Newsworldmarathi Pune: राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतो आहे. गेल्या २४ तासांत ९८ नवे रुग्ण आढळून आले असून, त्यात मुंबई आणि पुणे महापालिका क्षेत्रात प्रत्येकी ३४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमध्ये चिंता वाढली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये १०, तर पुणे ग्रामीण भागात ४ रुग्ण सापडले आहेत.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात १ जानेवारी ते ५ जूनदरम्यान १४,५६५ संशयित रुग्णांची करोना चाचणी झाली असून, त्यातील १,१६२ जणांना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यात मुंबईतील सर्वाधिक ५७५ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ५४८ रुग्ण उपचाराखाली, तर ५९७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
मृत्यूंचे प्रमाण कमी, पण सहव्याधी असणाऱ्यांना अधिक धोका
या कालावधीत राज्यात १७ मृत्यूंची नोंद झाली असून, त्यातील १६ रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. मृतांमध्ये मूत्रपिंडविकार, कर्करोग, फुफ्फुस विकार, ब्रेन स्ट्रोक, मधुमेह, क्षय अशा गंभीर आजारांचा समावेश होता.
आरोग्य विभागाचा संदेश
“सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी लक्षणे सौम्य असूनदेखील दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे,” अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.
Recent Comments