Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या मलनिस्सारन, देखभाल दुरुस्ती विभागामध्ये वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण होत आहे. कार्यकाळ संपलेला असताना पुन्हा त्याच त्याच ठिकाणी कोणाच्या राजकीय आशीर्वादामुळे हे अधिकारी मागील दहा- बारा वर्षापासून ठाण मांडून बसले आहेत याचे गौडबंगाल काय याची चौकशी व्हावी अशी मागणी आयुक्तांकडे स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ धनंजय जाधव यांनी केली आहे. यावेळी आयुक्तांनी चौकशी करून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश सामान्य प्रशासनाचे उपयुक्ताना दिले आहेत.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात डॉ. जाधव यांनी म्हटले आहे की, अधिकारी विनायक शिंदे हे सन 2016 पासून मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती या विभागांमध्ये उप अभियंता या पदावर कार्यरत आहेत. एक – दोन महिन्यासाठी विनायक शिंदे यांची बदली ढोले – पाटील क्षेत्रीय कार्यालय, पाणी पुरवठा विभागात झालेली होती अन्यथा मागील दहा वर्षापासून शिंदे हे मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागातच कार्यरत आहेत. दहा वर्ष अधिक काळ मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागात काम करूनही त्यांची बदली होणे अपेक्षित होते. मात्र नुकतीच महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाने बदलीसाठी पात्र असलेल्या उप अभियंता यांच्या यादीमध्ये विनायक शिंदे, पुरम यांचे नाव नाही याबद्दल संपूर्ण पुणे महानगरपालिकेमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
गणेश पुरम मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत होते. ते त्याच ठिकाणी बढतीने शाखा अभियंता, उप अभियंता पदा पर्यंत बढती मिळूनही मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागातच कार्यरत आहेत.
पूर्व भागातील रस्ते हे थोडा जरी पाऊस झाला तरी रस्त्यांना नदी- नाल्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र टीव्ही, प्रिंट मिडिया द्वारे पहात व वाचत असतो. या सर्व परिस्थितीस ठाण मांडून बसलेले अधिकारी शिंदे व पुरम हे प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे जाधव यांनी आयुक्तांना भेटून सांगितले आहे. महानगरपालिकेच्या मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागाकडून मागील दहा वर्षांमध्ये ड्रेनेज विषयक पावसाळी लाईन, कल्व्हर्ट विषयक किंवा नाला विषयक जे मोठे मोठे प्रकल्प झालेले आहेत त्या प्रकल्पावर उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता म्हणून विनायक शिंदे व गणेश पुरम यांनीच काम पाहिलेले आहे. म्हणजेच पुणे शहर वासियांना थोडा जरी पाऊस झाला त्यामुळे रस्त्यावर पाणी साठवून नद्यांचे स्वरूप येऊन जो नाहक त्रास होतोय त्यास देखील हे अधिकारी जबाबदार आहेत. दोघेही मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून व राजकीय बळांचा वापर करून मागील दहा वर्षापासून याच विभागामध्ये कार्यरत आहेत यांच्याकडे कोणाचे लक्ष कसे जात नाही? इतकी वर्षे होऊनही यांची बदली कशी होत नाही? हे मलनिस्सारन देखभाल दुरुस्ती विभागात इतके वर्षे का कार्यरत आहेत याची चौकशी करावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
जाधव यांनी याबाबतचे निवेदन आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त यांना भेटून सादर केले आहे. आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी चौकशी करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव यांना दिले आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पूजा जाधव- मोरे, गणेश सोनवणे, प्रणय शेंडे, ओंकार येनपुरे, विक्रम कदम, अजित बाबळसुरे यासह स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments