Newsworldmarathi Pune: भारतातील पाईप्स आणि फिटिंग्ज क्षेत्रातील अग्रगण्य फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्ज तसेच त्यांच्या मुकुल माधव फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “भारतात पाईप्स म्हटले की फिनोलेक्स हे नाव सर्वप्रथम समोर येते. ‘फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावानी’ ही ओळ अनेक दशकांपासून सर्वांच्या परिचयाची आहे. गेल्या ४५ वर्षांत फिनोलेक्सने महाराष्ट्रासह देशाच्या विकासात मोठे योगदान दिले असून, उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वही प्रभावीपणे पार पाडले आहे.”
महाराष्ट्राची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या आषाढी वारीमध्ये मुकुल माधव फाउंडेशन गेल्या ३० वर्षांपासून वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत आहे. या उपक्रमामुळे लाखो वारकऱ्यांना थेट लाभ मिळत असून, वारी अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, यंदा वारकऱ्यांना तीन लाखांहून अधिक बॅग, ५० हजार रेनकोट तसेच ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी आधाराच्या काठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन करण्याची संधी मिळणे ही आनंदाची बाब आहे.उद्योग आणि समाजसेवा यांचा समतोल साधत फिनोलेक्सने समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली असून, महाराष्ट्रातील अशा सेवाभावी उपक्रमांचा अभिमान वाटतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


Recent Comments