Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले विशेष महानिरीक्षक (कारागृह) जालिंदर सुपेकर यांच्यावर आता आणखी गंभीर आरोपांची मालिका समोर येत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी सुपेकर यांच्यावर तब्बल 150 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
वकील निवृत्ती कराड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सुपेकरांनी अमरावती कारागृहात कैद असलेल्या नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या मुलगा गणेश गायकवाड यांच्याकडून जामिनाच्या मोबदल्यात तब्बल 550 कोटी रुपये मागितले होते. कराड यांनी या प्रकरणी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून त्यांनी या प्रकरणाचे अनेक धक्कादायक तपशील उघड केले आहेत.
गायकवाड यांचे बँक लॉकर, सोनं व मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम जप्त करताना जालिंदर सुपेकर आणि तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मिळून 100 ते 150 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे जप्ती दरम्यान झाले असून, याची चौकशी व्हावी, अशी मागणी कराड यांनी केली आहे.
कराड यांनी असा दावाही केला की, अमरावतीला स्थानांतर केल्यानंतर सुपेकर यांनी दोघा कैद्यांना धमकावले व मारहाण केली. “तुम्ही मला पैसे दिले नाही, तर तुम्हाला जामीन मिळणार नाही, मीच तुम्हाला अडकवले आहे,” असे म्हणत सुपेकर यांनी दबाव टाकल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर, सुपेकरांनी कारागृहातील अधिकाऱ्यांना या कैद्यांना छळण्याचे आदेश दिले होते. जे अधिकारी त्यात सहभागी झाले नाहीत, त्यांना निलंबित करण्यात आले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर कारागृहातच एका कैद्याने नानासाहेब गायकवाड यांच्या गळ्यावर पत्र्याने वार केल्याची घटना घडली असून, यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही प्रकरणे उघड झाल्याने महाराष्ट्रातील तुरुंग प्रशासन आणि पोलीस विभागातील कार्यप्रणालीवर अनेक प्रश्नचिन्हं उभी राहिली आहेत. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? आणि सुपेकर व संबंधितांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Recent Comments