Newsworldmarathi Mumbai: महाराष्ट्रात काही दिवस पावसाचा जोर कमी झाला असला, तरी आता हवामान खात्याने पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या २-३ दिवसांत राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले भरून वाहत असून, धरणांतही जलसाठा वाढताना दिसतोय.
या जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट
पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबईसह कोकणातही वाऱ्याचा जोर
मुंबई आणि उपनगरांत पुढील २४ तासांत ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकणातही काही भागांत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह वादळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात
या भागांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
विदर्भात मान्सूनचं आगमन कधी?
२८ मे रोजी गडचिरोलीत आलेला मान्सून आठवडाभर तिथेच अडकलेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १३-१४ जून दरम्यान यवतमाळ, अमरावती, अकोला या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय होईल. १७-२० जूनदरम्यान पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. तोवर विदर्भात तापमान ३९-४० अंशांच्या घरात राहील, त्यामुळे उकाडा काहीसा कायम राहण्याची शक्यता आहे.
Recent Comments