Newsworldmarathi Pune : भारत सरकारने केलेल्या मोहिमेला दिलेले ऑपरेशन सिंदूर हे नाव योग्य आहे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. त्यांनी कारवाईला पाठिंबा दर्शवला असून, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला निर्णय समर्थनीय असल्याचे सांगितले. राष्ट्रीय एकात्मतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्वपक्षीय सहकार्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. “हा संपूर्ण निर्णय योग्य प्रकारे घेतला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. काल रात्री भारताने केलेल्या कारवाईनंतर आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
पवार यांनी सांगितले की, या विषयात राजकारण न आणता सर्वपक्षीय बैठक झाली आणि त्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. “या मुद्यावर आम्ही सर्वजण एकत्र आहोत,” असे सांगत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर एकीचे महत्त्व अधोरेखित केले.
पवार यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिक्रियांवरही भाष्य केले. “अमेरिका, जपान आणि अनेक देशांनी भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे, मात्र काळजीची बाब म्हणजे चीनने अजूनही अशी कोणतीही भूमिका घेतलेली नाही,” असे ते म्हणाले. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले.
पाकिस्तानच्या भूमिकेवर भाष्य करताना पवार म्हणाले, “आपल्याला माहित नाही की पाकिस्तान काय करेल, पण त्यांना स्वतःची ताकद आणि भारताची ताकद याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहावे लागेल.”
ते पुढे म्हणाले की, “पाकिस्तानची आर्थिक कोंडी कशी करता येईल, हे पाहण्याचे धोरण चुकीचे नाही. आणि या मोहिमेला दिलेले नाव योग्य आहे.” अशा शब्दांत पवार यांनी देशाच्या भूमिकेचे समर्थन करत सर्वपक्षीय सहकार्याची भावना अधोरेखित केली.


Recent Comments