Newsworldmarathi Tuljapur : समाजामध्ये जाती-धर्माच्या भिंती समज-गैरसमजातून रुंदावत चाललेल्या असताना अजूनही प्रेम, माणुसकी, भूतदया जिवंत असल्याची सुखद घटना अणदूर (ता. तुळजापूर) येथे पाहायला मिळाली. अणदूर येथील पाटील तांड्यावरील शेतकरी राजूभाई शेख व कुटुंबीयांकडे असलेलया एका बैलाचे सोमवारी निधन झाले होते. त्यांनी त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत.
आपल्याकडे असलेले गाय, बैल, म्हैस, कुत्रा यापैकी ब्रध्दापकाळाने किंवा अन्य कारणाने निधन झाले की त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याची वडीलांनी सुरू केलेली परंपरा आजही सुरू ठेवली आहे.
राजूभाई शेख हे परंपरागत शेतकरी आहेत. त्यांच्या मागील दोन पिढ्या येथे वास्तव्यास आहेत. शेती हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. त्यांच्याजवळील गाय, बैल, म्हशी, कुत्रे आदीवर जिवापाड प्रेम करुन त्यांचे संगोपन करण्याचा त्यांना छंद आहे. विशेष म्हणजे आपल्याजवळील एकही गाय किंवा बैलाची ते कधीही विक्री करीत नाहीत. जोपर्यंत गाय दुध देते व बैल शेतीच्या कामात चालतो तोपर्यंत त्यांच्याकडून काम करवून घेतात.
काही शेतकरी गाय-बैल म्हातारे झाले की त्यांची कसायाला विक्री करतात. तर कांही शेतकरी आपल्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या वयोमर्यादा संपल्यावरही कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम करुन अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा सांभाळ करतात, असं राजूभाई शेख यांनी सांगितले.


Recent Comments