बीड: बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या संदर्भात केलेल्या आरोग्य तपासणी मधून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकूण ७८ हजार महिला ऊसतोड कामगारांपैकी ८४३ लाडक्या बहिणींनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याचे समोर आले आहे. यात ३० ते ३५ वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे. तसेच १५२३ महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात मोळी आणि कोयता घेऊन काम करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्भपिशवी काढण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ऊसतोड मजूर हे २०२४ मध्ये दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात ऊस तोडणीसाठी स्थलांतरित झाले होते. आरोग्य विभागाकडून ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याप्रमाणे याचा अहवाल तयार झाला आहे. या अहवालात ऊस तोडणीला जाणाऱ्या महिलांना विविध आजार असल्याचे समोर आले आहे.
लोहाची कमतरता, बी-१२ आणि फॉलिक ॲसिडची कमतरता, थॅलसेमिया, मासिक पाळी, शस्त्रक्रिया किंवा इतर कारणांमुळे रक्तस्त्राव झाल्यास रक्तक्षय होतो. असाच त्रास असणाऱ्या ऊसतोड महिलांची संख्या ३ हजार ४१५ एवढी आहे. यातील ७३ महिलांना तीव्र रक्तक्षय आहे. या सर्व महिलांवर उपचार करण्यात आले आहेत.
Recent Comments