूक नाही, ही एक सामाजिक शोकांतिका” राज ठाकरे यांनी सांगितले की, “मुंब्र्याचं धोकादायक वळण नवीन नाही. प्लॅटफॉर्मवरची गर्दी जीवघेणी आहे. दरवाजे लावले तर लोक गुदमरून मरतील, आणि न लावल्यास फूटबोर्डवरून लटकून प्रवास करावा लागतो. ही स्थिती गंभीर असून तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.” रेल्वे मंत्र्यांना राज ठाकरेंचा थेट इशारा “रेल्वे मंत्री संध्याकाळी एका लोकलमध्ये सामान्य प्रवाशांबरोबर प्रवास करून पाहावं. त्यांच्या डोळ्यांद्वारे खरं वास्तव दिसेल. परिस्थिती सुधारली नाही, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा त्यांनी दिला. शहरांचं विद्रुपीकरण आणि माणसाच्या जीवाची किंमत नाही “मेट्रो आणि मोनो रेल्वेने प्रश्न सुटणार नाहीत. शहरांमध्ये ट्रॅफिक, पार्किंग, सार्वजनिक वाहतूक सर्व काही ढासळलं आहे. अपघात तर आता रोजचंच झाले आहेत. देशात माणसाच्या जीवाची किंमत शून्य आहे. बंबही पोहोचू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे.”

पुण्यातील बुधवार पेठेत रिक्षाचालकाकडून महिलेचा खून; परिसरात मोठी खळबळ

0
Newsworldmarathi pune: पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. उसने पैसे देण्याच्या वादातून एका रिक्षाचालकाने महिलेचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घडली आहे. ही घटना पुण्यातील सिंहरोड परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. श्यामली कमलेश सरकार असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून, नितीन चंद्रकात पाटील असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी नितीन हा रिक्षा चालक आहे. श्यामली सरकार आणि नितीन यांची ओळख रिक्षातून प्रवासाच्या दरम्यान झाली होती. तो तिला दररोज सायंकाळी बुधवार पेठेत सोडत असे. याच ओळखीच्या आधारे श्यामलीने नितीनकडून ५० हजार रुपये हात उसने घेतले होते. त्याने तिला पैसे परत मागितले असता, तिने पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ केली. त्यावेळी यातून त्यांच्यात वाद झाला. बुधवारी दुपारी नितीन श्यामलीला घेण्यासाठी धायरी येथील तिच्या घरी गेला. तिथे त्यांच्यात पुन्हा एकदा पैशांवरून वाद झाला. वाद विकोपाला गेला. त्याने श्यामलीची हत्या करण्याचं ठरवलं. दरम्यान, रागाच्या भरात नितीनने श्यामलीच्या ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने घराबाहेरून कुलूप लावले आणि स्वतः घरातच लपून बसला. यामुळे कुणालाही या घटनेची माहिती मिळाली नाही. या घटनेनंतर तो दिवसभर घरातच होता. अखेरीस त्याने ही संपूर्ण घटना आपल्या भावाला सांगितली. त्यानंतर गुरुवारी रात्री तो नांदेड सिटी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

महापालिका निवडणुका तीन टप्प्यात होणार; ऑक्टोबरमध्ये बिगुल वाजणार

Newsworldmarathi Mumbai : महाराष्ट्रात कोरोना नंतर राजकीय आरक्षण यामुळे लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी केली आहे. यामुळे याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले लागले आहे. असे असताना राज्य निवडणूक आयोग ऑक्टोबर महिन्यात निवडणूक वेळापत्रक जाहीर करू शकते. याबाबत महत्वाची माहिती समोर आली असून तीन टप्प्यात निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यात उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मतदानाचे नियोजन केले जात आहे आणि तिसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि कोकणात मतदान होईल. असेही सांगितले जात आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मते, प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार, 3 टप्प्यात निवडणुका घेण्याचे नियोजन केले जात आहे. राज्यातील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 288 पंचायत समित्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होऊ शकतात, याबाबत लवकरच अंतिम माहिती समोर येऊ शकते. यासाठी 2011 च्या जनगणनेनुसार प्रभागांची रचना केली जाईल. काही ठिकाणी प्रभागांच्या रचनेत आणि सीमांमध्ये बदल होतील. काही लोक याविरुद्ध न्यायालयात जाऊ शकतात. त्यामुळे प्रभाग तयार करण्यासाठी दोन महिने लागतील. यामुळे आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अंतिम करण्यासाठी तीन ते साडेतीन महिने लागू शकतात. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात. असेही त्यांनी म्हटले आहे. या निवडणूक खुपच लांबल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कामांसाठी देखील अडचणी येत आहेत. निधी वाटपात देखील घोळ होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग…! मुंबईच्या रेल्वे रूळावर मृत्यू तांडव, लोकल अन् पुष्पक एक्सप्रेस एकमेंकांना घासल्या; ५ जणांचा मृत्यू

