Newsworldmarathi Pune: पुणेकरांसाठी आणि पुण्यात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे आळंदी येथे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आणि वारकरी नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन दिवस आधी पुण्यात मुक्कामासाठी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच शहरात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महापालिकेने आज रात्री १२ वाजेपासून ते येत्या १२ जुलैपर्यंत शहरातील पाणी कपात पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या कालावधीत पुणेकरांना नियमित आणि अखंड पाणीपुरवठा केला जाणार आहे. वारकरी संप्रदायाच्या लाखो भाविकांच्या मुक्कामादरम्यान पाणीपुरवठा सुरळीत राहावा आणि कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
या निर्णयामुळे वारकऱ्यांसोबतच पुणेकरांनाही मोठा दिलासा मिळाला असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी कपातीपासून नागरिकांची तात्पुरती सुटका झाली आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, नियमित पाणीपुरवठ्यामुळे शहरातील दैनंदिन व्यवहारही सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.


Recent Comments