Pune News : पुणे मनपात महिला अधिकाऱ्याला छळणाऱ्या टोळीवर कारवाई, ‘कपडे काढून टाकू…’ अशा धमकीचा व्हिडीओ व्हायरल…

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेतील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्या भाजपा पदाधिकारी ओंकार कदम आणि त्याच्या साथीदारांवर मनपाने कडक कारवाई केली आहे. सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या आणि महिला अधिकाऱ्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरही महापालिका आयुक्तांनी मनपाच्या आवारात प्रवेशबंदीचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या पत्रकार कक्षात परवानगी न घेता पत्रकार परिषद घेणं, मोठा जमाव जमवून महिला अधिकाऱ्याच्या कार्यालयात गोंधळ घालणं आणि सोशल मीडियावर “कपडे काढण्याची” अश्लील आणि धमकीची भाषा वापरणं या सर्व प्रकारांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल, धमकीची भाषा उघड ओंकार कदमच्या महिला सहकाऱ्यांनी आणि महापालिकेतील कंत्राटी कामगारांनी फेसबुक लाईव्हद्वारे महिला अधिकाऱ्याला जाहीरपणे धमकावलं. यामध्ये “कपडे काढून टाकू” अशी अश्लील भाषा वापरण्यात आली होती. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महापालिकेने गंभीर दखल घेतली. या ६ जणांना मनपात प्रवेशबंदी महापालिकेच्या कारवाईत विशाल जाधव, रेखा ससाणे, संगीता पवार, रेश्मा चिल्लाळ, सारिका गोरड आणि मीना धोत्रे या सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर मनपाच्या आवारात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यावर प्रवेशबंदी महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपा पदाधिकारी ओंकार कदम आणि त्याचा सहकारी अक्षय कांबळे यांच्यावर महापालिका भवन व अन्य कार्यालयांमध्ये प्रवेशबंदी लावण्यात आली आहे. या प्रकरणात महिला अधिकाऱ्याने लैंगिक छळविरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. महापालिकेच्या अंतर्गत तक्रार समितीने चौकशी करून गंभीर शिफारशी केल्यानंतर आयुक्त नवलकिशोर राम यांनी ही कठोर कारवाई केली. हे प्रकरण आता अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि सार्वजनिक प्रशासनातील शिस्तीचा गंभीर मुद्दा बनले आहे.

पुण्यातील गंगाधाम चौकात थरकाप उडवणारा अपघात; ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

0
Newsworldmarathi Pune : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रक आणि स्कूटरमध्ये झालेल्या धडकेत एक महिलेला जीव गमवावा लागला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून, घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ट्रक (MH 14 AS 8852) चालकाने भरदिवसा स्कूटरला जोरदार धडक दिली. स्कूटरवर दोघं प्रवास करत होते. या धडकेत दिपाली युवराज सोनी (वय 29) यांचा जागीच मृत्यू झाला असून, जगदीश पन्नालाल सोनी (वय 61) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या स्पायरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, ट्रकचालक शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय 51, रा. भवानी पेठ, पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याच्यावर BNSS कलम 105 आणि आयपीसी 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर काही वेळ गंगाधाम चौकातील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

महाराष्ट्रात दारूची किंमत वाढणार, आता तळीरामांना प्रत्येक घोट महागात पडणार!

Newsworldmarathi Mumbai : मद्यप्रेमींना सरकारकडून मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्रात देशी आणि विदेशी दारूच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत तब्बल दीडपट (९ ते ७० टक्के) वाढ करण्यात आली आहे. तसेच आता हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्येही शॉपप्रमाणे मद्यविक्री करता येणार आहे. या व्यवस्थेवर १० ते १५ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. तळीरामांची तिजोरी रिकामी होणार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या अंदाजानुसार, या वाढीमुळे वार्षिक १४ हजार कोटी रुपयांचा महसूल शासकीय तिजोरीत जमा होणार आहे. नवे दर पुढीलप्रमाणे मद्याचा प्रकार जुने दर नवे दर देशी दारू 70 रुपये 80 रुपये महाराष्ट्र मेड लिकर — 148 रुपये भारतीय बनावटीचे विदेशी मद्य 120–150 रुपये 205 रुपये विदेशी प्रीमियम ब्रँड 330 रुपये 360 रुपये हॉटेलमधील दारूविक्रीलाही परवानगी एफएल-२ (सीलबंद मद्य विक्री) आणि एफएल-३ (हॉटेल / रेस्टॉरंट) परवाना कराराच्या आधारावर भाडे तत्वावर चालवता येणार. यासाठी अनुक्रमे १५% आणि १०% वाढीव लायसन्स शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे हॉटेल्समधूनही शॉपप्रमाणे दारूविक्री शक्य होणार आहे. उत्पादन शुल्क विभागाचे बळकटीकरण १२२३ नवीन पदांची भरती, मुंबई शहर व उपनगरासाठी स्वतंत्र विभागीय कार्यालय, आणि इतर प्रमुख जिल्ह्यांत अधीक्षक कार्यालयांची स्थापना असे निर्णय याअंतर्गत घेण्यात आले आहेत.