Newsworldmarathi Mumbai: कामाच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान धावणाऱ्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल आणि लखनऊहून येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या धडकेत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर ८ ते १० प्रवासी रेल्वे ट्रॅकवर खाली पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना आज सकाळी ९ ते ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. लोकल गाडीत प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक प्रवासी दरवाज्यात लटकत उभे होते. याचवेळी समोरून येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला लोकलने घासले, आणि त्यामुळे दोन्ही गाड्यांचा मोठा आवाज झाला. या धडकेमुळे दरवाजात उभे असलेले काही प्रवासी थेट ट्रॅकवर फेकले गेले. अपघातात ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने त्वरित मदतकार्य सुरू केले असून, रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली असून पूर्ण तपास सुरू केला आहे. गर्दी, वेग आणि निष्काळजीपणा? ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याचा तपास सुरु असला तरी सकाळची गर्दी आणि दोन्ही गाड्यांचा वेग यामुळे अपघाताचा परिणाम अधिक भयावह झाला. अनेक प्रवासी दरवाज्यांतून लटकत प्रवास करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. रेल्वेकडून अपात्कालीन उपाययोजना रेल्वे प्रशासनाने घटनेनंतर लगेच आपत्कालीन सेवा कार्यरत केली असून, ट्रॅकवरील वाहतूक काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. जखमी प्रवाशांवर उपचार सुरु असून मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर पोलिस व रेल्वे सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.

दगडूशेठ’ गणपतीच्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर सजावटीचे वासापूजन

0
Newsworldmarathi Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने १३३ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळ मधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्या सजावटीच्या तयारी प्रारंभी वासापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वासा पूजनाने सजावटीचा श्री गणेशा झाला. बुधवार पेठेतील उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे वासापूजन झाले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, राजाभाऊ सूर्यवंशी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे १०८ दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवासस्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येत असून भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे. प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये ३० भव्य खांब असून ५०० देवी-दैवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती असणार आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी मंदिराचे काम, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधींना सडेतोड उत्तर.. म्हणाले जनतेने ज्यांना नाकारले, ते जनादेशाला नाकारतात!

