Newsworldmarathi Mumbai : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे रुळालगत भांडण करत असलेल्या तीन मित्रांपैकी दोघांनी रेल्वे रूळ ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्न करताना वेगात आलेल्या लोकलच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऐरोली व दिघा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे. सागर संजीव सोनवणे (वय-२२), सचिन छबुराव रोकडे (वय-२४) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या अपघाताप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर सोनवणे आणि सचिन रोकडे हे ऐरोली नाका परिसरात राहत होते. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सागर आणि सचिन व त्यांचा तिसरा साथीदार नरेश सोनवणे (वय-२७) हे तिघेही ऐरोली व दिघा गाव या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाजवळ एकमेकांसोबत भांडण करत होते.

या भांडणादरम्यान नरेश दोघांना मारण्यासाठी त्यांच्या मागे धावला असता सागर आणि सचिन या दोघांनी त्याच्यापासून दूर पळून जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने सागर आणि सचिन या दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सागर व सचिन या दोघांचा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती रेल्वे पोलिसांना आणि आरपीएफच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतदेह ठाणे येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये पुढील कार्यवाहीसाठी पाठवून दिले. या अपघाताप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाणे यांनी दिली आहे.


Recent Comments