Newsworldmarathi Pune: देश सीमेपलीकडील तणावाच्या पार्श्वभूमीवर एकतेच्या धाग्यांनी बांधला जात असताना, पुण्यातून वातावरण दूषित करणारे राजकारण करणे ही खेदजनक बाब आहे, अशी तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केली आहे.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेस व भाजपच्या कालखंडाची तुलना करत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्याला उत्तर देताना आबनावे यांनी भाजपवर वेळ, काळ आणि मर्यादेचे भान न ठेवता भेदभावाचे बीज पेरत असल्याचा आरोप केला.
“केंद्रीय मंत्रिपदाच्या शपथेसोबत जबाबदारीची जाणही लाभावी, ही सहज अपेक्षा आहे. मात्र सध्याच्या नाजूक स्थितीत वैयक्तिक स्वार्थासाठी मतभेदांच्या राखेत ठिणगी टाकणे ही नीतिमत्तेची नव्हे तर संवेदनशीलतेचीही विफलता आहे,” असे आबनावे म्हणाले.
“देश सजग आहे, संसद एकमताने सज्ज आहे आणि जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत आहे. अशा काळात द्वेषाचे राजकारण करणे अयोग्यच नव्हे, तर अशोभनीय आहे. अटलजींच्या ‘राजकारण ही राष्ट्रसेवा’ या विचारांची आज पुन्हा आठवण करून देण्याची वेळ आहे,” असेही ते म्हणाले.
राजकारण करताना संयम राखणे, समाजात फूट न पाडता ऐक्याचे वातावरण ठेवणे हीच खरी देशसेवा असल्याचे आबनावे यांनी स्पष्ट केले.


Recent Comments