Newsworldmarathi Pune: पीएमपी प्रशासनाने अलीकडेच प्रवास भाडेवाढ केल्यामुळे महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढला आहे. यामुळे ही भाडेवाढ तत्काळ कमी करावी, अशी मागणी माजी नगरसेविका राणी भोसले यांनी पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे निवेदानाद्वारे केली आहे.
राज्य शासनाने एसटी प्रवासात महिलांना सवलत देऊन स्तुत्य पाऊल उचलले आहे. तशीच सवलत पीएमपी प्रवासातही महिलांना मिळावी, जेणेकरून त्यांच्या आर्थिक अडचणी कमी होतील, असे भोसले यांनी नमूद केले.
कात्रज लेक टाऊन सोसायटी ते पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर या मार्गावर सुरू असलेल्या बससेवेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र, लक्ष्मीनगर सोसायटी परिसरातील रस्त्याच्या कामामुळे सद्यःस्थितीत ही सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. परिणामी, परिसरातील महिला व नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
या मार्गावरील बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणीही भोसले यांनी निवेदनात केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना दीपा मुधोळ-मुंडे यांनी संबंधित मागण्यांवर वरिष्ठस्तरावर लवकरच चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे भोसले यांनी सांगितले.
या मागण्यांमुळे सामान्य प्रवाशांच्या अडचणी दूर होतील व महिलांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Recent Comments