Newsworldmarathi Pune : ‘पीएमआरडीए’ विकास आराखड्याच्या जागांचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने आणि अर्थिक गैरव्यवहार करून टाकण्यात आल्याची शक्यता आहे. त्याबाबत काही हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी आणि हे गैरप्रकार करणाऱ्यांना जबाबदार धरावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना ई मेल द्वारे पाठवले आहे.
गैरप्रकार झालेला हा विकास आराखडा रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतानाच सुनील माने यांनी, हा विकास आराखडा करण्याचे काम सुरू असताना मुंबईतून दोन खासगी व्यक्ती पुण्यात येऊन या कामात सहभागी होत होते. या प्रकरणात रोख रक्कम आणि चेकने सुद्धा व्यवहार झाल्याची आमची माहिती आहे, असा आरोप केला आहे. काही अधिकाऱ्यांची वाढलेली मालमत्ता, त्यांनी विकत घेतलेल्या जमिनी याबाबत ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी या प्रकरणात सर्वांवर जबाबदारी निश्चित करून दोषी असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विकास आराखडा रद्द झाल्याने पुणे परिसराचे नियोजन पुन्हा अनेक वर्षे मागे गेले आहे. या नुकसानीस जबाबदार कोण हे सरकारला निश्चित करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी लागेल. अन्यथा जनतेचा वेळ, पैसा आणि परिश्रम, हे अर्थशून्य होईल. त्यामुळे या संबंधित सर्वांची चौकशी केली पाहिजे.
यानंतर विकास आराखडा करताना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील तज्ञ व नागरिक यांचा सहभाग घ्यावा. ठिकठिकाणी चर्चासत्रे व कार्यशाळा घेऊन लोकांना सहभागी करावे. बांधकाम व्यवसायिकांना, खासगी व्यक्तींना या प्रक्रियेपासून दूर ठेवावे आणि कालबद्ध नियोजन करून विकास आराखडा लोकांसमोर आणावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.


Recent Comments