Newsworldmarathi Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील २४ चेकपॉईंट १५ एप्रिलपर्यंत बंद करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले आहेत. रविवारी परिवहन भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. देशभरात जीएसटी लागू झाल्यामुळे सीमा तपासणी नाक्यांचे महत्त्व कमी झाले आहे, असे ते म्हणाले.
भविष्यात व्यापारवृद्धी आणि मालवाहतुकीला चालना देण्यासाठी चेकपॉईंट बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे, १५ एप्रिलपर्यंत या संदर्भातील प्रस्ताव सादर करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिवहन भवनाचे भूमिपूजन झाले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. येत्या अडीच वर्षांत म्हणजे २०२७ च्या मध्यापर्यंत या भवनाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
फेसलेस सेवांचे लोकार्पण :
मुख्यमंत्र्यांनी हलक्या व्यावसायिक वाहनांची डीलर पॉईंट नोंदणी आणि हायपोथेकेशन टर्मिनेशनला स्वयंचलित मान्यता देणाऱ्या २ फेसलेस सेवांचे लोकार्पण केले. शासनाने ‘मेटा’सोबत करार केला असून, येत्या काळात ५०० सेवा व्हॉट्सॲपवर मिळणार आहेत, ज्यात आरटीओच्या ४५ फेसलेस सेवांचाही समावेश असेल.
राज्यात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र (एटीएस), स्वयंचलित चालक चाचणी केंद्र (एडीटीटी), एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएम) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चालकांना अद्ययावत करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओने नागरिकांचे प्रबोधन आणि शिक्षण करण्याचे आव्हान परिवहन विभागाने स्वीकारले पाहिजे.


Recent Comments