Newsworldmarathi Mumbai : 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका (Maharashtra Vidhansabha Election 2024) या लोकशाही यंत्रणेमध्ये हेराफेरी करण्यासाठी तयार केलेला मॅच फिक्सिंगचा आराखडा होता. आता हेच प्रकार बिहारमध्येही होणार आहे. भाजपला जिथे जिथे हार पत्करावी लागते तिथे अशा प्रकारची गैरकृत्ये केली जातात, अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली. राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेला ‘मॅच फिक्सिंग महाराष्ट्र’ हा लेख एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केला. त्यात त्यांनी गंभीर आरोप केले. राहुल गांधींच्या या आरोपावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लेखानेच प्रत्युत्तर दिले आहे. 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांत मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते; पण त्यानंतरही हे आकडे वाढत गेले. मतदानाची अंतिम टक्केवारी 66.05 टक्के असल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी सांगण्यात आले. म्हणजे या मतांमध्ये 7.83 टक्क्यांची वाढ झाली. राज्यातील केवळ 12000 बूथमध्ये नव्या मतदारांची भर पडली. त्यातील 85 मतदारसंत भाजपला विजय मिळाला होता, असा दावा राहुल गांधींनी केला. यावर देखील देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. शेवटच्या तासात मतदान वाढलेल्या जागी एनडीए जिंकली म्हणणे हास्यास्पद आहे. कामठीचे उदाहरण त्यांनी दिले. पण जे उदाहरण त्यांनी दिले नाही, ते मी येथे देतो आहे. माढ्यात शेवटच्या तासात 18 टक्के मतदान झाले,तिथं शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला. वणीत शेवटच्या तासात 13 टक्के मतदान झाले, तिथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आणि श्रीरामपूरमध्ये 12 टक्के मतदान झाले, तिथं काँग्रेस विजयी झाली, असं देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. राहुल गांधींच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले? राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाबाबत काही पुरावे उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोग त्यांना नक्कीच उत्तर देईल. पण मुख्य मुद्दा म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा आणि लोकांच्या जनादेशाचा सतत होणारा अपमान…जनतेने राहुल गांधींना नाकारले आहे आणि सूड म्हणून ते जनतेला आणि त्यांच्या जनादेशाला नाकारत आहेत. यामुळे काँग्रेस पक्ष आणखी अडचणीत येईल. त्यांच्याच पक्षाचे आमदार एका दिवसात कोणालाही भेटण्याची वेळ मिळावी असे आव्हान देणारी विधाने का करतात याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. लोकशाही प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबद्दल सतत शंका उपस्थित करून ते देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत आणि कोणते विष पसरवत आहेत याची त्यांना जाणीव असली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले- देवेंद्र फडणवीस काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्त सरकारने थेटपणे निवडले. 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले. प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षनेत्यासह आयुक्त नियुक्तीसाठी आयोग नेमला, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मोदी सरकारपेक्षा मनमोहनसिंग सरकारमध्येच मतदार वाढल्याचा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला. 2014 ते 2019 दरम्यान देशभर 63 लाख मतदार वाढले. 2019 ते 2024 दरम्यान देशभर 75 लाख मतदार वाढले. तर 2004 ते 2009 दरम्यान देशभर 1 कोटी मतदार वाढल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 2024 मध्ये मतदारसंख्या वाढीत काहीही असाधारण नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा नेहमीच निषेध करेन- देवेंद्र फडणवीस मतदानापासून ते मतदारांच्या संख्येपर्यंत, राहुल गांधी खोट्या अफवा निर्माण करण्यासाठी, लोकशाही प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबद्दल शंका निर्माण करण्यासाठी पुरावे विकृत करतात. महाराष्ट्रातील पराभवामुळे त्यांना आणि त्यांच्या मित्रपक्षांना किती दुःख झाले आहे हे मला माहिती आहे. पण जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी, लाडकी बहिणी, सामान्य जनता आणि सर्व नागरिकांच्या जनादेशाचा अशा प्रकारे अपमान करत राहिलात तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांचा सेवक म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा नेहमीच निषेध करेन, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

तडीपार वाळू माफिया सुयोग सोळुंकेची दादागिरी; जिल्ह्यात येऊन मारहाण, गुन्हा दाखल

Newsworldmarathi Jalna: जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा तडीपार वाळू माफियाच्या दहशतीचा प्रकार समोर आला आहे. मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे सख्खे मेहुणे आणि तडीपार वाळू माफिया म्हणून ओळखला जाणारा सुयोग सोळुंके याने तडीपार आदेशाचे उल्लंघन करत जालन्यात येऊन एका तरुणास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड तालुक्यातील आपेगाव परिसरातील गोदावरी नदी पात्रात, शासनाच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी वाळू आणणाऱ्या एका इसमावर सुयोग सोळुंके याने लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित तरुणाच्या तक्रारीवरून, मारहाण, धमकी देणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुयोग सोळुंकेसह अन्य १० वाळू माफियांवर फेब्रुवारी महिन्यात बेकायदा वाळू उत्खनन, चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा अशा गंभीर आरोपांमुळे जालना, संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर तडीपार असलेला सुयोग सोळुंके जिल्ह्यात येऊन पुन्हा गुन्हा करतो, ही बाब गंभीर मानली जात आहे. दरम्यान, आरोपी अजूनही मोकाट असून, पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी पीडित तरुण आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस प्रशासनाची कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.