राणे विरुद्ध महाजन वाद टोकाला; “माझा अपघात झाला तर जबाबदार राणेच”; महाजनांचा इशारा

Newsworldmarathi sambhajinagar: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राणे विरुद्ध महाजन असा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मनसे नेते प्रकाश महाजन आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद आता केवळ शाब्दिक न राहता थेट धमकी आणि आंदोलनाच्या पातळीवर गेला आहे. नारायण राणे यांनी “पुन्हा आमच्याविरुद्ध बोललात, तर उलट्या करायला लावीन” अशी तीव्र प्रतिक्रिया दिल्यानंतर प्रकाश महाजन यांनीही थेट पलटवार करत गंभीर आरोप केले आहेत. “माझा अपघात झाला तर त्याची जबाबदारी राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर असेल,” असा इशारा देत त्यांनी पोलिसांत तक्रार केली असून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी याची दखल घ्यावी, अशी मागणीही केली. पोलिसांचा हस्तक्षेप, आंदोलनाला ब्रेक महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी त्यांच्या घरी भेट देत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “राणे समर्थकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत,” असा दावा महाजनांनी केला असून, “पोलिसांकडे फोन केला तरी कोणी उचलत नाही,” असा आरोपही त्यांनी केला. वादाचा उगम – नितेश राणे यांचे वक्तव्य वादाची ठिणगी राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या विधानामुळे पडली. त्यांनी मनसे-शिवसेना (ठाकरे गट) युतीच्या चर्चांवर उपहासात्मक टीका करताना म्हणाले, “एक पक्ष २० आमदारांचा, दुसऱ्याचा एकही नाही, तरी आम्हाला घाम फुटतो!” यावर प्रत्युत्तर देताना महाजनांनी नितेश राणे यांच्यावर “वैचारिक खोली नाही” अशी जहरी टीका केली. राणेंचा पलटवार; “लायकीपेक्षा जास्त बोलतोस” या टीकेनंतर नारायण राणे यांनी फेसबुकवरून महाजनांवर तुटून पडत “नीलेश, नितेश आणि मी दूरच, पण आमची वैचारिक उंची मोजणारे तुम्ही कोण?” असा सवाल केला. “लायकीपेक्षा जास्त बोलतोस, पुन्हा काही बोललास तर उलट्या करायला लावीन,” असा थेट इशाराही दिला. राजकीय वादात तणाव वाढण्याची चिन्हं या शाब्दिक चकमकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत. पुढे काय वळण घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हृदयद्रावक घटना…! विजेच्या धक्क्याने शेतकरी पित्यासह दोन चिमुकल्यांचा अंत, गावावर शोककळा

Newsworldmarathi Jalana : जालना जिल्ह्यातील वरुड गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खरीप हंगामाच्या तयारीने शेतात राबणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. शेतात मशागतीचं काम करत असताना अचानक विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने बाप आणि त्याच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली आहे. या दुर्घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. विनोद मस्के (वय – ४०) हे आपल्या शेतात खरीप हंगामासाठी मशागत करत होते. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा हे दोघे लहान बाळंतही होते. अचानकपणे शेतातील विद्युत तार मस्केंच्या संपर्कात आली आणि त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या समर्थ आणि श्रद्धालाही विजेचा तीव्र धक्का बसला आणि तिघांचाही घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रसंगाने परिसर हादरून गेला आहे. गावकऱ्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या तिन्ही मृतदेह जालना सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मस्के कुटुंबावर एकाच वेळी एवढं मोठं संकट कोसळल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी कुटुंबाचा असा अकाली अंत झाल्याने कृषिप्रधान ग्रामीण जीवनातील धोक्यांची गंभीरतेने दखल घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

‘या’ गावांचा पाणीप्रश्न गंभीर, तातडीने पाणीपुरवठा करा; सभापती राम शिंदेंचे पुणे महापालिकेला आदेश

