Newsworldmarathi Mumbai: काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील सहा जणांच्या कुटुंबीयांना येत्या महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरवण्यात यावे. तसेच या कुटुंबातील व्यक्तींना राज्य सरकारने शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रीतील ६ व्यक्तींच्या कुटुंबीयांपैकी एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी. पुण्यातील संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिचे कायद्याचे शिक्षण पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देऊन महाराष्ट्रीची सेवा करण्याची संधी द्यावी, असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
जम्मू-काश्मीर या राज्यातील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांची हत्या करून दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील डोंबिवलीमध्ये राहणारे संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने हे तिघे जण, पनवेल येथे राहणारे दिलीप देसले, पुण्यामध्ये राहणारे कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे हे हे मरण पावले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही घटना आपल्या भारतावर झालेला हल्ला असून या दहशतवादी कारवाईचा निषेध करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत नागरिक एकजूट झाले आहेत. आम्ही सर्वजण एक देश म्हणून भारत सरकारच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. या घटनेचे वृत्तांत ऐकूनच अंगाचा थरकाप उडतो, मग प्रत्यक्ष अनुभवलेल्या नागरिकांची काय स्थिती असेल याची कल्पनाही केली जात नाही, असं त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना म्हणाल्या की, आपल्या घरातील कर्त्या पुरुषांना दहशतवादी अगदी टिपून-टिपून मारत असताना इतर कुटुंबीयांनी या कठीण प्रसंगाचा धीरोदात्तपणे सामना केला. या या संपूर्ण घटनेत त्यांनी दाखवलेली हिंमत अतिशय मोलाची आहे. आपली जीवाभावाची माणसे डोळ्यांदेखत मारली जात असताना अशी हिंमत दाखवणे सोपे नाही, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
Recent Comments