Newsworldmarathi Mumbai: राज्यातील ग्रामीण, शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्र असणाऱ्या अंगणवाडी, विविध माध्यमांच्या शाळांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
त्यानुसार राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांना छायाचित्रांसह संबंधित माहिती येत्या ३० एप्रिलपर्यंत अॅपवर नोंदवणे बंधनकारक केले आहे. शिवाय संबंधित शाळांनी भरलेल्या माहितीची खातरजमा करण्याची जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
शाळांना त्यांचा युडायस कोड किंवा युडायस प्लसमधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी नोंदवलेला मोबाइल क्रमांक टाकून या अॅपमध्ये लॉगिन करावे लागणार आहे. त्यानंतर शाळेची युडायस प्लसमध्ये भरलेली माहिती या अॅपमध्ये दिसेल.
शाळेचे जीआयएस करून शाळेचे नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण ५ फोटो समाविष्ट करावे लागतील. हा अर्ज भरताना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो, माहिती अद्ययावत करण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘महास्कूल जीआयएस’ अॅप विकसित
शाळांचे ठिकाण, भौगोलिक अंतर आणि उपलब्ध सोयीसुविधांची माहिती मिळवण्यासाठी राज्य शासनाने सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘महास्कूल जीआयएस’ हे अॅप विकसित केले आहे. या अॅपमध्ये शाळेचे नाव, संपूर्ण इमारत, किचन शेड, स्वच्छतागृहाची सुविधा, पाण्याची सुविधा यांचे फोटो अपलोड करून माहिती भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांकडे देण्यात आली आहे. ही माहिती शैक्षणिक सुधारणा, पायाभूत सुविधांचे नियोजन आणि संसाधनांचे वितरण यासाठी महत्त्वाची ठरेल.या जिओ टॅगिंग प्रक्रियेमुळे राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.


Recent Comments