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे आंदोलनाच्या मार्गावर जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पुणे महापालिकेला स्पष्ट शब्दांत निर्देश दिले आहेत की, “नवसमाविष्ट गावांना तातडीने आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात यावा.” सन 2018 मध्ये पुणे महापालिकेने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमित ठेवण्यासाठी २४×७ पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. मात्र, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी या विभागांतील नागरिकांना अद्यापही अपुरा पाणीपुरवठा सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, अनेक ठिकाणी आंदोलने होऊ लागली आहेत. विधानपरिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात “लक्षवेधी सूचना” मार्फत या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यासंदर्भात विधानभवनातील सभापती प्रा. शिंदे यांच्या दालनात एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणीपुरवठा संदर्भातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला आमदार योगेश टिळेकर यांच्यासह विधानमंडळ सचिव डॉ. विलास आठवले, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, तसेच नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका छापवाले उपस्थित होत्या. सभापती शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सद्यस्थितीत पुणे महापालिकेस १४ टीएमसी पाणी देण्याचा करार आहे. मात्र, नव्या ३४ गावांसाठी पाणीपुरवठा करताना हा साठा अपुरा पडतो. त्यामुळे नवीन २१ टीएमसी पाणी देण्याचा करार तातडीने करण्यात यावा.” योजना सुरू होऊन तब्बल सहा वर्षे झाली असली तरीही पाणीपुरवठा अपुरा असल्याने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रा. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ, वेळेचे नियोजन करून आणि व्यापक आराखडा तयार करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.

Sharad Pawar Speech : “देशात संवाद हरवला, त्याची किंमत जनतेला भोगावी लागते”; शरद पवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल

0
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. पवारांनी भारताच्या शेजारी राष्ट्रांशी असलेल्या संबंधांवर आणि देशातील आतंरिक सुरक्षा परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. शरद पवार म्हणाले, “देशाच्या नेतृत्वाने सुसंवादाची स्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्नच केलेले नाहीत. भारताच्या शेजारी देशांशी चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका सध्या आपले संबंध तणावपूर्ण आहेत. एक काळ होता जेव्हा भारत जागतिक व्यासपीठावर सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा देश म्हणून ओळखला जात होता. आज मात्र, आपल्याला सर्वत्र तणाव आणि संवादाची उणीव जाणवते. ही जबाबदारी देशाच्या नेतृत्वावर आहे, आणि त्याची किंमत आपल्याला देश म्हणून चुकवावी लागते.” जवळचा अनुभव आणि उदाहरणं देत टीका शरद पवारांनी आपल्या भाषणात आपला अनुभव शेअर करत बांग्लादेशाशी असलेल्या वैयक्तिक संबंधांची आठवणही करून दिली. “बांग्लादेशसाठी भारताने मोठा त्याग केला, तरी आज त्या देशाशी सुसंवाद नाही. श्रीलंकेवर तर थेट चीनचा प्रभाव वाढत चालला आहे,” असं ते म्हणाले. पहल्गाम प्रकरणावर भूमिका स्पष्ट शरद पवारांनी देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही भाष्य करताना, पहल्गाम घटनेच्या वेळी विरोधकांनी केंद्रावर टीका करण्याऐवजी सरकारच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. “देशावर हल्ला झाला तर आपण एकसंघ राहायला हवं. परंतु ही परिस्थिती कायमस्वरूपी असू नये यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत,” असा सल्लाही त्यांनी दिला. पक्षातील कार्यकर्त्यांचं भरभरून कौतुक कार्यकर्त्यांचं कौतुक करत पवार म्हणाले, “तुमच्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते पक्षाचा खरा आधार आहेत. तुम्ही विचाराने एकसंध राहा, सत्ता आपोआप तुमच्या मागे येईल.” त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा भरण्याचा प्रयत्न केला. फुटीवरून स्पष्ट भूमिका शिवसेना आणि इतर पक्षांप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही झालेल्या फूटीनंतर पवारांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त करत म्हटलं, “फुटीची चिंता करू नका. कोण गेले याची चिंता न करता, जे राहिले आहेत त्यांनीच पक्षाचा विचार पुढे न्यावा. आपण जनतेच्या प्रश्नांसोबत बांधिलकी ठेवल्यास कोणतीही अडचण येणार नाही.”

