Newsworldmarathi Pune : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक हवामानविषयक माहिती समोर आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो शुक्रवारी (२३ मे) तीव्र कमी दाबाच्या पट्टयात रूपांतरित झाला आहे. अद्याप या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झालेले नसले, तरी या हवामानातील बदलामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे, २४ ते २८ मे या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः रविवार (२५ मे) रोजी संपूर्ण राज्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शुक्रवारी दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले असून, ते पुढील २४ तासांत उत्तरेकडे सरकणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलंगण ओलांडून दक्षिण छत्तीसगडपर्यंत पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे.
या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी ठेवावी, तसेच निचऱ्याची व्यवस्था करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. राज्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Recent Comments