Newsworldmarathi Mumbai: Uddhav Thackeray mocks Nitesh Rane : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित भव्य कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवताना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांची ठाकरी शैलीत खिल्ली उडवली. “उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कोणासारखे माहीत नाही,” असा खोचक टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी नितेश राणेंच्या ‘बाप’ वक्तव्याचा समाचार घेतला. “कोणता तरी एक बाप ठरवा पहिल्यांदा,” असे म्हणत त्यांनी नितेश राणेंना डिवचले, ज्यामुळे सभागृहात हशा पिकला.
“कम ऑन, किल मी! पण अॅम्ब्युलन्स घेऊन या”
उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना थेट आव्हान देताना म्हटले, “हिंमत असेल तर अंगावर या, पण येताना अॅम्ब्युलन्स घेऊन या. येताना सरळ याल, पण जाताना आडवे व्हाल!” यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही टीकास्त्र सोडले. “देशाला पंतप्रधानाची गरज आहे, फक्त भाजपला पंतप्रधान आहे. देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, घरफोड्या अमित शहांची नाही. संरक्षणमंत्र्याची गरज आहे, गुंडांना अभय देणाऱ्या राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीसांची नाही,” असे घणाघाती टीका करत त्यांनी उपस्थित शिवसैनिकांचा उत्साह वाढवला.
महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात हिंदीची सक्ती कदापि होऊ देणार नाही. हिंमत असेल तर गुजरातमध्ये जा आणि तिथे हिंदीची सक्ती करून दाखवा!” त्यांनी ‘गद्दार मिंध्यां’वरही जोरदार टीका केली आणि शिवसेनेच्या 59 वर्षांच्या इतिहासाचा गौरव करताना म्हणाले, “आमचा नेता एकच, भगवा एकच, दैवत एकच आणि विचार एकच आहे.”
नितेश राणेंवर वैयक्तिक हल्ला
नितेश राणे यांच्या सततच्या वैयक्तिक टीकेवर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. “तुझी पार्श्वभूमी काय? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? आणि तू शिवसेनेवर बोलतोस? तुझा जीव काय, तू बोलतोस काय?” असे कठोर शब्द वापरत त्यांनी नितेश राणेंना सुनावले. यावेळी सभागृहात ‘नेपाळी, नेपाळी’ असे आवाज घुमले, ज्यावर उद्धव ठाकरे यांनी हसत हसत पुढील टीका केली.
हिंदू-मुस्लिम भांडणांवर टीका
भाजपवर हिंदू-मुस्लिम भांडणे लावण्याचा आरोप करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपचा एक बेडूक सतत ओरडत आहे, त्याला तेवढंच काम दिलं आहे.” त्यांनी धर्माच्या नावावर भांडणे लावण्याच्या राजकारणावरही तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेचा दमदार संदेश
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना एकजुटीने लढण्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण करण्याचे आवाहन केले. “59 वर्षांनंतरही शिवसेना बलशाली आहे. आमचा भगवा आणि विचार अढळ आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्याचे संकेत दिले आणि विरोधकांना पुन्हा एकदा सावध राहण्याचा इशारा दिला.
या कार्यक्रमाने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून, उद्धव ठाकरे यांच्या ठाकरी शैलीतील टीकेने विरोधकांना चांगलाच इशारा दिला आहे.
Recent Comments