घराचे स्वप्न होणार साकार; राज्यभरात अनुसूचित जाती–जमातींना लाखो घरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Newsworldmarathi Mumbai: केंद्र व राज्य शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. या प्रवर्गातील नागरिकांना गृहनिर्माणच्या विविध योजनांच्या माध्यमातून हक्काचे घर दिले जाते. केंद्र शासनाने या वर्षी 30 लाख घरे राज्याला उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे कोणीही व्यक्ती बेघर राहणार नाही. ग्रामीण भागात अनुसूचित जाती व जमाती मधील नोंदीत असलेल्या प्रत्येक कुटुंबाला यावर्षी प्राधान्याने घर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन २०२३-२४ आयोजित पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मृद व जलसंधारण संजय राठोड, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, आमदार संतोष बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. त्यात मानवता, समता, बंधुता आणि संधीची समानता आहे. भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘घरोघरी संविधान’ हा उपक्रम राज्यात राबवण्यात येत असून त्यातून उद्देशिका प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महापुरुषांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य शासन सातत्याने करत आहे. जे समाजाच्या भल्यासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करतात, अशा व्यक्तींच्या पाठीशी शासन कायम उभे आहे. राज्यात अनुसूचित जाती व जमातींसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, त्यामध्ये शिष्यवृत्ती योजना, आश्रमशाळा, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, परदेशी शिक्षणासाठी साहाय्य, तसेच महामंडळांच्या माध्यमातून रोजगाराभिमुख योजना राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान योजना, पीएम फसल बीमा योजना, मुद्रा योजना आणि स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती-जमातीतील घटकांना लाभ मिळाला आहे. केंद्र शासनाच्या धोरणांमुळे लाखो तरुण उद्योजक घडत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक अंतिम टप्प्यात असून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे यांची स्मारके उभारण्याची कामेही वेगाने सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सामाजिक न्याय विभागाचा निधी त्याच विभागाच्या उद्दिष्टपूर्तीसाठीच वापरण्यात येत आहे, असे स्पष्ट करत त्यांनी समाजहितासाठी कार्य करणाऱ्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि संस्था यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून समाजकार्य करणाऱ्यांचे कौतुक होते, तसेच महामानवांचे स्मरणही होते. चांगल्या कार्याचा गौरव झाल्यास समाजात सकारात्मक प्रेरणा मिळते. यापुढे हा पुरस्कार सोहळा दरवर्षी घेतला जाईल. राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली. महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला वैचारिक गुलामगिरीतून बाहेर काढलं, संत रविदास महाराज यांनी समाजातील गरीब, शोषित, वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला. या महामानवांच्या कार्याचा आदर्श ठेवूनच समाजातील बांधवांनी कार्य करावे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत राज्य असून, परकीय गुंतवणुकीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र हे दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

पुण्यातून बाहेर पडणं होणार सोपं; हडपसर ते यवत सहापदरी उड्डाणपुल मंजुर !

0
newsworldmarathi Pune: Pune-Solapur Highway Update : पुण्यातून सोलापूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. हडपसर ते यवत दरम्यान २५ किमी लांबीचा सहा पदरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील दैनंदिन वाहतूक कोंडीचा कायमचा प्रश्न सुटणार आहे. या उड्डाणपुलासाठी सुमारे ५,२६२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) तत्वावर उभारण्यात येणार असून, MSIDC याची अंमलबजावणी करणार आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५वरील हडपसर, मांजरी फाटा, लोणी काळभोर, उरळी कांचन या ठिकाणी दररोज सकाळ-संध्याकाळच्या वेळेत होणाऱ्या भीषण ट्रॅफिकमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या भागातील झपाट्याने वाढलेलं शहरीकरण आणि रहदारीच्या झपाट्यानं प्रशासनाला ही पावलं उचलावी लागली. या प्रकल्पामुळे होणारे फायदे: प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार वाहतूक अधिक गतिमान आणि सुरक्षित जिल्ह्यातील शहरी भागांना दिलासा उड्डाणपूलासोबतच विद्यमान महामार्गही ६ पदरी विस्तारित केला जाणार आहे. यामुळे संपूर्ण रस्त्याचा दर्जा आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारेल. हा निर्णय फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिव प्रज्ञा वाल्के यांच्या स्वाक्षरीने शासकीय आदेश जारी झाला आहे.

मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला, प्रभाग रचनेचे आदेश जारी, जाणून घ्या महापालिकांचे प्रभाग…

पुणे : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक अयोगाने दिलेल्या आदेशानुसार नगरविकास विभागाने महापालिका, नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी प्रभागरचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्यातील ड वर्गातील १९ महापालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक या ९ अ, ब, क वर्ग महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात येणार आहे. तसेच मुंबई महापालिकेसाठी एम सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. कोरोना आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लटकल्याने या निवडणुका रखडल्या होत्या. आता मात्र हालचाल सुरू केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. नगरविकास विभागाने या अ, ब, क वर्ग १० महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार आता तयारी करावी लागणार असून तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच ड वर्ग १९ महापालकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, प्रभाग रचनेसाठी साधारण अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यासाठी गुगल मॅपचा आधार घेण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे आता इच्छुकांनी देखील जोरदार तयारी केली असून लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी नेते हजर राहत आहेत.